हिंसेच्या वाटेवर भरकटलेले जिहादी

विवेक मराठी    21-May-2022   
Total Views |
दहशतवादाचा, जिहादचा पुरस्कार करणारा मुस्लीम समाजातील गट हिंसेच्या वाटेवर भरकटला आहे. समाजातील सर्वच लोक तसे नसतात, फार थोडे अतिरेकी वृत्तीचे असतात. अतिरेक्यांना धर्म नसतो अशा वायफळ गोष्टींना आता थारा न देण्याची वेळ आली आहे. मात्र मुस्लीम समाज सामूहिकरित्या अशा घटनांविरोधात ठामपणे उभा राहिल्याचे दिसत नाही. तसेच मानसिक विकृती वाढण्यास दुसरे कारण प्रामुख्याने मुल्लामौलवी आहेत. दर शुक्रवारी होणार्‍या जुम्म्याचा नमाजाच्या वेळी तेथे येणार्‍या नमाजींना चिथावणी देण्याचे काम ते ठरवून करतात. त्यांच्या बोलण्याने प्रभावित झालेले मुस्लीम युवक भरीस पडून गुन्हे करतात आणि मुल्ला लोक मात्र नामानिराळे राहून मोकाट सुटतात.

jihad
काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात दि. 12 मे रोजी एका शासकीय कार्यालयात 3-4 दहशतवाद्यांनी घुसून राहुल भट या काश्मिरी पंडित तरुणाची सर्वांसमक्ष हत्या केली. काश्मिरी पंडितांनी केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत काश्मीरमध्ये राहायला जाण्याचे धाडस दाखवले. काही दशकांच्या परागंदा स्थितीनंतर ते परत आपल्या काश्मीर खोर्‍यात राहायला गेले. त्या ठिकाणी अशी घटना घडल्यावर पंडित समाजाचा शासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवरील विश्वास उडाला असेल तर त्यात काही गैर नाही. त्यांना कितीही सुरक्षा पुरविली, तरी हिंसेच्या मार्गावर भरकटलेले जिहादी बहुसंख्य असलेल्या समाजात वावरताना कोण हल्ला करेल, केव्हा गोळ्या घालेल याची शाश्वती वाटत नाही.
 
 
गेल्या दोन महिन्यांत घडलेली ही तिसरी घटना आहे. 4 एप्रिलला दहशतवाद्यांनी बालकिशन भट या काश्मिरी पंडित औषध विक्रेत्याला त्याच्या दुकानात घुसून त्याच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर 13 एप्रिलला सतीश कुमार सिंग याची त्याच्या घरासमोर हत्या केली. हे हत्यासत्र गेल्या ऑक्टोबरपासून सुरू आहे.
 
 
अशा घटना घडतात, त्या वेळी तिथे असलेले इतर लोक काही प्रतिकार करण्याच्या मन:स्थितीत येण्यापूर्वीच हल्लेखोर पलायन करतात. त्यांनी लगोलग निसटून जाण्याची व्यवस्था केलेली असते. अशा हल्ल्यांच्या वेळी हल्लेखोरांचा निसटून जाण्याचा मार्ग कसा असेल आणि ते कुठवर जाऊ शकतील याचा अंदाज तेथे तैनात केलेल्या लष्कराच्या तुकड्यांना असतो. अशा हल्लेखोरांना कसे पकडायचे अथवा ठार करायचे याचा एक प्रकारचा सराव आपल्या लष्कराला झालेला आहे. वर्षानुवर्षे या प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करत असल्याने हल्लेखोरांचे पळवाट ठेवण्याचे मानसशास्त्र ते जाणतात. ते अशा हल्लेखोरांना शोधून काढतात आणि यमसदनी धाडतात. राहुल भटच्या मारेकर्‍यांची तीच गत झाली. त्याच्या हत्येत सामील असणार्‍या दोन मारेकर्‍यांना दुसर्‍याच दिवशी 13 तारखेला बांदिपोराला झालेल्या चकमकीत ठार मारण्यात आले, अशी माहिती पोलीस अधीक्षक इफ्तिकार तालिब यांनी दिली.
 
 
काश्मिरी नेत्यांचे नक्राश्रू
  

jihad


राहुल भटची हत्या झाल्यावर या वेळी दोन नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. भट कुटुंबीयांच्या परिस्थितीवर नक्राश्रू गाळताना मेहबूबा म्हणाल्या की, “काश्मीरमध्ये सर्व सुरळीत होण्याच्या मार्गावर आहे, हा केंद्र सरकारचा दावा खोटा आहे.” हे म्हणताना त्यांनी जिहादच्या वाटेवर गेलेल्या मुस्लिमांची ही विकृत मानसिकता आहे, हे बोलून दाखविण्याचे टाळले.
  
