जातीचा कायदा, नेमाडे वगैरे...

विवेक मराठी    19-Aug-2023   
Total Views |
nemade
गेले काही दिवस दोन विषयांवर सातत्याने चर्चा होत आहे. पहिला विषय आहे समान नागरी कायदा आणि दुसरा विषय आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांनी वेगवेगळ्या विषयांवर केलेली वादग्रस्त विधाने. या दोन्ही चर्चा चालू असताना एक वेगळा प्रश्न पुढे येऊ लागला आहे. तो कसा सोडवायचा, याचा विचार केला पाहिजे.
आपल्या देशात समान नागरी कायदा येत आहे, हे गृहीत धरून मागील काही दिवसांपासून साधकबाधक चर्चा सुरू आहे. समान नागरी कायदा या विषयावर समर्थक आणि विरोधक अशी सामाजिक विभागणी झाली आणि समान नागरी कायद्याची व्याप्ती व परिणाम या विषयावर दोन्ही बाजूंनी भरभरून लिहिले-बोलले जात आहे. एका अर्थाने सध्या वैचारिक घुसळण सुरू असून समान नागरी कायदा हा विवाह, घटस्फोट, वारसा हक्क इतक्या गोष्टींपुरता मर्यादित असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा स्पष्ट केले आहे. आपल्या देशात विविधता आहे. ही विविधता मानवी जीवनाची महत्त्वाची बाब आहे. समाजगट (जात), प्रदेशनिहाय ही विविधता अनुभवास येते. विवाहाची पद्धत, काडीमोड आणि वारसा यासंबंधी प्रत्येक ठिकाणी वेगळेपणा दिसतो आणि त्यामुळे योग्य प्रकारे न्याय करता येत नाही, असे न्यायालयाचे मत आहे. त्यामुळे लवकरात लवकर समान नागरी कायदा करा असा सर्वोच्च न्यायालय आग्रह करत आहे. त्यासंबंधी पूर्वतयारी म्हणून शासनाने नागरिकांकडून यासंबंधी सूचना मागवल्या होत्या. त्याचप्रमाणे समान नागरी कायदा आम्हाला लागू होऊ नये असे जनजाती (वनवासी) समूहांतील विविध संस्थांकडून निवेदने दिली आहेत; कारण ज्या गोष्टींसाठी हा कायदा अस्तित्वात येत आहे, त्यासंबंधी जनजाती समूहाचे स्वतंत्र कायदे आहेत.
 
 
 
तर समान नागरी कायदा अस्तित्वात यावा, यासाठी अशा प्रकारे देशभर प्रबोधन आणि प्रयत्न चालू असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये एका पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात समान नागरी कायद्याच्या पार्श्वभूमीवर ज्ञानपीठ विजेते भालचंद्र नेमाडे यांनी वक्तव्य केले की, प्रत्येक जातीचे स्वतंत्र कायदे असले पाहिजेत. वरवर पाहता नेमाडे यांनी केलेले विधान फार गंभीरपणे घेण्याची आवश्यकता नसली, तरीही एक वेगळ्या गुंत्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. गेल्या काही दिवसांपासून नेमाडे वेगवेगळ्या विषयांवर बोलून सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. औरंगजेब, काशीविश्वनाथ, ज्ञानवापी या विषयांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा खरपूस समाचार घेतला गेला असला, तरी ‘प्रत्येक जातीचे स्वतंत्र कायदे असले पाहिजेत’ हे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांनी केलेले विधान गंभीरपणे समजून घेतले पाहिजे. आपला समाज तीन भागांत विभागला गेला आहे. पहिल्या भागात ग्रामीण व शहरी समाज आहे. दुसर्‍या भागात वनक्षेत्रातील जनजाती समाज आहे आणि तिसर्‍या भागात भटक्या विमुक्त जाती व जमाती आहेत. समान नागरी कायद्यात पहिल्या भागाचा सखोल विचार केला आहे. सर्व धर्म आणि उपासना पंथ यांना समान नागरी कायद्याच्या कक्षेत आणले जाईल. दुसर्‍या भागात असणार्‍या जनजाती समूहाबाबतही सकारात्मक विचार केला जाईल. मात्र तिसर्‍या भागात असणार्‍या भटक्या विमुक्त जातींविषयी समान नागरी कायदा कसा विचार करतो, याविषयी कोठेही चर्चा होताना दिसत नाही.
 

