'कन्हैया कुमारा'। संसद उंबरा। गाठणार कसा?॥

30 Mar 2019 13:12:00

सीपीआयचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य कन्हैया कुमार यांनी आपण बेगुसराय मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे प्रसारमाध्यमांसमोर सहा महिन्यांपूर्वी जाहीर केले होते. मात्र ज्या महाआघाडीच्या जिवावर त्यांनी ही घोषणा केली आणि भाजपाविरोधात ते भाषणबाजी करत आहेत, त्याचे पुरोगामी नेते त्यांच्यासाठी बिहारमध्ये एकही जागा सोडायला तयार नाहीत. त्यामुळे निवडणूक लढून संसदेत जाण्याच्या कन्हैया यांच्या स्वप्ांना त्यांचेच सहकारी पक्ष आडकाठी करत असल्याचे चित्र आहे.

 

सहा महिन्यांपूर्वी कन्हैया कुमार यांनी देशभरात भाषणांचा सपाटा लावला होता. 'संविधान बचाव' अशी ती मोहीम होती. या सभांना किती उपस्थिती आहे हे कधीच दाखविले जायचे नाही. पण या भाषणांना माध्यमांतून मोठी प्रसिध्दी मिळायची. त्या वातावरणात पत्रकारांनी त्यांना विचारले होते, ''तुमची राजकीय भूमिका काय? तुम्ही आत्तापर्यंत विद्यार्थी होता, पण आता भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे (सी.पी.आय.चे) राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आहात. पक्षाचे अधिकृत नेते आहात. भाजपाला विरोध करायचा म्हणजे केवळ भाषणे करून जमत नाही. प्रत्यक्ष निवडणुकीत उतरावे लागते.'' यावर उत्तर देताना कन्हैया कुमार यांनी आपण बिहारमधील बेगुसराय या आपल्या मतदारसंघातून लोकसभा लढवायचे जाहीर केले होते.

 

सा. विवेकच्या सर्व वाचकांना विनंती आहे की, त्यांनी खालील विवेकचे  फेसबुक पेज like करावे....


https://www.facebook.com/VivekSaptahik/

 लगेच पुरोगामी माध्यमांना आनंदाचे भरते आले. त्यांनी यावर मोठया बातम्या केल्या आणि असे चित्र उभे केले की आता केवळ निवडणुकीची घोषणा व्हायची किरकोळ औपचारिकता बाकी आहे. कन्हैया कुमार यांना लोकांमधून प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे. भाजपाविरोधी पक्षही त्यांना 'महाआघाडी'चा एकमेव उमेदवार म्हणून उभा करतील आणि ते निवडून येतील.

पत्रकारांनी मग यावर प्रतिक्रिया म्हणून मुख्यमंत्री नितीशकुमार यांना विचारले. नितीशकुमार स्वत: विद्यार्थिदशेपासून राजकारणात आहेत. त्यांनी तथाकथित 'महाआघाडी'ची चव चांगलीच चाखली आहे. त्यांनी फार जबाबदारीने प्रतिक्रिया दिली, ''लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे. कन्हैया एका मोठया राजकीय पक्षाचे नेते आहेत. निवडणूक लढवणे न लढवणे हा संपूर्णत: त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. निवडणुकांच्या सक्रिय राजकारणासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा!''

यातील गोम पत्रकारांच्या लक्षात आली नाही किंवा त्यांना ती लक्षात घ्यावीशी वाटली नाही. पत्रकारांनी खरे तर बिहारातील 'महाआघाडी'चे मुख्य सूत्रधार लालूप्रसाद किंवा त्यांचा वारसा चालविणारे त्यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांना विचारायला हवे होते. पण त्यांनी या पुरोगामी नेत्यांना गृहीत धरले. आणि पुरोगामी पत्रकारांची नेमकी हीच चूक झाली. जी गोष्ट इतक्या दीर्घ अनुभवांनी नितीशकुमारांना कळली होती, ती तथाकथित पुरोगामी पत्रकारांना कळण्याची शक्यता नव्हती. त्यांनी आंधळया भाजपा-संघद्वेषाच्या जोशात आपल्या बातम्या, लेख रंगवायला सुरुवात केली.

