@प्रा. रवींद्र भुसारी
राजाभाऊ हाडाचे शिक्षक होते. साक्षात सरस्वतीने राजाभाऊंच्या ज्ञानलालसेची झोळी अगदी मुक्तहस्ताने भरली होती. त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेला नियोजकतेची जोड असल्यामुळे राजाभाऊंचे कोणतेही काम अगदी रेखीवपणे साकारले जात असे.
जोशी कुटुंब मूळ अचलपूरचे. वडील जयकृष्णपंत स्थानिक मिलमध्ये नोकरी करून अन्य पूर्णवेळ संघकार्य करीत असत. अचलपूरचे संघचालक असल्याने गावात स्नेह-परिचय दाट होता. घर तर संघमय होतेच. 1945 साली केवळ तीन महिन्याचे असताना राजाभाऊंचे म्हणजेच तान्हे बाळ असलेल्या भालचंद्राचे पितृछत्र हिरावले गेले. मुक्काम अकोल्यातील मोठे बंधू मधुकररावांकडे हलविला गेला. पुढे 1947 उजाडले. स्वातंत्र्य, म. गांधींची हत्या व लागून आलेली संघबंदी. मधुकररावांची रवानगी तुरुंगात झाली. या काळात जोशी कुटुंब अगदी मेटाकुटीला आले. पण मधुकररावांच्या कौटुंबिक जिव्हाळ्यामुळे या बिकट काळावरदेखील मात केली गेली. संघबंदी उठल्यावर बिर्ला मिलमध्ये नोकरीला असलेल्या मधुकररावांच्या बिर्ला क्वार्टरमध्येच राहून भालचंद्राचे प्राथमिक, शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले.
भालचंद्र बालपणी चार वर्षांचा असतानाच आपल्या चुलत भावांसोबत म्युन्सिपाल्टीच्या 7 नंबर शाळेत जाऊन बसत असे. शिक्षक घरी निरोप देत वारंवार बाहेत काढीत. शेवटी मुख्याध्यापकांनी या बालकाची परीक्षा घेतली व त्याची बुद्धिमत्ता बघून केवळ चौथ्या वर्षी भालचंद्रला पहिल्या वर्गात प्रवेश दिला. कुशाग्र बुद्धीची ही चमक भालचंद्राने पुढेही कायम ठेवत च.डल. पूर्ण केले व वयाच्या 20व्या वर्षी खामगावच्या एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजूदेखील झाले. या सर्व शैक्षणिक काळात भालचंद्र संघकार्याशी एकरूप राहिला. शिशु-बाल-किशोर व तारुण्यावस्थेपर्यंत भालचंद्राने सायम् शाखा नित्यनेमाने तर केलीच, शिवाय विविध स्तरांतील दायित्व स्वीकारत संघपरीघात ‘राजाभाऊ’ या प्रेमळ नावाने लौकिक कमावला.
सा. विवेक आणि राजाभाऊ
रसायनशास्त्राचे एक गाढे प्राध्यापक म्हणून नावलौकिक प्राप्त केलेले ‘बी.जे.’, संघदृष्ट्या मात्र एक वेगळेच रसायन होते. केमिस्ट्रीत एक प्रकरण असते - डेर्श्रीलळश्रळीूं.. अर्थात् ‘द्रावणीयता’.. म्हणजेच एखादा पदार्थ विरघळण्याची क्षमता! याच कसोटीचे निकष लावता, राजाभाऊ हे संघप्रवाहाच्या शुद्धजलात पूर्णतः विरघळून गेले होते. ‘अमृतमहोत्सवी’ आयुष्य जगलेल्या राजाभाऊंचे संघकार्य हेच मुळी अमृतासमान होते. पद हे राजाभाऊंसाठी अगदी गौण होते. कारण, पू. श्रीगुरुजींनी वर्णिलेल्या ‘स्वयंसेवकत्व’ या मौलिक पदाचा सन्मान ते जाणत होते.
