मोदीजींचा इजिप्त दौरा - भारतीय मुस्लीम मानसाच्या बुद्धिबळपटावरील खेळी

विवेक मराठी    04-Jul-2023   
Total Views |

modi
स्वतंत्र भारतीय इस्लामची विचारधारा चोखाळण्याचा मार्ग प्रशस्त करण्यास हिंदूंनी मुस्लीम समाजाला साहाय्यभूत होण्याची आवश्यकता आहे. भारतात इस्लाममध्ये सर्वधर्मसमावेशकता आणि आदर यांची मानसिकता आणणे हे मोदींच्या इजिप्त भेटीमागचे धोरण आहे. धर्मांध आणि काफिरद्वेषी मुल्लामौलवींच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन घालण्यासारखे होते. इजिप्तचा दौरा या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरतो.
अमेरिकेतील भव्यदिव्य आणि देश-परदेशांतील भारतीयांसाठी नेत्रदीपक ठरलेला दौरा आटोपून मोदीजी लगेच इजिप्तच्या दोन दिवसांच्या दौर्‍यावर रवाना झाले. या दौर्‍याला खरे सांगायचे तर येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकींची पार्श्वभूमी आहे. भारतातील मुस्लीम मतदाराला विशेष संदेश देण्याचा विचार समोर ठेवून हा दौरा झाला.
 
 
देशोदेशींचे नेते एकमेकांना आमंत्रणे देतच असतात. ती बासनात बांधून ठेवलेली असतात. राज्यकर्ते त्यांच्या सवडीनुसार आणि एकमेकांच्या सोयीनुसार ती स्वीकारतात. मोदींनी त्यांच्यासमोरील आव्हानांच्या आणि राष्ट्रहिताच्या दृष्टीने इजिप्तचे आमंत्रण स्वीकारले. कुठल्याही राज्यकर्त्यांच्या परदेशवारीत तह-करार होत असतात. त्यातून दोन्ही देशांना लाभ देण्याकडे कल असतो. या सर्व गोष्टी घडवाव्या लागतात. इजिप्तच्या भेटीत बोलणी-करार इ. नेहमीप्रमाणे झाले.
 
 
या भेटीदरम्यान मोदीजींसमोर भारतातील मुस्लीम नागरिकांचे मानस होते. त्यांनी 2014च्या निवडणुकीत मुस्लीम मतदारांच्या विजयातील वाट्याचा भ्रमाचा भोपळा फोडला. एकही मुस्लीम उमेदवार न देता बहुमत मिळवता येते, हे सिद्ध केले. 2019 साली अधिक उमेदवार निवडून येऊन त्याची पुनरावृत्ती दृढ झाली. यादरम्यान ज्या जनकल्याणकारी योजना अंमलात आणल्या गेल्या, त्यात हिंदू-मुस्लीम भेदभाव केल्याचा आरोप कोणत्याही विरोधी पक्षनेत्याला करता आलेला नाही. असे असले, तरी अनेक ठिकाणी वारंवार निरनिराळ्या प्रकारे ज्या हिंदूविरोधी कारवाया घडत आहेत, त्यातून मुस्लीम जनमानसाची अनेक दशकांपासून बळावत गेलेली हिंदूविरोधी हडेलहप्पीची प्रवृती स्पष्टपणे दिसते आहे. इथे लव्ह जिहाद, जमीन जिहाद, मोबाइल धर्मांतर जिहाद, समान नागरी कायद्याविरोधातील हिंसक आंदोलन इ. लक्षात घेतले पाहिजे. या आंदोलनांमागची मानसिकता आता मिटली पाहिजे.
 
