@योगेश नं. काटे
आज भक्तिसंप्रदाय उद्धारक वीर वैष्णव तसेच वायुदेवाचे तिसरे अवतार श्री मध्वाचार्य यांचा बद्रीगमन दिन आहे. श्री मध्वनवमी म्हणून संपूर्ण कर्नाटकात, तसेच महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात मोठ्या भक्तिभावाने साजरी करतात. श्रीमदांतीर्थ यांच्या जीवनाचा व तत्त्वज्ञानाचा थोडासा परामर्श घेण्याचा या शब्दवाहीच्या माध्यमातून हा अल्पसा प्रयत्न.

'वेदान्त' हा भारतीय (मुख्यतः हिंदू धर्माचा) तत्त्वज्ञानाचा मुख्य गाभा आहे, असे समजले जाते. मग त्यात पूर्व- व उत्तरमीमांसा, सांख्य, न्याय, वैशेषिक, योग, उपनिषदे, श्रीमद्भगीता यांचा समावेश होते. यात मुख्यतः प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिणार्या स 'आचार्य' वा 'भाष्यकार' म्हणून संबोधले जाते. ब्रह्मसूत्र, उपनिषद व श्रीमद्भगीता यांना प्रस्थानत्रयी असे संबोधले जाते. यावर विविध आचार्यांनी आपले भाष्य लिहिले आहे. त्यात जगद्गुरू श्री आद्यशंकराचार्य, श्री रामानुजाचार्य, श्री मध्वाचार्य, श्री निंबार्काचार्य, श्री वल्लभाचार्य या वंदनीय प्रातःस्मरणीय आचार्यांनी श्रुती-स्मृती- पुराण यांच्या आधारे श्रुतिसंमत भाष्ये लिहिली. श्री आद्यशंकराचार्य यांनी ज्ञानपर, तसेच जीव-ब्रह्म ऐक्य प्रतिपादित केवलाद्वैताची मांडणी केली. बाकी आचार्यवरांनी द्वैतपर मांडणी केली आहे. हिंदू धर्म हा सोळा खांबांवर उभा आहे, ते कोणते? - चार साधनामार्ग, चार आश्रम, चार पुरुषार्थ व चार वर्ण अशा भक्कम खांबांवर उभा आहे. तसेच भारतीय आध्यात्मिक तत्त्वज्ञान हे मुख्यत तीन उज्ज्वल परंपरांवर उभे आहे. त्या तीन परंपरा - ऋषी, आचार्य व संत या परंपरा.. कसे? तर 'ऋषिविचार' व 'आचार्य आचार' हे संतांनी सामान्य भाविकांपर्यंत नेले व रुजवले. महाराष्ट्रात श्री संत ज्ञानेश्वर महाराज, श्री तुकोबाराय व श्री रामदास स्वामी आदी संतपरंपरेने, तर कर्नाटकात हरिदास परंपरेने, उत्तरेत श्री तुलसीदास, श्री कबीर, मीराबाई, सूरदास, दक्षिणेत तिरुवल्लुर व अल्लवार संतांनी भाविकांच्या मनोवृत्तीनुसार व प्रकृतिभेदानुसार ऋषी व आचार्य परंपरा मुरवली आहे. ही वस्तुस्थिती इतकी खरी आहे की कोणीही विवेकी व सश्रद्ध भाविक याच्याशी सहमत होईलच.
भक्ती ही श्रद्धेची श्रेष्ठतम उंची आहे. भक्तीचे मूळ सर्वप्रथम आपणास ऋग्वेदातील वरुणसूक्तात वाचायला मिळेल. वसिष्ठ मुनींनी वरुणास उद्देशून हे सूक्त म्हटलेले आहे. भक्तीला वेदांचा आधार आहे, तसाच ज्ञानमार्गी उपनिषदांचासुद्धा आधार आहे. श्वेताश्वतर उपनिषदात भक्तीचे प्रतिपादित श्लोक आपणास वाचायला मिळतील. तसेच या सर्व पाच आचार्य परंपरेची मुळे आपणास वेद व उपनिषदे यांत घट्ट रुजलेली आढळतात. तर अशा भक्तिसंप्रदाय उद्धारक पूर्णप्रज्ञ श्रीमन्मध्वाचार्य यांच्या कार्याचा व तत्त्वज्ञानाचा परिचयात्मक भाग पाहू या.
