चिखली (बुलढाणा) मतदारसंघाच्या भा.ज.पा. आमदार श्वेताताई महाले पाटील या संघटन कौशल्यासाठी व संपर्काच्या आगळ्यावेगळ्या शैलीसाठी सुपरिचित आहेत. महिलांचे प्रश्न असो की शेतकर्यांच्या समस्या किंवा कोरोनाचे संकट - प्रत्यक्ष मैदानात उतरून त्यावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न त्या करतात. त्यांच्याशी साधलेला हा संवाद.
कोरोनाच्या काळात तुमच्या चिखली (बुलढाणा) मतदारसंघात कशी परिस्थिती होती? तुम्ही ही परिस्थिती कशा प्रकारे हाताळली?
मार्च 2020पासून देशात सर्वत्र कोरोनाचा कहर वाढत होता. सुरुवातीला माझ्या मतदारसंघात कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव नव्हता, मात्र हळूहळू संख्या वाढू लागली. ‘कोरोना’ हा अनोळखी आजार. त्यात क्वारंटाईन, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, पीपीई कीट, सॅनिटायझर हे सारे शब्ददेखील ग्रामीण भागासाठी नवीन होते. लोक खूप घाबरले होते. म्हणून मी ‘ध्वनिरथ’ बनविले. यावर कोरोनाची लक्षणे, घ्यावयाची काळजी आदींबद्दल माहिती देणारे फलकही होते. मी स्वत: त्या काळातही मतदारसंघात प्रवास केला आणि जवळपास 2 लाख 50 हजार मास्क्सचे वितरण केले. दवाखाने, प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस स्टेशन आदी ठिकाणी सॅनिटायझर्सच्या बाटल्या वितरित केल्या. लॉकडाउनच्या काळात अन्नछत्र चालविले. वाहतूक बंद असल्यामुळे आणि हॉटेल्स बंद असल्यामुळे अनेकांना जेवण मिळणे कठीण झाले होते. त्यांना या अन्नछत्राचा लाभ झाला. माझ्या आमदार निधीतील 50 लाख रुपये मी कोविड सेंटरसाठी साहित्य, औषधी यासाठी दिले. लॉकडाउनच्या काळात रक्तदान शिबिर घेऊन त्यातून 260 बाटल्या रक्त संकलित केले गेले.
मतदारसंघात तुम्ही कोणकोणती महत्त्वाची कामे केली?
कोरोनाच्या काळात मतदारसंघातील - विशेषत: ग्रामीण भागातील महिलांसाठी मी विशेष उपक्रम राबविला. 4000 गरोदर महिलांना टरबूज, खरबूज, पपई, चिकू, केळी, डाळिंब अशी सर्व फळे एकत्रित करून मोफत घरपोच दिली. त्यामुळे महिलांना सकस आहार तर मिळालाच, तसेच शेतकर्यांच्या मालालाही मोबदला मिळाला. बाजार बंद असल्यामुळे उत्पादक आपली फळे विकू शकत नव्हते. त्यांचे नुकसानही कमी केले.
कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार बंद झाला होता. लोक घरी बसून होते. या संधीचा फायदा घेऊन मी मतदारसंघातील जवळपास 40 पांधन रस्ते आणि नदी खोलीकरण यासारखी कामे श्रमदान आणि लोकवर्गणी यातून पूर्ण केली. भारतीय जैन संघटनेने यासाठी गउइ देऊन मोलाचे सहकार्य केले होतेे. जवळपास 4 कि.मी. पांधन रस्ता यातून पूर्ण झाला.
अधिवेशनात तुम्ही कोणकोणते महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले? त्याचे काय परिणाम झाले?
अधिवेशनात प्रश्न मांडण्याची संधी अद्याप फारशी मिळालेलीच नाही. कोरोनामुळे पूर्णकाळ अधिवेशनच झाले नाही. मात्र जी काही थोडीफार संधी मिळाली, त्यात खामगाव, जालना रेल्वेमार्गाचा प्रश्न मी प्राधान्याने मांडला. केंद्राने या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी 3000 कोटी रु. आवंटित केले आहेत, मात्र राज्याने आपला हिस्सा दिलेला नाही. परिवहन मंत्रालयाकडे मी याचा पाठपुरावा सुरू केला आहे.