 
भडकाऊ भाषणे
 
वरील आंदोलनात सक्रिय सहभाग घेणारे मुस्लीम तरुण हे विशेषकरून समाजातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या, पसमंदा वर्गातून येतात. ते अशी कृत्ये करण्यास तयार होतात याचे कारण दर शुक्रवारी त्यांच्या कानीकपाळी आदळणारी मुल्लांची काफिरद्वेष पेरणारी भाषणे असतात. काफिरविरोधी भावना भडकवण्याचे काम दर आठवड्याला रतीब घातल्याप्रमाणे होत असते. त्याला प्रतिबंध दोन प्रकारे करता येईल - एकतर ही भडकाऊ भाषणे करणार्‍या मुल्लामौलवींवर कायदेशीर कारवाया करण्याची तत्परता राज्य शासनांनी दाखवावी. आपण भडकाऊ भाषण केल्यास ते अंगलट येते, त्याचा जाब द्यावा लागतो, कायदेशीर कारवाई होऊ शकते, त्यामुळे भाषणे ऐकण्यास लोक जमणार नाहीत हे मुल्लामौलवींच्या लक्षात आणून द्यावे लागेल. दुसरा मार्ग म्हणजे, येथील मुस्लिमांसाठी विशेषत: धार्मिक बाबतीत अरब देशांमधील राज्यकर्ते आणि धार्मिक दुढ्ढाचार्य भारतीयांचा सन्मान करतात, ते काफिर हिंदू आहेत याला महत्त्व देत नाहीत, हे भारतातील मुसलमानांच्या लक्षात आणून दिल्यास मुल्लामौलवींच्या भडकाऊ भाषणांचा परिणाम आपोआपच कमी होईल. मोदी पंतप्रधानपदी आल्यापासून त्यांनी यातील दुसरा मार्ग चोखाळला आहे. त्यांनी अनेक मुस्लीम देशांना भेटी दिल्यात. त्यांना भेटींदरम्यान त्या इस्लामी देशांनी सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित केले, एवढेच नव्हे, तर हिंदू मंदिर बांधण्याच्या प्रकल्पाचा श्रीगणेशा केला. येथील धर्मांध आणि काफिरद्वेषी मुल्लामौलवींच्या डोळ्यात हे झणझणीत अंजन घालण्यासारखे होते. इजिप्तचा दौरा या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरतो.
 

modi 
 
इजिप्तमधील भेटीगाठी
 
 
इजिप्त हा देश अरब देशांमध्ये अनेक दृष्टींनी महत्त्वाचा देश आहे. तो इतर अरब देशांपेक्षा वेगळ्या वळणावर गेला आहे. अध्यक्ष नासेर यांनी पं. नेहरूंशी आणि इतर प्रगतिशील देशांशी सक्रिय सहकार्य करून अलिप्त राष्ट्र संघटना चळवळ - NAM स्थापन करण्यात मोठे योगदान दिले होते. दोन युद्धांनंतरही इस्रायलबरोबर राजकीय संबंध प्रस्थापित करण्यात इजिप्तचा पुढाकार होता. खुद्द इजिप्तमध्येच स्थापन होऊन वाढलेल्या त्याच वेळी इतर मुस्लीम देशांत मूळ धरू लागलेल्या, मुस्लीम ब्रदरहूडसारख्या अतिरेकी संघटनांना नासेर यांनी पायबंद घातला होता. आताचेही राष्ट्राध्यक्ष अल सीसी यांनी अरबी उन्हाळ्यादरम्यान प्रस्थापित झालेले आणि देशाला भिकेच्या वाटेवर नेणारे मुस्लीम ब्रदरहूडचे शासन बरखास्त केले. इजिप्त अरब मुस्लीम देश असला, तरी नासेरपश्चातच्या इजिप्तच्या राज्यकर्त्यांनी इस्लामी अतिरेक्यांना वाव दिला नाही, त्यांना वाढू दिले नाही. या वेळी मोदीजींना ‘ऑर्डर ऑफ नाइल’ या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यात त्यांचे हिंदू असणे आड आले नाही.
 

