@मनोज पटवर्धन
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा । सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा॥
हा सुंदर अभंग प्रसिद्ध आहे. यातील उपदेश आपल्यालाच आहे, असं नक्की समजून, या भ्रामरी ध्यानामध्ये स्वत:ला समर्पित करून स्वर्गसुख अगदी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता येईल. ‘विवेक’ प्रकाशित ‘ध्यान एक आनंदयात्रा’ या मनोज पटवर्धन लिखित पुस्तकाचे 21 जून रोजी जागतिक योग दिनानिमित्त प्रकाशन करण्यात येणार आहे. या पुस्तकातील एक लेख.
भ्रामरी ही प्रक्रिया प्राणायाम म्हणून केली जाते. तसंच ती योगशास्त्रातलीच ‘नादानुसंधानम’ प्रक्रिया म्हणूनही केली जाते. (स्वतःच्या शरीरातून निर्माण होणार्या विशिष्ट नादांवर ध्यान करणं - अनुसंधान राखणं म्हणजे नादानुसंधान.)
‘भ्रामरी’विषयीचे अनेक बारकावे जितके अधिकाधिक सुस्पष्ट होतील, तितका योगसाधकांना या प्रक्रियेचा उपयोग अधिक जाणवेल. भ्रामरी करण्याची पद्धत, त्यातून येणारी अनुभूती यामध्येही बदल झालेला जाणवेल.
भ्रामरी म्हणजे काय?
भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा हा कधीही एका जागी स्थिर राहात नाही. सतत इकडून तिकडे भ्रमण करत असतो. यावरूनच संस्कृत भाषेत त्याला ‘भ्रमर’ म्हणजेच ‘भ्रमण करणारा’ असं नाव पडलं आहे. मात्र यात एक मोठी गंमत आहे. या भुंग्याचा नाद जेव्हा माणूस स्वरयंत्रातून निर्माण करतो, तेव्हा तो अतिशय चंचल असणार्या मनाला एका जागी खिळवून ठेवतो. या नादाच्या, मनाला आकृष्ट करून अंतर्मुख करण्याच्या, स्थिर करण्याच्या वैशिष्ट्यामुळेच ‘भ्रामरी ध्यान’ फार प्रभावी ठरतं.
ओमकार म्हणताना प्रथम आपण आपल्या दोन्ही ओठांत थोडं अंतर ठेवून, ओठ एकमेकांना समांतर ठेवून आधी ‘अ’कार म्हणतो. नंतर ओठांचा गोलाकार चंबू करून ‘उ’कार म्हणतो. आणि मग शेवटी दोन्ही ओठ मिटलेले ठेवून ‘म’कार म्हणतो.
‘अ’कार आणि ‘उ’कार न म्हणता स्वतंत्रपणे फक्त ‘म’कार म्हणणं म्हणजे भ्रामरी.
हठयोगातील हठप्रदीपिका या ग्रंथामध्ये या भ्रामरी प्रक्रियेचं फार सुंदर शब्दात वर्णन केलेलं आहे.
वेगाद् घोषं पूरकं
भृङगनादं भृङगीनादं
रेचकं मन्दमन्दम्।
योगीन्द्राणामेवम् अभ्यास
योगच्चिते जाता
काचिदानन्दलीळा॥
भ्रामरी करताना दीर्घ श्वास घेतल्यानंतर भ्रमरासारखा आवाज करायचा असतो. हा आवाज करत असताना, श्वास त्याबरोबरच हळूहळू सोडला जातो. या आवाजाचे तरंग संपूर्ण शरीरात पसरतात. मन फक्त आवाजावर केंद्रित होतं. डोक्यात कोणताही विचार येत नाही. मन एकाग्र होताना मेंदूला आराम मिळतो. मेंदूतल्या कानाच्या भागात जे पाणी असतं, त्याच्या पातळीमध्ये या आवाजाचे तरंग समतोल राखतात. यामुळे कानाच्या आतल्या भागाचे विकार (कधी या पाण्याच्या कमीअधिक पातळीमुळे चक्कर येण्याचे प्रकार) होऊ शकतात.
भ्रामरी आणि नायट्रिक ऑक्साइडविषयीचं महत्त्वाचं संशोधन
गेल्या दीड वर्षात कोरोनामुळे संपूर्ण जग अतिशय भीषण अशा संकटात सापडलं आहे. यातून बाहेर पडण्यासाठी खूप वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन अनेक देशांमध्ये चालू आहे.
अमेरिका आणि इस्रायल या दोन देशांनी एकत्रितपणे संशोधन करून नायट्रिक ऑक्साइडचा नाकात मारण्याचा फवारा (नेझल स्प्रे) विकसित केला आहे.
नायट्रिक ऑक्साइड हे 99.9% प्रभावी Germ killer असल्याने या स्प्रेमुळे कोरोना विषाणू नष्ट होतो, असं या संशोधकांचं म्हणणं आहे. हा स्प्रे औषध म्हणून वापरला तर साहजिकच त्याचे काही दुष्परिणामही (साइड इफेक्ट्स) असू शकतात. त्यामुळे या औषधापेक्षा फक्त ‘हम्’ असं म्हणून नैसर्गिकरित्या नायट्रिक ऑक्साइड निर्माण करता येईल, असं आणखी एक संशोधन सांगतं. 2020 साली "Journal of respiratory medicine'मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झालं आहे. त्यानुसार नाकात कंपनं निर्माण झाली की ती खूप मोठ्या प्रमाणात नायट्रिक ऑक्साइड निर्माण करतात. यावरून, अमेरिकेतील एका तज्ज्ञ डॉक्टरांनी, ‘से हम् अँड क्रिएट नायट्रिक ऑक्साइड’, म्हणजे, ‘हम् म्हणा आणि नाकात नायट्रिक ऑक्साइड निर्माण करा’ असं घोषवाक्य तयार केलं आहे.
