@रुपाली कुळकर्णी-भुसारी
2016ला नॅशनल इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सीची कुन्नूरच्या कनकमला येथे धाड पडते. त्यात देशाविरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी ‘अल झारूर खालेफा’ गट बनवणारे आणि इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीयाने (इसिसने) भारावलेले काही जण सापडतात. हे सगळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे (पीएफआयचे) सदस्य असतात. नंतर दोनच महिन्यांत 22 जण इसिसला जाऊन मिळण्यासाठी कायमचे लुप्त होतात. हेच इसिसचे केरळमधील पहिले मोड्यूल. इसिसने भारावलेली संघटना पीएफआय आणि इस्लामी मूलतत्त्ववादाने नासलेले केरळ...
4 जुलै 2010 रोजी एर्नाकुलम जिल्ह्यात प्रा. टी.जे. थॉमस ह्या प्राध्यापकाचा हात मनगटापासून कापून टाकला गेला, कारण प्रश्नपत्रिका तयार करताना त्यांनी प्रेषित मुहंमद ह्यांचा अपमान केला. ह्यात पीएफआयच्या नेत्याला कटासाठी अटक करण्यात आली. (संदर्भ - पी.एफ.आय. लीडर हेल्ड फॉर अॅटॅक ऑन लेक्चरर - द इंडियन एक्स्प्रेस, 22 जुलै 2010, रिट्रीव्ह 28 जुलै 2011.)
संघटनेची स्थापना
संघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी
नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट ह्या संघटनेतून पी.एफ.आय.ची निर्मिती झाली. नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट 1994मध्ये केरळला मलबारला स्थापन झाली. इस्लामिक सेवक संघ ह्या देशाबाहेर हकालपट्टी झालेल्या संघटनेचे नवे रूप म्हणजे नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट असा दावा केरळ पोलिसांनी केला होता. (संदर्भ - आय.डी.एस.ए. स्ट्रॅटेजिक कमेंट्स - इज केरला इमर्जिंग अॅज इंडियाज न्यू टेरर हब अर्काइव्ह - 12 जुलै 2007 एट वेबॅक मशीन)
नीरा रावत, आय.पी.एस., यांनी न्या. थॉमस पी. जोसेफ चौकशी समितीपुढे सांगितले होते की आय.एस.आय. (पाकिस्तान) आणि इराण ह्यांनी एन.डी.एफ.ला पैसा पुरवला आहे. ह्या बाबतीत पोलिसांनी अधिकृत गोपनीय अहवाल तयार केला आहे. (संदर्भ - आय.एस.आय., इराण फंडेड एन.डी.एफ. - रावत, द हिंदू, चेन्नई 14 मार्च 2005.) यातूनच पीएफआयची निर्मिती झाली असल्यामुळे गुन्हेगारी स्वरूप अटळ आहे.
देशभरात विणलेले जाळे
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे जाळे संपूर्ण देशभरात अल्पावधीत पसरण्याचे कारण म्हणजे अनेक संघटनांच्या बरोबर केलेली युती. नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंटला आपल्यात सामावल्यानंतर तामिळनाडूच्या मानिथा निथी पसरायी ह्या संघटनेला 2007मध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने आपल्या आधिपत्याखाली घेतले. सिमीचीच एक शाखा असणारी संघटना म्हणजे ‘कर्नाटका फोरम फॉर डिग्निटी’ 22 नोव्हेंबर 2006 रोजी यात विलीन झाली. नॅशनल विमेन फ्रंट आणि कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया हेसुद्धा ह्याच संघटनेचे घटक आहेत. 2009पासून गोव्याचे सिटिझन फोरम, राजस्थानची सोशल अँड एज्युकेशनल सोसायटी, पश्चिम बंगालची नागरिक अधिकार सुरक्षा समिती, मणिपूरची लिलॉग सोशल फोरम आणि आंध्र प्रदेशची असोसिएशन ऑफ सोशल जस्टिस ह्या सगळ्या पीएआयशी संलग्न/विलीन आहेत. आठ राज्यांमधील ह्या संघटनाच्या एकत्रीकरणातून 17 फेब्रुवारी 2009 रोजी नॅशनल पॉलिटिकल कॉन्फरन्सची निर्मिती झाली. (संदर्भ - ग्रँड स्टार्ट फॉर पॉप्युलर फ्रंट नँशनल पॉलिटिकल कॉन्फरन्स, www.daijiworld.com रिट्रीव्ह 17 एप्रिल 2014.)
