खून, हत्या आणि वध

विवेक मराठी    21-Apr-2023   
Total Views |
आपले लोकमानस धर्माचे काम कोणते आणि अधर्माचे काम कोणते, या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहत असते. ही कसोटी लावून निर्णय करीत असते. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड - गँगस्टर अतीक अहमद, त्याचा भाऊ अशर्रफ अहमद आणिं त्याचा मुलगा असद यांच्या मृत्यूकडे पहावे लागेल.
Gangster Atiq Ahmed
 
 
संपत्तीच्या कारणासाठी, जमिनीच्या वादावरून, स्त्रीच्या वादावरून, दारूच्या नशेच्या आहारी जाऊन जेव्हा हत्या होते, तेव्हा त्याला खून म्हणतात. समाजामध्ये अशा प्रकारच्या घटना घडून खुनाचे प्रकार वारंवार घडत असतात. काही खुनांच्या बातम्या होतात, काहींच्या होत नाहीत. आरोपी पकडले जातात. वर्षानुवर्षे त्यांचे खटले चालतात. काही जण सुटतात, काहींना दीर्घ मुदतीच्या शिक्षा होतात आणि काही फासावर लटकतात.
 
 
 
माणूस मारण्याच्या दुसर्‍या प्रकाराला शब्द आहे ‘हत्या’. हत्येचे प्रकारही घडत राहतात. एखादा आमदार, एखादा खासदार, एखादा उद्योगपती, एखादा धर्माचार्य साधू, नामवंत राजकीय नेता यांना जेव्हा मारले जाते, तेव्हा त्याला नुसता खून न म्हणता हत्या म्हणतात. अशा हत्यादेखील समाजात वेगवेगळ्या कारणांसाठी घडत असतात. हत्यारे नंतर पकडले जातात. कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून त्यांना शिक्षा दिली जाते.
 
 
 
तिसरा प्रकार वधाचा आहे. त्यातही माणसे मरतात. वधाला कुणी खून किंवा हत्या म्हणत नाही. ज्याचा वध झाला, तो भयानक दुष्ट असतो. त्याने अनेक दुष्कर्मे केलेली असतात. तो कधी मरेल याची लोक वाट पाहत असतात. तो अधर्मी असतो. वृत्तीने दुष्ट असतो. निरपराध माणसे मारण्यात त्याला आनंद होतो. तो शक्तिमान असतो, म्हणून त्याला कुणी हात लावू शकत नाही. पण तोही धर्मशक्तीकडून मारला जातो. हे काम कधी रामाला करावे लागते, कधी कृष्णाला करावे लागते, तर कधी चंद्रगुप्त मौर्य करतो, तर कधी छ. शिवाजी महाराज करतात. या वधाच्या स्मृती समाज जागृत ठेवतो.
 
 
vivek
 
उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड - गँगस्टर, अनेक खून केलेला, लोकांच्या जमिनी हडप केलेला अतीक अहमद, त्याचा भाऊ अशर्रफ अहमद आणिं त्याचा मुलगा असद गेल्या आठ-दहा दिवसांत ठार मारले गेले आहेत. हे खून आहेत, या हत्या आहेत की वध आहेत, हे वाचकांनी आपल्या बुद्धीने ठरवावे.
 