स्त्रियांना शिवीगाळ, मारहाण, अत्याचार या विरोधात अॅट्रॉसिटीसारखा कडक कायदा असावा म्हणून मी सदनात चर्चा घडवून आणली. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून येत आहे.
घानमोड, मानमोड आणि देवधरी या गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू केला.
चिखली आणि आसपासच्या भागातील कापूस उत्पादकांना लाभ व्हावा आणि रोजगारनिर्मिती व्हावी, म्हणून चिखली एमआयडीसीमध्ये टेक्स्टाइल पार्क व्हावे यासाठी मी प्रयत्नरत आहे.
जनसंपर्कासाठी तुम्ही कोणत्या बाबींवर भर देता? कोरोनाच्या काळात त्यात सातत्य कसे राखले?
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही माझा मतदारांशी नियमित संपर्क होता. आजही आहे. सातत्याने ग्रामीण भागात फिरून मी लोकांच्या मनातील कोरोनाची भीती कमी केली. त्यांना काळजी कशी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले. प्रत्यक्ष काम करणारे पोलीस, नर्स, डॉक्टर, स्वच्छता कर्मचारी यांना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी विशेष उपक्रम राबविले. महिला भाजपाच्या वतीने रक्षाबंधन उपक्रम राबविला. ग्रामीण विद्यार्थ्यांना सैन्यभरती, पोलीस भरती यासाठी ऑनलाइन क्लासेसची व्यवस्था केली. ज्या गावात कोरोनाचा रोगी आढळला, येथे जाऊन उपचार मिळतो आहे का? कुटुंबाचे काही प्रश्न आहेत का? हे जाणून घेतले.
माझा जनसंपर्क सुरू आहे आणि कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतर मतदारसंघात जिल्हा परिषद सर्कलमध्ये ‘जनता दरबार’ सुरू करणार आहे. माझ्या मतदारसंघातील मातंग समाजाच्या लोकांचा बँड वाजविण्याचा रोजगार हिरावला गेला होता. त्यासाठी महाराष्ट्रात सर्वप्रथम चिखलीत ‘बँड बजाव’ आंदोलन झाले आणि त्याचा परिणाम जिल्हाधिकार्यांनी त्वरित आदेश काढून बँडवरील बंदी उठविली.
केंद्र सरकारच्या कोणकोणत्या योजना आपण आपल्या कार्यक्षेत्रात राबविल्या? त्यात कितपत यश मिळाले?
केंद्र सरकारच्या पी. एम. किसान मोफत धान्यवाटप आणि महिलांच्या जन धन खात्यात मदत या योजना माझ्या मतदारसंघात प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. मी स्वत: त्याकडे लक्ष देते आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या या योजनांमुळे ग्रामीण जनतेला या कोरोना काळात खूप मोठा आधार मिळाला. रोजगार गेलेल्या कुटुंबांनाही आर्थिक मदत आणि धान्यपुरवठा अगदी योग्य वेळी पोहोचला.
आगामी काळात आपल्या कार्यक्षेत्रात कोणत्या योजना राबविणार आहात?
आगामी काळात तालुक्यातील 26 पांधन रस्त्यांचा प्रश्न सोडविण्यावर मी भर देणार आहे. तसेच पुढच्या काळात चिखलीच्या एमआयडीसीमध्ये परिसरातील शेतकर्यांच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करणारे नवनवीन उद्योग उभारण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. विशेषत: बचत गटाच्या महिलांच्या माध्यमातून लघुउद्योग उभारण्यावर भर देणार आहे. याशिवाय अटलबिहारी आंतरराष्ट्रीय शाळा - सध्या जी केवळ बरखेड या ठिकाणी सुरू आहे, ती अधिक ठिकाणी कशी सुरू होईल हा प्रयत्न पुढील काळात राहील.
आमदार म्हणून माझी निवडणुक झाल्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फारशी कामे करण्याची संधी अद्याप मिळालेली नाही. तरी आहे त्या परिस्थितीत ग्रामीण भागाशी नित्य संपर्क आणि अव्याहत काम सुरू आहे. 5 वर्षांत या मतदारसंघाचा चेहरामोहरा बदललेला असेल, असा मला विश्वास आहे.