एका अवलियाचे जाणे...

विवेक मराठी    23-Oct-2020
Total Views |

 हिंदुत्वासाठी, संघासाठी, समाजासाठी झटणाऱ्या तरुणांचा कौस्तुभ सोहोनी हा आदर्श होता. त्यांच्या जाण्याने रायगड जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण संघ परिवाराची हानी अपरिमित हानी झाली आहे. संघाचे अनेक कार्यकर्ते होऊन गेले, आता आहेत, या पुढेही तयार होतील पण कौस्तुभ सोहोनी यांच्यासारखा एखादा समर्पित पण कलंदर माणूस विरळाच. त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

sohani_1  H x W

मानव निर्माण आणि त्यातून समाज निर्माण हे कायमच संघाचे महत्त्वाचे कार्य राहिले आहे. शहरांमध्ये
, गावोगावी संघाने अनेक कार्यकर्ते घडवले. समर्पित वृत्तीने हे कार्यकर्ते समाजासाठी, राष्ट्रासाठी, नागरिकांसाठी काम करत असतात. जीवित असेपर्यंत समाजहित हेच त्यांचे प्राधान्य असते. अशा कार्यकर्त्यांचे अकाली निधन होणे हे संघाच्या आणि समाजाच्या दृष्टीने अत्यंत दु:खदायक असते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रायगड जिल्हा सह कार्यवाह कौस्तुभ सोहोनी यांचे गेल्या शनिवारी १७ ऑक्टोबर रोजी दु:खद निधन झाले. अवघ्या पस्तिसाव्या वर्षी त्यांचे जाणे हे अनेकांसाठी धक्कादायक होते. अत्यंत धडाडीचा, समर्पित कार्यकर्ता अशी त्यांची ख्याती होती. केवळ कार्यकर्ताच नव्हे तर एक जवळचा मित्र गमावल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. मागील काही दिवस ते किडनीविकाराने ग्रस्त होते. कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

रोह्याच्या शाखेतील स्वयंसेवक म्हणून सुरु झालेला त्यांचा प्रवास हा पुढे तालुका कार्यकर्ता, जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख आणि जिल्हा सहकार्यवाह अशा जबाबदाऱ्या पूर्ण करीत सुरूच राहिला. अत्यंत तेजस्वी, प्रभावी आणि तितक्याच नम्र अशा आपल्या स्वभावाने त्यांनी अनेकांना आकृष्ट करून घेतले व संघकार्याशी जोडले. कष्टपूर्वक अनेक नवे स्वयंसेवक, कार्यकर्ते संघाला दिले. रायगड जिल्ह्यात संघ कार्याचा विस्तार करण्यात कौस्तुभ यांचा मोलाचा वाटा होता. विशेष म्हणजे घरात संघाची फारशी पार्श्वभूमी नसताना केवळ शाखेत यायला लागलेला एक स्वयंसेवक ते प्रचारक हा त्यांचा प्रवास कोणाही संघ कार्यकर्त्यासाठी पथदर्शी असाच आहे.

 

अतिशय हरहुन्नरी आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणाऱ्या कौस्तुभ सोहोनी यांनी आपल्या स्वभावाने अनेकांना आपलेसे करून घेतले. एखाद्या तरुणाशी संवाद साधताना त्यांचा जेवढा मोकळेपणा असे तेवढीच सहजता ज्येष्ठाशी संवाद साधण्यातही होती. आपले म्हणणे सर्व वयोगटाच्या कार्यकर्त्यांना पटवून देणे, त्यांच्या पचनी पाडणे हे त्यांना सहजसाध्य होते. जेवढे निरपेक्षपण त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात होते तेवढेच संघकार्यातही होते. तृतीय वर्ष शिक्षित झाल्यानंतर ते प्रचारक निघाले आणि जिल्ह्याच्या सर्वदूर क्षेत्रांत संघाचे काम पोहोचविण्यासाठी अविरत कष्ट घेतले. पुढे प्रचारक म्हणून थांबल्यानंतरही आपला व्यवसाय सांभाळत आपले संघकार्य त्यांनी अविरत सुरूच ठेवले होते. गेल्या ऑक्टोबर अखेरीस पोलादपूर येथे पहिल्यांदाच संघाचा प्राथमिक शिक्षा वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्या तयारीसाठी अगोदर येऊन सर्व व्यवस्था काटेकोर कशा लागतील याची चोख तयारी त्यांनी सर्वांच्या मदतीने करून घेतली. शारीरिक-बौद्धिक या दोन्ही क्षेत्रात त्यांची उत्तम तयारी होती. जिल्हा बैठक घेताना मुद्द्यांवर सर्वस्पर्शी चर्चा करणे व सर्वांना त्यात सामावून घेणे ही त्यांची खासियत होती.

जेवढ्या आत्मीयतेने कौस्तुभ यांनी संघकार्य पुढे नेले तेवढ्याच आत्मीयतेने आणखी एक कार्य अनेक वर्षे केले होते. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समितीद्वारे दरवर्षी रायगडावर शिवपुण्यतिथीच्या दिवशी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या सोहळ्याच्या नियोजनात आणि व्यवस्थेत कौस्तुभ यांचा मोलाचा सहभाग होता. शेकडो लोक या सोहळ्याला दरवर्षी उपस्थित राहतात. मुख्यत्वे या सर्वांच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याचे काम त्यांच्याकडे असे. त्यांच्यावर जबाबदारी सोपविली की ते काम हमखास आणि व्यवस्थित होणार याची सर्वांना खात्री असे.

गेला महिनाभर ते आजारी होते. तात्पुरते आजारपण असावे असे वाटून आपल्या दुखण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. रविवार, १० ऑक्टोबर रोजी अलिबागच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले. त्यावेळी त्यांची किडनी नादुरुस्त झाल्याचे लक्षात आले. मंगळवारी त्यांना कळंबोलीच्या महात्मा गांधी मिशन अर्थात एमजीएम रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर दोन वेळा त्यांचे डायलिसीस करण्यात आले. शनिवारी सकाळी अतिदक्षता विभागातून बाहेर काढल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला. त्यानंतर त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले परंतु दुपारी एकच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

कौस्तुभ यांच्या निधनानंतर समाजमाध्यमाद्वारे अनेकांनी आपल्या भावनांना वाट करून दिली. त्यात एक सामान्य प्रतिक्रिया होती ती जिवलग मित्र गमावल्याची. आपला एक सुहृद गमावल्याची प्रत्येकाची भावना आहे. हिंदुत्वासाठी, संघासाठी, समाजासाठी झटणाऱ्या तरुणांचा कौस्तुभ सोहोनी हा आदर्श होता. त्यांच्या जाण्याने रायगड जिल्ह्याचीच नव्हे तर संपूर्ण संघ परिवाराची हानी अपरिमित हानी झाली आहे. संघाचे अनेक कार्यकर्ते होऊन गेले, आता आहेत, या पुढेही तयार होतील पण कौस्तुभ सोहोनी यांच्यासारखा एखादा समर्पित पण कलंदर माणूस विरळाच. त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे.

( विश्व संवाद केंद्र )