भारतविरोधी जागतिक बोभाटा

विवेक मराठी    13-May-2021
Total Views |

भारताची जागतिक पातळीवर बदनामी करताना मोदी, भाजपा, संघ यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून (कु)तर्काचे तारे तोडले जातात आणि त्याचा गवगवाही मोठ्या प्रमाणात केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा भारताच्या बदनामीचा हा डाव असून तो मोठ्या चलाखीने आणि धूर्तपणे खेळला जातो आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.


sampadkiy_1  H
 
सत्य पायात चपला घालून घराबाहेर पडण्याआधी असत्याने गावभर बोभाटा केलेला असतो’, किंवाखोटी माहिती वारंवार विविध माध्यमांतून मांडली तर ती खरी वाटू लागते’, किंवाखोटं बोल पण रेटून बोलअशी वाक्ये आपण बर्याच वेळा ऐकलेली असतात. आज ही वाक्ये पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, ‘भारत कोरोना महामारीला रोखण्यात अयशस्वी झाला आहे’, ‘नरेंद्र मोदींच्या सरकारने कोरोना काळात कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही’, ‘भारतात कोरोनाविषयी योग्य नियोजन होत नसून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे’, ‘भारतात मृत्यूचे तांडव सुरू आहेअशा शीर्षकाचे आणि आशयाचे लेख, बातम्या न्यूयॉर्क टाइम्स, वॉशिंग्टन पोस्ट, गार्डियन इत्यादी आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रांत छापून आल्याने आणि त्यावरून अंदाज बांधत विदेशात स्थायिक झालेले भारतीय अस्वस्थ होत आहेत. त्यांच्या मनात भय निर्माण झाले आहे. ज्याच्या मनात भारताविषयी श्रद्धाभाव असतो, त्यांना अशा बातम्यांमुळे भारताच्या भविष्याविषयी शंका वाटू लागते. आंतरराष्ट्रीय पातळीवर टीका होते म्हणजे ती खरीच असणार, असा समज बहुसंख्य भारतीय करून घेतात. मात्र हा असत्याचा जगभर चाललेला बोभाटा आहे. मागील काही दिवसांपासून अशा प्रकारचा बोभाटा सातत्याने चालू असून, जगाला भारतातील वास्तवाचा परिचय करून देण्याचा त्याचा उद्देश नसून भारताची, मोदींची बदनामी करण्याचा आणि अनिवासी भारतीयांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा उद्देश आहे.

सरकारवर टीका करण्याचा हक्क लोकशाहीने दिला आहे. परंतु जी टीका केवळ संघ किंवा मोदी यांच्या द्वेषापायी केली जाते, तिचा उद्देश काही त्रुटी दाखवणे किंवा सुधारणा घडवून आणणे असा नसून द्वेषभावना निर्माण करून देशवासीयांच्या मनात न्यूनगंड निर्माण हा तिचा उद्देश असतो. म्हणून त्याचा समाचार घेणे भाग आहे.

भारताची जागतिक पातळीवर बदनामी करताना मोदी, भाजपा, संघ यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे करून (कु)तर्काचे तारे तोडले जातात आणि त्याचा गवगवाही मोठ्या प्रमाणात केला जातो. आंतरराष्ट्रीय पातळीवरचा भारताच्या बदनामीचा हा डाव असून तो मोठ्या चलाखीने आणि धूर्तपणे खेळला जातो आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.

वर उल्लेख केलेल्या वृत्तसंस्थांना भारताबद्दलची माहिती कोण उपलब्ध करून देते? त्यांचे अधिकृत प्रतिनिधी भारतात असतात का? या प्रश्नांचे उत्तर नाही असेच आहे. भारतात राहणारेच लोक अशा वृत्तसंस्थांसाठी लिखाण करत असतात. कोणी कोठे लिखाण करावे याविषयी सर्वांना मुक्त स्वातंत्र्य असले, तरीही विशिष्ट प्रकारच्या भूमिका घेऊन लिखाण करणारे, ज्या भूमिकेमुळे देशाची जागतिक पातळीवर बदनामी होते हे लक्षात येऊनही लिखाण करणारे लोक भारतातीलच आहेत. भारतात राहून भारताची बदनामी करत आहेत.