पीएफआय आणि गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया
पीएफआयचा राष्ट्रीय चेअरमन अब्दुल रहमान आधी सिमीचा सेक्रेटरी होता. राज्य सेक्रेटरी अब्दुल हमीद आधी सिमीचा राज्यपातळीवरील सेक्रेटरी होता. 13 ऑगस्ट 2010ला अलुवा पोलिसांनी पी.एफ.आय.च्या सहा सदस्यांना अटक केली. त्यांच्याकडून हिंदू आणि ख्रिश्चन धर्माविषयी विषारी प्रचार करणार्या पुस्तिकांच्या 320 प्रती जप्त केल्या गेल्या. (संदर्भ - सिक्स पीएफआय अॅक्टिव्हिस्ट्स हेल्ड, द हिंदू, चेन्नई, 14 ऑगस्ट 2010.) केरळ सरकारने 2012मध्ये केरळ उच्च न्यायालयात स्पष्ट केले होते की सीपीआय (एम) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ह्यांच्या 27 कार्यकर्त्यांच्या हत्येमध्ये पी.एफ.आय.चा हात आहे. (संदर्भ - ‘पीएफआय इज बॅनड आउटफिट सिमी इन अदर फॉर्म, केरला गव्हर्मेंट टेल्स एचसी.’ द इंडियन एक्स्प्रेस, 26 जुलै, 2012.) तसेच कुन्नूरच्या नारथ येथे 2013 मध्ये पीएफआयने ट्रेनिंग कँप चालवला होता. पोलिसांनी धाड टाकून तलवारी, गावठी बॉम्ब इ. जप्त केले होते. (संदर्भ - केरला कॉप कन्फर्म पॉप्युलर फ्रंट टेरर कॅम्प इन कुन्नूर, द पायोनियर, इंडिया, 25 एप्रिल 2013.) अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता एन. सचिन गोपाल आणि विशाल ह्यांची हत्या कँपस फ्रंट आणि पीएफआय ह्यांनी केली. (संदर्भ - बॅन ऑर्डर्स इन चेन्गानुर, माव्हेल्लीकरा, द न्यूज इंडियन एक्स्प्रेस.) तसेच पीएफआयने ईशान्य भारतातून आलेल्यांच्या विरोधात 13 ऑगस्ट 2012 रोजी 6 कोटी एसएमएस पाठवले. पुणे, चेन्नई, हैदराबाद आणि दिल्लीतून सुमारे 30 हजार लोक ईशान्य भारतात परतले. यातील 30 टक्के एसएमएस पाकिस्तानमधून अपलोड केले गेले होते. गृह मंत्रालयाने 15 दिवस बल्क एसएमएसवर बंदी घातली. (संदर्भ - दास, समीर कुमार (2013) गव्हर्निंग इंडियाज नॉर्थईस्ट - एसे ऑन इन्सरजन्सी, डेव्हलपमेंट अँड कल्चर ऑफ पीस., तसेच केरल बेस्ड पीएफआय ग्रूप ट्रिगर्ड हेट एस.एम.एस. लीडिंग टू नॉर्थ ईस्ट एक्झोडस, बिहारप्रभा, रिट्रीव्ह 14 मे 2014.)
पीएफआयच्या गुन्हेगारी, विशेषत: हिंदूविरोधी कारवाया पाहता ह्या संघटनेवर बंदी घालण्यात यावी अशी मागणी जनसामान्यात आहे. केरळ हे दहशतवादाचे केंद्र म्हणून उदयास येत आहे. ‘आर.एस.एस. इन केरला - अ सागा ऑफ स्ट्रगल’ ह्या प्रा. ए.के.एम. दास ह्यांच्या पुस्तकात म्हटले आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ-भाजपा समर्थक असणार्या 270 स्वयंसेवकांची हत्या केरळमध्ये 1969पासून आतापर्यंत केली गेली आहे. (संदर्भ - ‘फॅक्ट चेक - दीज आर नॉट आर.एस.एस. वर्कर्स ड्रॅग थ्रू द स्ट्रीट्स ऑफ केरला बाय पॉप्युलर फ्रंट बाय दिश्मा पुझाक्क्ल, इंडिया टुडे, 21 फेब्रुवारी 2021.)
नुकतेच इसिसचे मुखपत्र ‘व्हॉइस ऑफ हिंद’ने बाबरीचा बदला घेतला जाण्याची धमकी दिली आहे. इसिसला पीएफआयचे कार्यकर्ते जाऊन मिळाले आहेत. (संदर्भ - सिक्स पीएफआय अॅक्टिव्हिस्ट्स जॉइन इस्लामिक स्टेट, क्लेम्स केरला पोलीस’ पी.एस. गोपालकृष्णन उन्निथान, इंडिया टुडे, 2 नोव्हेंबर 2017.)
निसर्गरम्य केरळ... ‘गॉडस ओन कंट्री’ असे ब्रीद मिरवत होते. आता त्याची वाटचाल ‘नो अदर गॉड, बट अल्लाह’कडे होत असलेली दिसतेय. सर्वसमावेशक संस्कृतीकडून अतिजहाल इस्लामिक मूलतत्त्ववाद फोफावताना दिसतोय. पी.एफ.आय.च्या रॅलीत हिंदूविरोधी घोषणा देण्यात आल्या, हे त्याचेच द्योतक आहे. धार्मिक तेढ वाढणे कोणाच्याच हिताचे नाही. भारतात परधर्मसहिष्णुता हाच खरा आधार आहे. धर्माचे रक्षण करणे ही मानवाची स्वाभाविक वृत्ती आहेच. नाही तरी धर्मरक्षणासाठी भगवद्गीतेत सांगितले आहेच... ‘धर्म संस्थापनार्थाय...संभवामी युगे युगे....’
रुपाली कुळकर्णी-भुसारी
9922427596