@डॉ. कुमार शास्त्री
शंभर वर्षांपूर्वी २६ डिसेंबर १९२० रोजी नागपुरात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक अनोखे, ऐतिहासिक अधिवेशन झाले. नागपुरातील धंतोलीजवळ ज्या मोकळ्या मैदानावर हे अधिवेशन झाले, त्यातूनच आजचे ‘काँग्रेस नगर’ साकारले. अधिवेशनाच्या अस्तित्वाची ते साक्ष देते. या अधिवेशनाला ऐतिहासिक घटनांच्या नोंदी व काही महत्त्वाची अधोरेखिते प्राप्त झाली आहेत. या अधिवेशनाच्या घटनांमधून तत्कालीन नागपूर नगरीचा इतिहास, वेगळेपण, समाजकारण, राष्ट्रीय दृष्टीकोन दिसून येतो.
असे म्हणतात की इतिहास ही कालपुरुषाची शिकवण असते. त्यात मार्गदर्शनाच्या खुणा असतात, त्या ओळखायच्या, त्यातून धडा घ्यायचा हा कालक्रम असतो. नागपूर नगरीतील हे अधिवेशन खरोखरीच वैशिष्टयपूर्ण यासाठी ठरते, कारण १९२०मध्ये काँग्रेसमधील ‘टिळकयुगाचा अस्त अन गांधीयुगाचा उदय’ या संधिकाळातील वेशीवर हे अधिवेशन झाले. यामुळेच काही ऐतिहासिक महत्त्वपूर्ण घटनांची पार्श्वभूमी या अधिवेशनाला लाभली आहे.
आपण सगळेच जाणतो की स्वातंत्र्यपूर्व काळातील काँग्रेस ही सच्च्या देशभक्तांची होती. काँग्रेस ही एक स्वातंत्र्यचळवळ होती. तसाही काँग्रेसचा इतिहास बघणे रंजक ठरावे. इंग्रज शासकांविरुद्धच्या जनअसंतोषाला वाट करून देण्यासाठी एक सेटी व्हॉल्व एक यंत्र म्हणून ‘काँग्रेसची’ स्थापना झाली. ती एका इंग्रज गृहस्थाने केली. त्याचे नाव ‘अॅलन ह्यूम’. ह्यूमसाहेब काँग्रेसची स्थापना घाईने करताहेत, असे इंग्रज मुत्सद्द्यांचे मत होते. पण असंतोषाचा भडका उडू न देता असंतोषाची वाफ बाहेर काढणे आवश्यक आहे, अशी ह्यूम यांची विचारसरणी होती. प्रारंभीच्या काँग्रेसच्या अधिवेशनात यामुळे ब्रिटिश सत्तेविषयी निष्ठेची शपथ घेतली जाई. पुढे ते थांबले आणि विनंती व मागण्या, अर्ज यांचे सत्र सुरू झाले.
लोकमान्य टिळक काँग्रेसमध्ये आल्यानंतरच काँग्रेसचे पक्षांचे खरे स्वरूप, आंदोलनकारक उग्र स्वरूप समोर आले. इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास असणार्या, अर्ज-विनंत्या करणार्या ‘मवाळांचा’ एक गट काँग्रेसमध्ये होता, तर इंग्रजांच्या न्यायबुद्धीवर विश्वास नसणार्या ‘जहाल’ गटाचा एक पक्ष होता. एकूणच पक्षामध्ये मतभेद, मतमतांतरे असली, तरी तेव्हा राष्ट्रहित सर्वतोपरी होते. कारण सर्वांमध्ये पराकोटीची स्वातंत्र्याची ओढ व आत्मसमर्पण होते.
खरे तर नागपुरात लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली १९०७-१९०८मध्येच अधिवेशन होणार होते. तत्कालीन नागपूर टिळकभक्तांचा तसा आग्रहही होता. पण मवाळ व जहाल गटाच्या संघर्षामुळे ते अधिवेशन सुरतला झाले. यानंतर नागपुरातील काँग्रेसजन तब्बल बारा वर्षे अधिवेशन नागपुरात व्हावे, लोकमान्यांच्या अध्यक्षतेखाली व्हावे अशी जपमाळच धरीत होते. यामध्ये मध्यप्रांत काँग्रेसचे सदस्य डॉ. मुंजे, बॅ. अभ्यंकर, डॉ. ना.भा. खरे, भवानी शंकर नियोगी, नीलकंठ उधोजी, नारायणराव अळेकर, बॅ. गोविंदराव देशमुख, डॉ. चोळकर, डॉ. परांजपे, हरकरे, बोबडे, आदी अतिरथी, महारथी यांनी १९०७मध्येच एक ‘राष्ट्रीय मंडळ’ स्थापन केले होते. या अतिरथींमध्ये ‘वयाने लहान पण मनाने जहाल’ असणारे व्यक्तित्व होते डॉ. केशव बळीराम हेडगेवार!
