मोडनिंबच्या ‘बोरांना’ हवाय राजाश्रय

विवेक मराठी    21-Nov-2022   
Total Views |
थंडीच्या दिवसात सोलापूरहून पुण्या-मुंबईला जाताना हमखास नेण्याचा खाऊ म्हणजे मोडनिंबची (ता. माढा) बोरे. या बोरांचा गोडवा राज्यभर व देशभर लोकांच्या जिभेवर आहे. मोडनिंब परिसरातील आसपासच्या गावांत शेकडो एकरांवर बोरांची शेती आहे. मोडनिंब बाजारात विक्रीसाठी आणलेल्या बोरांना ‘मोडनिंबची बोरे’ म्हटले जाते. बोर उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी सरकारकडून राजाश्रय मिळणे आवश्यक आहे.

krushi
 
लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांनाच कोणते ना कोणते फळ खायला आवडते. थंडीच्या दिवसात एसटी स्टँडवर, रेल्वे स्टेशनवर, बाजारात किंवा कोणत्याही चौकात हमखास दिसणारे फळ म्हणजे बोर. रामायणात बोरांचा संदर्भ आलाच आहे. पूर्वी जनजाती समूहाचे ते पोटभरीचे अन्न समजले जायचे. पौष्टिकतेत बोर सफरचंदापेक्षा श्रेष्ठ मानले जाते. ‘क’ जीवनसत्त्वाच्या बाबतीत आवळा, पेरू यानंतर बोरांचाच क्रम लागतो. त्यात कॅल्शियम, फॉस्फरस आणि लोह हे धातूही अधिक प्रमाणात आढळतात.
 
 
 
 
प्रदेशानुसार बोरांची विविधता आढळते. गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व महाराष्ट्र या राज्यांत बोरांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. ‘उमराण’, ‘बनारसी’, ‘चमेली’, ‘अहमदाबादी’, ‘चेकमेट’, ‘चन्या मन्या’, ‘बकुळा’, ‘अ‍ॅपल’ अशी बोरांची काही वाण प्रसिद्ध आहेत आहेत. आपल्या राज्यात जळगावची ‘मेहरूण’ बोरे, पुण्याची ‘बाणेरी’ बोरे, सोलापूर-मोडनिंबची ‘उमराण’ बोरे, अहमदनगरची ‘बकुळा’ ही बोरे लोकप्रिय आहेत. सोलापूर, अहमदनगर, धुळे, बुलडाणा, सांगली, सातारा व पुणे या जिल्ह्यांतील कोरडवाहू क्षेत्रात हलक्या, मुरमाड जमिनीत मोठ्या प्रमाणात बोरांची शेती पाहायला मिळते.
 
 

krushi
 
बोरीत जून-जुलै महिन्यात फूलधारणा होऊन दिवाळीच्या सुमारास बाजारात बोरांची आवक सुरू होते. डिसेंबर-जानेवारी महिन्यात बोरांचा हंगाम बहरात असतो. यंदा अतिपावसाचा फटका बोरांनाही बसला आहे. त्यामुळे हळूहळू बाजारात बोरांची आवक होऊ लागली आहे.
 
 
बोर शेतीचे असेही एक गाव
 
 
सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना बोरांची शेती वरदान ठरत आहे. या जिल्ह्यातील मोडनिंब पसिरातील अरण, ढेकळेवाडी (बैरागवाडी), सोलंकरवाडी, तुळशी, मोडनिंब, आष्टी, पडसाळी, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, शेटफळ आदी गावांत 600 ते 800 एकरांवर बोरांची शेती केली जाते. एकट्या ढेकळेवाडी (बैरागवाडी) गावात सुमारे 400 एकरांवर बोरांची शेती आहे. बोर उत्पादक शेतकरी व व्यापारी नानासाहेब ढेकळे सांगतात, “ढेकळेवाडीची (बैरागवाडी) लोकसंख्या अडीच हजार आहे. ‘बोर’ हे गावचे मुख्य पीक आहे. त्यामुळे आमचे गाव ‘बोरांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध पावत आहे. 30-35 वर्षांपूर्वी आबासाहेब नरवडे आणि बाळासाहेब ढेकळे यांनी गावात प्रथम बोरांची बाग लावली. कमी पाण्यात व कमी श्रमात त्यांना बोरांपासून समाधानकारक उत्पन्न मिळाले. तेव्हापासून आमच्या गावातील शेतकरी बोर शेतीकडे वळले. दहा वर्षांपूर्वी गावात हजार एकरांवर बोराची बाग होती. बदलते हवामान, भुरी रोग यांमुळे शेतकर्‍यांनी बागा कमी केल्या आहेत. ही बाग आता चारशे एकरांवर आली आहे. सध्या ‘उमराण’, ‘चमेली’, ‘चेकमेट’ या जातींच्या बोरांचे उत्पादन होत असते.
 
