***श्रीकांत भुतडा****
अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनायकराव जाधव-पाटील यांचे 'प्रगतिपुस्तक' शेकडो विकासकामांनी भरलेले आहे आणि त्याचे परिणामही या मतदारसंघात स्पष्टपणे दिसून येत आहेत. या विकासकामांची यादी आणि तिचा वेग, झपाटा एखाद्या बुलेट ट्रेनलाही लाजवेल असाच आहे.
2014मध्ये केंद्रात आणि राज्यातही ऐतिहासिक सत्तापरिवर्तन झाले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचे कथित बालेकिल्ले या मोदीलाटेत उद्ध्वस्त झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली अन्य पक्षांतील अनेक ल्त्यांनी, कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला व 'सबका साथ, सबका विकास' या मोदींच्या घोषणेला अनुसरून पुढे वाटचाल सुरू केली. महाराष्ट्रातील मराठवाडा प्रदेश हा याचे मूर्तिमंत उदाहरण. राज्यातील हा भाग स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या दशकांनंतरही अविकसित, मागास म्हणूनच ओळखला गेला. हे चित्र बदलण्यासाठी फडणवीस सरकारने युध्दपातळीवर प्रयत्न सुरू केले व या वाटचालीत मराठवाडयातील अनेक दिग्गज नेते सामील झाले. अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनायकराव जाधव-पाटील हे यातील आघाडीचे नाव.
2014मध्ये विनायकराव जाधव-पाटील या मतदारसंघातून दुसऱ्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. वास्तविक, विनायकराव हे कोणतीही कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसलेले, सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले कार्यकर्ते. परंतु लातूर जिल्ह्याचा, अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे स्वप्न उराशी बाळगून, 'जनसेवा हीच ईश्वरसेवा' हे ब्रीदवाक्य घेऊन मार्गक्रमण करणाऱ्या या सर्वसामान्य कार्यकर्त्याला अहमदपूर-चाकूरवासीयांनी आपला लोकप्रतिनिधी म्हणून विश्वासाने निवडून दिले आणि त्याचे परिणाम आज मतदारसंघात जाणवून येत आहेत.
2014 ते 2019 या पाच वर्षांच्या कार्यकाळात विनायकरावांनी मतदारसंघात विकासकामांचा धडाकाच लावून दिला आहे. प्रामुख्याने कृषिप्रधान असलेल्या या मतदारसंघात कृषी, सिंचन, आरोग्य, रस्ते-राष्ट्रीय महामार्ग आदी पायाभूत सुविधा, शिक्षण, पेयजल, बंधारे, गृहनिर्माण, विद्युतपुरवठा आदी असंख्य क्षेत्रांत आज नेत्रदीपक काम झालेले दिसत आहे आणि परिणामी अविकसित, मागास, दुष्काळग्रास्त अशी या भागाची ओळख हळूहळू पुसली जाताना दिसत आहे.
गेल्या पाच वर्षांत विनायकरावांनी मतदारसंघासाठी थोडाथोडका नाही, तर तब्बल 2600 कोटी रुपयांचा विकास निधी आणण्यात यश मिळवले. यातून या भागात असंख्य कामे झाली आहेत, काही प्रगतिपथावर आहेत. अहमदपूर हे लातूर-नांदेड भागातील महत्त्वाचे आणि मध्यवर्ती असे वाहतूक केंद्र. या मतदारसंघातून तीन-तीन राष्ट्रीय महामार्ग जातात. यामुळे हे महत्त्व ओळखून त्यानुसार विकासकामांचे नियोजन करणे गरजेचे होते व केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली उर्वरित देशभराप्रमाणेच मराठवाडयात आणि अहमदपूर-चाकूरमध्येही रस्त्यांचे जाळे विणले जात आहे.
जोपर्यंत नवे उद्योग मतदारसंघात येणार नाहीत, तोपर्यंत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध होणार नाहीत, ही स्पष्ट भूमिका आ. जाधव-पाटील यांनी घेतली आणि त्या दृष्टीने पाठपुरावा क्केला. परिणामी, चाकूर औद्योगिक वसाहतीसाठी पहिल्या टप्प्यात भरीव निधी मंजूर झाला, शिवाय अहमदपूर औद्योगिक वसाहतीचाही लवकरच शुभारंभ होणार आहे.
