"निरामय विश्वासाठी आयुर्वेद अग्रेसर!" - सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

विवेक मराठी    15-Jul-2021
Total Views |

RSS_1  H x W: 0

"निरामय जीवन ही संकल्पना आयुर्वेदाने फार पूर्वीपासून मांडली. आता आयुर्वेद उपचारपद्धत वैश्विक ठरू लागली आहे. केवळ 'इलनेस' दूर करणे नव्हे, तर 'वेलनेस' हा आयुर्वेदाचा मूळ पाया आहे. सारे जग त्याकडे आशेने बघते आहे. आयुर्वेदाने इतर पॅथींना एकत्र जोडून समन्वयाची भूमिका पेलावी. 'आयुर्वेद व्यासपीठ'च्या माध्यमातून अग्रेसर राहून निरामय विश्वासाठी आयुर्वेद चिकित्सा रुग्णांपर्यंत पोहोचली पाहिजे" असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी प्रतिपादन केले. नाशिकमध्ये बुधवारी (दि. १४ जुलै) सरसंघचालक डॉ. मोहनराव भागवत यांच्या हस्ते आयुर्वेद व्यासपीठच्या 'चरक सदन' या वास्तूचे उद्घाटन झाले. ऑनलाइन पद्धतीने कळ दाबून उद्घाटन करण्यात आले. गंगापूर रोडवरील शंकराचार्य संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात मोजक्या निमंत्रितांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या वेळी अध्यक्षस्थानी भारतीय चिकित्सा पद्धती आयोगाचे अध्यक्ष वैद्य जयंत देवपुजारी होते. त्यांच्यासमवेत आयुर्वेद व्यासपीठचे संस्थापक अध्यक्ष वैद्य विनय वेलणकर, माजी अध्यक्ष वैद्य संतोष नेवपूरकर, केंद्रीय कार्याध्यक्ष वैद्य रजनी गोखले, उपाध्यक्ष वैद्य शिरीष पेंडसे, कार्यवाह वैद्य विलास जाधव, तसेच रा.स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, विभाग संघचालक कैलासनाना साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे मार्गदर्शन करताना डॉ. भागवत म्हणाले, "देशभरात स्वस्त व प्रभावी आरोग्यसेवा देण्यासाठी आयुर्वेदाशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वच पॅथींनी एकत्र येऊन उपचार करण्याची आवश्यकता आहे. सर्वांचे नेतृत्व आयुर्वेदाने केले पाहिजे. कारण आयुर्वेदाला प्राचीन ऋषिमुनींपासून प्रदीर्घ व समृद्ध परंपरा लाभलेली आहे. ती सर्वमान्य उपचारपद्धती असून आयुर्वेदिक औषधांनी रुग्णांना गुण येण्यास वेळ लागतो हा गैरसमज समाजात दृढ झाला आहे, तो कसा चुकीचा आहे हे समजावून दिले पाहिजे. सर्व पॅथींनी आपला अहंकार बाजूला सारून एकत्रितपणे रुग्णसेवा करणे गरजेचे आहे. ज्ञानाचे आदानप्रदान व्हायलाच हवे" असेही डॉ. भागवत यांनी आग्रही आवाहन केले.


RSS_4  H x W: 0

क्षणचित्रे
★ प्रवेशद्वारासमोर स्वागतासाठी भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. त्यात आयुर्वेद भवनचे बोधचिन्ह रंगवण्यात आले होते.

★ आयुर्वेद व्यासपीठतर्फे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांना संस्कृत भाषेत लिहिलेले मानपत्र प्रदान करण्यात आले.

★ प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. सांघिक गीत व धन्वंतरी स्तवन करण्यात आले.

★ सुवासिनींनी पारंपरिक पद्धतीने डॉ. मोहनजी भागवत यांचे औक्षण केले.

★ भारतमाता पूजन करून डॉ. हेडगेवार व गोळवलकर गुरुजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले.

★ आयुर्वेद व्यासपीठच्या कार्याचा अहवाल दृक्-श्राव्य माध्यमातून सादर करण्यात आला.

★ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या कार्यक्रमप्रसंगी सरकारवाडा पोलीस ठाण्याने चोख बंदोबस्त ठेवला.

"सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचार स्वस्त, सुलभ होऊन सर्वसामान्य जनतेला उपलब्ध झाले पाहिजेत. कोरोनाच्या काळात आयुर्वेदिक औषधे, काढे यांचा वापर करून अनेकांनी त्यावर मात केली. सर्व पॅथींनी श्रेष्ठत्वासाठी आपापसात स्पर्धा टाळून मानवकल्याणाचे ध्येय गाठावे" हे सांगताना त्यांनी इसापनीतीतील एक कथेचा आधार घेतला. ते पुढे म्हणाले, "अलीकडच्या परिवर्तनाने आयुर्वेदाचे महत्त्व पुन्हा अधोरेखित केले आहे. प्राचीन ऋषिमुनींनी संशोधन करून आयुर्वेदिक ज्ञान पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवले. आपण मात्र अहंकारात गुरफटून आदानप्रदान करीत नाही. त्यामुळे शास्त्राची हानी होते. ज्ञान अनंत असून समग्र ज्ञानासाठी आयुर्वेद महत्त्वाचा आहे. जग आता आपले अनुकरण करीत आहे. आयुर्वेदिक औषधांचे स्टँडर्डायझेशन जसे महत्त्वाचे, तसेच व्यक्तिपरत्वे उपचार हेदेखील आयुर्वेदाचे वैशिष्ट्य आहे. कस्टमाइज्ड उपचार देण्याची लवचीकता आयुर्वेदात आहे" असेही त्यांनी स्पष्ट केले. १३० कोटी जनतेपर्यंत सुलभ, स्वस्त उपचार मिळाले, तर देश आरोग्यदृष्ट्या स्वस्थ होईल. ती क्षमता आयुर्वेदात असून त्यासाठी व्रतस्थ प्रयत्न करावे लागतील. अशा वेळी नाव, झेंडा, पॅथी यांचे वाद न घालता आयुर्वेद भवनने पुढाकार घ्यावा. त्याकरिता उभारण्यात आलेले सदन हे साध्य नसून साधन म्हणून त्याकडे पाहावे. जुने न विसरता नव्यातील चांगल्याचा स्वीकारही व्हायला हवा, असेही त्यांनी नमूद केले. "आजच्या काळात जनता अधिक चिकित्सक, जिज्ञासू झालेली आहे. ते प्रत्येक पॅथीचा अनुभव घेतात. कोणत्याही उपचारपद्धतीत गुणवत्ता, दर्जा यांना महत्त्व आहे. त्यावरच रुग्णाला गुण येऊन तो पूर्णपणे बरा होणे अवलंबून असते. आयुर्वेदिक मात्रा व काही उपचार रुग्ण तातडीने बरा होण्यासाठी उपयुक्त ठरतात, हेदेखील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. केवळ आजारी रुग्ण बरे करण्याचे ध्येय न बाळगता सर्वसामान्य जनतेला निरामय आरोग्य लाभावे यासाठी सर्व वैद्यांनी प्रयत्नशील राहावे" असेही त्यांनी सांगितले.

पूर्वसुरींचे विस्मरण

नाशिकमध्ये १२५ वर्षांपूर्वी प्राणाचार्य कृष्णशास्त्री देवधर यांनी आयुर्वेद रुजवला. त्यासाठी त्यांचे गुरू गणेशशास्त्री तरटे यांचे त्यांना बहुमोल मार्गदर्शन लाभले. परंपरागत ज्ञान व आधुनिक तंत्रज्ञान यांचा समन्वय साधून त्यांनी क्रांतिकारक प्रयोग केले. आयुर्वेदिक औषधनिर्मिती केली. गुरुकुल पद्धतीने अनेक शिष्य घडवले. त्यातील नाशिकमधील वैद्य वामनशास्त्री दातार, वैद्य केळकर, वैद्य दाते यांनी गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानाचा रुग्णसेवा करण्यासाठी प्रभावीपणे उपयोग केला. कार्यक्रमात वैद्य कृष्णशास्त्री देवधर यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे बाजूलाच, पण पुसटसा उल्लेखदेखील करण्यात आला नाही. ज्यांनी रचलेल्या पायावर सध्याची वाटचाल सुरू आहे, अशा पूर्वसुरींचे विस्मरण अनेकांना खटकले.
प्राचीन काळात घनदाट वने होती. त्यात मुबलक प्रमाणात औषधी गुणधर्म असणाऱ्या वनस्पती असत. त्यांच्यावर संशोधन करून आयुर्वेदिक औषधे तयार केली जायची. वनापासून आता भवनपर्यंत आपण पोहोचलो आहोत, याकडे निर्देश करून डॉ. भागवत यांनी अन्य पॅथीच्या तज्ज्ञांनी आयुर्वेदाचे ज्ञान घ्यावे, तसेच आयुर्वेद वैद्यांनीही इतर सर्व पॅथींचा तुलनात्मक अभ्यास करावा; आयुर्वेद हे हजारो वर्षांचे सिद्ध शास्त्र असून त्याच्या वैश्विक प्रचारासाठी तज्ज्ञ व्यक्तींसह प्रशिक्षक, विद्यार्थी यांनीही पुढाकार घ्यावा, योगदान द्यावे असेही त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात दर्जेदार औषधोपचाराची क्षमता आयुर्वेदात आहे. आयुर्वेदाने भारतीयांना विज्ञानाधिष्ठित जीवनशैली शिकवली, असेही त्यांनी स्पष्ट केले.