संघातील विविध दायित्वे सांभाळीत राजाभाऊ कधी प्रांतस्तरावर ‘महाविद्यालयीन विद्यार्थी प्रमुख’ झाले. काही काळानंतर त्यांना चक्क ‘अकोला तालुका कार्यवाह’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. राजाभाऊंनी अत्यंत आनंदाने ती तर स्वीकारलीच, शिवाय त्या दायित्वाला पूर्णपणे न्याय दिला. तो कालखंड आद्य सरसंघचालक प.पू. डॉक्टर हेडगेवार यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा होता. राजाभाऊंनी अतिशय बारकाईने तालुक्याचा अभ्यास करून डॉक्टरांच्या जन्मदिनी गुढीपाडव्याच्या एकाच दिवशी एकाच सायंकाळी अकोला तालुक्यात 100 शाखा लावून डॉक्टरांचे अलौलिक जीवनदर्शन गावकर्यांसमोर मांडण्याची योजना केली. अतिशय तपशिलात जाऊन कार्ययोजना केली. प्रवासी कार्यकर्त्यांची यादी/निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण दिले. हाती घेतलेला उपक्रम पूर्णपणे यशस्वी होण्याकरिता आवश्यक ती सर्व काळजी घेतली. अनुवर्तन केले, सतत कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहिले. त्या संघटित कौशल्याचा परिणाम म्हणून 1989च्या वर्षप्रतिपदा दिनी अकोल्यातील 101 शाखांवर प.पू. सरसंघचालक प्रणाम होऊन राष्ट्रउद्धारक डॉक्टरांचे चरित्र गावकर्यांसमोर शाखा पद्धतीत मांडणे शक्य झाले. या उपक्रमाच्या श्रमपरिहार दिनी तत्कालीन प्रांत प्रचारक मा. मोहनजी भागवत यांनी एका कौटुंबिक सोहळ्यात या उपक्रमाचा समारोप केला. संघाने आज्ञा करताच प्रांत स्तरावरील अधिकार्याने क्षणात तालुकास्तरातील पद स्वीकारून संघकार्यात स्वतःला विरघळवून टाकणे हे काही सोपे काम नव्हे. पण त्यांच्या मूळ ‘संघशरण’ स्वभावामुळे राजाभाऊंना हे सहज शक्य झाले.
साधेपणा व मधुर वाणी यामुळे राजाभाऊ प्रत्येकाला आपल्या हक्काचे वाटत. कॉलेजमध्येदेखील एक चिंतनशील प्राध्यापक ही छबी निर्माण झालेले बी.जे. तितकेच विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिकास आले. महाविद्यालयातील प्राचार्यांपासून तो समस्त विद्यार्थ्यांना, तसेच कार्यालयीन कर्मचार्यापासून तो सर्व शिपायांना ‘आपला’ माणूस वाटणारी व्यक्ती म्हणून राजाभाऊंनी नाव कमावले होते. थोडे मागे पडलेल्या विद्यार्थ्यांचे निःशुल्क शिकवणी वर्ग ते आत्मीयतेने स्वतःच्या घरी घेत. इतकेच नव्हे; ज्या काळात खखढच्या प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी करून घेण्याचे कोणतेही साधन अकोल्यात नव्हते, त्या काळात राजाभाऊंनी पुढाकार घेऊन विद्यार्थ्यांकरिता क्लासेस सुरू केले. तसेच, राजाभाऊंनी रसायनशास्त्राची लिहिलेली पुस्तके अनेक विद्यार्थ्यांकरिता बहुमोल मार्गदर्शनाची ठरली आहेत. ठङढ सायन्स कॉलेजचे प्राचार्य एम.जी. जोशी यांची, एक शिस्तप्रिय व तितकेच विद्यार्थिप्रिय प्राचार्य म्हणून ख्याती होती. उत्तम प्रशासनाचा आदर्श म्हणून ओळखल्या जाणार्या एम.जींचा राजाभाऊंवर विशेष लोभ होता. महत्त्वाच्या निर्णयात ते बीजेंना सामील करून घेत.
एके प्रसंगी कॉलेजमध्ये विज्ञानाचा एक महत्त्वाचा विषय विद्यार्थ्यांसमोर मांडण्याकरिता विदेशातून एक प्रसिद्ध व्याख्याता आले. अतिशय उत्सुकतापूर्ण माहिती असलेला उडत्या तबकड्यांचा (णऋज) तो रहस्यमय विषय होता. इंग्लंडहून आलेल्या या विद्वानाला मराठी वा हिंदी भाषा येण्याचे काही कारण नव्हते. त्यांचे इंग्लिश उच्चारदेखील विद्यार्थ्यांना समजण्यापलीकडचे होते. एम.जीं.नी दुभाषाचे (खपींशीिीशींशीचे) काम राजाभाऊंकडे सोपविले. राजाभाऊंनी असमर्थता दाखविताच एम.जी. म्हणाले, “बी.जे. सर, तुमच्याशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही. तुम्ही हे केलेच पाहिजे.” राजाभाऊंनी अल्पवेळात पाहुण्यांशी ओळख करून घेत गप्पाटप्पात त्यांच्या उच्चारण शैलीचा अभ्यास केला आणि आश्चर्य ते काय - बी.जे. सरांनी सभागृहातील सर्व विद्यार्थ्यांना व समस्त श्रोत्यांना हा किचकट पण औत्सुक्यपूर्ण विषय अगदी नीट समजावा इतके या विद्वानाच्या व्याख्यानाचे उत्तम भाषांतर केले. दर दोन वाक्यांनंतर दुभाषाने लगेच ती वाक्ये मराठीत अचूकपणे भाषांतरित करावी, हे अवघड काम राजाभाऊंनी सहज केले व एम.जीं.नी त्यांच्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविला.