अहमदपूर-चाकूर मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत झालेल्या विकासकामांची नुसती यादी जरी वाचायची झाली तरी थकायला होईल, अशी अवस्था आहे. मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्गांसाठी आतापर्यंत 1040 कोटी इतका निधी मिळवण्यात विनायकराव जाधव-पाटील यांना यश मिळाले आहे. तसेच, तीर्थक्षेत्र विकास योजनेत 62 कामांसाठी 5 कोटी, जि.प. प्राथमिक व माध्यमिक शाळा दुरुस्तीच्या 125 कामांसाठी साडेतीन कोटी, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या बांधकाम व दुरुस्तीच्या 72 कामांसाठी 7 कोटी, जलयुक्त शिवारच्या 1176 कामांसाठी सुमारे 70 कोटी, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन अभियानांतर्गत 4766 लाभार्थी व साडेसव्वीस कोटीचा निधी, राष्ट्रीय फलोत्पादन योजनेत 159 लाभार्थी व सव्वादोन कोटीचा निधी, दलितोत्तर जिल्हास्तर योजनेसाठी दीड कोटी, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 1690 लाभार्थी व साडेसतरा कोटींचा निधी, रमाई आवास योजनेअंतर्गत 2936 लाभार्थी व 35 कोटींचा निधी, इंदिरा आवास योजनेअंतर्गत 2264 लाभार्थी व साडेएकवीस कोटींचा निधी, उज्ज्वला गॅस योजनेंअंतर्गत 5918 लाभार्थी, स्वच्छ भारत अभियानांतर्गत 30812 लाभार्थी व 37 कोटींचा निधी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना अर्थात कर्जमाफी योजनेअंतर्गत 33312 लाभार्थी व 82 कोटी निधी, दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत 70 कोटींचा निधी, आयुष्मान भारत योजनेअंतर्गत 27515 लाभार्थींना कार्ड वाटप, खरीप व रब्बी पीक विमा योजनेअंतर्गत 2014 ते 19 या कालावधीत 9 कामांसाठी 483 कोटींचा निधी, राज्यस्तरीय नगरोत्थान पाणीपुरवठा योजनेतून लिंबोटी धारण ते अहमदपूर शहर कायमस्वरूपी पाणीपुरवठा प्रकल्पासाठी 42 कोटींचा निधी, महावितरणची 25 कोटी निधीची विद्युत विकास कामे.. ही यादी न संपणारी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे सगळे केवळ 5 वर्षांत साध्य केल्यामुळे अहमदपूर-चाकूर मतदारसंघ आज विकासाच्या मार्गाने वाटचाल करत आहे आणि या वाटचालीत आ. विनायकराव जाधव-पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे, असे नक्कीच म्हणता येईल.
छत्रपती शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराजांचा अश्वारूढ पुतळा मतदारसंघात असावा हे स्वप्न अहमदपूरवासीयांनी पाहिले होते. आज शिवरायांचा अश्वारूढ पुतळा शहरात दिमाखात उभा आहे. मराठा आरक्षणासारखा कित्येक वर्षांचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावतानाच शेतकरी कर्जमाफीसारखा महत्त्वाचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला. अहमदपूर-चाकूर भागातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना, युवकांना व विद्यार्थ्यांना या निर्णयांचा मोठा फायदा होणार आहे. कोणताही लोकप्रतिनिधी उत्तीर्ण की अनुत्तीर्ण हे ठरवणारी परीक्षा म्हणजे अर्थातच निवडणूक! आणि राज्यातील 288 लोकप्रतिनिधींची ही परीक्षा आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विनायकराव जाधव-पाटील यांचे 'प्रगतिपुस्तक' वर उल्लेखलेल्या शेकडो विकासकामांनी भरलेले आहे आणि त्याचे परिणामही या मतदारसंघात स्पष्टपणे दिसून येत आहेत. या विकासकामांची यादी आणि तिचा वेग, झपाटा एखाद्या बुलेट ट्रेनलाही लाजवेल असाच आहे. त्यामुळे परीक्षेला सामोरे जात असतानाच हा अहमदपूर-चाकूरवासीयांनी भरभरून प्रेम दिलेला लोकप्रतिनिधी उत्तीर्ण होणार की नाही, हे वेगळे सांगण्याची कदाचित गरजच पडणार नाही!