अच्युत बळवंत कोल्हटकर लिहितात, ‘नागपुरात अधिवेशन होणार म्हटल्यावर, नागपुरात एक नवा त्वेषच संचारला होता. पण या सर्वच मंडळींच्या उत्साहावर आघात करणारी – नव्हे, या देशावरच आघात करणारी दुर्दैवी घटना होती, ३१जुलै १९२० रोजी भारताचे अनभिषिक्त सम्राट लोकमान्य टिळकांचे निधन! लोकमान्यांच्या मृत्यूनंतर दहाव्या दिवशी नागपुरात डॉ. हेडगेवारांनी सार्वजनिक हरताळ, मिरवणूक व सभा असा कार्यक्रम पुढाकाराने घेतला होता. तसेच ११ ते १८ ऑगस्ट हा आठवडा नागपुरात ‘असहकार सप्ताह’ पाळण्यात आला. त्या वेळी काढलेल्या पत्रकावर डॉक्टरांची स्वाक्षरी आहे, अशी नोंद आहे.
या अधिवेशनाला महत्त्वाचे असे देशातील वळणबिंदू, विवादित ठरणार्या खिलाफत चळवळीची गडद पार्श्वभूमी होती. तुर्कस्थानच्या खलीफांसाठी भारतातल्या मुसलमानांनी आंदोलन करायचे, त्यांचे नेते मौ. शौकत अली व मौ. महंमद अली यांना हिंदूंनी विनाशर्त पाठिंबा द्यायचा, हिंदू-मुस्लीम एकीसाठी हे आवश्यक आहे, ही म. गांधींची भूमिका होती. पण टिळकभक्त काँग्रेसचा याला विरोध होता. हिंदुस्थानशी अर्थाअर्थी संबंध नसलेले खिलाफतीचे दुखणे घरात आणू नये, इंग्रजांविरुद्ध लढ्यात एकटे हिंदू स्वयंपूर्ण आहेत. बंगालच्या फाळणीच्या वेळी १९०५मध्ये हिंदू-मुस्लीम लाल-बाल-पाल यांच्या नेतृत्वात एकत्र लढले होते, लोकमान्यांच्या नेतृत्वात हिंदू-मुस्लीम एकी तेव्हाही होती. तेव्हा गांधीजींनी ‘विनाशर्त पाठिंबा’ हा आग्रह सोडावा, ही भूमिका मांडणारा जहालमतवादी एक गट होता. महात्माजींना ‘अहिंसा’ हवी होती, तर अली बंधूंना रक्तरंजित क्रांती हवी होती. ‘हिंसा’ हवी होती. ‘सहिष्णुता’ हा महात्माजींचा प्राण होता, तर धर्मांधता हा अली बंधूंचा स्वभाव होता. पं. नेहरूंनीच आत्मचरित्रात मौलाना मुहम्मद अलींचे वर्णन श्उवेज पततंजपवदंससल तमसपहपवदेश् ‘परमावधीचे धर्मांध’ असे केलेले होते, अशी नोंद आहे.
असे असले, तरी इंग्रजांविरुद्ध खिलाफत चळवळीमुळे मुसलमानांचा असंतोष आणि जालियनवाला बागमुळे हिंदूंचा असंतोष अशी प्रक्षोभांची युती जमवून इंग्रजांविरुद्ध ‘असहकार आंदोलना’चे नवे पर्व म. गांधींनी उभे केले. लोकमान्य गेले अन् खिलफत समितीने ‘प्रयाग’ येथील अधिवेशनात म. गांधींच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा दिला. विशेष असे की या असहकार पर्वात डॉक्टर हेडगेवार सामील झाले होते. हा सगळा इतिहास व खिलाफत आंदोलन हा अनेक तपशिलांचा, बारकाव्यांचा, लेखनाचा स्वतंत्र विषय आहे. केवळ अधिवेशनाची पार्श्वभूमी इथे संक्षेपाने ठेवतोय.
