'हिंदुस्थान की बेटी' गीताची कहाणी

29 Nov 2021 15:59:52
 

RSS_2  H x W: 0
पाकिस्तान ते परभणी अशी ही गीताची कहाणी आहे. ज्या काळजीने व प्रेमाने गीताचे पालनपोषण व सांभाळ होत आहे, त्यावरून सुषमाजींच्या शब्दातील "गीता ही हिंदुस्थानची बेटी" आहे, हे बिरुद सार्थ ठरले आहे!!
 
तिथे 'उजमा' असे नाव दिलेली ही मुलगी आपल्या धर्मसंस्कृतीची मुळे विसरली नाही. पाकिस्तानात राहूनही शाकाहार आणि नित्यपूजा असा तिचा दिनक्रम होता.
 
 
गीता पूर्णत: मूकबधिर आहे व अशी एक भारतीय मुलगी पाकिस्तानात आहे, ही बाब इंदोर येथील ज्ञानेंद्र पुरोहित आणि त्यांच्या पत्नी मोनिका यांना समजली. पुरोहित दांपत्य इंदोर येथे आनंद सर्व्हिस सोसायटीच्या माध्यमातून मूकबधिरासाठी मोठे कार्य करतात. परभणी येथील 'पहल फाउंडेशन'चे अनिकेत शेलगावकर यांना त्यांनी बोलावून घेतले आणि गीताशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. अनिकेत हे गीताशी संपर्क करणारे पहिले भारतीय ठरले. गीताला मायभूमीची ओढ लागलीच होती. तिने भारतात परतण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा ज्ञानेंद्र यांनी भारताच्या तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्याशी संपर्क साधला.
 
 
सुषमाजी म्हणजे असामान्य प्रतिभेच्या धनी. द्रष्ट्या राजकीय नेत्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे एक मातृहृदयी व्यक्तिमत्त्व! परराष्ट्र मंत्री असताना अनेक भारतीयांना त्यांच्यातील वात्सल्याचा अनुभव आलेला आहे. गीता त्याला अपवाद कशी असणार होती? सुषमा स्वराज यांनी आपले राजकीय कौशल्य वापरून गीताला मायभूमीत परत आणले. सुरुवातीला पंजाबी फाउंडेशनमध्ये आणि नंतर ज्ञानेंद्र पुरोहित यांच्या आनंद सर्व्हिस सोसायटीमध्ये ती राहत होती. तिच्या दिनक्रमावरून ज्ञानेंद्र यांच्या लक्षात आले की ही मुलगी इतकी वर्षे पाकिस्तानात राहिली, तरी ती आपला धर्म आणि संस्कृती विसरली नाही. ती हिंदू धर्माप्रमाणे आचरण करते, पूर्णत: शाकाहारी आहे. तिच्या म्हणण्याप्रमाणे पाकिस्तानातदेखील ती श्रीकृष्णाची भक्ती करत असे. गीताची देवनागरीतील आकडेमोड, तिच्या राहणीमानाची पद्धत, संस्कृती यावरून ती महाराष्ट्रातील असल्याचे ज्ञानेंद्र यांच्या लक्षात आले आणि त्यांनी तिच्या जन्मदात्यांचा शोध घ्यायचे ठरवले. त्यांनी अनिकेत यांचे वडील डॉ. अशोकराव शेलगावकर यांच्याशी संपर्क साधला. गीताच्या स्मृतीप्रमाणे तिच्या घराजवळून नदी वाहत होती आणि मंदिर होते. असे बालपणातील संदर्भ आठवून विविध ठिकाणी तिच्या जन्मदात्यांचा शोध सुरू झाला. गीता मूकबधिर असल्याने त्यात अडथळेही बरेच होते. हे काम अर्थातच सोपे नव्हते. प्रशासन-पोलीस-सांकेतिक भाषातज्ज्ञ यांच्या मदतीने तिच्या पालकांचा अखंड शोध सुरू होता.
 

RSS_3  H x W: 0 
  
वृत्तवाहिन्या, वर्तमानपत्रे आणि सोशल मीडियाद्वारे गीताची कहाणी सर्व समाजात पोहोचली होती. तिच्या आईवडिलांचा शोध सुरू असतानाच वाळुज येथील मीनाबाई पांढरे यांना या विषयाची माहिती मिळाली व त्यांनी गीता आपलीच मुलगी असल्याचे सांगितले. जिंतूर येथील सुधाकर वाघमारे यांच्याशी मीना यांचा विवाह झाला होता. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता. गीता (बालपणीचे नाव राधा) ही पाच वर्षांची असतानाच जिंतूर येथून निघून गेली होती. पतीचे निधन झाल्यानंतर मीना यांनी दिनकर पांढरे यांच्याशी पुनर्विवाह केला. परभणी येथे जाऊन मीनाबाईंनी गीताची भेट घेतली असता तिने आपल्याला ओळखल्याचा दावा केला. तिच्या पोटावर भाजल्याची खूण असल्याचे त्यांनी सांगितले. तिला लहानपणी वाहनात बसण्याचा छंद असल्यामुळे ती पाकिस्तानात पोहोचली असावी, असेही त्या म्हणाल्या. "चोवीस वर्षांनंतर माझी हरवलेली राधा भेटल्याचा आनंद आहे, मात्र तिचा सांभाळ करण्याची आपली अर्थिक परिस्थिती नाही. शासनाने मदत केल्यास बरे होईल" असे त्या म्हणाल्या.
 