दुसरे काश्मिरी मुखंड फारूक अब्दुल्लांनी वेगळेच तारे तोडले. मात्र त्यांनी एक कबुली अजाणता दिली. ते म्हणाले की, आजपर्यंत त्यांनी कोणा काश्मिरी पंडिताला दगडफेक करताना पाहिले नाही. कधी वाटते की इथेच पंडित समाजाचे चुकले. त्यांनी पूर्वीच शस्त्रे घेऊन प्रतिकार केला असता, एकास दोन मारले असते तर हे हत्यांचे सत्र थांबले असते.
  
 

jim


फारूख अब्दुल्लांनी उपराज्यपालांची भेट घेऊन काय मागणी करावी? ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे संपूर्ण देशात मुस्लिमांविरोधात फार मोठ्या प्रमाणावर जनमत दूषित झाले. त्याचा परिणाम म्हणून काश्मिरी युवकांच्या मनात राग असून ते अशी दहशतवादी कृत्ये करण्यास प्रवृत्त होतात, म्हणून त्या चित्रपटाचे प्रदर्शन थांबवावे. जणू काही दहशतवादाच्या मार्गावरून चालणारे काश्मिरी मुस्लीम युवक तो चित्रपट प्रसिद्ध होण्यापूर्वी काश्मिरी पंडितांच्या हत्या करत नव्हते.
अर्थात असा प्रश्न फारूख अब्दुल्लांना पडणार नाही, कारण काश्मिरी पंडितांनी हल्ल्यांच्या भीतीपोटी काश्मीर सोडून जाणे हे त्यांच्या पथ्यावर पडणारे आहे. या सर्व नेते मंडळींनी मोक्याच्या जागांवर अवैध कब्जे केले, राजवाड्यांसारखे बंगले बांधले. नव्या प्रशासनात त्यावर गदा येण्याची परिस्थिती येऊ शकते. त्या जागा कब्जात घेऊन तिथे पंडितांसाठी आणि दशकांपूर्वी पाकिस्तानमधून आलेल्या शरणार्थींसाठी पक्की घरे बांधण्याचा मनोदय केंद्र शासनाने व्यक्त केला होता. बिगरमुस्लीम खोरे सोडून गेले तर घरे कोणासाठी बांधणार? न रहेगा बांस, न बजेगी बाँसुरी. बाकी पक्षांचे आणि सेक्युलर विचारवंतांचे सोडूनच द्या. मुस्लिमांमधील दहशतवादाचा पुरस्कार करणार्‍या जिहादी मानसिकतेच्या विरोधात कोणतेही विधान करण्याचा त्यांनी धसका घेतला आहे.
 
पाकिस्तानातील हत्याकांडे
गेला महिना रमझानचा होता. तो महिना एकजात सर्व पंथांचे मुस्लीम पवित्र समजतात. त्या महिन्यात आचरण चांगले ठेवावे असा बाहेरून उपदेश जरी करत असले, तरी पाकिस्तानात त्या महिन्यादरम्यान विशेषत: शिया पंथीयांच्या मशिदींवर सातत्याने हल्ले झाले. हे हल्ले करणारे आत्मघातकी हल्लेखोर होते, हे विशेष. त्यानंतर लगेचच पेशावरजवळ दोन शिखांची हत्या करण्यात आली.
हे हत्यांचे सत्र केवळ पाकिस्तानपुरते मर्यादित नाही. यापूर्वी युरोपमध्ये आश्रय घेतलेल्या शरणार्थींनी त्याच देशात पै. मोहम्मदांची व्यंगचित्रे छापल्याच्या कारणावरून ती छायाचित्रे प्रसिद्ध करणार्‍या मासिकाच्या कार्यालयावर हल्ला करून 10-12 कर्मचार्‍यांची हत्या केली होती. त्या हत्या केल्यानंतर अशी व्यंगचित्रे छापणे भीतीमुळे बंद पडेल अशी त्यांची समजूत असावी. मात्र घडले उलटेच. एका शहराच्या अनेक मजली इमारतीच्या दर्शनी भिंतीवर जाहिरातींच्या जागेवर ती व्यंगचित्रे सातत्याने अनेक दिवस दाखविली गेली. याआधी केवळ चार्ली हेब्दो मासिकाच्या वाचकांपुरती ती मर्यादित रहिली असती, ती व्यंगचित्रे या घटनेमुळे कितीतरी लाखो लोकांनी उघड्यावर पाहिली. या घटनेनंतर मुस्लीम निर्वासितांच्या विरोधात जनमत जायला युरोपात सुरुवात झाली. हिंसेचा असाही प्रतिकार होऊ शकतो हे मुस्लीम समाजाला उमजले असावे.
 
