हवेतील वाढत्या प्रदूषणाचा शाप

06 Apr 2022 16:55:25
डॉ. श्रीकांत कार्लेकर । 9764769791
’आयक्यू एअर’ या स्विस संघटनेने तयार केलेला जागतिक हवामान गुणवत्ता अहवाल 22 मार्च 2022 रोजी प्रकाशित करण्यात आला. या अहवालाअंतर्गत जगातील 6475 शहरांच्या हवा प्रदूषणाचा अभ्यास केला गेला. यातील केवळ 222 शहरे प्रदूषणमुक्त आहेत! या अभ्यासात असे लक्षात आले की जागतिक आरोग्य संघटनेने (WHOने) निश्चित केलेली स्वच्छ हवेची मानके (Standards) पूर्ण करण्यात भारतातील कोणत्याही शहराला यश आलेले नाही.

pollution
 
कोरोना लॉकडाउन काळात जगभरातील हवेत झालेली सुधारणा आता संपुष्टात आली असून हवा प्रदूषणाची पातळी सगळीकडे पुन्हा वाढली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कोविड लॉकडाउनच्या काळात वाहनांची कमी झालेली वाहतूक, बंद असलेले कारखाने आणि माणसाचा नैसर्गिक पर्यावरणात कमी झालेला हस्तक्षेप यामुळे हवेची प्रत जगभरात सुधारली होती. हवेतील तरंगती प्रदूषके, नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड यात मोठ्या प्रमाणावर घट झाली होती. जगभरात कार्बन उत्सर्जनात 25 टक्क्यांनी, तर नायट्रोजन ऑक्साइड उत्सर्जनात 50 टक्क्यांनी घट झाली होती. उत्तर भारतात ही घट देशाच्या इतर भागांपेक्षा जास्त प्रमाणात झाल्याचे निरीक्षणही होते.

या बाबतीत दिल्लीचा पुन्हा प्रथम क्रमांक लागल्याचा जागतिक हवामान गुणवत्ता अहवाल 2021चा निष्कर्ष नुकताच प्रकाशित झाला आहे. या अहवालानुसार जगातील 100 प्रदूषित शहरांपैकी 65 प्रदूषित शहरे भारतातच आहेत! राजस्थानातील भिवंडी आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद ही भारतातील सर्वात जास्त प्रदूषित शहरे असून तिथली 2.5 मायक्रोमीटर आकाराच्या सूक्ष कणांची प्रदूषण पातळी अनुक्रमे 106.2 व 102 आहे. जगातील प्रत्येक देश आणि शहरे यात हे प्रमाण मानकाच्या 97 टक्के इतके आहे.

’आयक्यू एअर’ या स्विस संघटनेने तयार केलेला हा अहवाल 22 मार्च 2022 रोजी प्रकाशित करण्यात आला. या अहवालाअंतर्गत जगातील 6475 शहरांचा हवा प्रदूषणाच्या अभ्यास केला गेला. यातील केवळ 222 शहरे प्रदूषणमुक्त आहेत!


pollution
 
या अभ्यासात असे लक्षात आले की जागतिक आरोग्य संघटनेने (WHOने) निश्चित केलेली स्वच्छ हवेची मानके (Standards) पूर्ण करण्यात भारतातील कोणत्याही शहराला यश आलेले नाही. या संघटनेने प्रतिघनमीटर हवेत 5 मायक्रोग्रॅम इतके मानक नक्की केले आहे, मात्र भारतातील 48 टक्के शहरांत हे प्रमाण 50 मायक्रोग्रॅमपेक्षाही जास्त असल्याचे दिसून आले आहे. कोरोनापूर्व काळात नवी दिल्लीत हे प्रमाण 80 मायक्रोग्रॅम होते, ते आता 96.4 मायक्रोग्रॅम इतके झाले आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगला देशात हवेतील प्रदूषणाचे प्रमाण जागतिक आरोग्य संघटनेने निश्चित केलेल्या मानकापेक्षा दहा पट जास्त आहे. महानगरांच्या हवेत साचणारे धुराचे आणि धुळीचे कण शाप बनून लक्षावधी लोकांसमोर आरोग्याचे मोठे संकट उभे करीत आहेत.
 