उडुपीपासून जवळ असलेल्या पाजक नावाच्या क्षेत्रात शके ११९८मध्ये विजयादशमीच्या दिवशी आचार्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव मध्यगेह व आईचे नाव वेदवती असे होते. आचार्यांचे मूळ नाव वासुदेव. बालपणापासून कुशाग्र बुद्धी असल्याने त्यांचा विद्याभ्यास लवकर पूर्ण झाला. धर्मशास्त्र, श्रुती, उपनिषदे, व्याकरण यांत, तसेच व्युपत्तिशास्त्रातही लहान वयात पारंगतता मिळवली. तसेच आचार्यांनी अद्भुत अशा चमत्काराचा प्रत्यय आणून दाखवला. श्रीअच्युतप्रेक्ष यांच्याकडून संन्यासदीक्षा घेत 'पूर्णप्रज्ञ' हे नाव धारण केले. आचार्यांनी त्यांची तात्त्विक भूमिका निर्धारित करीत पूर्ण भारतभ्रमण केले. विशेषतः उत्तर व दक्षिण भारतात धर्मपरिक्रमा व द्वैतमताचा प्रसार करू लागले. यात मुख्यत्वेकरून इतर मतवाद्यांना वादात हरवत द्वैतमताची स्थापना केली व विशेषतः मायावादाचे खंडन केले. त्यांनी अनेक परमत विद्वानांचा पराभव केला आहे. यात वादसिंह व बुद्धिसागर यांचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथे अद्वैत विद्वानांशी झालेल्या शास्त्रचर्चेत या विद्वान मंडळींचा पराभव केला आहे. या शास्त्रचर्चेत श्रीमध्वाचार्य यांनी विश्व या शब्दाचे १०० अर्थ उलगडून दाखवले. पुढे बद्रीनारायण येथे गीताभाष्य लिहिले. कठोर तपस्या करत श्री वेदव्यास यांना प्रसन्न करून घेत त्यांच्या आदेशानुसार ब्रह्मसूत्रावर भाष्य केले व या भाष्यात आधीच्या सर्व मतांचे खंडन केले. उत्तर भारताच्या यात्रेत मुस्लीम राजाला उर्दूतून संभाषण केल्याचा उल्लेख त्यांच्या चरित्रात वाचण्यात आला आहे. पुढे उडुपीत असताना आचार्य समुद्रस्नानास गेले असता, त्या वेळी एक नाव समुद्राच्या वाळूत फसलेली होती, ती त्यांनी आपल्या अभूतपूर्व अशा सामर्थ्याने बाहेर काढली. त्यात गोपीचंदनाचे तीन खडे मिळाले, त्यात एका खड्यात बालगोपाळाची मूर्ती मिळाली, तिची स्थापना करून त्यांनी उडुपी येथे काही स्तोत्रांची रचना केली, तसेच ब्रह्मसूत्रावर व्याख्याने केली. तीच व्याख्याने 'अनुव्याख्याने' म्हणून प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांनी 'न्यायविवरण' या ग्रंथाची रचना केली. आचार्य यांचे आपल्यावर महत्त असे उपकार आहेत, कारण त्यांनीच भक्तिमार्गाचा उद्धार प्रथमतः केला, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
त्यांनी प्रामुख्याने ३७ ग्रंथ लिहिले आहेत. त्यात ब्रह्मसूत्रभाष्य, अनुव्याख्यान, गीताभाष्य, गीतातात्पर्यनिर्णयं, भागवततात्पर्यनिणर्यं, ऋग्वेदभाष्य, महाभारततात्पर्य निर्णयं, तत्त्वविवेक, उपाधिखंडनं इ. आहेत. सर्व वेदांचे तात्पर्य विष्णू हे सर्वश्रेष्ठ तत्त्व असून तोच परमात्मा आहे. तो जडजगत आणि चेतन जीव यांपेक्षा वेगळा असून सर्वज्ञ, सर्वशक्तिमान, सर्वोत्तम गुणांनी परिपूर्ण आहे. जगत हे सत्य असून भेद तत्त्वसिद्ध आहेत. या तत्त्वाचे पाच प्रकार आहेत - जीवेश्वरभेद, जीवजडभेद, जडजडभेद, जीवजीवभेद व जडजीवेश्वर भेद. जीव परमेश्वराचे सेवक असून त्यांच्यात योग्यतेचे तारतम्य असते. निर्दोष भक्ती हाच मोक्षप्राप्तीचा उपाय असून तिच्यामुळे जिवांचा उद्धार होतो. स्वत:च्या वास्तव स्वरूपाची अनुभूती म्हणजे मोक्ष. मोक्ष, प्रत्यक्ष अनुमान आणि शब्द हे तीन प्रमाण. आचार्य यांनी द्वैतमताच्या प्रचारासाठी आठ मठांची स्थापना केली. यात उत्तरादी मठ हा मुख्य असून तो स्वतंत्र मठ आहे. तसेच धर्मप्रसारासाठी व मतप्रचाराठी तो फिरता आहे. आचार्यांचे प्रमुख चार शिष्य होते. त्यांची नावे पद्मनाभतीर्थ, नरहरीतीर्थ, अक्ष्योभ्यतीर्थ व माधवतीर्थ. यापैकी आचार्यांच्या ग्रंथावर पद्मनाभतीर्थ, नरहरीतीर्थ इ शिष्यांनी टीका लिहिल्या. मात्र आचार्यांच्या सर्व ग्रंथांवर पंढरपूरजवळील मंगळवेढ्याच्या देशपांडे घराण्यातील धोंडो रघुनाथ यांनी टीका लिहिली, म्हणून ते 'टीकाचार्य' असे संबोधले जातात. टीकाचार्य हे नाव वेदान्त क्षेत्रात ध्रुवतार्या सारखे आजही अढळ आहे.