 
‘मोडनिंब बोरांना’ संरक्षणाची गरज

सध्या ‘अ‍ॅपल’सारख्या बोरांची नवी जात विकसित झाली आहे. राज्याच्या काही भागात या जातीची लागवड होत आहे. सफरचंदाच्या आकारासारखे हे फळ आहे. त्यामुळे शहरातील स्टॉल विक्रेत्यांकडून, ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. परिणामी, मोडनिंब परिसरातील उमराण, चमेली बोरांना याचा मोठा फटका बसत आहे. स्थानिक बाजारात बोरांना योग्य दर मिळत नसल्याची खंत शेतकरी व्यक्त करत आहेत. असंख्य शेतकरी गेल्या चाळीस वर्षांपासून जोपासत असलेल्या बागा मोडून काढत आहेत. या परिसरातील बोर बागा नष्ट होऊ नये, यासाठी कृषी विभागाकडून व कृषी विद्यापीठाकडून बोर उत्पादक शेतकर्‍यांना संरक्षण मिळणे आवश्यक आहे. कृषी विभागाने अ‍ॅपलसारख्या नवीन सुधारित वाण कलम करण्यासाठी शेतकर्‍यांना अनुदान दिले पाहिजे. तर कृषी विद्यापीठाने सुधारित कलमे शेतकर्‍यांना उपलब्ध करून दिली पाहिजेत, तर काही ठिकाणी कलमे तयार करण्याचे प्रशिक्षण शेतकर्‍यांना देणे गरजेचे आहे.


krushi
- तानाजी इंगळे
कार्यकारिणी सदस्य, सोलापूर जिल्हा पर्यावरण गतिविधी
 
 
बोरांची लागवड साधारणत: मान्सूनच्या प्रारंभी केली जाते. साधरणत: सहा ते आठ अंतरावर प्रत्येक झाडांची रोपे लावली जातात. वर्षभरात फळ काढणीस येते. मार्च महिन्यात बोरांची छाटणी केली जाते. त्यामुळे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये बोरे विक्रीस येतात. चोख व्यवस्थापन व शेणखतांचा योग्य वापर केल्यामुळे गावातील बहुतांश शेतकरी प्रतिझाडापासून दोन ते तीन क्विंटल उत्पन्न घेतात. बोरांना बाजारात सरासरी पाच ते वीस रुपये किलो दर मिळतो. त्यामुळे बोर पिकांतून मिळालेल्या उत्पन्नातून बहुतांश शेतकर्‍यांनी शेतातच टोलेजंग घरे बांधली आहेत.
 
 
 
आष्टी उपसा जलसिंचनाच्या व शेततळ्याच्या माध्यमातून पाण्याचे व्यवस्थापन केले जाते. काही शेतकर्‍यांनी विहीर खोदली आहे, तर काहींनी बोअरवेल घेतली आहे.
 
 
बोरीची लावणी, छाटणी, कलम करणे व काढणी अशा स्वरूपात वर्षभर काम असते. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील तीनशे ते चारशे शेतमजुरांना गावात कायमस्वरूपी रोजगार मिळतोय.
 
 
संपूर्ण गावाचे अर्थकारण बोर पिकाशी निगडित आहे. त्यामुळे गावातून रोजगारांसाठी कोणी स्थलांतर करत नाही.”
 