स्कँडिनेव्हिअन देश, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जपान व यूके या देशांत हे प्रमाण केवळ एक ते दोन टक्केच जास्त आहे.
दिल्ली हे आज जगभरात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखले गेले आहे. एका अंदाजानुसार दिल्ली शहरात दर वर्षी अकरा हजारपेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. 2013-14पासून वाहनांचे वाढते प्रमाण, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामे आणि आजूबाजूच्या शेतजमिनीत तृण जाळण्याच्या घटना (Stubble burning) यामुळे प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीत 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचे (SPM - Suspended Particulate Matterचे) प्रमाण 1 घनफूट हवेत 153 मायक्रोग्रॅम इतके प्रचंड असते. हे प्रमाण 60 मायक्रोग्रॅम एवढेच अपेक्षित आहे. यामुळे शहरात नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारीत मोठी वाढ तर झाली आहेच, शिवाय तापमानात चढ-उतार होत राहणे, दृश्यमानता (Visibility) कमी होणे, हवाई वाहतूक बंद पडणे आणि प्रदूषित हवेमुळे शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रसंग ह्या घटनांतही वाढ होतेच आहे.
 
 
पूर्व दिल्लीत एक ऑक्टोबर 2019ला 10 मायक्रोमीटरपेक्षा जास्त आकाराच्या कणांची पातळी दर घनमीटरला 200 मायक्रोग्रॅम इतकी, म्हणजे प्रदूषण नियंत्रण खात्याने निश्चित केलेल्या पातळीनुसार ती वाईट होती! वर्ष 2016मध्ये दिल्लीतील 20 टक्के वाहने 2.5 मायक्रोमीटर आकाराच्या प्रदूषकांची पातळी वाढायला जबाबदार असल्याचे दिसून आले होते. वर्ष 2018मध्ये त्यात 40 टक्क्यांनी वाढ झाली होती. वर्ष 2019मध्ये नोव्हेंबर या काळात हे प्रमाण दर घनमीटरला 458 मायक्रोग्रॅम, तर 16 नोव्हेंबरला ते 548 मायक्रोग्रॅम इतके प्रचंड होते. दिल्लीमध्ये हवा प्रदूषणाची ही पातळी इतक्या धोकादायक अवस्थेला पोहोचली आहे की दृश्यमानता कमी झाल्यामुळे होणारे रस्त्यांवरचे अपघात, विमानांची उड्डाणे रद्द होण्याच्या घटना यात दर वर्षी वाढच होत आहे. दिल्ली हे शहर एक मोठे ’गॅस चेंबर’ झाले आहे!
 
3 डिसेंबर 2017 रोजी आंतरराष्ट्रीय संघाच्या खेळाडूंनी मास्क लावून क्रिकेट खेळ खेळण्याचा अभूतपूर्व प्रसंग नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत-श्रीलंका यांच्यातील तिसर्‍या कसोटीत रविवारी घडला होता, ते अनेकांना आठवत असेलच. वर्ष 2019मध्येही बांगला देशाबरोबरच्या खेळाच्या पहिल्याच दिवशी अतिप्रदूषणामुळे अशीच वेळ येऊन ठेपली होती. अशा प्रकारामुळे दिल्लीतील हवेच्या प्रदूषणाबद्दलचा खूपच वाईट आणि वेदनादायक संदेश सगळ्या जगात यापूर्वीच पोहोचला आहे.
 
 
भरपूर झाडांची लागवड, सीएनजीवर धावणारी वाहने, पर्यावरण हितैषी दिल्ली मेट्रोची सुरुवात, सम/विषम तारखेला केवळ तशाच क्रमांकाची वाहने रस्त्यावर आणायची सक्ती असे प्रयत्न होऊनही शहरातील मोटारगाड्यांची वाढती संख्या, वाढती बांधकामे आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडून शहराकडे वाहत येणार्‍या धुराचे वाढते प्रमाण यामुळे हे संकट कमी होण्याची लक्षणे नाहीत.