कोण आहेत हे लोक? आणि भारताची बदनामी करणारे लेख ते का लिहीत आहेत? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. करणदीप सिंग, समीर याशिर, जेफरी जटलमन, हरिकुमार, महंमद सरताज आलम, निहा मसिह, विद्या कृष्णन ही यापैकी काही नावे आहेत. ही नावे म्हणजे हिमनगाचे आपल्याला दिसणारे टोक आहे. अशी असंख्य नावे घेता येतील, जी वर उल्लेख केलेल्या माध्यमातून भारतविरोधी लिखाण करत असतात. या मंडळींनी शाहीनबाग, एल्गार परिषद, 370 विरोधात किंवा भाजपाशासित राज्यांच्या विरोधात सातत्याने लेखन केले आहे. ही सारीच मंडळी टुकडे टुकडे गँगशी या ना त्या कारणाने जोडलेली आहेत. त्यामुळेच ते जागतिक पातळीवर भारताची बदनामी करणारे लेखन करून आपले प्रचारतंत्र प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांचा मोदींना विरोध आहे, त्यांचा भारताच्या विकासाला विरोध आहे आणि म्हणून ते जागतिक पातळीवर भारताची बदनामी करत आहेत हे जरी खरे असले, तरी त्यांचा मोदींना विरोध का? मोदींनी त्याचे काय नुकसान केले, ज्यामुळे चवताळून ही मंडळी मोदी आणि भारतविरोधी भूमिका घेऊन जागतिक पातळीवर गरळ ओकत आहेत?


मागील चार-पाच वर्षांत मोदींनी जे महत्त्वाचे निर्णय घेतले, त्यात या प्रश्नांची उत्तरे मिळतात. मोदींच्या निर्णयामुळे परदेशातून एनजीओंना मिळणार्या आर्थिक मदतीवर नियंत्रण आले. परिणामी जे अशा आर्थिक मदतीला ऑक्सिजन मानत होते, ते अस्वस्थ झाले. एखाद्या व्यक्तीचा प्राणवायूचा पुरवठा बंद केल्यानंतर तो जसा तडफडेल, अगदी तशीच या भणंगांची अवस्था झाली आहे. डाव्या विचारधारेचा क्षीण होत चाललेला प्रभाव आणि मोदींचे राष्ट्रकेंद्री विकासधोरण लक्षात घेता आगामी काळात ही तडफड अधिक वाढत जाणार आहे. देशाच्या विविध कानाकोपर्यातून अशा भारतविरोधी भूमिका घेतलेले लेखन प्रकाशित करण्यासाठी जागतिक पातळीवर माध्यमे उपलब्ध करून दिली जातील.

सीएए, शाहीनबाग, किसान आंदोलन, एल्गार परिषद यांच्या मागे असणार्या ज्या एनजीओ आहेत, त्यांची जातकुळी डावीकडे झुकणारी आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक मदतीवर जगणारी आहे. त्यांना भारताच्या भवितव्याशी आणि विकासाशी काहीही देणे-घेणे नाही. काहीही करून त्यांना आपले उपद्रवमूल्य सिद्ध करायचे आहे, म्हणून ते आंतरराष्ट्रीय मायाजाल पसरवत आहेत. त्यांच्या या कृतीचा केवळ निषेध करून चालणार नाही, तर त्यांचे खरे स्वरूप अनिवासी भारतीयांसमोर मांडले पाहिजे. मोदींच्या, भारताच्या बदनामीचे हे षड्यंत्र उधळून लावण्याचे काम भारतीय नागरिकांना आणि अनिवासी भारतीयांना करावे लागेल. भारतविरोधी जागतिक बोभाटा केवळ सुजाण नागरिकच बंद करू शकतात.