modi 
 
संदेश देणार्‍या भेटी
 
 
राजकीय भेटी-बैठकींव्यतिरिक्त मोदीजींनी 11व्या शतकातील अल हकीम मशिदीला भेट दिली. ती महत्त्वाचा संदेश देणारी होती. भारतातील बोहरा समाजाने त्या मशिदीचे नूतनीकरण केले. इजिप्तमध्ये बोहरा समाजाला मशिदीचे नूतनीकरण करण्याचे काम मिळावे याचा अर्थ त्या समाजाला मुस्लीम म्हणून एका मोठ्या आणि महत्त्वाच्या अरब देशाने मान्यता दिली, असा होतो. बोहरा जमात स्वत:ला जरी मुस्लीम म्हणवून घेत असली, तरी इतर अनेक देशांत, भारतातसुद्धा मुस्लीम त्यांना आपले मानत नाहीत. एका वाहिनीवरील चर्चेत नेहमी भाग घेणार्‍या एका मुस्लीम विद्वान (?) वक्त्याला थेट असाच प्रश्न विचारण्यात आला होता की तो मशिदीत बोहरा व्यक्तीच्या नेतृत्वाखाली नमाज पढेल का? नेहमीप्रमाणे प्रश्नाला सरळ उत्तर न देता त्याने फाटे फोडले. पण अर्थ सरळ होता - बोहरा जमातीला तो वाहिनीप्रणीत विचारवंत मुस्लीम मानायला तयार नव्हता.
 

modi 
 
मोदींचे बोहरा समाजाबरोवर फार पूर्वीपासून सौहार्दाचे संबंध राहिले आहेत. त्यांनी बोहरा लोकांना भेटणे यातही नावीन्य नाही. पण अरब देशात पुरातन मशीद नूतनीकरण, तेही बोहरा समाजाकडून होणे, त्या समाजाची इजिप्तमध्ये मुस्लीम अशी मान्यता असणे, मोदींनी तिला भेट देताना भारतीय मुस्लीम दूर जातील का असा विचार न करणे यातून मोदींनी भारतीय मुस्लीम समाजाला कट्टरता सोडण्याचा महत्त्वाचा संदेश दिला आहे. देशाचा पंतप्रधान भेट देऊन त्यांच्या परदेशातील धार्मिक कामाचे कौतुक करतो, ही गोष्ट बोहरा समाजाकरता मोठी अभिमानास्पद ठरली.
 
 
 
मोदीजींची दुसरी भेट इजिप्तमधील ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अल्लाम यांच्याशी झाली. मुस्लीम जगतात ग्रँड मुफ्तीचे स्थान सर्वोच्च धार्मिक नेत्यासारखे आहे. अर्थात इस्लामअंतर्गत पंथीय लाथाळ्यांमुळे एकजात सर्व मुस्लीम त्यांना सर्वोच्च मानतील, हे शक्य नाही. एकीकडे 2019च्या दणदणीत पराभवामुळे चेकाळलेले मोदीद्वेष्टे हिंदू-मुस्लीम मोदी इस्लामविरोधी आहेत या प्रचारात सतत वरचढ ठरलेले भासत असताना, छुपा मुस्लीम बराक ओबामाने भारतातील अल्पसंख्य आणि मानवाधिकारांसंदर्भात केलेली विधाने लक्षात घेता, ग्रँड मुफ्तींना मोदी भेट टाळता आली असती. पण त्यांनी ती आवर्जून घेतली, पूर्वी मोदींसह झालेल्या भेटीला उजाळा दिला. या दोन्ही भेटींदरम्यान भारताने केलेत्या प्रगतीसाठी मोदींवर स्तुतिसुमने उधळली. जागतिक स्तरावर अतिरेकी आणि जिहादी संघटना यांचा विरोधात एकत्र येण्यावरही दोघा नेत्यांचे एकमत झाले. मुस्लीम ब्रदरहूडने सत्तेत आल्यावर इजिप्तमध्ये जो धुमाकूळ घातला, त्याच्या आठवणी ताज्या आहेत. त्यापासून इजिप्तची जनता आणि नेते धडा शिकले आहेत.
 