प्रत्यक्ष निवडणुकीची घोषणा झाली. निवडणुका होणारच नाहीत अशी बोंब आधीच पुरोगाम्यांनी केली होती. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा त्यांना जरा धक्काच बसला. मग 'महाआघाडी'ची बोलणी सुरू झाली. प्रत्यक्ष निवडणुका जाहीर झाल्या नव्हत्या, तोपर्यंत महाआघाडी हा विषय जोरात होता. पण प्रत्यक्ष जेव्हा

लढाईचा खरा डंका झडाया लागला

जो तो आपापल्या तंबूत दडाया लागला

असे जे सुरेश भटांनी लिहिले आहे, त्याप्रमाणे सुरू झाले. आपल्या आपल्या पक्षात सगळे दडायला लागले. काहींनी तर निवडणुकीत सपशेल माघारच घेतली. कन्हैया कुमार यांच्या बिहारात 'महाआघाडी'चा जो प्रयोग सुरू झाला, त्यात नेमकी डाव्या पक्षांनाच जागा शिल्लक ठेवण्यात आली नाही. लालूंच्या राष्ट्रीय जनता दलाने 40पैकी 20 जागा स्वत:कडे ठेवल्या. यातील एक जागा शरद यादवांना सोडली. अट इतकीच की त्यांनी राजदच्या चिन्हावर लढायचे आणि निवडणुकीनंतर राजदमध्ये आपला पक्ष विलीन करायचा. एक जागा सी.पी.आय. (एम.एल.) या कम्युनिस्ट गटाला सोडली.

आता उरलेल्या जागांपैकी किमान एक जागा कन्हैया कुमारसाठी सोडतील असे अपेक्षित होते. पण ते तसे घडले नाही. आणि यासाठी जे कारण देण्यात आले, ते पुरोगाम्यांच्या तोंडात चपराक मारणारे आहे. तेजस्वी यादव म्हणाले की ''बेगुसराय येथे भाजपाने केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना तिकीट दिले आहे. ते कन्हैया कुमार यांच्याच जातीचे (भूमिहार) आहेत. मग कन्हैया कुमार यांना मते कोण देणार? त्यापेक्षा आम्ही तिथे मुस्लीम उमेदवार देणार आहोत.''

तेजस्वी यादव यांचे हे जातीचे 'तेजस्वी' गणित. याला नेमके काय उत्तर आहे पुरोगाम्यांकडे? महाआघाडीची पतंगबाजी करत असताना खेळ प्रत्यक्ष खेळपट्टीवरच खेळावा लागतो, 'कॉमेंटरी बॉक्समध्ये' बसून खेळता येत नाही, हे साधे तत्त्व पुरोगामी पत्रकार विसरले.

बिहारमधील लालूप्रणीत या 'महाआघाडी'मध्ये काँग्रेसच्या वाटयाला 9 जागा आल्या आहेत आणि आगामी राज्यसभा निवडणुकीत त्यांना एक जागा मिळणार आहे. उपेंद्र कुशवाह, जे आधी रालोआचे घटक होते, त्यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाला 5, माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांच्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) या पक्षाला 3, मुंबईचे व्यावसायिक मुकेश सैनी यांच्या विकासशील इन्सान पक्षाला 3 जागा सोडण्यात आल्या आहेत.

म्हणजे जितन राम मांझी, उपेंद्र कुशवाह, मुकेश सैनी यांच्यासाठी एकूण 11 जागा सोडायला पुरोगामी हृदयसम्राट लालूप्रसाद यादव (आडवाणींची रथयात्रा रोखणारे म्हणून पुरोगामी हृदयसम्राट) तयार झाले. पण कन्हैया कुमारांसाठी एकही जागा सोडायला तयार नाहीत. इतकेच नाही, तर आख्ख्या बिहारात डाव्यांना जागा सोडली गेली नाही. मागच्या निवडणुकीतही ही जागा सोडण्यात आली नव्हती.

केवळ बिहारमध्येच कम्युनिस्टांची ही गोची केली गेली आहे असे नाही. डाव्यांचा एकेकाळचा गड असलेल्या पश्चिम बंगालमध्येही अगदी त्यांच्या विद्यमान खासदारांच्याही जागा सोडायला काँग्रेस तयार नाही, हे पाहून शेवटी ही आघाडीच बारगळली. लांब कशाला, आपल्या महाराष्ट्रातही हीच परिस्थिती आहे.

नाशिक जिल्ह्यात दिंडोरी मतदारसंघात कम्युनिस्टांचे चांगले काम आहे. विद्यमान आमदार जिवा पांडू गावित यांना ही जागा हवी होती. पण राष्ट्रवादीने इथे आपला उमेदवार घोषित करून डाव्यांना चित करून टाकले. दुसरी जागा पालघरची होती. पण या ठिकाणी बहुजन विकास आघाडीला जागा सोडून हा रस्ताही बंद केला. सोलापूरला लोकसभा नाही, पण पुढे चालून विधानसभा नरसय्या आडम यांच्या रूपाने लढविता आली असती. पण तिथेही आडम यांनाच पक्षातून काढून टाकून डाव्यांनी आपल्याच पायावर कुऱ्हाड (किंवा त्यांच्या चिन्हात असलेला कोयता) मारून घेतली आहे.