nemade 
 
महाराष्ट्रात जवळपास 49 जातींचा समूह भटक्या विमुक्त जाती म्हणून ओळखला जातो. या सर्वच जातींच्या स्वतंत्र जातपंचायती असून स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. जातीअंतर्गत आणि जातीबाहेर कसे वागावे, याचे प्रत्येक जातीचे कायदे आहेत आणि बहुसंख्य भटक्या विमुक्त जाती या कायद्याचे काटेकोरपणे पालन करत असतात. दहा वर्षांपूर्वी ‘जातपंचायतीला मूठमाती’ नावाने एक मोहीम राबवली गेली होती. पण ती यशस्वी झाली नाही. आजही जातपंचायती अस्तित्वात आहेत. या जातपंचायती भटक्या विमुक्त समाजाला आपले संरक्षण कवच वाटते, जातपंचायतीचे न्यायदान तत्काळ होते, या गोष्टी लक्षात घेता समान नागरी कायदा म्हणून भटक्या विमुक्त जातींचा विचार कसा करावा? हा आजचा प्रश्न आहे. समान नागरी कायद्याच्या कक्षेत जे तीन महत्त्वाचे घटक येणार आहेत, त्याविषयी भटक्या विमुक्त जातींतील प्रत्येक जातपंचायतीत न्यायनिवाडा केला जातो. त्याचप्रमाणे भटक्याची बाई म्हणजे जनावर, तिची खरेदी-विक्री होऊ शकते.. इथपासून ते बाई म्हणजे देवता, त्यामुळे पत्नी सोडून इतर सर्व महिला आईसमान इथपर्यंत दोन टोकांवरच्या समाजधारणा भटक्या विमुक्त जातींमध्ये पाहावयास मिळतात. काही जातींचा अपवाद वगळला, तर बहुतेक सर्व भटक्या विमुक्त जातींमधील बाई ही अन्याय-अत्याचारांची, शोषणाची शिकार असते. तिला कोणतेही अधिकार नसतात, हक्क नसतात. या पार्श्वभूमीवर भटक्या विमुक्त जाती आणि समान नागरी कायदा यांचा विचार केला पाहिजे.
नेमाडे म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक जातीचे स्वतंत्र कायदे करणे हे केवळ अशक्यच नाही, तर सामाजिक अराजकाला आमंत्रण असणार आहे, म्हणून प्रत्येक जातीचे स्वतंत्र कायदे असणार्‍या भटक्या विमुक्त जातींचा विचार करताना सर्वात प्रथम त्यांना स्थिर केले पाहिजे. सदैव भटकंती करणार्‍या या बांधवांना जातीचे कायदे आणि जातपंचायती महत्त्वाच्या वाटतात, कारण या गोष्टी त्यांना सामाजिक सुरक्षेची हमी देतात. भारतीय राज्यघटनाही अशी हमी देते, ही गोष्ट भटक्या विमुक्त समाजाने अजून खर्‍या अर्थाने स्वीकारली नाही, म्हणून भटक्या विमुक्त जातींमध्ये आजही जातीचे कायदे प्रभावी आहेत, या गोष्टीचा विचार केला पाहिजे, भटक्या विमुक्त समाजाला आधी राज्यघटनेच्या कक्षेत आणले पाहिजे, तरच जातीचे कायदे निष्फळ होतील.

रवींद्र गोळे

रवींद्र विष्णू गोळे

 जन्मदिनांकः 24 फेब्रुवारी 1974

 शिक्षणः एम.ए. (समाजशास्त्र)

 गावचा पत्ता - मु. पो. हातगेघर, ता. जावली. जि. सातारा 415514

 सध्याचा पत्ता - 1/6 जैन इस्टेट ,विल्हेज रोड,भांडुप मुंबई  - 78

 संपर्क- 9594961860 

 2003 पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत.

 सहकार्यकारी संपादक - साप्ताहिक विवेक

 प्रकाशित ग्रंथसंपदा

कृतार्थ - आ. अरविंद लेले यांचे चरित्र

आयाबाया - भटके-विमुक्त समाजातील महिलांची व्यक्तिचित्रणे

दीपस्तंभ - दलित उद्योजकांच्या यशोगाथा

पथिक - सामाजिक कार्यकर्त्यांची व्यक्तिचित्रणे

झंझावात - आ. नवनाथ आव्हाड यांचे चरित्र

अष्टपदी- आपल्या सहजीवनातून सामाजिक काम करणाऱ्या पतीपत्नीचा परिचय

समरसतेची शिदोरी - सामाजिक संस्कार कथा

समाज धन्वतरी - डॉ.श्रीहरी दत्तात्रय देशपांडे यांचे चरित्र

प्रेरणादीप - युवकांसाठी महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा परिचय

जनता जर्नादन वामनराव परब -आ. वामनराव परब यांचे च्रित्र

आधुनिक संत आणि समाज- ( महाराष्ट्रातील आधुनिक संताचे सामाजिक काम)

   संपादने

अण्णा भाऊ साठे  जीवन व कार्य

डॉ. आंबेडकर व स्वामी विवेकानंद यांचे विचारविश्व

कर्मवीर दादा इदाते गौरवग्रंथ

ध्यासपथ - भटके -विमुक्त विकास परिषद गौरवग्रंथ

सहकाराकडून सामाजिकतेकडे ( आतंरराष्ट्रीय सहकार वर्षांनिमित्त विशेष ग्रंथ)

राष्ट्रद्रष्टा पंडित दीनदयाळ उपाध्याय

समर्थ भारत- स्वप्न- विचार-कृती

वन जन गाथा

अभंग सेतू ( मराठी संत वचनाचा अनुवाद)

समरसतेचा पुण्यप्रवाह

 बालसाहित्य

प्रिय बराक ओमाबा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर

सयाजीराव गायकवाड

संत गाडगेबाबा

लेण्याच्या देशा

सांगू का गोष्ट ?

 अन्य जबाबदाऱ्याः

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,सदस्य

राजगृह सहकारी पतसंस्था, सदस्य

सम्यक संबोधी ग्रंथालय भांडुप , अध्यक्ष

साहित्य संबोधी भांडुप, कार्यवाह

दै. तरुण भारत,पुण्यनगरी,  विवेक विचार, विमर्श ,एकता या नियतकालिकांतून सातत्याने लेखन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 जंयती निमित्त एकता मासिकात भीमाख्यान हे सदर

पुरस्कार

पुणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचा 'साहित्य सम्राट न.चिं.केळकर पुरस्कार'  2016

आम्ही सातारकर विकास प्रतिष्ठानचा 'साहित्य रत्न पुरस्कार' 2016

भारतीय स्त्रीशक्ती चा राज्यस्तरीय काव्यलेखन पुरस्कार 2001