 
सुषमा स्वराज यांच्या प्रयत्नाने भारतात आलेल्या गीताला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे. तिची संपूर्ण माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडे आहे. तिच्या जन्मदात्या आईवडिलांचा शोध घेताना तिची फसवणूक होऊ नये, याची काळजी परराष्ट्र मंत्रालय आणि पहल फाउंडेशन ही संस्था घेत आहे. म्हणूनच तिचे कुटुंबीय असण्याचा दावा करणार्‍यांची गीतासह डीएनए चाचणी झाल्याशिवाय गीताला त्यांच्याकडे सुपुर्द करण्यात येणार नाहीये.
 
 
गीताचे वास्तव्य सध्या परभणी येथे अनिकेत शेलगावकर यांच्या पहल फाउंडेशनमध्ये आहे. अनिकेत यांचे वडील डॉ. अशोकराव शेलगावकर हे प्रदीर्घ काळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 'देश हमे देता है सबकुछ, हम भी तो कुछ देना सीखे' या संस्काराचे अनुसरण करत त्यांनी मूकबधिर, कर्णबधिर मुलांसाठी 'पहल फाउंडेशन'ची स्थापना केली आहे. अनिकेत हे स्वत: मूकबधिर आहेत. पहल संस्था स्वखर्चातून आणि मिळेल त्या सामाजिक सहकार्यातून गीताचे पालनपोषण करत आहे. त्यासाठी त्यांना कुठलीही शासकीय मदत मिळत नाही. ज्ञानेंद्र आणि मोनिका पुरोहित यांच्या सूचनेनुसार गीता त्यांच्याकडे राहत आहे. रा.स्व. संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे इंदोर प्रवासात असताना मोनिका पुरोहित यांनी त्यांना गीताविषयी माहिती दिली होती, तेव्हा "महाराष्ट्राच्या प्रवासात आपण गीताला नक्की भेटू" असे मोहनजी म्हणाले होते. त्यानुसार दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी संभाजीनगरला गीताची आणि पहल फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली.
 
RSS_1  H x W: 0
“रा.स्व. संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत हे इंदोर प्रवासात असताना मोनिका पुरोहित यांनी त्यांना गीताविषयी माहिती दिली होती, तेव्हा "महाराष्ट्राच्या प्रवासात आपण गीताला नक्की भेटू" असे मोहनजी म्हणाले होते. त्यानुसार दि. १३ नोव्हेंबर २०२१ रोजी त्यांनी संभाजीनगरला गीताची आणि पहल फाउंडेशनच्या पदाधिकार्‍यांची भेट घेतली. ”
 
गीता सध्या परभणीत राहते. पहल फाउंडेशनमध्ये ती सध्या भारतीय सांकेतिक भाषा शिकत आहे. मराठी, इंग्लिश आणि गणित शिक्षणही ती घेत आहे. तिला शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याचा प्रयत्न अनिकेत शेलगावकर करत आहेत.
 
 
भारताच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज या तर गीतासाठी आईच होत्या. त्या गीताला "हिंदुस्थान की बेटी" म्हणत असत. ती मध्य प्रदेशात असताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहानदेखील तिची नियमित चौकशी करत असत.
 
 
जेव्हा सुषमा स्वराज यांचे निधन झाल्याची बातमी गीताला कळली, तेव्हा तिच्या शोकाला पारावार राहिला नाही. जणू तिची आईच गेली होती. तिला अनाथ झाल्यासारखे वाटले. सुषमाजी तिच्याशी नेहमीच फोनवर बोलत असत. थावरचंद गहलोत यांना सांगून सुषमाजींनी तिच्या अभ्यासासाठी लॅपटॉप उपलब्ध करून दिला होता. तिच्या मनात सुषमा स्वराज यांच्याविषयी हळव्या आठवणी आहेत. सुषमाजी असोत किंवा परभणीचे डॉ. शेलगावकर, ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारात वाढलेली माणसे. देशबांधवाप्रती विलक्षण आत्मीयता हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
 
 
 
पाकिस्तान ते परभणी अशी ही गीताची कहाणी आहे. ज्या काळजीने व प्रेमाने गीताचे पालनपोषण व सांभाळ होत आहे, त्यावरून सुषमाजींच्या शब्दातील "गीता ही हिंदुस्थानची बेटी" आहे, हे बिरुद सार्थ ठरले आहे!!
 
 

 - रवींद्र सासमकर
 
विश्व संवाद केंद्र, देवगिरी
Powered By Sangraha 9.0