प्रेरणास्थान विष्णूजी सवरा

11 Jan 2021 18:18:10

@नंदकुमार पाटील

विष्णू सवरा साहेबांचा शांत स्वभाव, मृदू बोलणं, समोरील व्यक्तीस आपलंसं करणं, अपुरी साधनसामग्री, तुटपुंजी व्यवस्था यामधून साहेबांनी एवढं मोठं समाजकार्य उभं केलं. अतिशय खडतर परिस्थितीत जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी उभी करण्यात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. साहेबांनी दिलेल्या आदर्शावर चालून ध्येयनिष्ठेने पक्षनिष्ठेने वागून जिल्ह्यात भाजपा क्रमांक एकचा पक्ष करणं हीच साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.


bjp_1  H x W: 0


आमचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान, लोकनेते आदरणीय विष्णूजी सवरासाहेब यांचं आपल्यातून निघून जाणं मनाला चटका लावून गेलं.

गेली अठ्ठावीस वर्षं साहेबांसह काम करण्याची संधी मिळाली, साहेबांना जवळून अनुभवता आलं. त्यांची काम करण्याची पद्धती, सामान्य माणसाला आपलंसं करणं, जनसंपर्क, कार्यकर्त्यांच्या प्रती असलेलं प्रेम, कामाच्या प्रती ध्येयनिष्ठा, पक्षनिष्ठा या सर्व गोष्टी जवळून बघितल्या.

साहेबांचा शांत स्वभाव, मृदू बोलणं, समोरील व्यक्तीस आपलंसं करणं, अपुरी साधनसामग्री, तुटपुंजी व्यवस्था यामधून साहेबांनी एवढं मोठं समाजकार्य उभं केलं. अतिशय खडतर परिस्थितीत जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी उभी करण्यात साहेबांचा सिंहाचा वाटा आहे.

मी 92-93च्या काळामध्ये पक्षाचं सक्रिय काम करू लागलो, त्याच वेळेस सन 1995 सालच्या विधानसभेचं काम केलं. त्या वेळेच्या वाडा विधानसभा मतदारसंघामध्ये सवरासाहेब निवडणूक लढवून आमदार म्हणून पुन्हा निवडून आले. मी माझ्या ग्रामपंचायतचा सरपंच होतो. वाड्यात एका छोट्याशा खोलीमध्ये त्यांचं कार्यालय होतं. मी कामासाठी त्यांच्या कार्यालयात गेलो सर्वात मागे बसून होतो. साहेब अनेकांची कामं करत होते. मी शांत बसून होतो. साहेबांनी हाक मारून पुढे बोलावलं, “सरपंच, पुढे याआणि त्यानंतर शेवटपर्यंत साहेबांबरोबर राहिलो.

सन 1995च्या निवडणुकीनंतर सतत साहेबांबरोबर राहिलो. त्यानंतर 2000, 2004, 2009 2014 अशा निवडणुकांमध्ये साहेबांचं काम केलं. साहेब सातत्याने सहा वेळा निवडून आले.

 

1995च्या काळामध्ये युतीच्या सरकारमध्ये सन 1999मध्ये साहेब कॅबिनेट मंत्री झाले. 6-8 महिन्यांच्या कालावधी त्यांना मिळाला, त्यांनी त्या थोड्या कालावधीमध्येसुद्धा मंत्रीमंडळात आपल्या कामाचा ठसा उमटवला. कातकरी वस्तीसाठी घरकूल योजना राबवली, वाड्यासारख्या ग्रामीण भागात + ूेपश मंजूर करून औद्योगिकीकरणाला चालना देऊन तालुक्याचा विकास केला. भिवंडी, वाडा मनोर रस्त्याचं चौपदरीकरण, जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रस्ते, नदीवरचे बंधारे, आश्रमशाळा बांधणं यासारखी अनेक विकासकामं केली. त्यानंतर 2014 या वर्षी पुन्हा युतीचं सरकार आल्यानंतर साडेचार वर्षं मंत्री म्हणून काम पाहिलं. या कालावधीत पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी दिला. सर्वसामान्य आदिवासी मुलांना नामांकित शाळांमध्ये प्रवेश देऊन शिक्षण दिलं, आपल्या समाजाप्रती असलेलं देणं साहेबांनी पूर्ण केलं.


bjp_2  H x W: 0 

साहेबांचं काम करत असताना साहेबांनी आम्हाला घडवलं, समाजसेवेचं बाळकडू दिलं. कार्यकर्त्याला आपलंसं कसं करावं हे शिकवलं. पक्षनिष्ठा शिकवली. अनेक प्रसंगी कार्यक्रम आटोपून रात्री उशिरा साहेब त्यांच्या घरी यायचे. जेवल्याशिवाय साहेब आम्हाला घरी जाऊन देत नव्हते. रात्री कितीही उशिरा साहेब आले, तरी बाई गरम पोळी करून वाढत असत. आमच्यावर साहेबांनी पितृतुल्य प्रेम केलं. जेवण करून घरी जायला मोटरसायकल करून निघालो की बाहेर थंडी असल्याने साहेब त्यांचा मफलर कानटोपी द्यायचे. “सावकाश जा.” रात्री घरी पोहोचल्यावर साहेबांचा फोन यायचा. अशा प्रकारे माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला साहेबांनी घडवलं. आज माझ्यावर जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी आहे. हे सर्व साहेबांमुळे शक्य झालं.

खडतर परिस्थितीत काम करून पूर्वीच्या ठाणे ग्रामीण आताच्या पालघर जिल्ह्यामध्ये त्यांनी पक्ष संघटना वाढवली. स्टेट बँकेतील नोकरी सोडून साहेब ग्रामीण भागात काम करू लागले. घरची हलाखीची परिस्थिती असताना, घराची संपूर्ण जबाबदारी असताना अशा प्रकारे शाश्वत नोकरी सोडून साहेब समाजासाठी काम करत आले. दोन वेळा विधानसभेत अपयश आल्यानंतर सन 1990पासून सतत 6 वेळा निवडून आले. 2014 हे वर्ष पालघर भाजपासाठी सुवर्णकाळ होतं. या कालावधीत जिल्ह्यात भाजपाचे खासदार, आमदार, कॅबिनेट मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष, अनेक पंचायत समित्या, ग्रामपंचायती भाजपाकडे होत्या. सन 2019नंतर जिल्ह्यात भाजपा मागे आली आहे. साहेबांनी दिलेल्या आदर्शावर चालून ध्येयनिष्ठेने पक्षनिष्ठेने वागून आता पुन्हा या जिल्ह्यात भाजपा क्रमांक एकचा पक्ष करणं हीच साहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल.

9271811405 
Powered By Sangraha 9.0