इथे एक गोष्ट प्रारंभीच नमूद करणे क्रमप्राप्त ठरते. विद्यार्थिदशेपासूनच डॉ. हेडगेवारांची जाज्ज्वल देशभक्ती सर्वांना ठाऊक होती. कलकत्ता येथे डॉक्टरीचे शिक्षण घेताना ते पंजाब, राजस्थान, बंगाल येथील क्रांतिकारकांच्या संपर्कात होते. डॉक्टरांनी सशस्त्र क्रांतीच्या मर्यादा जाणल्या होत्या. पहिल्या महायुद्धानंतर कलकत्त्यावरून नागपूरला आल्यानंतर ते काँग्रेस पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. परंतु इथेही त्यांची भूमिका तत्कालीन परिस्थितीच्या परिशीलनाची, राष्ट्रचिंतनाची आहे. काँग्रेस पक्षाच्या मर्यादा ते जाणून होते. पक्षाची सर्वच ध्येयधोरणे त्यांना मान्य नव्हती. खिलाफत आंदोलनाला त्यांचा विरोध होता. पूर्ण स्वातंत्र्य आणि ‘साम्राज्यवाद विरोध’ या वैचारिक मुद्द्यांवर डॉक्टरांचे वैचारिक मतभेद होते. डॉक्टरांनी यासाठी ‘नागपूर नॅशनल युनियन’ अशी वेगळी संस्था उभी केली होती. त्यामध्ये डॉ. ना.भा. खरे, विश्वनाथराव केळकर, मंडलेकर, बोबडे, चोरघडे, हरकरे आदी मंडळी त्यांच्यासोबत होती. डॉक्टरांनी देशभक्तीची जी दहा सूत्रे जोपासली, त्यात समाज व राष्ट्र आराधना अन् सामाजिक ऐक्यभान सर्वोच्च होते. असे असूनही स्वत:ला देशभक्त म्हणवून घेणे त्यांना आवडत नव्हते. असे आत्मविलोपी, शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व असल्यानेच त्यांनी ‘असहकार आंदोलनात’ स्वत:ला झोकून दिले.
डॉक्टरांच्या संदर्भात लोकविलक्षण बाब अशी की स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तळमळ असल्यामुळेच जरी तत्कालीन राजकारणात उतरले ते केवळ राष्ट्रकारणासाठी! क्रांतिकारक, शस्त्रकारक, काँग्रेस, हिंदू महासभा या सगळ्यातून त्यांनी हळुवारपणे स्वत:ला दूर सारले. राजकारणातील इर्षा, सत्ता, स्पर्धा, निवडणूक या घटकांपासून ते सदैव दूर राहिले. डॉक्टरांना या सर्व मर्यादांचे भान होते. समाजसंघटनेशिवाय या देशाला पर्याय नाही, हे लक्षात घेऊनच डॉक्टरांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विशुद्ध समाजसंघटना स्थापन केली, हा सगळा इतिहास आहे.
त्या वेळी प्रांतिक काँग्रेस समितीच्या राष्ट्रीय मंडळाच्या वतीने नागपुरातून ‘संकल्प’ नावाचे हिंदी साप्ताहिक काढण्याचा प्रयास झाला. मराठीतून ‘महाराष्ट्र’ हे वृत्तपत्र होतेच. पण महाकोशल, मध्यप्रांत या हिंदी भागांत प्रसार करणे आवश्यक होते. या ‘संकल्प’ पत्राचे संघटक म्हणून डॉक्टरांना नियुक्त केले. डॉक्टरांनी महाकोशल मध्यप्रांत भागात व्यापक जनसंपर्क केला. प्रसार-प्रचार केला. डॉक्टरांच संघटनकौशल्य, दूरद़ृष्टी इथे दिसून येते. विद्यार्थ्यांमध्ये व युवकांमध्ये सभा, भाषणे, उत्सव घेऊन, डॉक्टरांनी व्यापक मित्रमंडळ व लोकसंग्रह उभा केला. डॉक्टर स्वत: ओजस्वी वक्ते होतेच, त्याचबरोबर डॉ. मुंजे, शं.दा. पेंडसे, लोकनायक बापूजी अणे, राजे लक्ष्मणराव भोसले, डॉ. परांजपे, कामगार पुढारी रामभाऊ रुईकर या प्रभृतींसह डॉक्टरांचा सामूहिक सहभाग असायचा. १९१९ डिसेंबरमध्ये इंग्रजाच्या ‘शांतता दिनाला’ धुडकावून लावण्यात डॉक्टरांचा पुढाकार होता. जालियनवाला बागच्या पार्श्वभूमीवर श्ब्ंद ूम बमसमइतंजम चमंबमघ्श् असे पत्रक काढून त्यांनी ‘सरकारचा तो निषेध दिन’ पाळला गेला. त्या वर्षीच्या अमृतसर काँग्रेसला डॉक्टर गेले होते. जालियनवाला बागला शहिदांना वंदन करायला ते विसरले नाहीत.
