विवेकानंद शिलास्मारकाची संकल्पना

विवेकानंद स्मृतिजागर

विवेक मराठी    01-Sep-2023   
Total Views |
 
story of vivekananda  memorial
2023 साल हे स्वामी विवेकानंद जयंतीच्या 160 वर्षे पूर्तीचे आहे. 2 सप्टेंबरला विवेकानंद शिलास्मारकाच्या लोकार्पणास 53 वर्षे पूर्ण होत आहेत, तर 11 सप्टेंबरला स्वामी विवेकानंदांनी अमेरिकेत शिकागो येथे आयोजित सर्वधर्मपरिषदेत भाषण देऊन श्रोत्यांची मने जिंकून घेण्यास तब्बल 130 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे सप्टेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून स्वामी विवेकानंदांच्या संदर्भातील चार लेखांची लेखमाला लिहीत आहे. पहिला लेख हा विवेकानंद शिलास्मारकावर असेल, दुसरा लेख सर्वधर्मपरिषदेतील स्वामीजींचे भाषण, भारतात आगमनानंतर त्यांचे कशा प्रकारे स्वागत झाले, बेलूर मठाची स्थापना कशी झाली यावर असेल. तिसरा लेख स्वामीजींनी अमेरिकेत व इंग्लंडमध्ये हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती, वेदान्त तत्त्वज्ञान, हिंदू धर्म, त्यातील वाईट रूढी यावर दिलेल्या भाषणांवर असेल. तर चौथा लेख येशू ख्रिस्त, गौतम बुद्ध इ. महापुरुषांसंदर्भातील तसेच त्यांच्या पंथांविषयीचे विचार यावर असेल. स्वामी विवेकानंदांविषयी, तसेच त्यांच्या कार्याविषयी वेळोवेळी त्यांच्याच पत्रांतील मजकूर संदर्भविरहितपणे उचलून, तसेच काही मजकुराची मोडतोड करून लेखन केले जाते आणि त्यांच्याविषयी गैरसमज पसरविले जातात. या लेखमालेतून स्वामीजींच्या संदर्भातील घटनांची, त्यांनी केलेल्या वक्तव्यांची किंवा त्यांनी लिहिलेल्या पत्रांतील वस्तुस्थिती संदर्भासहित वाचकांसमोर मांडली जाईल. त्यामुळे स्वामीजींच्या संदर्भात सत्य माहिती सगळ्यांसमोर येईल. या सगळ्याची जुन्या पिढीला माहिती आहेच, पण नवीन पिढीसमोरही ही माहिती येणे गरजेचे आहे असे वाटले, म्हणून ही लेखमाला करत आहे.
एकनाथजींचा दूरदर्शीपणा, त्यांची कामावर असलेली निष्ठा, सेवाभावी वृत्ती, उत्साह, कळकळ, संघटनकौशल्य याचे फलित म्हणजे विवेकानंद शिलास्मारक. विवेकानंद शिलास्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर एकनाथजींना केवळ दगडविटांचे स्मारक नको होते, म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी 7 जानेवारी 1972 रोजी‘विवेकानंद केंद्र’ या संघटनेच्या स्थापनेतून एका जिवंत स्मारकाची संकल्पना प्रत्यक्षात आणली.