कोणत्याही विषयाचा गाभा नीट समजून घेऊन त्याची रितसर पूर्वतयारी करणे, हा राजाभाऊंचा पिंड होता. परिणामी कोणत्याही विषयाचा गुंता अतिशय सहजपणे सोडवत. विषय शिक्षणाचा असो की कौटुंबिक, सामाजिक असो वा राजकीय, राजाभाऊ समस्येच्या मुळाशी जाऊन त्यावर अतिशय चिंतनशील विचार मांडत. नियोजनबद्ध काम करण्यावर राजाभाऊंचा कटाक्ष असे.
राजाभाऊंच्या सेवानिवृत्तिदिनी आम्ही काही स्वयंसेवक मित्र त्यांचे शुभचिंतन करण्यास कॉलेजमध्ये पोहोचलो. राजाभाऊंचे लायब्ररीमध्ये काही वाचन सुरू होते. “शेवटच्या दिवशीही आता कोणता अभ्यास सुरू आहे?” आम्ही स्वाभाविक प्रश्न केला. त्यावर राजाभाऊंचे उत्तर अध्यापन क्षेत्रासाठी फार मर्मग्राही आहे - “विषयाचे अध्ययन केल्याखेरीज मी आजवर कोणताही तास कधी घेतला नाही, तर शेवटचा तास पूर्वाभ्यास केल्याशिवाय कसा घेऊ?”
“केमिस्ट्री तर तुमच्या ओठावर खेळत असेल, राजाभाऊ, फर्स्ट इयर ते फायनलपर्यंतची?” आमचा कुतूहलमिश्रित प्रतिप्रश्न. त्यावर राजाभाऊ विनम्रपणे म्हणाले, “ते ठीक आहे, पण अशा अभ्यासामुळे माझी ज्ञानलालसादेखील टिकून राहते. आणि मुख्य म्हणजे ज्ञान अमर्याद असल्याने अध्यापकाच्या अभ्यासाचा निश्चित लाभ विद्यर्थ्यांना तर होतोच, शिवाय जीव ओतून शिकविल्याचा आत्मिक लाभ आपल्यालादेखील होतो.” अध्यापन-अध्ययन क्षेत्रासाठी हे उदाहरण अनोखे ठरावे.
ज्ञानाची विलक्षण भूक असलेल्या राजाभाऊंना अनेक वेळा तृतीय वर्षाच्या संघ शिक्षा वर्गात बौद्धिक विषय मांडावा लागत असे. ते प्रचंड तयारी करत. ‘षड्दर्शन’ हा दर्शनशास्त्राचा गंभीर व किचकट विषय राजाभाऊ अभ्यासूपणाच्या याच वृत्तीमुळे अतिशय सोपा व रुचिपूर्ण करून स्वयंसेवकांसमोर मांडत. दर वर्षी संघ शिक्षा वर्गात उपस्थित राहणार हा नियम अनेक वर्षे पाळला. तृतीय वर्ष वर्गात राजाभाऊंनी दोन वेळा बौद्धिक प्रमुखाची जूबाबदारी सांभाळली आहे. सखोल वाचनाच्या आवडीमुळे ते कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञता प्राप्त करत. णऋज (उडती तबकडी) व हॅलेचा धूमकेतू, अंतराळयात्री कल्पना चावलाचे वीरमरण, अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर जिहादी हल्ला इत्यादींवरील त्यांची व्याख्याने आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. खगोलशास्त्रापासून तो संघाच्या विविध घोषवाद्यांचीही राजाभाऊंना आवड होती. सर्व वाद्यांचा अभ्यास करून संघाच्या घोषपथकात राजाभाऊंनी वंशीवादक म्हणून वर्षानुवर्षे उपस्थिती दिली आहे.