याच दरम्यान अधिवेशनाच्या निमित्ताने डॉ. ल.वा. परांजपे यांच्या नेतृत्वात ‘भारत स्वयंसेवक मंडळ’ स्थापन करण्यात आले. जुलैच्या प्रारंभापासूनच हजार-बाराशे स्वयंसेवकांची उभारणी करण्याचा प्रयास सुरू झाला. डॉ. मुंजे, डॉ. हेडगेवारांनी प्रचार दौरे, भाषणे, खेडोपाडी संपर्क, शेतकरी बंधूंची सभा, सम्मेलने गाजविली. १९२०च्या ‘महाराष्ट्र’ वृत्तपत्रात याची वृत्ते झळकली.
‘स्वयंसेवकांची पथके’ पोशाखात उभी व्हावी, स्वयंसेवक पथके केवळ अधिवेशनापुरती न राहता ती कायमची राष्ट्रीय संस्थांना मदत करणारी हवी. गावोगावी मिरवणूक, सभा यांतून व्यवस्था ठेवण्याकरता स्वयंसेवक पथके तयार झाली पाहिजेत हा डॉक्टरांचा आग्रह होता. भारत स्वयंसेवक मंडळ यासाठीच कार्यरत होते. २६ डिसेंबरच्या अधिवेशनात या सर्व पूर्वतयारीची मदत झाली, हे सांगणे नलगे.
सध्या नागपुरात जिथे काँग्रेस नगर आहे, तिथेच अधिवेशनाचा मंडप होता. तीन हजार स्वागत मंडळाचे सदस्य व सात ते आठ हजार प्रेक्षक, तसेच १४,५८३ अधिवेशन प्रतिनिधी उपस्थित होते, असे वर्णन आढळते. संख्येच्या द़ृष्टीने १९२८पर्यंत असे अधिवेशन झाले नाही. डॉ. हेडगेवार व डॉ. परांजपे अधिवेशनातील स्वयंसेवकांचे प्रमुख होते. याशिवाय भोजन व्यवस्था व वसतिगृह व्यवस्था यावर डॉक्टरांनी विशेष लक्ष द्यावे, असे होते. डॉक्टरांनी गणवेशात स्वयंसेवक तर उभे केलेच, तसेच लोकांना आवरणे, इतरत्र व्यवस्था लावणे या व्यवस्थेमध्ये ‘शिस्तीचे वळण’ घालून देणे या बाबी त्यांनी इतक्या व्यवस्थित केल्या की अधिवेशनाच्या व्यवस्थेविषयी सर्वांनी ‘धन्योद्गार’ काढण्याइतकी सेवा डॉक्टरांनी केली. स्वयंसेवक कसा असावा व कसा घडवावा, शिस्त कशी असावी याची ही पूर्ण तयारी नव्हती काय? आदर्श स्वयंसेवकत्वाची ती बीजरूपेच होती, असे स्पष्टपणे आढळून येते.
१० ऑक्टोबर १९२० रोजी नागपुरात अधिवेशनाच्या स्वागत समितीची बैठक झाली. यामध्ये ५५० प्रतिनिधी सामील झाले. डॉ. हेडगेवार काँग्रेस अधिवेशन स्वागत समितीचे सदस्य होते. स्वागत समितीसमोर महत्त्वाचा विषय होता तो अधिवेशनाच्या अध्यक्षपदाचा. लोकमान्यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झाली होती. म. गांधींचे नेतृत्व जरी अधिवेश्नाला लाभले होते, तरी अनेक वरिष्ठ काँग्रेसश्रेष्ठी अध्यक्षपदाच्या मान्यतेच्या होत्या. यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष कोण व्हावे, हा प्रश्न महत्त्वाचा होता.