 ‘कुटुंब रंगलंय रक्तपातात’ हा आपला कार्यक्रम राजकीय आश्रयाने करीत राहिले. योगी आदित्यनाथ यांचे शासन आले आणि त्यांनी ठरवून टाकले की, उत्तर प्रदेशातील माफियाराज संपवून टाकायचे. 2017पासून पोलीस एन्काउंटरमध्ये 180हून अधिक कुख्यात गुंड ठार झाले.
‘कुटुंब रंगलंय काव्यात’ हा एक लोकप्रिय कार्यक्रम विसुभाऊ बापट गेली कित्येक वर्षे महाराष्ट्रात करतात. या कार्यक्रमात रसिकांना खूप आनंद मिळतो. अतीकचे ‘कुटुंब रंगले रक्तपातात’ हा कार्यक्रम मात्र रंजक नाही, भयानक आहे, अंगावर काटे आणणारा आहे. त्याची बायको शाहिस्ता परवीन फरार आहे, बहीण फरार आहे, दोन मुले तुरुंगात आहेत. दोेन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात आहेत. उत्तर प्रदेशात असे हे ‘कुटुंब रंगलंय रक्तपातात’ हा आपला कार्यक्रम राजकीय आश्रयाने करीत राहिले. योगी आदित्यनाथ यांचे शासन आले आणि त्यांनी ठरवून टाकले की, उत्तर प्रदेशातील माफियाराज संपवून टाकायचे. 2017पासून पोलीस एन्काउंटरमध्ये 180हून अधिक कुख्यात गुंड ठार झाले. त्यात बहुसंख्या इस्लामी गुंडांची आहे. समाजवादी पार्टीचे राज्य म्हणजे गुंडाराज होते. आता सज्जनशक्तीचे राज्य आहे.
 
  
अतीक अहमद, त्याचा भाऊ आणि त्याचा मुलगा ठार झाले. अश्रू मात्र असदुद्दिन ओवैसी यांच्या डोळ्यात आले. ते म्हणाले, “हत्यार्‍यांची नजर आणि हात स्थिर होते, हे सर्व पाहता ते हत्यारे प्रोफेशनल किलर्स (व्यावसायिक मारेकरी - पैसे घेऊन हत्या करणारे) होते, आणि हा एक कोल्ड मर्डर आहे. मलाही बंदूक चालवता येते, स्वसंरक्षणासाठी मीसुद्धा एका तज्ज्ञाकडून बंदूक चालविण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. हत्येत उत्तर प्रदेशमधल्या भाजपा सरकारची किती आणि काय भूमिका आहे आणि ते मारेकरी कोण होते, याचा तपास केला पाहिजे. ज्या समाजात मारेकर्‍यांना हिरो मानले जाते, त्या समाजात कोर्टात जाऊन न्याय कसा मिळणार? न्यायव्यवस्था कशाला हवी अशा समाजात? अतीक आणि त्याचा भाऊ अशर्रफ दोघेही पोलिसांच्या ताब्यात होते. त्यांना हातकडीही बांधण्यात आली होती. मात्र जय श्रीरामचे नारे देत त्यांची हत्या करण्यात आली. योगी सरकारच्या राज्यात कायदा व सुव्यवस्था नाकर्ती ठरली आहे. एन्काउंटर झाल्यावर ज्यांना आनंद साजरा करावासा वाटतो, तेच या हत्येला जबाबदार आहेत.”
 
 
 
असेच दुसरे अश्रुबहाद्दर के.आर. खान सिनेअभिनेते आहेत. ते म्हणाले, “अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ हे खासदार आणि आमदार राहिले होते. त्यांना पोलिसांसमोर गोळ्या झाडण्यात आल्या. जेथे आमदार-खासदार सुरक्षित नाहीत, तेथे सामान्य माणसांची काय लायकी.” या के.आर.के.ला विचारले पाहिजे की, जेव्हा राजू पाल आणि उमेश पाल यांची हत्या झाली, तेव्हा तुमचे थोबाड बंद का होते? आणि आताच ते कसे उघडले? नेहमीप्रमाणे काश्मीरच्या मेहबूबा मुफ्ती मोहम्मद म्हणतात, “यूपीमध्ये कानून व्यवस्था चांगली नाही. तिथे जंगलराज आहे.” या मुफ्तीच्या आणि तिच्या बापाच्या राज्यात काश्मिरी पंडित कसे वेचून वेचून मारले गेले, यासाठी ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट पाहिला पाहिजे. मारला गेलेला मुसलमान असल्यामुळे या सर्व भाईजान यांना प्रेमाचे भरते आलेले आहे. सेक्युलरभांगी कपिल सिब्बल म्हणतात, “उत्तर प्रदेशामध्येे 12 सेंकदात दोन हत्या झाल्यात. पहिली अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशर्रफ यांची आणि दुसरी कायदा आणि सुव्यवस्थेची.”
 