श्रीमध्वाचार्यांच्या 'अनुव्याख्यानम्'वर न्यायसुधा नावाची टीका लिहिली व ही टीका द्वैत वेदान्ताच्या व तसेच वेदान्ताच्या क्षेत्रांत सर्वात महत्त्वाची मानली जाते. याबरोबरच श्री व्यासराय तीर्थ व श्री राघवेंद्र स्वामी यांची टीकाही द्वैत वेदान्तशास्त्रात प्रसिद्ध आहे. श्रीमध्वाचार्य यांनी भक्तीचा व उपासनेचा आग्रहाने पुरस्कार केला असला, तरी त्यांचा प्रतिपादित भक्तिसिद्धान्त डोळस विवेकी असा आहे. एका ठिकाणी टीकाचार्य म्हणतात, माध्वमतानुसार मोक्ष हा ईश्वरप्रसादावर आधारित असला, तरी भगवंत त्याचा आशीर्वाद व प्रसाद त्याच भक्तांवर करतो, ज्याला त्याचे ज्ञान यर्थापणे होते. हे ज्ञान यथार्थपणे होण्यासाठी श्रुतींचे, शास्त्रांचे श्रवण, मनन करणे आवश्यक आहे. श्रीमध्वाचार्य हे प्रभावी तसेच तेजस्वी असे तत्त्वज्ञ होत. त्यांनी भक्तसिद्धांस तार्किक पाठबळसह त्याची सुसंगत अशी मांडणी केली आहे, हे त्यांच्या बिनतोड युक्तिवादाने व धारदार तर्कसंगत अशा मांडणीने दाखवून दिले.
आद्य शंकराचार्य, रामानुजाचार्य, वल्लभाचार्य, निंबार्काचार्य व मध्वाचार्य यांनी वेगवेगळी मत मांडून प्रस्थानत्रयीवर भाष्य लिहिले. कोणी केवलाद्वैत, तर कोणी विशिष्टाद्वैत, तर कोणी प्रस्थानत्रयीचे द्वैत मत तात्पर्य म्हणून मांडले. यात टोकाचे मतभेद आहेत, तरी एका बाबतीत सर्वांचे एकमत आहे, ते म्हणजे ब्रह्म सत्य आहे. तसेच श्रुती, शास्त्र, स्मृती यातील कोणताही भाग प्रक्षेपित मानला नाही. बाकी जग मिथ्यत्व वा सत्यत्व यावर वाद झाले वा होतील वा समोर चालूही राहतील. हेच तर वैशिष्ट्य आहे या भारतीय तत्त्वज्ञानाचे. या सर्व आचार्यांची भूमिका समर्थांच्या भाषेत सांगायची, तर - 'साधू दिसती वेगळाले। परी ते स्वरूपी मिळाले।' या स्वरूपाची आहे. किंवा श्री तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे 'काय सांगू संतांचे उपकार। मज निरंतर जागविती|'
आज अशा भगवद्भक्ताचा बद्रीगमन अथवा समाराधना दिवस आहे, म्हणून ही शब्दवाही सेवा श्री सद्गुरुप्रेरणेने व सर्व आचार्यप्रेरणेने घडली, अशीच घडत राहो ही सद्गगुरुचरणी प्रार्थना करतो.
समारोप करताना मराठी माध्व भाषिकांसाठी मध्वाचार्य यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल तसेच जीवनाबद्दल जिज्ञासू भाविकांना जाणून घ्यायचे असल्यास आधुनिक महिपती संतकवी श्रीदासगणू महाराज विरचित ओवीबद्ध 'सुमध्वविजय' हे मध्वचरित्र, तसेच रा.बा. अवधानी यांनी लिहिलेले गद्यात्म चरित्र 'मध्वाचार्य व तत्त्वज्ञान' हे ग्रंथ वाचावे. तसेच 'देणे प्राणाशाचे' वादिराज लिमये लिखित मध्वचरित्र हा ग्रंथसुद्धा आचार्यांच्या तत्त्वज्ञानाबद्दल एक अनोखा पैलू सांगून जातो.
प.पू. संतकवी श्री दासगणू महाराज शंकराचार्य चरित्रात (ओवीबद्ध) म्हणतात,
या चारी आचार्यांनी। परिस्थितीला पाहुनी।
आपुली मते स्थापुनि। उपासनेसी जीवविले।
एवंच पाचांनीहि केले। वैदिक धर्माचे संरक्षण।
हे पंचमुखी परमेश्वर। वा हे पाच पांडव साचार।
या पाची जणांना नमस्कार। करणे भाग प्रत्येका।
(अध्याय ३७, ओवी १९८ ते २००)
हे सर्व आचार्य म्हणजे वैदिक धर्माचे पंचमुखी परमेश्वर वा पांडव आहेत. प्रत्येक हिंदूने यांना नमस्कार केलाच पाहिजे.
प्रथमो हनुमानच व्दितीयो भीम एवच।
पूर्णप्रज्ञतृतीयस्तु भगवत् कार्य साधकः।।
।।श्रीकृष्णार्पणमस्तु।।
शब्दवाही : योगेश नं. काटे