आता प्रश्न निर्माण होतो की कन्हैयासारखे जेव्हा भाजपा-संघ-मोदी विरोधात आपल्या भाषणांतून तोफा डागत असतात, त्याचा फायदा कुणाला होणार? आणि हे कशासाठी असा फुकटचा प्रचार करत राहिले?

परभणी लोकसभा मतदारसंघात तर विचित्र परिस्थिती आहे. कन्हैयाच्याच पक्षाचा (सी.पी.आय.) अधिकृत उमेदवार कॉ. राजन क्षीरसागर लोकसभेसाठी उभा आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार आहे. आणि सहा महिन्यांपूर्वी याच राष्ट्रवादीच्या लोकांनी संपूर्ण मतदारसंघात 'संविधान बचाव' या नावाने कन्हैयाच्या सभा घडवून आणल्या होत्या. मग राष्ट्रवादीने ही जागा कम्युनिस्टांसाठी का नाही सोडली?

जर सोडायचीच नव्हती, तर कन्हैयाला बोलावून त्याच्या सभा का घडवून आणल्या? याचा अतिशय वाईट असा अर्थ निघू शकतो की केवळ भाजपा-संघविरोधी वातावरण तयार करण्यासाठी या भाषणांच्या सुपाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यात प्रत्यक्ष डाव्या राजकारणाचा बळी गेला तरी हरकत नाही. आज देशभरात रालोआ विरुध्द काँग्रेसप्रणीत संपुआ विरुध्द प्रादेशिक पक्षांची आघाडी (ममता, चंद्राबाबू, नवीन पटनायक, चंद्रशेखर राव, केजरीवाल) विरुध्द सपा अधिक बसपा विरुध्द डावे लढत आहेत. म्हणजे भाजपाविरोधात अधिकृतरीत्या चार आघाडया तयार झाल्या आहेत. मग कर्नाटकाच्या निवडणुकीत हात उंच करून महाआघाडीच्या घेतलेल्या शपथा कुठे गेल्या?

सत्ताधारी आणि विरोधक हे सर्व राजकारणच करत असतात. त्यामुळे त्यांच्या आघाडया आणि विरोध हा मुद्दा आपण जरा बाजूला ठेवू. हे चालणारच आहे. मग महाआघाडीच्या नावाने आपल्या लेखण्या झिजविणारे जे पत्रकार होते आणि आजही आहेत, ते ही पतंगबाजी कशासाठी करत आहेत? कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल, अल्पेश ठाकूर, उमर खालिद ही सगळी पिलावळ काही दिवसांपूर्वी माध्यमांनी मोठी केली होती, यांना अवास्तव प्रसिध्दी देण्यात आली होती ती कशासाठी?

आज डाव्या पक्षांत निष्ठेने वर्षानुवर्षे काम केलेले निःस्पृह कार्यकर्ते आहेत. त्यांना बाजूला ठेवून या उठवळ तरुणांना मोठे करण्यात आले, हे कशासाठी? ही कुणाची बौध्दिक दिवाळखोरी आहे?

भाजपाला पराभूत करायचे असेल, तर प्रत्यक्ष निवडणुकीला उभे राहून सक्षम विरोध करून दाखवावा लागतो. मग कन्हैयाला जर त्याच्या जातीवरून पुरोगामीच आता घेरत असतील, तर हे राजकारण पुढे फलदायक होणार कसे?

लोकशाहीत निवडणुकांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकांसमोर तुम्ही पर्याय उभा केला पाहिजे. लोकांनी तुमच्यावर  विश्वास दाखवीत तुम्हाला मते दिली पाहिजेत. मग निवडून आल्यावर वैध मार्गाने तुम्हाला सत्ताधाऱ्यांना विरोध करणारा सक्षम विरोधी पक्ष बनता आला पाहिजे आणि आपल्या कामांतून आणखी एक पायरी पुढे चढून तुम्हाला मतदारांनी सत्ताधारी बनविले पाहिजे. हे सगळे विसरून केवळ भाषणबाजी करून सत्ताधाऱ्यांना विरोध केला, तर त्याचा फारसा उपयोग होत नाही. उद्या लोक यांना ऐकणारही नाहीत. कन्हैया कुमार सीपीआयच्या तिकिटावर निवडणूक लढवीत आहेत, पण त्यांना महाआघाडीचा पाठिंबा नाही, हे लक्षात घेणे आवश्यक आहे.  

जनशक्ती वाचक चळवळ, औरंगाबाद

 

Powered By Sangraha 9.0