pollution
 

दिल्लीप्रमाणेच ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा), शांघाय, बीजिंग (चीन), लंडन (यू.के.), ग्लासगो, एडिनबर्ग (स्कॉटलंड), मेक्सिको सिटी, सँटियागो (चिली), तेहरान (इराण), लॉस एंजेलिस (कॅलिफोर्निया), उल्लून बाटर (मंगोलिया), कालीमंतान (आग्नेय आशिया) अशी अनेक जागतिक शहरे आज ह्या विळख्यात सापडली आहेत. भारतातही पाटणा, ग्वाल्हेर, रायपूर, अहमदाबाद, कानपूर, आग्रा अशी अनेक शहरे ह्या समस्येने बाधित आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथेही परिस्थिती जवळपास तशीच आहे. हे चित्र केवळ भारतापुरतेच मर्यादित राहिले नसून जगातील अनेक शहरे या विषारी हवा प्रदूषणाचा सामना करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार शुद्ध हवेचे सगळे मापदंड ओलांडल्यामुळे बर्‍याच शहरातील 80 टक्क्यांपेक्षा जास्त जनसंख्या यामुळे श्वसनविकारांनी बाधित होत चालली आहे.

हवेच्या ह्या प्रदूषणाचा इतिहास पाहता असे लक्षात येते की माणसाने जेव्हा आगीचा शोध लावला आणि लाकूडफाटा जाळण्यासाठी आगीचा उपयोग सुरू केला, तेव्हाच हवेच्या मानवनिर्मित प्रदूषणाला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू अशा जळण्यातून तयार झालेला धूर दाट लोकसंख्येच्या नागरी वस्त्यांवर तरंगताना दिसू लागला. औद्योगिक क्रांतीनंतर तर कोळसाही जाळला जाऊ लागल्यावर प्रदूषणाचे हे संकट आणखीनच गडद होत गेले.


pollution
 
इ.स. 1850च्या दरम्यान लंडन शहरावर कोळशाचा धूर आणि धुके (Pea Soup) याच्या प्रचंड मोठ्या काळ्या दाट थराने शहर काळवंडून जाऊ लागले होते. याने अनेकांचे बळीही घेतले होते. यावरूनच 1911च्या सुमारास या प्रदूषण प्रकाराला ‘स्मॉग (smog)’ म्हणजेच ‘धूरधुके’ किंवा ‘धुरके’ असे नाव दिले गेले. धूरधुके हे एक प्रकारचे दृश्य स्वरूपातले प्रदूषण असून ते नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड आणि धूर ह्यांचे मिश्रण असते. आजकाल वाहनांतून बाहेर पडणार्‍या धुरामुळे ह्या प्रदूषणात मोठीच भर पडत आहे. औद्योगिक शहरातील हवेत कारखान्यातील धुरामुळे जलशोषक अणूंचे प्रमाण जास्त असते. यामुळे सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात काळपट धूरधुक्याची निर्मिती होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरही बाहेर पडणार्‍या सल्फर डायऑक्साइड व इतर सूक्ष्म कणांमुळे असे धूरधुके तयार होते. याला व्हॉग (vog) असे म्हटले जाते.
 
pollution
हे प्रदूषण कमी करण्याच्या अथक प्रयत्नांनंतर लंडन शहर कोळशाचा धूर आणि धुके यापासून मुक्त झाले. पण आधुनिक काळात वाहनातून होणार्‍या धुराच्या उत्सर्जनामुळे प्रदूषणाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. अमेरिकेतील पिट्सबर्ग, पेनसिल्वानिया, सेंट लुई, मिसुरी अशा अनेक शहरांत आज दिवसाही वाहने हेडलाइट लावून चालवावी लागताहेत. 1948मध्ये पेनसिल्वानियातील डोनोरा शहरात आजूबाजूच्या डोंगरांनी बंदिस्त केलेल्या दरीत 5 दिवस साठून राहिलेल्या धुक्यात शहरातील स्टीलचे आणि झिंक वितळवणारे कारखाने आणि सल्फ्युरिक अ‍ॅसिडचे प्लँट यांनी हवेत सोडलेली प्रदूषके मिसळली गेली व हजारो माणसे बाधित झाली. त्यानंतर आलेल्या ‘क्लीन एअर अ‍ॅक्ट’च्या सक्तीमुळे हे प्रमाण सगळीकडेच एकदम कमी झाले.
 
