श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आयोजित ३४०वा शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम यंदा स्थगित करण्यात आला होता. त्याऐवजी मंडळाने रायगड किल्ल्याच्या परिसरातील २५० वनवासी बांधवांना शिधावाटप केले. किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या निजामपूर ग्रामपंचायतीने केलेल्या सर्वेक्षण आणि विनंतीनुसार वनवासी (आदिवासी) वाडी, शिंदेवाडी, टकमकीवाडी, रायगडवाडी, हिरकणीवाडी, नेवाळी, खडकी, परडी, वाघेरी वनवासी (आदिवासी) वाडी, वाघेरी गाव या सर्व ठिकाणी जाऊन आम्ही स्वतः वाटप केले.
तसेच गडावर राहणाऱ्या स्थानिक बांधवांना आणि रायगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या कामासाठी जव्हार येथून आल्यावर, गडावरच अडकलेल्या मजुरांनाही शिधावाटप करण्यात आले. वाटप करताना social distancingची काळजी घेण्यात आली. यासाठी निजामपूर ग्रामपंचायत, रायगड रोप-वे आणि रा.स्व. संघ जनकल्याण समिती यांनी मोठे सहकार्य केले.
आजपासून रायगड परिसरातील दुर्गम भागातील अन्य ग्रामपंचायतींनी नवीन सर्वेक्षण सुरू केले असून त्याचा अहवाल हाती मिळताच स्थानिक प्रशासनाच्या आणि ग्रामपंचायतींच्या सहकार्याने पुढील मदतकार्य करणार आहोत. प्राथमिक अंदाजानुसार आणखी किमान १,००० शिधा संच लागतील. या कार्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार.