अष्टावक्र संहितेला ‘गीता’ असे म्हटले जाते. गीता म्हणजे ‘गायले गेलेले’. गीत अनेक जणांच्या हृदयाला स्पर्श करू शकणारे असते. गीत नेहमी ताजे असते. आत्मिक, मौलिक आणि वेळेवर तयार झालेले असते. ते नूतन असते आणि सखोल असते. म्हणूनच जेव्हा तत्त्वज्ञान हे केवळ बौद्धिक पातळीवर नसते, तर हृदयापर्यंत, आत्मिक स्तरावर पोहोचते तेव्हा त्यास गीता म्हटले जाते. श्रीमद्भगवद्गीता, उद्धवगीता, व्याधगीता आणि अष्टावक्र गीता ही त्याची उदाहरणे आहेत.
अष्टावक्र संहितेमध्ये 20 अध्याय व 298 सूत्रे आहेत. सूत्रे ही कमीत कमी शब्दांत अधिक आशय सांगणारी असतात. ही सूत्रे अष्टावक्र मुनींनी जनकाला सांगितली. अष्टावक्र हे मुनी होते. मुनी म्हणजे मनन करणारा. मौन पाळणारा! राग-द्वेषरहित अशी व्यक्ती. ऋषी आणि मुनी हे दोन शब्द बर्याच काळापासून एकाच अर्थाने वापरले जात असले, तरी एकेकाळी ह्या दोन्हींचा विशिष्ट अर्थ होत असे. श्रुती समजणारा, ऋष म्हणजे वेदवचने बघणारा (अवतरित होताना), यज्ञ करणारा आणि वेदानुसार जीवन जगणारा तो ऋषी होय. ‘ऋषति प्राप्नोति सर्वांन मन्त्राण। ज्ञानेन पश्यति संसार पारं वा।’ ज्ञानाच्या डोळ्यांनी संसाराच्या पलीकडचे बघणारा तो ऋषी.
असेही म्हटले जाते की नंतरच्या कालखंडात आलेल्या बुद्धिस्ट झेन ध्यानाचे बीज अष्टावक्र संहितेमध्ये आपणास दिसून येते. हे म्हणण्याचे कारण म्हणजे, ज्या वेळी अष्टावक्रांनी जनकाला अचानक थांबण्यास सांगितले, त्या वेळी जी स्थिती होती, अशा प्रकारच्या स्थितीत शिष्याला थांबवणे हे झेन गुरू करत असतात. तसेच “तुला आत्ता आणि याच ठिकाणी लगेच वैराग्य आणि मुक्ती मिळू शकेल” असे मुनी अष्टावक्र म्हणतात! हे वाक्यही झेन साधनेत नित्य म्हटले जाते. अश्वघोष याने लिहिलेल्या बुद्धचरित्रात राजा जनकाचा बोधिप्राप्त व्यक्ती म्हणून आदरपूर्वक उल्लेख आढळतो!
मुमुक्षू अशा जनकाने अष्टावक्रांना विचारले की “हे प्रभो, ज्ञान कसे प्राप्त होते? मुक्ती कशाने मिळते? आणि वैराग्य कशा प्रकारे प्राप्त होते? हे मला सांगा.” यामध्ये ज्ञान, मुक्ती आणि वैराग्य ह्या तीन संकल्पना सुरुवातीलाच येतात.
हे तीन शब्द एका कथेची आठवण करून देतात, ती म्हणजे विवेकानंदांची कथा. असे म्हटले जाते की रामकृष्ण परमहंस यांनी विवेकानंदांना ‘अष्टावक्र गीता’ हे एकमेव पुस्तक आवर्जून वाचण्यास सांगितले होते. त्यांच्याच एका कथेमध्ये आपणास याच तीन शब्दांचा उल्लेख आढळतो.
जेव्हा विवेकानंदांना काही घरगुती अडचणी सतावत होत्या, त्यांची आई त्या अडचणींमुळे स्वस्थ नव्हती, तेव्हा विवेकानंद रामकृष्ण यांना म्हणाले की “मला आईला या अडचणीमधून बाहेर आणायचे आहे. काय करू?” तेव्हा रामकृष्णांनी सांगितले की “आत जा, कालीमातेसमोर उभा राहा आणि तिला हवे ते माग.”
कालीमातेसमोर उभे राहिल्यानंतर विवेकानंदांच्या तोंडून आपसूक शब्द बाहेर पडले, “मुक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे.” हीच गोष्ट एकामागोमाग एक तीन वेळा घडली. तिन्ही वेळेला विवेकानंद आपल्या सांसारिक अडचणीतल्या काहीही गोष्टी कालीमातेकडे मागू शकले नाहीत आणि त्यांनी केवळ ‘मुक्ती, ज्ञान आणि वैराग्य’ मागितले.
ही कथा मुमुक्षू मनुष्याचे यथार्थ वर्णन करते. विवेकानंद जेव्हा गर्भगृहात मातेसमोर उभे राहतात, तेव्हा ते संसारातील अडचणी विसरतात आणि आतून जे हवे आहे ते स्वाभाविकपणे बाहेर येते. रामकृष्ण तीन वेळा त्यांना परत परत पाठवतात आणि तिन्ही वेळेला तीच गोष्ट पुन:पुन्हा मागितली जाते. सुखदुःख, अडचणी असणारच. पण जेव्हा आतून मुक्ती, ज्ञान आणि वैराग्य हवे असेल, तेव्हाच मनुष्य खर्या अर्थाने मुमुक्षू असतो. संसार कधीही संपत नाही. मात्र त्याच्याशी सतत जोडलेले राहणे आवश्यक नसते.
वरवरच्या इच्छांची आवरणे दूर होऊन जेव्हा आंतरिक मूळ इच्छा दिसते, तेव्हा मनुष्य या मार्गाकडे वळतो. मनुष्याला स्वाभाविकपणे शांती हवी असते. तीच त्याची आंतरिक अभिप्सा असते. त्याची सतत धडपड त्याच दिशेने असते. ही मूळ इच्छा पूर्ण होत नाही, तोवर मनुष्य विविध प्रकारच्या इच्छांमागे धावत असतो. मात्र जेव्हा हा सर्व भ्रम संपतो आणि आपल्याला मुक्ती, ज्ञान आणि वैराग्य हेच हवे आहे व आपल्या सर्व धडपडीमागे याच तीन मूळ इच्छा आहेत हे ध्यानात येते, तेव्हा तो या ज्ञानाचा अधिकारी ठरतो.
अष्टावक्र जनकाला म्हणतात, “जर तुला खरोखरच मुक्ती मिळवण्याची इच्छा उत्पन्न झाली असेल, तर तुला विषयांना विष समजून त्यागले पाहिजे आणि क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य यांना अमृत समजून धारण केले पाहिजे.”
सुरुवातीच्या या दोन सूत्रांमध्ये ‘ज्ञान, मुक्ती, वैराग्य, विषय, क्षमा, आर्जव, दया, संतोष आणि सत्य’ हे पारिभाषिक शब्द आलेले आहेत.