 
हवेच्या प्रदूषणाची पातळी प्रामुख्याने कार्बन डाय ऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डाय ऑक्साइड, सल्फर ट्राय ऑक्साइड, नायट्रिक व नायट्रोजन ऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लुरोकार्बन आणि हवेत तरंगणारे सूक्ष्म घन पदार्थ व द्रवरूपी थेंब यामुळे वाढत असते. कोविड लॉकडाउनच्या काळात या सर्व घटकांचे प्रमाण 50 टक्क्यांनी कमी झाले होते आणि हवा शुद्ध झाली होती.
 
मोठमोठ्या शहरावर आजकाल प्रकाशरासायनिक धूरधुके (Photo chemical smog) व औद्योगिक धूरधुके (Industrial smog) अशा दोन मुख्य प्रकारच्या धूरधुक्याचे प्रचंड थर आढळून येत आहेत. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या प्रदूषकांत सूर्यप्रकाशामुळे होणार्‍या परस्पर क्रिया ज्या धूरधुक्याच्या निर्मितीस कारण होतात, त्यास ‘प्रकाशरासायनिक धूरधुके’ म्हटले जाते. वाहनातून बाहेर पडणार्‍या धुरामुळे पिवळसर तपकिरी रंगाचा नायट्रोजन ऑक्साइड तयार होतो. मोठ्या शहरात सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशानंतर दुपारपासूनच ह्या पिवळसर तपकिरी धूरधुक्याचा थर दिसू लागतो. यामुळे डोळ्यांची आग होऊन ते चुरचुरू लागतात. भरपूर ऊन अनुभवणार्‍या उबदार व कोरड्या हवेच्या नागरी वस्त्यांवर प्रकाशरासायनिक धूरधुक्याचा प्रभाव जास्त असतो.
 
थंडीच्या दिवसात दिल्लीसारख्या औद्योगिक शहरातील लोकांना सल्फर डाय ऑक्साइडमुळे तयार झालेल्या सल्फ्युरिक अ‍ॅसिडच्या तरंगत्या कणांमुळे व उडणारी राख, परागकण, सिमेंटची धूळ, गिरणीतील पीठ पदार्थ, कोळशाची राख व रंगद्रव्ये अशा सूक्ष्म तरंगत्या पदार्थांमुळे (Aerosolsमुळे) तयार झालेल्या धूरधुक्याचा सामना करावा लागतो. चीन, भारत, युक्रेन व काही पूर्व युरोपीय देशांत, जिथे प्रदूषण नियंत्रणाचा फारसा प्रयत्न केला जात नाही, तिथे मोठ्या प्रमाणावर कोळसा ज्वलनामुळे अशा प्रकारच्या धूरधुक्याचे प्रमाण वाढलेले दिसते.
 
2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान आकाराचे, आगीतून आणि डिझेल ज्वलनातून हवेत पसरणारे कण वातावरणात बराच काळ तरंगत राहतात आणि माणसांच्या फुप्फुसांत सहज प्रवेश करतात.
 
 
कोळसा, लाकडे यांच्या ज्वलनातून आणि धुळीची वादळे, जंगलातील आगी याचबरोबर भारतातील डोंगराळ भागांतील सखल दर्‍याखोर्‍यांत अशी प्रदूषित हवा मोठ्या प्रमाणावर साठविली जाते. शेताची भाजावळ (Crop burning), बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी प्रचंड धूळ यांचाही यात हातभार असतोच.
 
