अख्खे रोम फिडल वाजवत होते!

विवेक मराठी    26-May-2022
Total Views |


congress
2014पासून आजपर्यंत या ना त्या माध्यमातून सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत आली आहे. जवळपास निम्म्याहून अधिक देशात काँग्रेस पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे आणि काही ठिकाणी तर तो झालाच आहे. काँग्रेसचे अध:पतन हा इथे मुख्य मुद्दा नसून काँग्रेसच्या अध:पतनातून देशाच्या राजकीय भवितव्यावर कोणकोणते परिणाम संभवतात हे पाहणे अधिक आवश्यक ठरते.
2014पासून आजपर्यंत या ना त्या माध्यमातून सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत आली आहे. जवळपास निम्म्याहून अधिक देशात काँग्रेस पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे आणि काही ठिकाणी तर तो झालाच आहे. काँग्रेसचे अध:पतन हा इथे मुख्य मुद्दा नसून काँग्रेसच्या अध:पतनातून देशाच्या राजकीय भवितव्यावर कोणकोणते परिणाम संभवतात हे पाहणे अधिक आवश्यक ठरते.

देशातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा आणि राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसच्या बाबतीत मागील दोन आठवड्यांत काही महत्त्वाच्या घटना घडल्या. राजस्थानमधील उदयपूर येथे काँग्रेसचे चिंतन शिबिर पार पडले. शिवाय खा. राहुल गांधी यांनी लंडनमध्ये जाऊन आपल्या दिव्य ज्ञानाची मुक्ताफळे उधळली. याचबरोबर अनेक ठिकाणी काँग्रेसच्या मोठमोठ्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. पंजाबमधील सुनील जाखड, गुजरातमध्ये पाटीदार आंदोलनातून चमकलेला हार्दिक पटेल आणि मुख्य म्हणजे काँग्रेसच्या राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेले कपिल सिब्बल.. 2014पासून आजपर्यंत या ना त्या माध्यमातून सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत आली आहे. जवळपास निम्म्याहून अधिक देशात काँग्रेस पक्ष हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे आणि काही ठिकाणी तर तो झालाच आहे. काँग्रेसचे अध:पतन हा इथे मुख्य मुद्दा नसून काँग्रेसच्या अध:पतनातून देशाच्या राजकीय भवितव्यावर कोणकोणते परिणाम संभवतात हे पाहणे अधिक आवश्यक ठरते.
 
 
गेल्या सात-आठ वर्षांत स्थानिक स्तरापासून ते राष्ट्रीय स्तरापर्यंत अनेक मोठमोठ्या नेत्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. यात अगदी हिमंता बिस्व सर्मा, ज्योतिरादित्य सिंदिया यांच्यासारख्या युवा नेत्यांपासून कॅ. अमरिंदर सिंग यांच्यासारखे ज्येष्ठे नेते समाविष्ट होतात. ही यादी बरीच मोठी असून कपिल सिब्बल हे यातील ताजे नाव. आज काँग्रेसच्या एका एवढ्या मोठ्या वरिष्ठ नेत्यास पक्षाबाबत व पक्षातील स्वत:च्या करिअरबाबत भरवसा वाटत नाही, यातच सारे काही आले. भाजपाच्या शीर्षस्थ नेत्यांनी अनेकदा ’काँग्रेसमुक्त भारता’चा नारा दिला. आज काँग्रेस स्वत:होऊन हा नारा वास्तवात आणण्यासाठी पुढे सरसावल्याचे चित्र आहे. भाजपा समर्थक मंडळींना याचा आनंद होणे स्वाभाविकच. मात्र त्यापलीकडे भारतीय राजकारणावर काँग्रेस अस्तंगत होण्याचे मोठे परिणाम होऊ घातलेले आहेत. एकतर पुन्हा एकदा भारताची वाटचाल ’एकपक्षीय वर्चस्वा’च्या दिशेने होत आहे. ज्या प्रकारे 1952पासून 1977पर्यंत काँग्रेसने देशाच्या राजकारणावर एकहाती वर्चस्व गाजवले, तशी स्थिती आता पुन्हा उद्भवत असून या वेळी या व्यवस्थेतील ध्रुव भाजपा असणार आहे. भाजपासाठी ही एक मोठी संधी आहे आणि भाजपाचे नेतृत्व आज सक्षम, दूरदर्शी व्यक्तींकडे असल्याने तीही चिंता करण्याचे काही कारण नाही. उलट, ज्या राज्यांमध्ये भाजपाला अजूनही पाय रोवता आलेले नाहीत आणि जिथे काँग्रेसचे बर्‍यापैकी अस्तित्व आहे, तेथे काँग्रेसची जागा भाजपा घेऊ शकतो आणि तेथून नवी सुरुवात करू शकतो. मात्र त्यापलीकडे जाऊन, भाजपासाठी तूर्तास अवघड असलेली राजकीय ’स्पेस’ आम आदमी पक्षासारखे अराजकवादी पक्ष घेऊ पाहण्याचाही धोका आहे. मुस्लीम मतपेटीत एमआयएमसारखी विषवल्ली अलगदपणे शिरकाव करू शकते.
 
