दिशा एकच

विवेक मराठी    08-Jul-2021
Total Views |

एका हिंदी वृत्तपत्राने एक स्टोरी चालविली की, भागवत यांच्या विधानावर संघांतर्गत विरोध सुरू झालेला आहे. श्रीगुरुजींच्या काळातील संघात हाच विचार होता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारच्या टेबल न्यूज तयार करून त्या चालविण्याचे काम काही वर्तमानपत्रे करीत राहतात. संघाचा विचार करता अशा बातम्यांना काही अर्थ नसतो. आणीबाणीनंतर बाळासाहेब देवरस यांनी मुस्लीम समाजाला जवळ करण्याचा विषय संघात सुरू केला. श्रीगुरुजींनी स्पष्ट शब्दात मांडले होते की, उपासना पद्धतीचा भेद भारतमातेच्या भक्तीच्या आड येता कामा नये. सुदर्शनजींच्या काळात मुस्लीम राष्ट्रीय मंचाची स्थापना झाली. त्या त्या कालखंडात जेवढे पुढे जाता येईल, तेवढे पुढे जाण्याचा प्रयत्न श्रीगुरुजींच्या काळापासूनच सुरू आहे आणि त्याची दिशा डॉ. हेडगेवारांनीच दाखवून दिली आहे.

RSS_1  H x W: 0

भारतात तिघांचे तीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहेत असे जर आम्ही म्हटले, तर त्याचे अनेकांना आश्चर्य वाटेल. पहिला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ डॉ. हेडगेवार यांचा आणि संघस्वयंसेवकांचा आहे. दुसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरोगामी, सेक्युलर, डावे या विचारसरणीचा आहे. आणि तिसरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संघावर भन्नाट लेखन करणार्या तथाकथित विद्वानांचा आहे. यात शशी थरुर, ऑॅम्वेट, जेफरलॉट, अनंतमूर्ती, सीताराम येच्युरी अशी असंख्य नावे येतात. डॉ. हेडगेवारांचा संघ, हेडगेवारांच्याच भाषेत सांगायचे तर, “हिंदुस्थान हे एक राष्ट्र असून आपण प्रत्येक जण त्याचे एक घटक आहोत हा प्रत्येक घटक राष्ट्रासाठी आहे, हे आपणाला पटवून द्यायचे आहे.” “ब्रिटिश जसे ब्रिटनवर राज्य करतात, जर्मन जसे जर्मनीवर राज्य करतात, तसेच आम्हीही (हिंदू म्हणून) या देशावर राज्य करावे अशी आमची इच्छा आहे.” “संघाचे कार्य आम्हाला याच जीवनात पूर्ण करायचे आहे. म्हणून संघाने सांसारिक ध्येयात, हे ध्येय सर्वोच्च ठेवून ते प्राप्त करण्याचा निश्चय केलेला आहे.” हा देश, समाज, संस्कृती माझी आहे आणि तिच्या उत्थानासाठी काम करणे यात कसलाही त्याग नाही, ते आपले कर्तव्य आहे, असे डॉक्टर सांगत. डॉक्टरांचा संघ, स्वयंसेवकांनी डॉक्टरांना अभिप्रेत असलेल्या मार्गाने नेलेला आहे.

ज्यांचा दुसरा आणि तिसरा संघ आहे, त्यांना यातील काहीही समजत नाही. एकवेळ लहान बालकाचे अज्ञान समजू शकते, परंतु विद्वान माणूस जेव्हा अज्ञानी राहतो, तेव्हा त्याला समजणे फार अवघड जाते. मोहनजी भागवत गाझियाबाद येथे ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्यावैचारिक समन्वय-एक पहलया पुस्तक प्रकाशन समारंभात म्हणतात, “हिंदू-मुस्लीम एक आहेत, याचे कारण आपली मातृभूमी एकच आहे. सर्व भारतीयांचा डीएनए हा एकच आहे. एकही मुसलमान राहू नये असं कुणी हिंदू म्हणत असेल तर तो हिंदू नाही. गायीला हिंदू धर्मात पवित्र मानलं जातं. पण जे दुसर्यांना मारत आहेत ते हिंदुत्वाविरोधात आहे. अशांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जावी. हिंदू-मुस्लीम एकता हा शब्दच भ्रम निर्माण करणारा आहे. हिंदू-मुस्लीम हे वेगळे नाहीतच. कायमच एक आहेत. जेव्हा लोक दोघांना वेगळं समजतात तेव्हा संकट निर्माण होतं. आपल्या श्रद्धेचा आकार आणि निराकार दोन्ही समान आहेत.”