 
हिंसेच्या वाटेवरचे भरकटणे
 
गेले पूर्ण दशक मध्यपूर्वेतील देशांमध्ये आयसिसने जे हत्याकांड केले, ते हिटलर, स्टालिन आणि माओ या हुकूमशहांनी केलेल्या नृशंस हत्याकांडांपेक्षा भयानक आणि अघोरी होते. एकंदरीत पाहता दहशतवादाचा, जिहादचा पुरस्कार करणारा मुस्लीम समाजातील गट हिंसेच्या वाटेवर भरकटला आहे. समाजातील सर्वच लोक तसे नसतात, फार थोडे अतिरेकी वृत्तीचे असतात. अतिरेक्यांना धर्म नसतो अशा वायफळ गोष्टींना आता थारा न देण्याची वेळ आली आहे. मात्र मुस्लीम समाज सामूहिकरित्या अशा घटनांविरोधात ठामपणे उभा राहिल्याचे दिसत नाही. सामाजिक स्तरावरील हे मानसिक दौर्बल्य (की विकृती?) आहे. ते स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य कोणी दाखवत नाही. मुस्लीम नेते आणि वक्फ बोर्डाचे सदस्यही त्यांच्या समर्थनार्थ उभे राहतात, ही बाब गंभीर आहे.
 
 
आजवर अनेक गोष्टींचा ऊहापोह झाला आहे. हे मानसिक रोगी असलेले युवक अशा हत्याकांडानंतर मारले गेल्यास थेट स्वर्गात जाऊन अनंत काळापर्यंत बहात्तर चिरयौवनी पर्‍यांच्या सहवासात जाण्याच्या लालचीने अशी अघोरी कृत्ये करण्यास प्रवृत्त होतात असे सांगण्यात येते. किंवा ते निराशेच्या भरात अशी हिंसा करायला प्रवृत्त होतात. ती मानसिक विकृती आहे हे मुस्लीम समाज समजून घेण्याच्या मन:स्थितीत नाही. त्या विकृतीची जाणीव त्यांना स्पष्ट शब्दात वारंवार करून दिली पाहिजे.
 
 
ही मानसिक विकृती वाढण्यास कारण प्रामुख्याने मुल्लामौलवी आहेत. दर शुक्रवारी होणार्‍या जुम्म्याचा नमाजाच्या वेळी तेथे येणार्‍या नमाजींना चिथावणी देण्याचे काम ते ठरवून करतात. काफिरांच्या विरोधात गरळ ओकणे, त्यांच्या विरोधात हिंस्र कारवाया करण्यास विशेषत: तरुणांना फूस लावणे या गोष्टी सातत्याने ते करत असतात. असे करणार्‍या मुल्लामौलवींच्या विरोधात कधी एफ.आय.आर. दाखल केल्याचे स्मरणात नाही. खरे तर दर शुक्रवारी खुलेआम चिथावणी देणारी भाषणे ठोकणार्‍या मुल्लामौलवींच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दखल करून त्यांना तुरूंगात टाकण्याची आवश्यकता आहे. त्यांच्या बोलण्याने प्रभावित झालेले मुस्लीम युवक भरीस पडून गुन्हे करतात आणि मुल्ला लोक मात्र नामानिराळे राहून मोकाट सुटतात.
 
 
ठाणे जिल्ह्यातील पालघर नाक्यावर एकदा एका म्हातार्‍या मुस्लीम फळविक्रेत्याशी संवाद साधला. त्याने सांगितले की, “त्याची तीन मुले पूर्वी साधी सरळ होती. नवा मुल्ला उत्तर प्रदेशातून आला. त्याने स्थानिक तरुणांना बहकवले आणि भरकटवले. आता त्याची दोन मुले तुरुंगात खडी फोडत आहेत.” त्यांच्या गरीब बापाला त्यांच्या भविष्याची चिंता होती.
 
 
शुक्रवारच्या जुम्म्यानंतर भडकावणारी भाषणे देण्याचा परिपाठ केवळ भारतातच नव्हे, तर जिथे जिथे मुसलमान जुम्म्याच्या नमाजासाठी जातात, तिथे थोड्याफार प्रमाणात हा प्रकार घडतो. नमाज आटोपून बाहेर पडल्यावर हिंसा करणे हे वारंवार घडत असते. इंग्लंडमध्येे अशी भडकवणारी भाषणे देणार्‍या मुल्लांवर प्रवेशबंदी टाकली आहे. मुल्लांकडून हे आगीत तेल ओतणे थांबवायचे असेल आणि मुस्लीम समाजाला मुल्लांच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करायचे असेल, तर शासनाने दर शुक्रवारी होणार्‍या मुल्लामौलवींच्या आगलाव्या भाषणांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचे धोरण आखावे.
 
 

डॉ. प्रमोद पाठक

अभियांत्रिक म्हणून उच्चविद्याविभूषित असणारे डॉ. प्रमोद पाठक हे 'गोवा एनर्जी डेव्हलपमेण्ट एजन्सी' अर्थात 'गेडा'चे प्रमुख म्हणून काम पाहतात. कामानिमित्त अनेक वर्षे परदेशी राहण्याचा त्यांना वारंवार योग आला. मुस्लीम प्रश् आणि आंतरराष्ट्रीय राजकारण हा त्यांचा खास अभ्यासविषय आहे. या विषयावरील लेखन साप्ताहिक विवेक तसेच अन्य नियतकालिकांतून सातत्याने प्रकाशित होत असते.