 
याचा अर्थ काँग्रेसप्रती सहानुभूती, प्रेम दाखवणे असा अजिबातच होत नाही. काँग्रेस गेल्या सत्तर वर्षांतील आपल्या कर्तृत्वाची फळे भोगते आहे आणि ते आवश्यकही आहे. तूर्तास, भारताच्या राजकीय पटलावर गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून अस्तित्वात असलेली द्वि-ध्रुवीय रचना आज पुरती डळमळीत झालेली असून ती केव्हाही जमीनदोस्त होण्याची शक्यता आहे. याचे कारण क्रमांक दोनचा पक्ष हे काँग्रेसचे गेल्या सात-आठ वर्षांतील स्थानही कायम राहणे अशक्य दिसत आहे. तेव्हा काँग्रेसचे अध:पतन ही भाजपासाठी मोठी संधी आहेच, परंतु काँग्रेसच्या कर्तृत्वाने रिक्त झालेल्या जागेत अराजकवादी, फुटीरतावादी, देशविघातक शक्ती न घुसू देण्याच्या दृष्टीने सावधगिरी बाळगणेही आवश्यक. कारण आता या स्तरावरून पुन्हा काँग्रेसला उभारी मिळण्याची शक्यता धूसर आहे. राहुल गांधी म्हणे आता काश्मीर ते कन्याकुमारी यात्रा करणार आहेत. एरवी थायलंड-इंडोनेशिया वा युरोपच्या यात्रा करणारे राहुल आता आपला देश पाहू इच्छित असतील तर ती चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यातून काँग्रेससाठी काही सकारात्मक घडले तर तो चमत्कार मानावा लागेल.
 
 
राहुल गांधींनी लंडनमध्ये जाऊन ’आयडिया फॉर इंडिया’ नामक कार्यक्रमात भारतीय संघराज्य व्यवस्थेबाबत, ‘भारत हे राष्ट्र नसून राज्यांचा संघ’ असल्याचे केलेले वक्तव्य नक्कीच चीड आणणारे आहे आणि मतदार नेहमीप्रमाणे काँग्रेसला यावर उत्तर देतीलच, परंतु काँग्रेस पक्षातील उरल्यासुरल्या नेते-कार्यकर्ते यांनाही या पोरकटपणातील धोके लक्षात येऊ नये, ही आश्चर्याची बाब.
 
  
’रोम जळत होते, तेव्हा निरो फिडल वाजवत होता’ असा एक वाक्यप्रयोग आपण करतो. मात्र काँग्रेसची अवस्था पाहता पुढील काळात ’रोम जळत होते, तेव्हा अख्खे रोम फिडल वाजवत होते’ असा वाक्यप्रयोग करावा लागल्यास आश्चर्य वाटायला नको.