*आर.जे.इंटरनॅशनल स्कुलमध्ये 'स-संविधानाचा' पुस्तकाचे जल्लोषात प्रकाशन.
एकसंध भारत कशाप्रकारे चालेल, त्याचं शासन कोणत्या प्रकारचं असेल, हे शासन कोण निवडणार याशिवाय नियमास अधिन राहून संपूर्ण स्वातंत्र्याचे अधिकार संविधानाने आपल्याला कसे दिले आहेत, या विषयीची माहिती राजीव जहागिरदार यांनी दिली.
संविधान दिनाच्या निमित्ताने संभाजीनगरमधील आर.जे.इंटरनॅशनल स्कुलमध्ये ज्येष्ठ विचारवंत, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे लिखित 'स-संविधानाचा' या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शाळेचे सचिव पी.व्ही.सोळुंके, मुख्याध्यापिका सौ.शिल्पा पाठक उपस्थित होत्या.
प्रमुख वक्ते म्हणून बोलतांना जहागिरदार यांनी मुलांसमोर संविधान निर्मितीचा इतिहास सांगितला. ते म्हणाले २६ नोव्हेंबर १९४९ ला संविधान अस्तित्वात आले. पण संविधान आस्तित्वात येण्यापूर्वी तीन वर्ष आधी म्हणजे १९४६ ला संविधान तयार करण्यासाठी संविधान सभा निर्माण करण्यात आली त्यात डॉ.राजेंद्र प्रसाद, पं.जवाहरलाल नेहरु व सरदार वल्लभभाई पटेल सह २८९ सभासद होते. या समितीतून संविधान लिहिण्यासाठी ७ जणांची लेखासमिती तयार करण्यात आली. त्यातील थोर घटनातज्ज्ञ, कायदेपंडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे अध्यक्ष अशी जबाबदारी आली. लेखा समितीचं काम १४१ दिवस चाललं. या घटना समितीने ३९५ कलमांची घटना समितीसमोर ठेवली.
संविधान निर्मितीचा इतिहास विशद केल्यानंतर विद्यार्थ्यांकडून आपला राष्ट्रध्वज, आपले राष्ट्रगीत, सर्व धर्माचे लोक, त्यांचे उत्सव याचा आदर आपण केला पाहिजे. तसेच राष्ट्रीय संपत्तीचे जतन करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
बालाजी सालगुडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आर.जे.इंटरनॅशनलचे सचिव पी.व्ही.सोळुंके यांनी मनोगत व्यक्त केले. मान्यवरांचा परिचय रेणुका देशपांडे यांनी केला. आभार प्रदर्शन सौ.वृशाली कुलकर्णी यांनी केले. तर सूत्रसंचालन ललित गायकवाड यांनी केले.