कोणतेही काम मन लावून करणार्या राजाभाऊंना सर्वांचा फायदा करून देणारी एक अलौकिक सवय होती, ती म्हणजे नोंदवही लिहिण्याची. राजाभाऊ रोज डायर्या लिहीत. एक संघाची व दुसरी व्यक्तिगत कौटुंबिक घटनांची. साधे रजिस्टर वा नोटबुकमध्ये दैनंदिन कामकाजाची नोंद असलेल्या या डायर्या कित्येक प्रसंगात अनेकांच्या कामी येत असत. भाषा साहित्यिक नसे, पण घटनांची तपशीलवार वर्णने डायर्यांमध्ये हमखास सापडत. शिवाय त्यांनी दैनंदिनी ही सर्वांसाठी ‘खुली किताब’ असे. जुने संदर्भ हुडकून काढण्यास राजाभाऊंच्या डायर्यातील नोंदी शोधण्याचा अधिकार सामान्य स्वयंसेवकालादेखील असे.
मधल्या काळात राजाभाऊ विदर्भ प्रांत बौद्धिक प्रमुख झाले. रामजन्मभूमी आंदोलनातील कारसेवांच्या त्या काळात राजाभाऊंनी लोकजागृतीसाठी अथक परिश्रम घेतले. 1992मधील निर्णायक कारसेवा अभियानात राजाभाऊ प्रांतातर्फे अकोला जिल्ह्याचे पालक म्हणून ठाण मांडून अयोध्येत होते. 1993मध्ये अकोल्यात संघाच्या समस्त प्रांत प्रचारकांची बैठक स्थानिक खंडेलवाल भवनात ऐन दिवाळीत झाली. त्या काळात या बैठकीला ‘दीपावली बैठक’ असेच म्हणत असत. अकोला नगरासाठी एक अपूर्वाई ठरलेली ही ऐतिहासिक बैठक राजाभाऊंच्या कुशल व्यवस्थापनात यशस्वी झाली. अ.भा. दीपावली बैठकीचे व्यवस्था प्रमुख म्हणून संघटनकौशल्याचा आदर्श ठरलेले राजाभाऊ 1994नंतर विदर्भ प्रांताचे व्यवस्था प्रमुख झाले. विज्ञान विषयाच्या प्राध्यापकाने प्रांताचे खातेपुस्तके लिहिण्याचे काम असलेले व्यवस्था प्रमुखाचे कामदेखील तितक्याच नेटाने केले. शेवटच्या आठ-दहा वर्षांत राजाभाऊंना विस्मरणाची व्याधी जडली, ती पूर्ववत झालीच नाही.
मा. मोहनजींसह सर्व प्रचारकांना आपले हक्काचे घर वाटावे असे संघमय वातावरण राजाभाऊंनी घरात कायम केले. शोभाताईदेखील हरेक प्रचारक-स्वयंसेवकाची आस्थापूर्ण दखल नेहमी घेतात. स्वाभाविकपणे राजाभाऊंच्या मुली आसावरी व आरती, तसेच मुलगा आदित्य यांच्यामध्येदेखील संघाकामाची आस्था संस्कारित झाली आहे.
मूलस्वभावतः राजाभाऊ हे आत्मविलोपी व्यक्तिमत्त्व होते. कोणत्याही गोष्टीचा मोठेपणा नाही असे अहंकारशून्य वागणे, तितकेच शांत व संयमी या स्वभावातूनच राजाभाऊंनी कदाचित असे एकाएकी निघून जाण्याचे नियोजन मनोमन केले असावे. कोणालाही चाहूल लागू न देता. अन्यथा कोणत्याही गोष्टीची यथासांग पूर्वतयारी करणारा हा माणूस एकाएकी असा निघून जाऊच कसा शकतो? राजाभाऊंच्या आत्मविलोपी स्वभावात याचे उत्तर सापडते. शेवटी, ‘हरि इच्छा बलीयसी॥’.
व्यावहारिक चमक-धमकपासून कोसो दूर राहून आपल्या साध्यासुध्या राहणीतून विद्यार्थ्यांवर व स्वयंसेवकांवर अपार प्रेम करणार्या राजाभाऊंना विनम्र श्रद्धांजली.
माजी प्रदेश संघटन मंत्री, भाजपा.
प्रा. रवींद्र भुसारी
9594753444