स्वामी विवेकानंद परिव्राजक अवस्थेमध्ये भारतभ्रमण करत करत 24 डिसेंबर 1892 रोजी देशाच्या दक्षिणेकडील टोकाला, म्हणजेच कन्याकुमारीला पोहोचले. निवांतपणे श्रीपाद शिलेवर जाऊन ध्यान करण्याचे त्यांच्या मनात आल्यावर त्यांनी समोरच्याच खळाळत्या समुद्रात उडी टाकून पोहतच श्रीपाद शिला गाठली. त्या पुढील तीन दिवस - 25 डिसेंबर ते 27 डिसेंबर 1892 त्यांनी श्रीपाद शिलेवर (म्हणजेच देवी कन्याकुमारीचे पदचिन्ह असलेल्या खडकावर) ध्यानधारणा केली. भगव्या वस्त्रातील इसमाने खळाळत्या समुद्रात उडी टाकल्याचे आणि पोहत तो श्रीपाद शिलेवर गेल्याचे किनार्‍यावरील कोळी बांधवांनी पाहिले. त्यांतीलच एकाने त्यांना तीन दिवस खाण्यासाठी अन्न आणि पिण्यासाठी पाणी खडकावर उपलब्ध करून दिले, असा संदर्भ एस.एन. धर लिखित ‘स्वामी विवेकानंद समग्र चरित्र - खंड 1’मध्ये दिलेला आहे. या श्रीपाद शिलेवरच स्वामी विवेकानंदांना आपले गुरू श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या “आईची सेवा कर” या संदेशाचे खरे आकलन झाले. त्यांना या तीन दिवसांच्या ध्यानधारणेतूनच त्यांच्या जीवनकार्याची दिशा मिळाली. त्यांनी भारतमातेच्या सेवेत - म्हणजेच देशबांधवांच्या सेवेसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करण्याचे ठरविले. यानंतरच त्यांना श्रीरामकृष्णांकडून अमेरिकेत शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेसाठी समस्त भारतीयांचे प्रतिनिधित्व करण्याचा संकेतही मिळाला. त्यामुळे या सर्व दृष्टीनेच स्वामी विवेकानंदांच्या जीवनकार्याचा आणि श्रीपाद शिलेचा अतिशय जवळचा संबंध. म्हणूनच त्यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने श्रीपाद शिलेवर स्वामीजींचे एक स्मारक व्हावे असे अनेकांच्या मनात आले, म्हणून जानेवारी 1962मध्ये स्थानिक स्तरावर विवेकानंद शिलास्मारक समिती निर्माण झाली. यात मद्रासमधील रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामी शुद्धतत्त्वानंद यांचा, तसेच काही स्थानिक हिंदू नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा समावेश होता.
 
 
story of vivekananda  memorial 
 
सुरुवातीचा स्थानिक ख्रिस्ती लोकांचा विरोध
 
जसजशी विवेकानंद शिलास्मारक उभारणीची बातमी सर्वत्र पसरली, तसे स्थानिक ख्रिस्ती कोळ्यांनी त्यास विरोध करण्यास सुरुवात केली. 400 वर्षांपूर्वीपर्यंत हे कोळी हिंदूच होते, पण सेंट झेवियर्स या मिशनर्‍याने 400 वर्षांपूर्वी त्यांच्या पूर्वजांचे धर्मांतर केले होते. कन्याकुमारीतील एका स्थानिक कडव्या ख्रिस्ती धर्मगुरूने या कोळ्यांना भडकावल्याने एप्रिलमध्ये त्यांनी श्रीपाद शिलेवर किनार्‍यावरून दिसेल असा मोठा क्रॉस रातोरात लावून त्या शिलेला सेंट झेवियर्स रॉक संबोधण्यास सुरुवात केली. यावर काही स्थानिक लोकांनीही ताबडतोब एकत्र येऊन निदर्शने करून तिथे श्रीपाद चिन्ह असल्याने ते हिंदूंचे पूजास्थान असल्याचे तारेने जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांना कळविले आणि श्रीपाद शिलेवरील त्या क्रॉसचे अतिक्रमण हटविण्याची मागणी केली. पूर्वी श्रीपाद शिलेवर देवी कन्याकुमारीने एका पायावर उभे राहून तपश्चर्या केली होती, अशी कथा आहे.
 
