***शैलेश राजपूत***
मेट्रो-3च्या कारशेडविरुद्ध उभे केलेले आंदोलन म्हणजे ख्रिस्ती मिशनरी, बाह्य निधीवर पोसल्या गेलेल्या स्वयंसेवी संस्था आणि विकासविरोधी समाजकंटक यांनी मीडियाला हाताशी घेऊन आणि सोशल मीडियाद्वारे भ्रम आणि छद्म पसरवून, लोकांची दिशाभूल करून उभे केलेले एक भीषण कारस्थान असल्याचे लक्षात येत आहे.
आरे दुग्धवसाहतीत होत असलेल्या मेट्रो-3च्या कारशेडला विरोध करण्यासाठी 2014 साली ‘Save Aarey’ ही चळवळ सुरू झाली. वरकरणी पर्यावरणरक्षण असा या चळवळीचा उद्देश वाटत असला, तरी यांची एकूण कार्यप्रणाली संशय निर्माण करणारी आहे.
‘आरे वाचवा’ असं म्हणत असताना या लोकांना 1,287 हेक्टरमध्ये पसरलेल्या आरे दुग्धवसाहतीचे कोणतेच प्रश्न दिसत नसून यांचा मुद्दा फक्त 30 हेक्टर जमिनीवर बांधल्या जाणार्या कारशेडच्या जागेपुरताच मर्यादित आहे.
एकूणच आरे दुग्धवसाहतीचा इतिहास पाहता 1949 साली सरकारने ही जमीन दुग्धप्रकल्पासाठी अधिग्रहित केली. 1951 साली स्वतः जवाहरलाल नेहरू यांनी येथे आशियातील पहिली दुग्धशाळा स्थापन केली. या भागात म्हशींचे व गायींचे 32 गोठे आहेत. यातील जनावरांसाठी 160 हेक्टर जमिनीवर कुरणांची लागवड होते. 1990च्या दशकापर्यंत मुंबई शहराला आरे दुग्धयोजनेद्वारे दूधपुरवठा होत होता.
देशाच्या दुधउत्पादन धोरणात 1991 ते 2002मध्ये झालेल्या बदलानुसार सुरुवातीला शासकीय आस्थापनांकडे असलेले दुग्धउत्पादन क्षेत्र हळूहळू सहकार आणि खाजगी क्षेत्राकडे वळवण्यात आले. त्यामुळे 1997नंतर वारणा आणि गोकुळ या कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी दूध संघांनी बृहन्मुंबई परिसरात दूधपुरवठा करण्यास सुरुवात केली. दुग्धव्यवसायातील एकूणच बदललेल्या धोरणामुळे आरे दुग्धवसाहतीतील शासकीय दुग्धव्यवसाय बंद झालेला आहे.
सरकारी जागेत असलेले येथील 32 गोठे आता आपल्या दुधाचा खाजगी व्यवसाय करत आहेत. म्हणूनच ऑगस्ट 2016मध्ये महाराष्ट्राचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी या गोठ्यातील 25 टक्के दूध सरकारकडे जमा करण्याची मागणी केल्याची बातमी होती.
एकूणच सरकारी जमीन असलेल्या या आरे दुग्धवसाहतीत आता सरकारी दुग्धव्यवसाय होत नसल्यामुळे गेल्या दोन दशकांत आरे वसाहतीत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत व होत आहेत. यात प्रामुख्याने झोपड्या, छोटी-मोठी देवळे, मांत्रिक-बाबा यांचे अड्डे अशा विविध गोष्टी वसत आहेत. गोरेगाव व आसपासच्या परिसरातील विविध मंडळी आरे कॉलनीत पावसाळ्यात वृक्षारोपणाचे कार्यक्रम करत असतात. यानंतर काही समाजकंटकांकडून ही रोपे नष्ट करण्याचेही प्रकार वारंवार घडत असतात.