संघ, जातीयवाद आणि डॉ. हेडगेवार

विवेक मराठी    10-Apr-2021
Total Views |

@श्रीपाद कोठे

महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शासकीय सेवेत कोणकोण संघनिष्ठ आहेत याचा शोध घेणार असल्याचे म्हटले आहे. शोध घेऊन काय करणार हे काही ते बोललेले नाहीत, पण ते आणि त्यांचा पक्ष यांचा परंपरागत संघविरोध लक्षात घेता, 'सांभाळून राहा, संघनिष्ठ असल्याची किंमत चुकवावी लागू शकते' असा गर्भित इशाराच त्यांना द्यायचा असावा. संघाचे स्वयंसेवकच नव्हे, तर समाजातील संघनिष्ठ लोकसुद्धा त्यांच्या या गर्भित इशाऱ्याला भीक घालणार नाहीत हे निर्विवाद. पण अशा प्रकारचे इशारे ही काही आजचीच नवीन बाब आहे असे समजण्याचेही कारण नाही. शासकीय कर्मचाऱ्यांनी संघाच्या कार्यात सहभागी होऊ नये याचे प्रयत्न या देशातील सरकारांनी आधीही केले आहेत. तीनदा तर संघाला चिरडून टाकण्याचे प्रयत्न झाले आहेत. मात्र हे केवळ स्वातंत्र्योत्तर स्वदेशी सरकारांचेच कर्तृत्व आहे असे समजण्याचे कारण नाही. संघाच्या सातव्या वर्षीच तत्कालीन ब्रिटिश शासनाने असा प्रयत्न केला होता आणि डॉ. हेडगेवार यांच्या कुशल प्रयत्नांनी ते विदेशी शासन तोंडघशी पडले होते. स्वदेशी सरकारेही अशीच तोंडघशी पडली होती. संघविरोधक यातून जेव्हा धडा शिकायचा तो शिकतील. संघ मात्र प्रत्येक वेळी अधिक सशक्त होतो. १९३२पासूनचा हा इतिहास आहे.

RSS_1  H x W: 0

राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जातीयवादाचा आरोप अनेकदा करण्यात येतो. या आरोपात नवीन तर काहीच नाही, पण तो originalसुद्धा नाही, हे लक्षात घ्यायला हवे. आजच्या बहुतेक राजकारण्यांनी, बुद्धिजीवींनी, लेखक-विचारवंतांनी, संपादकांनी, विश्लेषकांनी, सुशिक्षितांनी जशा इंग्रजांच्या अनेक गोष्टी उचलल्या आणि अर्थ वगैरेच्या भानगडीत न पडता त्या तशाच पुढे चालू ठेवल्या, तसाच संघावरील हा जातीयवादाचा आरोपही त्यांनी इंग्रजांकडूनच उधार घेतला आहे. १९३२च्या डिसेंबर महिन्यात मध्यप्रांत-वऱ्हाडच्या प्रांतीय सरकारने म्युनिसिपल व डिस्ट्रिक्ट काउन्सिलच्या नोकरांनी संघात भाग घेऊ नयेअसे परिपत्रक काढले होते. संघ हा राजकीय चळवळी करतो आणि जातीयवादी आहे अशी दोन कारणे सरकारने त्यासाठी दिली होती. १९३३च्या डिसेंबर महिन्यात सरकारने याच आशयाचे एक नवीन परिपत्रक काढले. त्यातून राजकीय चळवळीचा आरोप काढून टाकण्यात आला, पण संघ जातीयवादी असल्याचा आरोप मात्र कायम ठेवण्यात आला होता. त्या वेळी परकीय इंग्रजांचे राज्य होते आणि काँग्रेसलाही संघाबद्दल मुळीच प्रेम नव्हते. असे असतानाही संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी त्याविरुद्ध यशस्वीपणे लढा दिला होता.

संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बाबासाहेब आपटे, तसेच त्यांचे काका आबाजी हेडगेवार आणि अन्य काही विश्वासू कार्यकर्त्यांशी चर्चा, विचारविनिमय करून डॉक्टर हेडगेवार यांनी अशी योजना आखली की, डिस्ट्रिक्ट काउन्सिले आणि म्युनिसिपालिट्या यांनी मध्यप्रांत सरकारकडे या परिपत्रकाचा निषेध पाठवावा. जे यशस्वीपणे व बहुमताने असा निषेध करू शकतील त्यांनीच तो करावा, बाकीच्यांनी त्यात हात घालू नये, अशी सूचनाही त्यांनी केली होती. यामुळे पुढील अधिवेशनात या सरकारी परिपत्रकाचा समाचार घेणे सोयीचे होईल असा त्यांचा कयास होता. या संबंधात अकोल्याचे गोपाळराव चितळे यांना ६ फेब्रुवारी १९३४ रोजी पाठवलेल्या पत्रात डॉक्टर हेडगेवार यांनी लिहिले होते, `संघावर यत्किंचितही दोषारोपण करता येत नाही, अशी सरकारची स्थिती झाली आहे. डिसेंबर १९३२च्या सर्क्युलरमध्ये संघ कम्युनल व राजकीय चळवळीत भाग घेणारा आहे असे विधान सरकारने केले होते. परंतु डिसेंबर १९३३च्या सर्क्युलरात राजकीय चळवळीचे विधान सरकारला मागे घ्यावे लागले व संघ फक्त कम्युनल आहे एवढेच पोरकट विधान त्यांनी केले. दोष तर लावता येत नाही व दृष्टीने तर पाहवत नाही, अशी हितविरोधी लोकांची स्थिती झाली आहे. याच वेळी हा संघ कम्युनल नाही, कोणत्याही कम्युनल चळवळीत या संघाने कधीही भाग घेतला नाही व कोणत्याही परजातीचा वा परधर्मीयांचा द्वेष किंवा तिरस्कार संघ कधीही करत नाही; म्हणून या संघाला कम्युनल म्हणता येत नाही. अशा परिस्थितीत सरकारचे हे नवे सर्क्युलर अनाठायी व अन्याय्य आहे अशा अर्थाचा विरोध; सर्व डिस्ट्रिक्ट काउन्सिले व म्युनिसिपालिटीज यांनी मध्यप्रांत सरकारकडे पाठवणे आवश्यक आहे.

 


RSS_1  H x W: 0

रमेश पतंगे लिखित संघभाव पुस्तक ऑनलाईन नोंदणीसाठी

अशाच आशयाची पत्रे संघसंस्थापकांनी अन्य काही जणांनाही पाठविली होती. त्यानुसार ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. काही डिस्ट्रिक्ट काउन्सिले व म्युनिसिपालिटिज यांनी सरकारच्या सर्क्युलरचा निषेध केलाही आणि तो सरकारकडे पाठवलाही. त्याच्या प्रती डॉ. हेडगेवार यांच्याकडेही पोहोचल्या. त्या वेळी त्यांनी लगेच नागपूरच्या `महाराष्ट्रनियतकालिकात त्याचे वृत्त छापण्याची व्यवस्था केली. स्थानिक वर्तमानपत्रात या बातम्या याव्या अशा सूचनाही दिल्या. या निषेध प्रस्तावांबद्दल समाधान व्यक्त करतानाच, त्यातील भाषा व आशय याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना अकोल्याचे श्री. गोपाळराव चितळे यांना २५ फेब्रुवारी १९३४ रोजी पाठवलेल्या पत्रात डॉक्टर म्हणतात, `केवळ हिंदू समाजाच्या हिताकरिता हिंदू संघटनेची केलेली चळवळ जर परधर्मीयांच्या किंवा परकीयांच्या द्वेषमूलक तत्त्वावर उभारलेली नसेल तर ती कम्युनल होऊ शकत नाही, अशी स्पष्ट व जोरदार भाषा बोलण्याची हीच वेळ आहे, असे मला वाटते. परंतु आपल्याच इच्छेने जग चालत नाही हीही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे.काम करताना एक एक पाऊल पुढे टाकत, बेरजेचा विचार करीत, आक्रस्ताळेपणा न करता, मिळेल ते पदरात टाकून घेत पुढील मार्ग प्रशस्त करीत जाण्याची संघ संस्थापकांची वैशिष्ट्यपूर्ण शैली कशी होती याचा, हे पत्र म्हणजे उत्तम नमुना आहे.


परंतु डॉक्टर हेडगेवार एवढ्यावरच थांबले नाहीत. मध्यप्रांत काउन्सिलमध्ये सर्क्युलरचा हा विषय यावा आणि त्यात सरकारचा पराभव होऊन हे सर्क्युलर रद्द व्हावे
, यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच होते. त्यासाठी सभासदांना भेटणे, त्यांच्याशी चर्चा करणे, संघ, संघाचा विचार त्यांना समजावून देणे आणि सरकारी परिपत्रक कसे अयोग्य व अन्याय्य आहे हे पटवून देणे हे काम डॉक्टरांनी अथकपणे व चिकाटीने केले. परिणामी १९३४ सालच्या मध्यप्रांत सरकारच्या हिवाळी अधिवेशनात या परिपत्रकाच्या मुद्द्यावर मांडण्यात आलेल्या कपात सूचनेवर सरकारचा पराभव झाला. डॉक्टरांनी तेव्हाचे महाराष्ट्र प्रांत संघचालक सांगलीचे काशीनाथराव लिमये यांना याचे विस्तृत वृत्त कळविले होते. १६ मार्च १९३४ रोजी लिहिलेल्या या पत्रात डॉक्टरांनी लिहिले होते,


`गेले १५ दिवस हे नागपूर शहराला हलवून सोडणारे व अत्यंत खळबळीचे असे गेले. लोकांचे तोंडी जिकडेतिकडे संघाचाच विषय दिसत असून सरकारचा कल्पनेच्या बाहेर असा पराभव झाल्यामुळे लोकात एक प्रकारचे चैतन्य व उत्साह दिसून येत आहे. प्रत्यक्ष काउन्सिलमध्ये सरकारी बेंचेस वगळून बाकी सर्व लोकनियुक्त, सरकारनियुक्त, मुसलमान, पारशी व ब्राह्मणेतर अशा सर्व सभासदांनी संघासंबंधी काटावर (कपात सूचनेवर) अनुकूल मते दिली. एवढेच केवळ नव्हे, तर मुसलमान व पारशी सभासदांनी संघाला अनुकूल अशी भाषणेही केली. अशा रितीने मध्यप्रांत कायदे काउन्सिलात संघाने अपूर्व विजय मिळविला आहे. हा संघ कम्युनल नाही व असला तरी तसा कम्युनल असणे दोषार्ह नाही व हिंदूंचा हिंदुस्थान म्हणणे हे सत्यकथनच आहे. म्हणून यात आम्हाला काहीच वावगे दिसत नाही, अशाच अर्थाची सर्व सदस्यांची भाषणे झाली. सरकारतर्फे उत्तर देताना चीफ सेक्रेटरी मि. राऊटन व होम मेंबर श्री. राव यांना संघाविरुद्ध कोणताही पुरावा पुढे आणता आला नाही. हिटलर व नाझी यांच्या ध्येयानुसार संघाचे काम चालले असून या विषयावरील डॉ. हेडगेवार यांच्या भाषणाचा पुरावा माझेपाशी आहे, असे होम मेंबर श्री. राव यांनी विधान सोडून दिले. परंतु डॉ. हेडगेवार यांचे ते भाषण वाचून दाखवा, असा पाठपुरावा सभासदांनी केल्यावर होम मेंबरजवळ तसे भाषण मुळातच नसल्याने त्यांची फजिती मात्र झाली. चीफ सेक्रेटरी मि. राऊटन यांनी डॉ. हेडगेवारांचे भाषण म्हणून ४-५ ओळी वाचून दाखवल्या. परंतु त्यात हिंदूंचे हिंदुस्थान एवढेच विधान होते. यात आक्षेपार्ह काय आहे ते दाखवा, असे विचारताच सरकार पक्षीयांची तोंडे बंद झाली. शेवटी काटावरील चर्चेत सरकारतर्फे उत्तर देताना १९३२ साली काढलेल्या सर्क्युलरचे समर्थनार्थ आक्षेपार्ह म्हणून १९३३ साली संक्रांतीचे उत्सव प्रसंगी माजी होम मेंबर सर मोरोपंत जोशी व डॉ. मुंजे यांच्या भाषणाचे उतारे होम मेंबर श्री. राव यांनी वाचून दाखविले. त्या वेळी, १९३३ सालच्या भाषणाबद्दल १९३२ साली सर्क्युलर काढले की काय; असा प्रश्न विचारण्यात येऊन काउन्सिलमध्ये सर्वत्र हंशा पिकला. कम्युनल शब्दाचा अर्थही अनेक सभासदांनी विचारला असता होम मेम्बरांना सांगता आला नाही. संघाविरुद्ध आक्षेपार्ह असे काहीही सरकारला पुढे आणता न आल्यामुळे या वेळी मध्यप्रांतीय कायदे काउन्सिलात संघाचा पूर्ण विजय होऊन कायदेशीरपणाचा छाप संघावर मारला गेला आहे.