01 September, 2023 | 13:3
     
तिचा आधार घेऊन श्रीपाद शिलेवर कन्याकुमारी देवस्थानने आपला दावा जाहीर केला. तिथे जाण्यासाठी नावेची सुविधा चालू केली. ही सुविधा चालविण्याचे काम काही समर्पित हिंदू तरुणांनी हाती घेतले. यामुळे लोकांची श्रीपाद शिलेवर जाण्याची छान सोय झाली. तोपर्यंत श्रीपाद शिलेवर किंवा त्याच्या शेजारील शिलेवर जाण्यासाठी लोकांना ख्रिस्ती कोळ्यांच्या लाकडी होड्यांतून जावे लागत असे. नंतर हिंदूंनी तो क्रॉस एका रात्री काढून टाकला. त्यामुळे संघर्षाची परिस्थिती निर्माण होऊन कन्याकुमारीत जमावबंदीचे कलम 144 लागू केले गेले आणि श्रीपाद शिलेवर एक रक्षकही नेमला. त्यानंतर तत्कालीन राज्य सरकारने स्थानिक ख्रिस्ती आणि हिंदूंचा संघर्ष टाळण्यासाठी विवेकानंद स्मारक किनार्‍यावर उभे करावे अशी सूचना देऊन तशी परवानगी दिली. पण समितीचे यावर समाधान झालेले नव्हते. त्यामुळे किमान श्रीपाद शिलेवर स्वामी विवेकानंदांनी येथे 25 ते 27 डिसेंबर 1892 या कालावधीत ध्यान केले अशा आशयाचा लेख तरी तिथे असावा, अशी कल्पना मांडली. त्यानुसार राज्य सरकारच्या परवानगीने 17 जानेवारी 1963 रोजी श्रीपाद शिलेवर तशा मजकुराची शिला उभी केली. श्रीपाद शिलेवरून क्रॉस हटविण्याच्या घटनेचा बदला घेण्यासाठी म्हणून कॅथलिक लोकांनी तो शिलालेख उखडून समुद्रात फेकून दिला. पुन्हा निदर्शने करणे आणि निवेदने तारेमार्फत पोहोचविणे या माध्यमातून संघर्ष चालू झाला.
 

story of vivekananda  memorial 
विवेकानंद शिलास्मारक समितीमध्ये
मा. एकनाथजी रानडे यांचा प्रवेश
 
जेव्हा अशी संघर्षाची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा विवेकानंद शिलास्मारक समितीच्या लोकांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख मा. एकनाथजी रानडे यांची आठवण झाली. असे विरोध हाताळण्यात एकनाथजींचा हातखंडा होता. विरोधकांचेही समर्थन घेण्यात त्यांची हातोटी होती. स्वामी विवेकानंद जन्मशताब्दी निमित्ताने स्वामीजींच्या विचारांवर आधारित एक पुस्तक करण्याच्या कामात एकनाथजी गुंतलेले होते. त्या वेळी नुकतेच 1962मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यावर तत्कालीन केंद्र शासनाच्या स्तरावरील काही चुकीच्या निर्णयांमुळे प्रतिकारासाठी आपली पुरेशी तयारी नव्हती. त्यामुळे भारतीय सैन्याला हार पत्करावी लागल्याने भारतीय सैनिक आणि नागरिक यांचे मनोधैर्य खचलेले होते. हे मनोबल उंचावण्याचे काम फक्त आणि फक्त स्वामी विवेकानंदांचेच विचार करू शकतात, याची एकनाथजींना खात्री होती, म्हणून त्यांनी स्वामीजींच्या तेजस्वी विचारांच्या संकलनाचे पुस्तक करण्याच्या कामात स्वत:ला झोकून दिलेले होते. त्यासाठी त्यांनी मार्च 1962मध्ये कोलकात्यातील बेलूर मठात राहून स्वामीजींच्या समग्र वाङ्मयाचा अभ्यास केला. अनेक पुस्तके समोर असल्याने द्विधा मन:स्थिती टाळण्यासाठी त्यांनी बाकीचे सर्व ग्रंथ बाजूला ठेवून स्वामीजींच्या समग्र वाङ्मयावरच लक्ष केंद्रित केले. सखोल अध्ययनासाठी त्यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले होते. हे अध्ययन करत असतानाच ‘राष्ट्रपुनरुत्थानासाठी शिवभावे जीवसेवा’ या मंत्राचा अर्थ त्यांच्या लक्षात आला. स्वामीजींचे विचार प्रत्यक्षात उतरविण्याचा त्यांनी ध्यास घेतला. विवेकानंद शिलास्मारक समितीने रा.स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक श्री गोळवलकर गुरुजी यांची भेट घेतली. श्रीगुरुजींना यात आपले गुरू स्वामी अखंडानंद आणि स्वामीजी या दोघांच्या ऋणातून मुक्त होण्याची सुवर्णसंधी दिसली, म्हणून श्री गुरुजींनी आनंदाने एकनाथजींना संघाच्या सर्व जबाबदार्‍यांतून मुक्त केले आणि त्यांना आदेश दिला की त्यांनी विवेकानंद शिलास्मारकाचे काम पूर्णत्वास न्यावे. दरम्यान स्वामीजींच्या विचारांचे एकनाथजींचे पुस्तक र्ठेीीळपस उरश्रश्र ीें ींहश कळपर्वी छरींळेप जानेवारी 1963मध्ये वेळेआधीच तयार झाले. मग त्यांनी मद्रास येथे जाऊन शिलास्मारक समिती आणि सरकार यांच्यातील पत्रव्यवहार अभ्यासला आणि मग त्यांनी समितीचे संघटक-सचिव म्हणून 11 ऑगस्ट 1963ला शिलास्मारक समितीच्या कामात स्वत:ला झोकून दिले.
 