 
यादरम्यान दुसरी एक घटना घडली. छुपा मुस्लीम असलेल्या ओबामाने त्याच्या पूर्वीच्या राष्ट्राध्यक्षपदाचा आब न राखता ‘मोदींच्या राज्यात मुस्लीम अल्पसंख्य खतरे में’ अशी हाळी दिली. तिचा सणसणीत समाचार घेत अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य आयोगाचे माजी आयुक्त जॉनी मूर यांनी ओबामाचा कान जबरदस्त पिळला. भारतात निर्मला सीतारामन यांनी मुस्लीम ओबामाने त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत इतर मुस्लीम देशांवर कमी नव्हे, 27000 बाँब टाकून हजारो मुस्लिमांचा कसा बळी घेतला, याची जगाला आठवण करून दिली. ओबामाच्या त्या विधानाला धरून भारतात एकाही सेक्युलॅरिस्टाने तोंड उघडले नाही.
 
मोदीद्वेष्ट्यांच्या थोबडीत
 
 
ओबामाने केलेल्या प्रचंड गोचीमुळे हिंदू-मुस्लीम मोदीद्वेष्ट्यांच्या थोबडीत झणझणीत चपराक बसली आहे. तसेच हिंदूविरोधी मानसिकता बाळगणार्‍या सर्वसाधारण मुस्लिमांना त्यातून एक संदेश गेला आहे, तो म्हणजे वहाबी कठमुल्ले शुक्रवारी भाषणांमधून तुमच्या कानीकपाळी कितीही मोदीविरोधी जहर ओतत असले, ते गझवा-ए-हिंदसाठी जिहाद करण्यास तुम्हाला भडकवण्याचे षड्यंत्र रचत असले, तरी त्यात वाहवून जाऊ नका. त्यांच्या आहारी जाऊ नका. भारतीय बनून हिंदूंसह शांततापूर्ण जीवन जगणे हेच तुमच्यासाठी हितावह आहे.. हा तो संदेश आहे.
 
 
काफिरांविरोधात जिहाद करणे हे आता कालबाह्य झाले आहे. मुस्लीम ब्रदरहूडचे सय्यिद कुत्ब, हसन-अल-बन्ना, जमाते इस्लामीचा मौलाना अबुल आला मौदुदी यांसारख्या अतिरेकी विचारवंतांना अरब जगताने वाळीत टाकले आहे. सौदी अरेबियाने तर इस्लाम धर्मग्रंथातच परिवर्तन करण्याचे हाती घेतले आहे. त्यासाठी भारतातील मुल्लामौलवींना सामील करून न घेता कचर्‍याच्या पेटीत टाकले आहे. आयसिसने उभ्या केलेल्या धर्मसंमत जागतिक खिलाफत मृगजळाला कुठलाही अरब देश उचलून धरायला तयार नाही. अबू बक्रच्या खिलाफतच्या मृगजळात वाहून गेलेल्या बहुसंख्य भारतीय मुस्लिमांचा भ्रमनिरास झाला आहे. ते मार खाऊन परतले आहेत. त्यांना गझवा-ए-हिंदसारखी निष्फळ आणि मानवताविरोधी मानसिकता सोडावी लागणार आहे. तसेच येथील मूर्तिपूजक हिंदू धर्म इस्लामइतकाच दैवी धर्म आहे हे त्यांना केवळ स्वीकारून नव्हे, तर त्याला धरून भारतात सहजीवन घालवावे ही मानसिकता जागवावी लागेल. त्याबाबत मुस्लीम समाजात, विशेषत: माघारलेल्या पसमंदा जातीजमातींमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आवश्यकता आहे.त्यातून स्वतंत्र भारतीय इस्लामची विचारधारा चोखाळण्याचा मार्ग प्रशस्त करण्यास हिंदूंनी मुस्लीम समाजाला साहाय्यभूत होण्याची आवश्यकता आहे. भारतात मुस्लिमांममध्ये सर्वधर्मसमावेशकता आणि आदर यांची मानसिकता आणणे हे मोदींच्या इजिप्त भेटीमागचे धोरण आहे.
 
 

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.