चिकनगुनिया

27 Jan 2018 16:45:00

     

चिकनगुनिया या आजाराचं स्वरूप भयंकर असलं तरी तो जीवघेणा आजार नाही. तो बरा होतोच, शिवाय सांधेदुखी हा त्याचा उपद्रवदेखील बरा होऊ शकतो. गरज आहे ती फक्त योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून  घेण्याची.

दर पंधरा दिवसांनी, किंवा बाजारभाव उतरला तरी दर महिन्याला पुण्याला जाणारी मी, गेली तीन महिने पुण्यात गेले नाही. एरवी फोनवर, “कित्ती दिवस झाले तुला इकडे येऊन? कधी येतेस?” असं पुण्याहून आल्यावर दुसऱ्या दिवशी देखील म्हणणारी माझी माणसं; सध्या मात्र, “इतक्यात तू इकडे येउच नकोस” असं म्हणायला लागली आहेत. कारण काय तर ‘चिकनगुनिया’.

   काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात थैमान घातलेला चिकनगुनिया, सध्या पुण्यातल्या घराघरात  शिरला आहे. हा आजार सामान्यतः घरात एकाच वेळी सगळ्यांना होतो. सगळे आडवे झाल्यानं कोणीच कोणासाठी काही करू शकत नाही. शिवाय या आजारातल्या संधीवेदना या तीव्र आणि दीर्घकाळ छळणाऱ्या असल्यानं आजारातून लगेच सुटका होत नाही. एकूणच या आजाराचं स्वरूप इतकं त्रासदायक आहे की याचा एक रुग्ण नुसता बघितला तरी त्याचा धसका बसतो.  त्याच धसक्यानं, आत्यंतिक काळजी आणि प्रेमापोटी मला पुण्याची दारं सध्या बंद आहेत. कदाचित् तुम्हालाही असतील.  अर्थात डास हे  काही फक्त पुण्याचं वैभव  नाही. (मागे मुंबईत डेंग्यूची अल्पशी साथ असताना, डोंबिवलीतील माझ्या एका परिचित महिलेनं तिच्या नवऱ्याला एक महिना मुंबईत जाऊ दिलं नव्हतं. आता बोला.)

   ‘चिकनगुनिया’ हा मुळात साहिली भाषेतील शब्द आहे. पूर्वी हा आजार माकडांना होत असे. ‘एडीस इजिप्टी’ नावाच्या डासाची मादी या आजाराचा प्रसार करते. तिच्या चाव्यातून ‘अरबो व्हायरस’ नावाचे विषाणू मानवी शरीरात प्रवेश करतात. एकदा त्यांनी शरीरात प्रवेश केला की त्यांची संख्या वाढून आजार व्यक्त होण्याचा काळ पाच ते आठ दिवस इतका असतो. या आजाराची मुख्य लक्षणं अशी आहेत.

 

           काही रुग्णांमध्ये ही सगळी लक्षणं तीव्र स्वरूपात दिसतात,  काही जणांमध्ये काहीच लक्षणं दिसतात तर काही जणांमध्ये लक्षणांचं स्वरूप त्यामानानं सौम्य असतं. ताप आणि सांधेदुखी मात्र सगळ्यांमध्ये असते.

    चिकनगुनियाचं हे पुस्तकात वर्णन केलेलं चित्र आहे. याची लक्षणं इतकी स्पष्ट आणि तीव्र असतात की अगदी सुरवातीलाच आजाराचं निदान करणं सहज शक्य असतं. तरी RT_PCR या रक्तपरीक्षणात, चिकनगुनियाच्या व्हायरस चा RNA तपासता येतो. मात्र तो सातव्या दिवशी रक्तात आढळू शकतो.

     या आजारावर ताप घालवणारी आणि वेदनाशामक औषधं घेतली तरी ती किती काळ घ्यावी लागतील याचा भरवसा नसतो. काही वेळा आठवड्यानं किंवा महिन्यानं ताप परत येतो. सांधेदुखी आणि स्तब्धता तर कधीकधी दोन वर्ष पाठ सोडत नाही.

    आयुर्वेदाच्या दृष्टीनं विचार केला तर या ज्वराच्या प्रकारात अग्निमांद्य (भूक आणि पचनशक्ती यांचा ऱ्हास), वात दोषाच्या कामात बिघाड, रसवहस्रोतसाच्या कामात बिघाड, (आहारापासून तयार झालेला पहिला शरीर घटक म्हणजे रस धातू होय. त्याचं शरीरभर वहन करणारं स्रोतस - channel म्हणजे रसवह स्रोतस), रक्तात बिघाड, अस्थि (हाडं) आणि सांध्यात बिघाड झालेला असतो. शास्त्रातील आमवात या आजारात वर्णन केल्यासारखी परंतु त्याहीपेक्षा तीव्र वेगानं घडलेली ही परिस्थिती आहे. याचा प्रतिकार करायचा असेल तर दोन पद्धतीनं विचार करायला हवा.

    पहिला मुद्दा प्रतिबंधाचा. हा आजार डासांपासून होत असल्यानं आपल्या परिसरात डासांना वाढायला अनुकूल वातावरण कटाक्षानं टाळावं. या संबंधात महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत हे वेळोवेळी सूचना देत असतात आणि फवारणी देखील करत असतात. याउपर डास होत असतील तर घराच्या खिडक्यांना जाळ्या बसवणं आणि रात्री मच्छरदाणीचा वापर करणं हे उपाय हुशारीचे ठरतात.

    आजार झालाच तर सुरुवातीला तातडीनं करायचे उपचार म्हणजे....

           चिकनगुनियाच्या काही रुग्णांमध्ये सुरुवातीला विरेचन किंवा बस्ती असे शोधानोपाक्रम करावे लागतात. ते अर्थातच वैद्यांच्या देखरेखीखाली करायचे असतात. ते करून घेताना वैद्यांचे सल्ले तंतोतंत पाळावे हे महत्त्वाचं. या आजारात ताप गेल्यावरदेखील दीर्घकाळ औषधं घ्यावी लागतात. प्रत्येक रुग्णानुसार ही औषधं बदलतात. म्हणून मनानं औषधं घेऊ नयेत. घरातल्या एका माणसाला दिलेली किंवा लिहून दिलेली औषधं दुसऱ्यानं वापरू नयेत. आहाराचं पथ्य- अपथ्य सांभाळावं लागतं. यासाठी वैद्यकीय सल्ला आवश्यक ठरतो. आजारानं सांध्यांमध्ये केलेले बिघाड याच उपक्रमांनी बरे होऊ शकतात. त्यामुळे रुग्णाला वेदनारहीत आयुष्य जगायची संधी मिळते.

       लक्षात घ्या की चिकनगुनिया या आजाराचं स्वरूप भयंकर असलं तरी तो जीवघेणा आजार नाही. तो बरा होतोच, शिवाय सांधेदुखी हा त्याचा उपद्रवदेखील बरा होऊ शकतो. गरज आहे ती फक्त योग्य वेळी वैद्य गाठण्याची आणि त्यांच्याकडे पुरेसा काळ उपचार करून  घेण्याची.

9322790044

vaidyasuchitra@gmail.com

 

Powered By Sangraha 9.0