story of vivekananda  memorial 
 
मोठमोठ्यांचा सहभाग आणि विरोधकांचेही सहकार्य
 
पदभार स्वीकारल्यावर त्यांनी सर्वप्रथम केंद्रीय मंत्री हुमायून कबीर यांची भेट घेऊन त्यांची या प्रकल्पास लेखी परवानगी मिळविली. हुमायून कबीर यांच्या विरोधामुळे तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री भक्तवत्सलम हे शिलास्मारकास विरोध करत होते. हुमायून कबीर यांची लेखी परवानगी मिळविल्यावर भक्तवत्सलम यांचाही विरोध मावळला आणि त्यांनीही पूर्ण सहकार्य केले. एकनाथजींनी या दोघांची स्वीकृती कशी मिळविली, याचा तपशील त्यांच्या संभाषणाच्या रूपात ‘कथा विवेकानंद शिलास्मारकाची’ या पुस्तकात परिशिष्टात दिलेला आहे. स्वामी विवेकानंदांचे योगदान पाहता कोणत्याच विचारसरणीच्या लोकांनी त्यांना विरोध करण्याचे कारण नव्हते, तरीही त्यांनी या प्रकल्पासाठी सार्वमत आणि जनमत तयार करण्यासाठी मोठमोठ्या व्यक्तींना भेटून त्यांना प्रकल्पाची माहिती सांगून त्यांच्याकडून या प्रकल्पासाठी पाठिंबा आहे यासाठी त्यांची स्वाक्षरी घेणे असा कार्यक्रम हाती घेतला. यात केरळचे मोठे नेते अण्णा दुराई, नेदुंचेरियन अशांमुळे द्रविड मुन्नेत्र कळ्ळघम पक्षातील लोकांनी सह्या दिल्या. यात तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन, तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादुर शास्त्री, एम.सी. छागला, रामकृष्ण मिशनचे अध्यक्ष आणि कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य यांना प्रकल्पाची माहिती सांगून त्यांची स्वीकृती घेतली. यातच हे स्मारक लहान नको, तर तो स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असला पाहिजे, अशी सूचना या मान्यवरांकडून मिळाली. मग या कामासाठी त्यांना एस.के. आचारी हे उत्तम कलाकार असलेले चांगले स्थापत्यविशारद मिळाले.
 
