विवेक प्रकाशनने नुकताच प्रकाशित केलेला ‘पुस्तक त्रिवेणी’ संच हा यमगरवाडी, तलासरी व बारीपाडा या तीन सामाजिक प्रकल्पाची गाथा मांडणार्या पुस्तकांचा संच आहे. डॉ. रमा गर्गे यांनी या तिन्ही पुस्तकांचा स्वतंत्रपणे परिचय करून दिला आहे.
जसे माणसांचे नशीब वेगवेगळे असते, तसे पंचमहाभूतांचेही दैवयोग ठरलेले असतात. एखाद्या नदीच्या काठाला तीर्थक्षेत्र म्हणून मान्यता मिळते, तर एखादे स्थान पवित्र देवालय होऊन जाते. असाच यमगरवाडीच्या जमिनीला एक अद्भुत सेवा प्रकल्प आपल्या अंगावर रुजवून घेण्याचा योग प्राप्त झाला. त्या मातीने सांगितलेली ही कहाणी आहे.
पुस्तक online खरेदी करण्यासाठी
अशा प्रकारच्या पुस्तकांमध्ये एक धोका नेहमी असतो आणि तो म्हणजे गोष्टी वाढवून सांगणे. कारण भावनेच्या रसाने जेव्हा कहाणी लिहिली जाते, तेव्हा तिच्या कोणत्याही प्रकारच्या विस्ताराला बंधन घालणे तसे गरजेचे राहत नाही. परंतु लेखक येथे अतिशय समतोलपणे घडलेल्या घटना जशाच्या तशा सांगतो. सांगताना त्यामध्ये भावनेची पेरणी करत जातो. हे एका अर्थाने करुण रसाने भरलेले असे काव्य आहे, त्याचप्रमाणे वीररसाने भारलेल्या कार्यकर्त्यांची सेवागाथा आहे.
म्हणूनच यमगरवाडी कौतुकाने म्हणते, ‘आंदोलने, मेळावे, मोर्चे यातून भटके-विमुक्त परिषद सर्वत्र पोहोचत होती आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे माझा - म्हणजे यमगरवाडी प्रकल्पाचा डांगोरा पिटला जात होता. एका अर्थाने मला केंद्र मानूनच व्याप विस्तार वाढत होता. बर्याच वेळा विविध समस्यांवर उत्तरे शोधणार्या बैठका यमगरवाडीत झाल्या. काही नवे करायचे आहे, मग ती संघटनात्मक रचना असू दे किंवा समाजघटक जोडणे असू दे, सारे सारे पहिल्यांदा येथेच ठरले. याच भूमीत स्वप्नांच्या बिया पेरल्या आणि त्यांची तयार केलेली रोपे महाराष्ट्रात विविध ठिकाणी लावून त्यांची वाढ केली गेली. यमगरवाडी प्रकल्पातून प्रेरणा घेऊन पुढच्या काळात शेकडो नवे विषय हाती घेतले गेले आणि तडीस नेले गेले.’
एक-दोन कार्यकर्त्यांची ही गाथा नाही. संघाच्या प्रकल्पाचे हे वैशिष्ट्य सांगता येईल की, प्रकल्प व्यक्तिकेंद्रित नसतो. विशिष्ट कुटुंबाच्या नावाने तो ओळखला जात नाही. या मातीने हे नेमकेपणाने हेरले, म्हणूनच गिरीश प्रभुणे, दादा इदाते, रमेश पतंगे यांच्याविषयी यमगरवाडी जितकी बोलते, त्यांच्यावर जीव टाकते, तितकीच अभिमानाने ती रेखाबद्दल बोलते, सुवर्णाताईचे नाव घेते, सुजातादीदीबद्दल, खंडू काळेबद्दल बोलते.
ही माती अभिमानाने म्हणते, ‘आमची मुले ज्या क्षेत्रात गेली, त्या क्षेत्रात त्यांनी आपली नाममुद्रा उमटवली. ‘मेड इन यमगरवाडी’ नावाचा ब्रँड त्यांनी तयार केला.’
रवींद्र गोळे यांना वारंवार आपल्याकडे बोलावून या मातीने हे सारे त्यांच्याकडून लिहून घेतले, असेच ही कथा वाचताना लक्षात येते. एका ओसाड माळरानाचे पुण्यक्षेत्र कसे झाले, त्या कायापालटाची ही कथा. एखाद्या पवित्र पारायण ग्रंथासारखी.