"महापुरुषांच्या तपश्चर्येने देश अढळपणे उभा!"

"आपल्या देशावर अनेक आघात व आक्रमणे झाली. अनेक मोहजाल टाकण्यात आले. तेव्हा हा देश बुडेल, हा सनातन हिंदू धर्म टिकणार नाही असे अनेकांना वाटले. मात्र संत-महापुरुषांच्या तपश्चर्येने हा देश अढळपणे उभा राहिला" असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहनजी  भागवत यांनी प्रतिपादन केले. नाशिक येथे आयोजित स्वामी सवितानंद यांच्या अमृतमहोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. "मोक्ष हा धर्मासोबत चालतो. मोक्ष म्हणजे आध्यात्मिक साधना व पुरुषार्थ होय. जोपर्यंत शरीर असते तोपर्यंत अर्थ व काम या दोन्ही गोष्टी असतात, मात्र यांना अनुशासित करण्यासाठी धर्म असतो. तो धर्मच सगळ्या समाजास एकसंध ठेवतो" असे ते म्हणाले. समाजातील संतांचा व महात्म्यांचा कळवळा हा लोकांसाठी असतो. ते स्वतःसाठी काही मागत नाहीत. आपणास जे मिळाले ते सर्वांना मिळावे, यासाठी ते आयुष्यभर झटत असल्याचेही भागवत म्हणाले. या प्रसंगी स्वामी सवितानंद यांना मानपत्र देऊन, महावस्त्र व पुष्पहार घालून डाॅ. भागवत यांनी स्वामी सवितानंद यांचा अमृतमहोत्सवी सत्कार केला. या वेळी साधकांना मार्गदर्शन करताना स्वामी सवितानंद म्हणाले, "प्रत्येकाने समाजाच्या व देशाच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्न करावा. तेव्हाच ईश्वर मिळतो."
वैद्य देवपुजारी म्हणाले, "संघटनात्मक कार्य महत्त्वाचे असून त्याचे दूरगामी व दीर्घकालीन परिणाम होत असतात. सरकार सहकार्य करते, त्यांचे धोरण ५-१० वर्षे टिकते. वैद्य मात्र ३० वर्षांपेक्षा जास्त काळ रुग्णसेवा करतात. आम्ही आयुर्वेदाला मोठे करीत नाही, तर त्याचे बोट धरून चालतो ही भावना आपल्यात असली पाहिजे. समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी संघटन महत्त्वाचे आहे" असे त्यांनी सांगितले. वैद्य रजनी गोखले यांनी प्रास्ताविकात चरक भवनविषयी माहिती दिली. वैद्य स्वाती कर्वे यांनी धन्वंतरी गीत सादर केले. वैद्य मंदार भणगे यांनी वैद्यगीत गायले. संतोष नेवपूरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मृत्युंजय शर्मा यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यवाह वैद्य विलास जाधव यांनी आभार मानले.


RSS_3  H x W: 0

नाशिक येथील नक्षत्र लाॅन येथे गुरुवारी (दि. १५ जुलै) पार पडलेल्या या सोहळ्यात स्वामी सवितानंद अमृतमहोत्सव समितीतर्फे 'सविता अर्घ्य' या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. या स्मरणिकेत देशभरातील स्वामी साधकांच्या लेखांचा समावेश करण्यात आला आहे. स्वामी सवितानंद सेवा समितीतर्फे सैनिक कल्याण निधीस तीन लाख रुपयांचा, तर श्रीरामजन्मभूमी न्यासला तीन लाख रुपयांचा धनादेश देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आला. डाॅ. कपिल चांद्रायण यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले, तर वैद्य योगेश जिरांगलीकर यांनी आभारप्रदर्शन केले. कोरोना नियमावलीमुळे अत्यंत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मात्र थेट प्रक्षेपणाच्या व्यवस्थेमुळे देशभरातील साधकांनी हा अमृतमहोत्सव सोहळा घरबसल्या अनुभवला.
संजय देवधर
९४२२२७२७५५