 
निधीसंकलन
 
तेथील समुद्रातील खार्‍या वार्‍यांचा विचार करता आरसीसी बांधकाम करता आले नसते, त्यामुळे हे सर्व काम ग्रॅनाइटमध्ये करायचे ठरले. स्मारकाचे माप 91 फूट लांब आणि 32 फूट रुंद असे ठरले. आता श्रीपाद मंडपम वगळता प्रत्यक्षात भिंती 180 फूट लाब व 56.5 फूट रुंद अशा आहेत. आतील भागात स्वामीजींचा कांस्य धातूतील पुतळा 7 फूट उंच आणि 4 फूट रुंद असा आहे. तर ज्या चौथर्‍यावर हा पुतळा विराजमान आहे, त्या चौथर्‍याची उंची 4 फूट व रुंदी 8 फूट आहे. स्मारकाच्या खालच्या बाजूला ध्यान मंडपम आणि श्रीपाद चिन्हासाठी श्रीपाद मंडपम असे सर्व झाले. यामुळे मूळ खर्चाचा अंदाज 6 लाखांचा होता, तो वाढत वाढत 60 लाख, 80 लाख असा होत होत शेवटी 1 कोटी 35 लाखांपर्यंत पोहोचला. कन्याकुमारीजवळच असलेल्या अंबासमुद्रम येथून काळे ग्रॅनाइट, तर तुतिकोरिनहून लाल ग्रॅनाइट खरेदी केले गेले. इतक्या मोठ्या प्रकल्पासाठी निधीसंकलन हे एक आव्हानच होते. देशातील उद्योगपतींनी आणि प्रतिष्ठित श्रीमंतांनी दिले असते, तर 1 कोटी 35 लाख सहज जमले असते. पण एकनाथजींच्या मनात हे स्मारक सामान्य जनतेलाही आपले आहे, असे वाटायला पाहिजे होते. अमेरिकेत सर्वधर्मपरिषदेसाठी जाताना स्वामी विवेकानंदांनी सामान्य जनतेकडून अत्यल्प स्वरूपातील देणगी स्वीकारून पैसे गोळा केले आणि त्या जनसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून ते अमेरिकेतील सर्वधर्मपरिषदेत दाखल झाले. एकनाथजींनी अगदी हीच योजना आखली. सामान्य जनतेला अगदी 1 रुपयापासून देणगी मूल्य देण्याची सोय केलेली होती. त्यासाठी 1 रुपयाची तिकिटेदेखील छापलेली होती. जवळजवळ 30 लाख सर्वसामान्य नागरिकांनी, अनेक राज्यांनी स्वत:च्या राजकोषातून ि्शलास्मारकासाठी निधी दिला. अशा प्रकारे लहान-थोर अशा सगळ्यांकडूनच प्रत्येकाच्या क्षमतेनुसार देणग्या गोळा करून हा प्रकल्प पूर्णत्वास नेला गेला. शिलास्मारकाच्या भिंतीवरील शिल्पे आणि नक्षीकाम या सगळ्याचे, तसेच विवेकानंदांचा पुतळा कसा असावा? या सगळ्याचे बारकावे एकनाथजींनी अतिशय विचारपूर्वक ठरविलेले होते. विवेकानंद शिलास्मारकाच्या उद्घाटनास रामकृष्ण मठाचे प्रमुख स्वामीजी, तत्कालीन राष्ट्रपती व्ही.व्ही. गिरी, मोरारजीभाई देसाई यांसारख्या मोठ्या व्यक्तींची उपस्थिती होती.
 

story of vivekananda  memorial 
 
विवेकानंद केंद्राची स्थापना
 
एकनाथजींचा दूरदर्शीपणा, त्यांची कामावर असलेली निष्ठा, सेवाभावी वृत्ती, उत्साह, कळकळ, संघटनकौशल्य याचे फलित म्हणजे विवेकानंद शिलास्मारक. विवेकानंद शिलास्मारकाचे लोकार्पण झाल्यानंतर एकनाथजींना केवळ दगडविटांचे स्मारक नको होते, म्हणून त्यांनी स्वामी विवेकानंदांचे विचार प्रत्यक्षात उतरविण्यासाठी 7 जानेवारी 1972 रोजी ‘विवेकानंद केंद्र’ या संघटनेच्या स्थापनेतून एका जिवंत स्मारकाची संकल्पना प्रत्यक्षात आणली. मातृभूमीची सेवा करण्याच्या ध्येयासाठी जीवन समर्पित करू इच्छिणार्‍या युवक-युवतींना एकत्र करून त्यांना जीवनव्रती म्हणून प्रशिक्षण देण्याची परंपरा एकनाथजींनी 1973 साली सुरू केली. ‘मनुष्यनिर्माण राष्ट्रपुनरुत्थान’ हे विवेकानंद केंद्र या अधात्मप्रेरित सेवा संघटनेचे ब्रीदवाक्य आहे. जीवनव्रती हे विवेकानंद केंद्राच्या कार्याचा कणा आहेत. मुख्यत: योगवर्ग (18च्या पुढे, 60पर्यंत), स्वाध्यायवर्ग (सर्वांसाठी), संस्कारवर्ग (बाल आणि किशोरवयीन), केंद्रवर्ग (सर्वांसाठी) अशी विवेकानंद केंद्राची कार्यपद्धती आहे. विवेकानंद केंद्रामार्फत 11 ते 15 वयोगटासाठी व्यक्तिमत्त्वविकास शिबिरे घेतली जातात. आध्यात्मिक शिबिर, योग शिबिर, युवा प्रेरणा शिबिर अशा विविध शिबिरांच्या माध्यमातून आध्यात्मिक आणि व्यक्तिगत गुणांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला जातो. याव्यतिरिक्त स्थानिक, प्रांत आणि राष्ट्रीय स्तरावर विविध कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. शिक्षक व प्राध्यापकांसाठी आचार्य प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. ईशान्य भारतातील अरुणाचल प्रदेश, आसाम, नागालँड या राज्यांत, तसेच अंदमान, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांत शाळा चालविल्या जातात. केंद्राचे विविध प्रकल्प देशभरात कार्यरत आहेत - उदा., अरुणाचल प्रदेशात अरुणज्योती प्रकल्प, नाशिक जिल्ह्यातील पिपळद येथे विवेकानंद केंद्र प्रशिक्षण व सेवा प्रकल्प, तमिळनाडूमधील नैसर्गिक साधनसंपत्ती विकास प्रकल्प, ग्रामीण विकास प्रकल्प, गुवाहाटीतील विवेकानंद केंद्र सांस्कृतिक संस्था, कोडंगल्लूर येथील वैदिक दर्शन प्रतिष्ठान, दिल्लीतील विवेकानंद इंटरनॅशनल फाउंडेशन आणि प्रकाशन प्रकल्प. गेल्या वर्षी विवेकानंद केंद्राला 50 वर्षे पूर्ण झाली, तर ह्या वर्षी विवेकानंद केंद्रात प्रशिक्षणाला सुरुवात होऊन 50 वर्षे झाली. अधिक माहितीसाठी विवेकानंद केंद्राच्या स्थानिक कार्यालयाशी संपर्क साधावा आणि विवेकानंद केंद्रामार्फत मनुष्यनिर्माण आणि राष्ट्रपुनरुत्थानासाठी आपलाही खारीचा वाटा उचलावा, ही विनंती.