अपेक्षेप्रमाणे मायावती, ओवेसी इत्यादी नेत्यांनी मोहनजी भागवतांच्या वक्तव्यावर ताशेरे झाडलेले आहेत. एका जातीच्या पलीकडे जाणार्या मायावती आणि जीनांचा वारसा चालविणारे, बोकडदाढीधारी ओवेसी याहून वेगळे तरी काय बोलणार? यापैकी कुणाच्याही डोळ्यापुढे भारत म्हणजे काय आणि भारताचे वैश्विक लक्ष्य कोणते, याचे कसलेही चित्र नाही. मायावती यांचे लक्ष्य पंतप्रधानपद आहे आणि ओवेसी यांचे लक्ष्य जीनांचे लक्ष्य आहे. संघाचे लक्ष्य मोहनजींच्या भाषेत सांगायचे तर, ‘भारताला विश्वगुरुपदी आरूढ करायचे आहे.” त्यासाठी भारतीय समाजाचे मनोमिलन होणे, पूर्ण भावनिक ऐक्य निर्माण होणे आवश्यक आहे. मोहनजी याच गोष्टीवर भर देत असतात, हा डॉ. हेडगेवारांचा संघ आहे. डॉ. हेडगेवार यांचे वचन असे आहे, “या देशाच्या 35 करोड लोकसंख्येत केवळ 25 करोड हिंदू आहेत (1934-35च्या काळातील हे वाक्य आहे) बाकीचे दहा कोटी आज हिंदू नाहीत. ते दहा कोटी एकेकाळी हिंदूच होते, परंतु आपली उदासीनता आणि निष्क्रियता यामुळे आपण त्यांना घालवून बसलो आहोत.” ज्यांना आपण घालवून बसलो, त्यांना पुन्हा आपल्यात सामावून घेण्याचा कालखंड आता आलेला आहे आणि मोहनजी त्या कालखंडाचे प्रतिनिधित्व करतात आणि तसा विचार मांडतात.

एका हिंदी वृत्तपत्राने एक स्टोरी चालविली की, भागवत यांच्या विधानावर संघांतर्गत विरोध सुरू झालेला आहे. श्रीगुरुजींच्या काळातील संघात हाच विचार होता का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. अशा प्रकारच्या टेबल न्यूज तयार करून त्या चालविण्याचे काम काही वर्तमानपत्रे करीत राहतात. संघाचा विचार करता अशा बातम्यांना काही अर्थ नसतो. आणीबाणीनंतर बाळासाहेब देवरस यांनी मुस्लीम समाजाला जवळ करण्याचा विषय संघात सुरू केला. श्रीगुरुजींनी स्पष्ट शब्दात मांडले होते की, उपासना पद्धतीचा भेद भारतमातेच्या भक्तीच्या आड येता कामा नये. सुदर्शनजींच्या काळात मुस्लीम राष्ट्रीय मंचाची स्थापना झाली. त्या त्या कालखंडात जेवढे पुढे जाता येईल, तेवढे पुढे जाण्याचा प्रयत्न श्रीगुरुजींच्या काळापासूनच सुरू आहे आणि त्याची दिशा डॉ. हेडगेवारांनीच दाखवून दिली आहे. ही गोष्ट एकदा समजली की, सरसंघचालकांच्या वक्तव्याचा नेमका अर्थ काय होतो, हे लक्षात येईल. प्रारंभी म्हटल्याप्रमाणे ज्यांचे संघ वेगळे आहेत, ते याचे वाटेल ते अर्थ काढत बसतील. त्यांना त्यांची त्यांची दुकाने चालवायची असल्यामुळे तसे त्यांना करणे आवश्यकच आहे, असे मानून आपण सर्वांनी त्याचा आनंद घ्यावा आणि पूजनीय डॉ. हेडगेवारांच्या मार्गाने जो संघ निघालेला आहे, त्याला अधिक गती देण्याच्या कामात स्वत:ला लावावे, ही या काळाची गरज आहे.