 
शहरांबरोबर प्रदूषणाचे हे लोण आता शहरांच्या जवळ असलेल्या खेड्यांच्या दिशेने सरकले आहे. वर्ष 2015मध्येच खेड्यातील 75 टक्के मृत्यू याच कारणांमुळे झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. शेणाच्या गोवर्‍या, लाकूड जाळण्यातून उत्पन्न होणारे प्रदूषित वायू याला कारणीभूत होते, असे ही माहिती सांगते. शेतात केलेल्या भाजावळीमुळे दिल्ली, मुंबई, चेन्नई यासारख्या महानगरांच्या दिशेने जो धूर पसरतो, त्यातून ही प्रदूषके शहरातील बांधकामांची धूळ, वाहनातून बाहेर पडणारा धूर, फॅक्टरी आणि इतर उद्योगांतून सोडला जाणारा धूर यात मिसळून जातो. चुलींच्या वापरातून भारतात 25 टक्के हवा प्रदूषण होते. शहरांजवळच्या वीट भट्ट्याही याला हातभार लावतातच.
 
 
एका सर्वेक्षणानुसार, भारतातील विषारी वायुप्रदूषणाची ही समस्या नक्कीच फार जुनी आहे. आजकाल प्रत्येक शहराभोवती आणि आजूबाजूच्या भागांत हे वायुप्रदूषण मोजण्याचे प्रमाण वाढल्यामुळे ते लक्षात येऊ लागले आहे, इतकेच. प्रदूषण मोजण्याचे हे प्रमाण सगळीकडे जसे जसे वाढेल, तसे भारतातील आणखी अनेक ठिकाणांनी ही पातळी यापूर्वीच गाठली असल्याचेही लक्षात येण्याची शक्यता आहे.
 
 
शहराचा भूगोल, भूरूपिकी (Geomorphology), हवामान, लोकसंख्येची घनता, औद्योगिक संकुलांची संख्या, छोट्या मोटारी व ट्रक यांची संख्या आणि इंधनांचा वापर अशा सगळ्याच गोष्टींवर हवा प्रदूषणाचे प्रमाण ठरते. जिथे पर्जन्यवृष्टी किंवा हिमवृष्टी जास्त असते, अशी शहरे मात्र नैसर्गिकदृष्ट्या या प्रदूषणातून मुक्त असतात. समुद्रकिनारी असलेली शहरेही ह्या बाबतीत थोडी जास्त नशीबवान असतात. कारण जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्‍या हवेतील तरंगती प्रदूषके, समुद्राकडून येणार्‍या खारट समुद्री हवेच्या फवार्‍यामुळे नष्ट केली जातात. किनार्‍यांवर उंच इमारती असल्या, तर मात्र हा परिणाम थोडा कमी दिसतो. जिथे वारे जास्त वेगाने वाहतात, तिथेही हवेतील प्रदूषके इतरत्र वाहून नेली जातात. मात्र ज्या दिशेने ती वाहत जातात, त्या बाजूकडील ठिकाणे प्रदूषणग्रस्त होतात.

 
मोठ्या शहरातील उंच इमारतींमुळे वार्‍याचा वेग रोखला जातो आणि हवेतील प्रदूषके तिथेच घुटमळत राहतात. डोंगराळ प्रदेशातील नागरी वस्त्यांतही सखल भागात प्रदूषके साचून राहतात. ती इतरत्र पसरू शकत नाहीत. तापमानाच्या विपरीततेमुळे (Temperature Inversionपमुळे) धुके व त्याबरोबर प्रदूषकेही दरीत साचतात आणि प्रदूषण पातळीत वाढ होते.
 
 
अनेक पर्यावरणवाद्यांच्या मते नागरीकरण (Urbanization) ही खरे म्हणजे समस्या नसून नागरी वस्त्यांची सर्व दिशांनी होणारी वाढ (Urban Sprawl) ही समस्या आहे! ह्यामुळे आजूबाजूच्या मोठ्या ग्रामीण, प्रदूषणविरहित, स्वच्छ परिसराचा र्‍हास होण्याची शक्यता वाढत असते.
 
दिल्लीसारखी शहरे अधिक शुद्ध, स्वच्छ हवेची, प्रदूषणमुक्त व जगण्यासाठी योग्य बनविणे हे खरे तर ह्या समस्येचे योग्य उत्तर आहे. ह्यासाठी शहरांचे पर्यावरणहितैषी अशा ग्रीन सिटीमध्ये किंवा इको सिटीमध्ये रूपांतर करणेही आता गरजेचे आहे. अशा शहरात प्रदूषणावर पूर्ण नियंत्रण, कचरा निर्मितीत घट आणि सौर शक्ती वापरून त्याचा पुनर्वापर यावर मुख्य भर असावा. शहरातील व आजूबाजूच्या प्रदेशातील जीवविविधतेचे रक्षण करणे व त्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणे या गोष्टींनाही इथे प्राधान्य हवे. ही शहरे लोकाभिमुख हवी, ती वाहनाभिमुख (car oriented) नसावी.
 