डॉ. अपर्णा लळिंगकर

 पी.एचडी - एज्युकेशन टेक्नॉलॉजी (ट्रीपल आय टी बंगलोर), एम. फिल. (केम्ब्रिज विद्यापीठ, इंग्लंड); एम. एस्सी - गणित (पुणे विद्यापीठ), बीएड; स्वतःची एज्युकेशन टेक्नॉलॉजीची कंन्सलटन्सी आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यपाल नियुक्त अधिसभा सदस्य; एनसीईआरटीच्या अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक निर्मिती कमिटीच्या गणित विषयाच्या सदस्य (member of NSTC CAG mathematics); जी 20 सी 20 आंंतर्गत Diversity Inclusion Mutual Respect आणि वसुधैवकुटुंबकम या दोन कार्यगटांत काम; उच्च शिक्षणासाठी देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिष्यवृत्त्यांचे संपादन; पोस्टडॉक्टोरेे संशोधनासाठी इस्त्रााली गव्हर्नमेंटच्या फेलोशिपवर वर्षभर इस्रायल मध्ये वास्तव्य; दोन वर्षे विवेकानंद केंद्राचे सेवाव्रती शिक्षिका म्हणून नॉर्थ ईस्टमधील अरूणाचल प्रदेश व आसाममधील शाळांमधे काम; ज्ञान प्रबोधिनी प्रशाला, पुणे येथे चार वर्षे गणिताचे अध्यापन; विवेकानंद केंद्र पुणे येथे सह-सचिव म्हणून जबाबदारी त्याआंतर्गत युथ कॅम्प्स, व्याख्यानमाला यांचे आयोजनात सहभाग, स्वामी विवेकानंदांचे विचार आणि कार्य यांवर विविध ठिकाणी व्याख्याने देणे, कार्यशाळा घेणे; महाविद्यालयीन जीवनात संघाच्या कौशिक आश्रम या कार्यालयाच्या माध्यमातून बालसंस्कार वर्ग घेणे, त्यातूनच पर्वती दर्शन परिसरात वस्तीतील मुला-मुलींसाठी एक अभ्यासिका चालू केली होती. एज्युकेेन टेक्नॉलॉजी, स्वामी विवेकानंद, इस्त्रायल, एल जी बी टी क्यू सारखे विविध सामाजिक तसेच राजकीय विषयांवर साप्ताहिक विवेक, मासिके, दिवाळी अंक, समाजमाध्यमे यांत अभ्यासपूर्ण लेखन.