 
 
राजू पाल याची हत्या अतीक अहमद आणि त्याच्या गँगने केली. नऊ दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. राजू पाल हे आमदार होते. राजू पालची पत्नी पूजा हिच्यावर मोठा आघात झाला. त्या शोकात तिने अतीकला आणि त्याच्या परिवाराला शाप दिला की, तिच्या निर्दोष पतीची ज्या प्रकारे हत्या झाली आहे, त्याची शिक्षा ईश्वर अतीक परिवाराला जरूर देईल आणि ही शिक्षा सर्व जग पाहील. अठरा वर्षांनंतर पूजाचा हा शाप खरा झाला. राजू पाल यांची हत्या 2005 साली झाली होती. एखाद्या साध्वी स्त्रीच्या शापाचा असा परिणाम होतो. वैदिक वाङ्मयात आणि बौद्ध वाङ्मयात त्याच्या खूप कथा आहेत. एका जातक कथेत राजा एका सुंदर स्त्रीला बळजबरीने उचलून आपल्या महालात आणतो आणि तिच्या नवर्‍यावर चोरीचा खोटा आरोप ठेवून त्याला देहदंडाची शिक्षा देतो. तेव्हा ती पतिव्रता आक्रोश करून इंद्राला आवाहन करते आणि इंद्र प्रकट होऊन तो राजाला तत्काळ वधस्तंभावर चढवितो. डोके उडविण्याची शिक्षा अमलात आणणारे राजाची गर्दन छाटतात. अशी ही थोडक्यात कथा आहे. हा आपला इतिहास आहे. म्हणून अतीकच्या मृत्यूचा आलाप करण्याचे आपल्याला काही कारण नाही. ‘जैसा जो करेगा वैसा वो भरेगा’ हे मदर इंडिया चित्रपटातील एक गाणे आहे. पापाचा घडा भरला की, शिक्षा होते. ज्यांनी अतीक अहमदवर आणि त्याच्या भावावर गोळ्या घातल्या, त्यांनी कायदा हातात नक्कीच घेतला आहे. जे काम न्यायव्यवस्थेने करायचे होते, ते त्यांनी केले. सुसंस्कृत समाजात कायदा हातात घेण्याची परवानगी कुणालाही देता येत नाही. अशी परवानगी देणे म्हणजे अराजकाला निमंत्रण देण्यासारखे आहे. आपल्याला राज्यघटनेच्या कायद्याप्रमाणे चालायचे आहे, म्हणून अतीकची आणि त्याच्या भावाची हत्या करणार्‍या तिघांनी अतीकच्या आणि त्याच्या भावाच्या कर्माची शिक्षा दिली असली, तरीही अशा कृत्याचे समर्थन करता येणार नाही. कायद्याची प्रक्रिया पूर्ण करून न्यायालय उद्या त्यांना काही शिक्षा करील. आणि ती त्यांना भोगावी लागेल.
 
 
 
कायदा, न्यायपालिका, न्यायपालिकेचा न्याय त्याच्या पलीकडे जाणारा एक न्याय असतो. ‘मला काही सांगायचंय’ हे प्रभाकर पणशीकर यांची अप्रतिम भूमिका असणारे नाटक आहे. नाटकात ते निवृत्त न्यायमूर्ती आहेत. नाटकातल्या शेवटच्या संवादात ते आपल्या मुलाला म्हणतात की, “न्यायाच्या पलीकडे असणाराही न्याय मला आज समजला.” असा न्याय काय असतो, कायद्याने ज्याला हत्यारा ठरवला, त्याला लोकमानस ठरवते का? इंग्रजांनी अनेकांना फासावर लटकविले, त्यांना आपण खुनी मानतो का? आपले लोकमानस धर्माचे काम कोणते आणि अधर्माचे काम कोणते, या कसोटीवर प्रत्येक गोष्ट घासून पाहत असते. ही कसोटी लावून निर्णय करीत असते. त्या जनतेचा निर्णय कोणता असेल?

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.