खरंतर देशातील वीस-पंचवीस निवडक रत्नं निवडून त्यांना आपल्या सल्लागारपदी नेमून त्यांच्या आदेशानुसार निर्णय घ्यायला हवे होते. आणि या रत्नांमध्ये देशातील एकेक ‘चुनिंदा’ डावे, तथाकथित पुरोगामी, लिबरल, सेक्युलर, बुद्धिवादी वगैरे लोक समाविष्ट करायला हवे होते. तरच सर्व समस्यांवर योग्य ते पर्याय या मंडळींनी शोधून दिले असते आणि त्यानुसार मोदींनी कार्यवाही केली असती. चुकलंच खरं..
कदाचित, या सल्लागार मंडळींचं एकमत होईपर्यंत कोरोनाने देशात हाहाःकार माजवला असता, म्हणून कदाचित ‘आत्ता नको, नंतर पाहू’ म्हणत मोदींनी या लोकांचा सल्ला, मार्गदर्शन इ. घेतलं नसावं. खरंतर, या लोकांपैकी बहुतांश सर्वजण कोरोना निवारणातील तज्ज्ञच आहेत. आज पंतप्रधान मोदीच काय, जगातील जवळपास सगळेच देश आणि त्यांचे राष्ट्रप्रमुख आपल्या नागरिकांना घरी राहण्याचं – ‘होम क्वारंटाइन’चं, ‘सोशल डीस्टन्सिंग’ पाळण्याचं आवाहन करत आहेत. आवाहन काय, अक्षरशः विनंत्या – आर्जवं करताहेत. परंतु, आपल्या देशातील डावी आणि (त्यांच्यामते) लिबरल, सेक्युलर, बुद्धिवादी, पुरोगामी वगैरे असणारी मंडळी ही तर गेल्या कित्येक वर्षांपासून ‘होम क्वारंटाइन’ आहेत, एकदम कडक ‘सोशल डीस्टन्सिंग’ पाळत आहेत. चुकून एखादा ‘संघवाला’ किंवा हिंदुत्ववादी – राष्ट्रभक्त वगैरे भेटला तर त्याला हे लोक अस्पृश्य मानतात, त्याचा साधा स्पर्शच नव्हे तर तीन मीटरच्या आतदेखील त्याला येऊ देत नाहीत. इतकं यांचं कडक, सोवळ्या-ओवळ्याचं सोशल डीस्टन्सिंग. देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांपासून त्यांनी केव्हाच ‘स्वयं-विलगीकरण’ करून घेतलंय. केवळ कोरोनाभयास्तव आज २०१९-२० च नाही तर गेली कित्येक दशकं ते समूहापासून आणि समूहभावनेपासून कोसो लांब आहेत. २०१४ मध्ये नाही का, सारा देश एकीकडे होता आणि ही मंडळी भलतीकडेच. देशातील जनतेच्या मनात काय चाललंय, लोक मोदींविषयी काय म्हणतायत, भाजपविषयी, संघाविषयी काय म्हणतायत, काँग्रेसविषयी काय म्हणतायत आणि मुख्य म्हणजे आपल्याविषयी काय म्हणतायत, याचा त्यांना थांगपत्तादेखील नसतो. ते उगाच गर्दीत मिसळत नाहीत. स्वतः गर्दी करतही नाहीत, कारण त्यांच्याजवळ आजकाल कुणी येतच नाही. बघा मोदीजी, ही अशी माणसं आपल्या अवतीभोवती आहेत आणि आपण भलत्याच काहीतरी उपाययोजना करतोय, उगाचच मेहनत घेतोय. ‘काखेला कळसा आणि गावाला वळसा म्हणतात’, तसंच काहीसं.
आता काही दिवसांपूर्वीच, अशाच ठिकठिकाणच्या काही स्थानिक नररत्नांनी ‘या कोरोनाच्या काळात संघवाले कुठायत?’ अशा स्वरूपाचे प्रश्न फेसबुक-ट्विटर आदी माध्यमांतून विचारले होते. ‘आता खाकी चड्डीतले मदतकार्य करणाऱ्यांचे फोटो भक्तांकडून का पोस्ट होत नाहीयेत? कोरोनाला घाबरले की काय?’ अशा स्वरूपाची विचारणा होत होती. आता जेव्हापासून हे कोरोनाचं संकट ओढावलं, त्या दिवसापासून रा. स्व. संघ, जनकल्याण समिती आणि संघ परिवारातील असंख्य संस्था बाकी सारं विसरून मदतकार्यात गुंतली आहेत, हे या लोकांच्या गावीच नव्हतं मुळी. संघाच्या रचनेतील अगदी प्रत्येक महानगर – विभाग वगैरे स्तरावर शेकडो स्वयंसेवक कार्यकर्ते अहोरात्र सेवाकार्य करतायत, कुणी रक्तदान करतंय, कुणी ते जमवून रक्तपेढ्यांकडे पोहोचवतंय, कुणी अन्नधान्याचा पुरवठा करतंय, कुणी गरजूंना जेवणखाण पुरवतंय, कुणी स्वच्छता – निर्जंतुकीकरण राबवतंय, कुणी इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करतंय, गरीब वस्त्यांमध्ये पोहोचवतंय वगैरे वगैरे. कितीतरी दिवस झाले, हे सर्व सुरू आहे. परंतु, तरीही ‘कुठायत खाकी चड्डीवाल्यांचे फोटो?’ असा प्रश्न उपस्थित झालाच. ‘सोशल डीस्टन्सिंग’चं या प्रश्नकर्त्यांहून अधिक चांगलं उदाहरण असू शकेल काय? आणि हे झालं कोरोनाचं, १९२५ पासून संघ अशाप्रकारे कुठेकुठे सेवाकार्य, मदतकार्य करतोय, शिक्षण – ग्रामविकास – कृषी – पर्यावरण – आरोग्य – जलसंधारण अशा काही क्षेत्रांत शेकडो प्रकल्प उभारतोय, त्यासाठी त्यांची माणसं आपली आयुष्यं खर्च करतायत. मात्र आमच्या लिबरलांनी – बुद्धिवादी विचारवंतांनी कधी असा वेडेपणा केलाय का? कधीच नाही.. आणि ते भविष्यातही करणार नाहीत. छानपैकी दिल्ली – मुंबई – पुण्यात वा अजून कुठे कुठे छान प्रशस्त घरांत, वातानुकुलीत खोलीत बसून लेखबिख लिहितात, फेसबुकवर पोस्ट छानछान टाकतात, लोकशाही – राज्यघटना – समता – बंधुता – सहिष्णुता वगैरे शब्द वापरून व्याख्यानं देतात. फारतर एखाद्या शहरातील ठराविक चौकात ‘कॅण्डल मार्च’ काढतात. मोदीजी, आपण एक गोष्ट इथे लक्षात घ्या, ५ एप्रिलला मेणबत्ती वा पणती वा अन्य कोणतीही ज्योत पेटवून जनतेचं मनोबल वगैरे काहीएक उंचावणार नाही, मात्र आमच्या डझनभर लोकांच्या कॅण्डल मार्चने मात्र लोकशाही मजबूत होते, सहिष्णुता वाढते आणि अशी बरीच काय काय जादू होते. तुम्हाला आणि तुमच्या भक्तांना नाही कळणार हे.
मुळात, हे असं काही जनतेचं मनोबल वगैरे कशाला उंचावायचं? मध्यंतरी ते संध्याकाळी देशभरातील लोकांनी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या. आरोग्य आणि अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असणाऱ्या, कोरोनाच्या संकटातही जीव धोक्यात घालून रात्रंदिवस राबणाऱ्या असंख्य ज्ञात – अज्ञात लोकांप्रती कृतज्ञता म्हणून. अहो असं कुठे असतं का? आमच्या विचारवंत मंडळींनी अजिबात असलं काही केलं नाही. उलट, आपण किती मागास आहोत, आपला देश कसा जुनाट विचारांनी बुरसटलेला आहे, टाळ्या / थाळ्या वाजवून कसं काहीच होणार नाही इ. मुद्द्यांवर जनजागृती करणारे लेख त्यांनी फेसबुक – ट्विटरवर लिहिले. आता मोदींनी नवीनच काहीतरी काढलंय. म्हणे ५ एप्रिलला सर्वांनी आपल्या घरातून ज्योत पेटवा, दिवे लावा. यातून सकारात्मक उर्जा मिळेल, आपल्यासाठी राबणाऱ्यांबाबत कृतज्ञता व्यक्त होईल, आपलं मनोबल उंचावेल. याला काय अर्थ आहे? जनतेचं मनोबल उंचावून काय मिळणारे? भले, आपल्या संस्कृतीत, परंपरेत ज्योत पेटवणं, प्रकाशरूपी चैतन्य निर्माण करणं याचं काही विशेष महत्व आहे. पण आपण कुठे या देशाची संस्कृती – परंपरा मानतो? त्यामुळे या मागास विचारांवर कडाडून टीका होणं गरजेचंच होतं. ते आमच्या विचारवंत मंडळींनी केलं, हे बरं झालं. आता तरीही लोक रविवारी मोदींच्या आवाहनाला अभूतपूर्व प्रतिसाद देतीलच. काय करणार, अडाणीच लोक आहेत सगळे..
बरं, मोदीजी असे तर त्यांची भक्त मंडळीही तशीच. तब्लीगीच्या मरकजवर आणि त्यातून कोरोनाच्या वाढलेल्या लागणीवर चक्क टीका करतात! त्याला जिहाद म्हणतात.. भले त्यातील लोक त्यांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्सवर थुंकले म्हणून काय झालं? अल्पसंख्यांकांच्या मानवाधिकाराचं काय.. या लोकशाही देशात तब्लीगींना एवढाही अधिकार नाही का? भले कोरोना पसरू दे, जगभरातील राष्ट्रांनी काहीही प्रतिबंधात्मक उपाय योजू दे, तरी हा असा ‘मानवाधिकार’ (?) शाबूत राहायलाच हवा. अर्थात, तब्लीगी प्रकरणावर आमच्या सर्व लाडक्या पुरोगामी विभूतीमत्वांनी त्यांच्या लौकिकास साजेशी अशीच भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्याबाबत काळजी करण्याचं काही कारण नाही. याला म्हणतात निष्ठा. तब्लीगीवर एक चकार शब्द काढला नाही पण मोदींनी दिवा पेटवायचं काय आवाहन केलं, हेच लोक पेटून उठले आणि फेसबुक – ट्विटरवर आपल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा आविष्कार दाखवू लागले. मान गये! बघा मोदीजी.. कोरोना निवारणासाठी इतके रात्रंदिवस कष्ट घेत बसण्यापेक्षा या लोकांच्या हाती सूत्रं द्यायला हवी होती. मोदीजी, आपका जरा चुक्याच..