आता हे सगळं आपण योगाच्या द़ृष्टीकोनातून पाहू या. हे ‘हम्’ म्हणणं म्हणजेच ‘म’कार किंवा भ्रामरी. भ्रामरी करताना नाकाच्या पोकळ्यांमध्ये (सायनसेसमध्ये) कंपनं (व्हायब्रेशन्स) निर्माण होतात. ही कंपनं मोठ्या प्रमाणात नायट्रिक ऑक्साइड तयार करतात. हे नायट्रिक ऑक्साइड सर्व प्रकारचे जंतू, विषाणू (व्हायरस) नष्ट करते. यावरून, कोरोना विषाणूच नाही, तर यापुढे निर्माण होणार्या कोणत्याही विषाणूंचा त्रास होऊ नये, म्हणून नियमितपणे भ्रामरी ध्यान करणं अत्यावश्यक झालं आहे.
भ्रामरी आणि एकाग्रता
या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आवाजाची स्पंदनं, तरंग संपूर्ण शरीरात पसरतात. साधकांची एकाग्रता जेवढी जास्त होईल, तेवढं मन संपूर्णपणे त्या आवाजावर केंद्रित होतं. साहजिकच, मेंदूत कोणतेही विचार येत नाहीत. मन एकाग्र होऊन मज्जाकेंद्रात शिथिल, आरामदायक स्थिती निर्माण होते.
या ध्यानात अंतरीचे अनाहत नाद ऐकू येतात. मन अंतर्मुख होतं. नादाशी मन एकरूप झाल्याने समाधीचाही अनुभव मिळू शकतो. या साधनेमुळे मन त्या नादावर एकाग्र होतं, म्हणून मनाची एकाग्रता वाढते. त्यामुळेच मन अंतर्मुख झाल्याचा अनुभव साधकांना येतो. समाधीच्या दिशेने जाणारा हा रस्ता आहे, याचा अनुभव येतो हे निश्चित.
भ्रामरी आणि श्रवणसंस्थेचं आरोग्य
मेंदूतील कानाच्या भागात एक द्रव पदार्थ असतो. काही कारणाने या द्रव पदार्थाच्या पातळीत बिघाड झाल्यास चक्कर येणं, तोल जाणं (Vertigo) असे त्रास होतात. भ्रामरी ध्यान करताना जे विशेष असे नादतरंग निर्माण होतात, ते या द्रवात संक्रमित होऊन या द्रव पदार्थाच्या पातळीत समतोल राखला जातो.
एका सुप्रसिद्ध शल्यचिकित्सकांनी भ्रामरीसंबंधी केलेल्या संशोधनानुसार, या नादामुळे सभोवतालच्या वातावरणातील विषाणू (व्हायरसेस) आणि घातक जंतू नष्ट होतात. त्याचप्रमाणे, या तरंगांमुळे शरीरातील नुकसानकारक जंतूदेखील नष्ट होतात. सध्या कोरोना विषाणूमुळे जगातील प्रत्येक माणसाला भयावह अशा चिंतेने ग्रासलं आहे. प्रत्येक व्यक्तीने या ध्यानाचा अभ्यास दिवसातून किमान दोन-तीन वेळा केल्यास कोरोनाच्या किंवा भविष्यात होऊ शकणार्या इतर विषाणूंच्या आक्रमणाची शक्यता उरणार नाही.
माझ्या योगसाधकांमध्ये अनेक डॉक्टर्स आहेत. भ्रामरी ध्यानाच्या नियमित अभ्यासाचं महत्त्व आणि फायदे या डॉक्टर्सनी स्वत: अनुभवलेले आहेत. भारताबरोबरच इतर अनेक देशांतही यासंबंधी खूप मोठ्या प्रमाणात संशोधन झालेलं आहे.
ताणतणाव कमी होण्यासाठी उपयोग
या नादामध्ये मन तल्लीन झालं की मानसिक आनंद अनुभवायला मिळतो, पर्यायाने मानसिक शांतताही अनुभवायला मिळते. म्हणजेच ताणतणाव कमी होण्याकरिता ही साधना उपयोगी पडते.
विद्यार्थ्यांना होणारे फायदे
या नादातून निर्माण होणार्या ध्वनिलहरींचा परिणाम शरीरातील सर्व पेशींवर होतोच, तसंच विशेषतः मेंदूच्या पेशींवर त्या कंपनांचा परिणाम होतो. त्यातून त्या पेशींची कार्यक्षमताही वाढू शकते. यामुळे एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, निर्णयशक्ती वाढू शकते.
भ्रामरी ध्यानाचे, षण्मुख मुद्रा भ्रामरी, डामर भ्रामरी असे एकाहून एक अनुपम असे ध्यानप्रकार आहेत. यातल्याच काही मोजक्या आणि प्रभावी अशा पद्धती आपण पुढच्या दोन प्रकरणात पाहू या.
ज्ञानेश्वर महाराजांनी मनाला भ्रमराची उपमा देऊन रचलेला
रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा ।
सांडीं तूं अवगुणु रे भ्रमरा॥
हा सुंदर अभंग प्रसिद्ध आहे. यातील उपदेश आपल्यालाच आहे, असं नक्की समजून, या भ्रामरी ध्यानामध्ये स्वत:ला समर्पित करून स्वर्गसुख अगदी ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवता येईल.
अशी स्वर्गीय अनुभूती घेणार्या साधकांना, माउलींनी ‘एक तरी ओवी अनुभवावी’ असं का म्हटलंय हे वेगळं सांगावंच लागत नाही.