 
मुंबई, कोलकाता, चेन्नई ह्यासारख्या किनार्‍याजवळच्या शहरातील खाड्या, नद्या वारंवार स्वच्छ करून, त्यांच्या पर्यावरणाची सुधारणा किंवा पुनर्निर्मिती, तसेच दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा शहरांच्या नदी पर्यावरणात सुधारणा, वृक्षांची भरपूर लागवड, टेकड्यांच्या पर्यावरणाची सुरक्षितता आणि शहराच्या सर्व दिशांनी वाढणार्‍या सीमेवर नियंत्रण असे अनेक उपाय प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भात अभ्यासकांनी मांडले आहेत.
 
ह्याआधीही अनेक ठिकाणी ‘इको सिटी’चे यशस्वी प्रयोग झालेत. ब्राझीलमधील क्युरिटिबा, न्यूझीलंडमधील वैताकेरी, फिनलंडमधील टॅपिओला, ओरेगॉनमधील पोर्टलँड आणि कॅलिफोर्नियातील डेव्हिस अशी अनेक उदाहरणे देता येतील. यातील अनेक इको सिटीजमध्ये प्रदूषण नष्ट करण्यात उत्तम सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा खूप मोठ्ठा हातभार आहे. स्वच्छ, स्वस्त, सोईस्कर, सक्षम व पुरेशी सार्वजनिक वाहतूक यंत्रणा शहराला हवेच्या प्रदूषणापासून किती चांगल्या प्रकारे मुक्त करू शकते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्राझिल ह्या विकसनशील देशातील क्युरिटिबा हे शहर!
 
 
दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा सर्वच शहरातील वाढत्या प्रदूषण समस्येवर अशा तर्‍हेचाच उपाय करणे योग्य ठरेल. शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी जगात इतरत्र झालेले प्रयोग आपल्याकडे जसेच्या तसे लागू करता येतील असे मुळीच नाही. आपल्या शहरांचा भूगोल, इतिहास, वाढ आणि विकास व पर्यावरण हे सगळे इतके वेगळे आहे की त्या प्रत्येकाचा विचार करूनच आपल्याला अल्पकालीन व दीर्घकालीन उपाय शोधावे लागतील. परदेशातून आणून आपल्याकडे चालू केलेल्या अनेक वाहतूक योजनांचा आपल्या शहरातून कसा बोजवारा उडाला आहे, ते आपण पाहतोच आहोत!
आपल्याकडची बरीचशी शहरे मुळातच कुठलेही नगर नियोजन नसताना वाढली. वेड्यावाकड्या पद्धतीने आणि जागा मिळेल तशी आणि तिथे वाढलेल्या शहरांतून मार्ग कडून उपाय शोधण्याची गरज आहे आणि ते शोधायला निश्चितच अजूनही अनेक संधी आहेत. वर्षागणिक वाढणारी वाहनसंख्या आणि पर्यावरणाचा र्‍हास करणारी अनिर्बंध बांधकामे यावर नियंत्रण ठेवले, तरी दिल्ली आणि अर्थातच पुणे, मुंबई यांसारख्या शहरातील समस्या कमी करता येईल. लोकांची मानसिकता बदलणे आणि त्यांचे सहकार्य शहर विकासाच्या व प्रदूषण निर्मूलनाच्या सर्व चांगल्या योजनांना मिळणे हे सगळ्यात महत्त्वाचे. ते झाले, तर भविष्यात आपणही अनेक प्रदूषणविरहित, स्वच्छ, सुंदर ’इको सिटीज’ नक्कीच तयार करू शकू, यात शंका नाही.
हा अहवाल सर्व शहरांसाठी धोक्याची घंटा आहे, हे मात्र निश्चित!
Powered By Sangraha 9.0