 
 
मोडनिंब - बोरांची मुख्य बाजारपेठ
 
कुर्डुवाडी (ता. माढा) कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत येणारा मोडनिंब उपबाजार हा उमराण, चमेली बोरांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. या बाजारात हंगामात दररोज सरासरी 10 ते 12 हजार गोणी बोरांची आवक होत असते. या बाजारातूनच दिल्ली, इंदोर, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, नागपूर, जयपूर, कोलकाता, चेन्नई आदी ठिकाणी बोरे पाठविली जातात. या ठिकाणांवरून बोरे खरेदीसाठी व्यापारी मोडनिंब बाजारात येत असतात.
 
 
बोरांचा हंगाम ऑक्टोबर ते जानेवारीदरम्यान असतो. मकर संक्रांतीच्या सणासाठी बोरांना मोठी मागणी असते. त्यानंतर बोरांची आवक कमी व्हायला सुरुवात होते. एकूणच बोरांच्या माध्यमातून मोडनिंब बाजारात दर वर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे बोरांची मुख्य बाजारपेठ म्हणून मोडनिंबची ओळख बनत आहे.
 
 

krushi 
 
 
शेतकरी आहेत समाधानी
 
 
कमी पाण्यात, उत्कृष्ट नियोजनातून असंख्य शेतकरी बोरांचे यशस्वी उत्पादन घेत असल्यामुळे शेतमळ्यावर बहर आला आहे. दुष्काळी भागासाठी हा प्रयोग प्रेरणादायक आहे. शेतकरी कुमार डोंगरे यांनी ढेकळेवाडी शिवारात वीस वर्षांपूर्वी लावलेली बोरांची बाग अत्यंत श्रमपूर्वक जोपासली आहे. याविषयी ते सांगतात, “पूर्वी पाण्याच्या कमतरतेमुळे आमची शेती पडीक असायची. जी कसली जायची तीदेखील पावसावर अवलंबून असायची. वीस वर्षांपूर्वी आम्ही बोर लागवडीकडे वळलो. सध्या आमच्याकडे सहा एकरांत चमेली जातीच्या बोरांची शेती आहे. बोरांची विक्री थेट वाशी (मुंबई) मार्केटमध्ये करत असतो. व्यापारी थेट शेतातून माल नेत असतात. त्यामुळे वेळेची बचत होते. व्यापारी थेट बँकेच्या खात्यावर पैसे जमा करतात. आतापर्यंत बोरीतून समाधानकारक उत्पन्न मिळालेले आहे. गतवर्षी खर्च वजा जाता दहा लाखांचे उत्पन्न मिळाले. यंदा अतिपावसामुळे फळधारणेस विलंब झाला. याचा परिणाम उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.”
 
 
 
संतोष मांढरे सांगतात, “माझी वीस एकर शेती आहे. यापैकी 2 एकरांवर बोरांची (चेकमेट जात) लागवड केली आहे. गतवर्षी एका एकरांतून 400 गोण्या (50 किलो प्रतिगोणी) निघाल्या. पुणे, हैदराबाद, मुंबई बाजारात चांगला दर मिळाला. शेतकरी सध्या विविध अडचणीत सापडला आहे. सरकार इतर पिकांना ज्याप्रमाणे आधारभूत किंमत देते, त्याप्रमाणे बोरांनाही आधारभूत किंमत जाहीर करणे आवश्यक आहे.”
 
 
 
रत्नाकर यशवंत ढेकळे यांची सव्वा एकरांत उमराण जातीची बोरीची शेती आहे. गतवर्षी यांना 2 लाखांचे उत्पन्न मिळाले. तर नानासाहेब ढेकळे यांच्याकडे तीस वर्षांपासून बोरीची बाग आहे. गतवर्षी त्यांना दीड एकरांत 3 लाखांचा नफा मिळाला आहे. बोरीच्या उत्पन्नातून नानासाहेबांनी शेतात बंगला बांधला आहे.
 
 
 
बोरापासून जॅम, कँडी, सुकविलेली बोरे, सरबत, पावडर, बिस्किट इत्यादी प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करता येतात. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढविण्याची व ग्रामीण भागातील महिलांना स्वत:चे उत्पन्न निर्माण करण्याची संधी या परिसरात उपलब्ध झाली आहे. त्यासाठी सरकारकडून प्रोत्साहन मिळणे गरजेचे आहे.
 
 

विकास पांढरे

सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.