नागपुरातील टिळकभक्तांनी ‘योगी अरविंद घोषांचे’ नाव पुढे केले. डॉ. मुंजे आणि डॉ. हेडगेवार श्री अरविंदांना भेटण्यासाठी स्वत: पाँडीचेरीला गेले. परंतु अरविंदानी विनम्रपणे नकार दिला. प्रांतीय काँग्रेसने अध्यक्षपदासाठी अरविंद घोष, विजय राघवाचार्य, चित्तरंजनदास, महंमद अली आणि क्रांतिकारक श्यामसुंदर चक्रवर्ती यांची नावे सुचविली होती. डॉ. हेडगेवारांनी प्रथम श्री अरविंद यांचे नाव व नंतर श्यामसुंदर चक्रवर्ती यांचे नाव प्रस्तावित केले होते. पंजाब, बिहार, दिल्ली, मद्रास, मुंबई यांनी मात्र विजय राघवाचार्य यांचे नाव प्रस्तावित केले. विजय राघवाचार्य या नावाला डॉक्टरांचा सैद्धान्तिक विरोध होता. कारण ‘जालियनवाला बागच्या’ असंतोषाच्या पार्श्वभूमीवर विजय राघवाचार्यांनी गव्हहर्नरचे ‘चहापान’ स्वीकारले होते, जे अनेकांना खटकले होते. अध्यक्ष हा ‘बेदाग’ असावा, विवादित नसावा, ही यामागे त्यांची भूमिका होती. पण अखेर बहुमताने ‘विजय राघवाचार्य’ अधिवेशनाचे अध्यक्ष ठरले. डॉ. मुजेंचा पाठिंबा विजय राघवाचार्यांना होता, यामुळे प्रस्ताव डॉक्टरांनी मान्य केला. शिस्तप्रिय डॉक्टर अधिवेशनात कार्यरत झाले. विशेष असे की, डॉक्टरांचे अध्यक्षाबाबतचे अभिमतच अखेरीस खरे ठरले. विजय राघवाचार्यांचे अधिवेशनाचे अध्यक्षीय भाषण विरोधाभासपूर्ण ठरले, ‘इंडियन रिव्हयू’, ‘जन्मभूमी’, ‘महाराष्ट्र’ या वृत्तपत्रांची ही टिप्पणी होती.
या अधिवेशनात डॉ. हेडगेवारांनी विषय समितीच्या बैठकीत एक समानांतर प्रस्ताव ठेवला की ‘काँग्रेसने आपली ‘उद्देश्य’ ही पुन्हा परिभाषित करावी. काँग्रेसचे उद्देश्य ‘पूर्ण स्वातंत्र्य’ व भारतीय प्रजासत्ताकाची स्थापना आणि ‘साम्राज्यवादी अत्याचारापासून’ राष्ट्राला मुक्त करणे आहे.’ हाही प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. परंतु या प्रस्तावाबाबत ‘मॉर्डन रिव्ह्यू’ने मार्मिक टिप्पणी केली होती...’ श्ठनज जीम चतवचवेमक तमेवसनजपवदए ूीपबी मगबपजमक संनहीजमत But the proposed resolution, which excited laughter among serious mided people, deserved a better fate than what it met with the subject committee!’ पुढे ते लिहितात, काँग्रेस स्वागत समितीत ‘प्रजासत्ताकाचे पुरस्कर्ते’, ‘रिपब्लिकन’ कार्यकर्ते आहेत ही आनंदाची बाब आहे. अर्थात डॉ. हेडगेवार व त्यांच्या नागपूर नॅशनल युनियनच्या सहकार्यांनी हा प्रस्ताव ठेवला होता, त्यांच्यासाठी फार मोठी प्रशस्ती होती. याच घटनाक्रमात ‘गोरक्षणाचा’ एक प्रस्ताव अधिवेशनात आला होता. पण तोही दूर सारला गेला. खिलाफत चळवळीमुळे तो दूर ठेवला गेला, ही कार्यकर्त्यांची नाराजीही तिथे स्पष्ट झाली.
मो.9423613710