RSS_1  H x W: 0

रमेश पतंगे लिखित संघभाव पुस्तक ऑनलाईन नोंदणीसाठी

याच विषयाच्या अनुषंगाने खामगावचे संघचालक भास्करराव गुप्ते यांना लिहिलेल्या पत्रात डॉक्टरांनी कळविले होते, `मध्यप्रांतीय कायदे काउन्सिलने संघाला पाठिंबा देऊन सरकारचा पूर्णपणे पराभव केल्याचे वृत्त आपण वाचले असेलच. या चर्चेत सरकारजवळ संघाचे विरुद्ध यत्किंचितही पुरावा नसल्याचे आढळून आले व सरकारतर्फे लोकल बॉडीजकरता काढलेले सर्क्युलर हे आज्ञावजा नसून उपदेशवजा आहे व लोकल बॉडीजनी हे सर्क्युलर न मानल्यास आम्ही त्यांची ग्रांट वगैरे मुळीच बंद करू शकत नाही, अशी स्पष्ट कबुली देण्यात आली.


या प्रकरणाची काही ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.

१) समाजाच्या सर्व जातिधर्माच्या सदस्यांनी संघाची भूमिका उचलून धरली. संघ विशिष्ट जातीचा वा समूहाचा आहे, हा आक्षेप या प्रकरणाने खोटा ठरविला.

२) जनसंघ वा भाजपा यांच्या जन्माच्याच नव्हे, तर भारताचे स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येण्याच्याही कितीतरी आधीचे हे प्रकरण आहे. त्यामुळे त्या निमित्ताने घेतलेल्या भूमिका राजकीय नाहीत हे स्पष्ट झाल्याशिवाय राहत नाही.

३) कोणाचा विरोध ही संघाची भूमिका नसून सुदृढ हिंदू समाजाची उभारणी हे संघाचे ध्येय आहे आणि ते सुरुवातीपासूनच आहे, हे स्पष्ट झाले.

संघाच्या सातव्या वर्षी सरकारतर्फे संघावर हा प्रहार करण्यात आला होता. नवव्या वर्षी संघाने तो आघात परतवून लावला. संघाचा हा विजय मात्र डॉ. हेडगेवार यांनी साजरा वगैरे केला नाहीच, उलट तो विषय तेथेच संपवून ते कार्यवाढीच्या मागे लागले. संघ आणि संघविरोधक यांच्यातील परस्पर भिन्न मानसिकतेचे दर्शनच या प्रकरणात होऊन गेले. आज संघावर होणारे आरोप, त्यासाठी वापरण्यात येणारे शब्द, त्यातील फोलपणा, खोटे रेटण्याची निषेधार्ह वृत्ती या सगळ्याचे मूळ कुठे आहे, हे दाखवून देणारा हा इतिहास आहे. ही घातक वृत्ती अजूनही कायम आहे आणि सूक्तासूक्त कसलाही विचार न करता ती कशी डोके वर काढीत असते, हे तर सगळ्यांसमोरच आहे.


श्रीपाद कोठे

नागपूर