जागे होण्याची वेळ

26 Jul 2022 15:59:41
एका बाजूला आपण भारतमातेच्या परमवैभवाची स्वप्ने पाहत सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचे, असा प्रयत्न करत आहोत. ‘सबका साथ, सबका विकास’ ही मा. पंतप्रधानांनी केलेली घोषणा प्रत्यक्षात येण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू आहेत. तर दुसर्‍या बाजूला भारताचे इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी योजना तयार केल्या जात आहेत. 2047 साली भारत इस्लामी राष्ट्र होईल यासाठी कोणत्या प्रकारची योजना आखली जात आहे? आपण या बाबतीत गंभीरपणे विचार करणार की आपल्या पायापुरता प्रकाश शोधणार? हा आजचा प्रश्न आहे.
 
pfi
 
 
भारत हा लोकशाही मार्गाने चालणारा देश असल्याने आपल्याला न आवडणार्‍या गोष्टीविषयी विरोध व्यक्त करण्याची आपणास मुभा आहे. मात्र हा विरोध देशाच्या मूळ प्रकृतीवर घाला घालणारा असेल, देशाच्या पंतप्रधानांना लक्ष्य करणारा असेल तर काय करायचे? पाटणा पोलिसांनी नुकत्याच केलेल्या कारवाईमध्ये राष्ट्रविरोधी दहशतवादी गटाची योजना उघड झाली आहे. या योजनेचा मसुदा सात पानांचा असून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. ही योजना काय आहे? हे एका वाक्यात सांगायचे, तर 2047 साली भारत इस्लामी राष्ट्र असेल. म्हणजेच भारतावर इस्लामी विचार सत्ता स्थापन करेल आणि वेगवेगळ्या पातळ्यांवर त्याची पूर्वतयारी चालू आहे. भारत इस्लामी राष्ट्र व्हावे यासाठी योजनाबद्ध प्रयत्न करणारे कोण आहेत? असा प्रश्न आपल्याला पडला असेल. पाटणा पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) व सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) या दोन संघटनाची नावे समोर आली आहेत. पीएफआय या संघटनेचा 2006च्या मुंबई बाँबस्फोटामध्ये व 2008च्या अहमदाबाद बाँबस्फोटामध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे सी.ए.ए.ला विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनांत या दोन्ही संघटनांचा सहभाग आहे. दिल्लीत झालेल्या दंगलीचे नियोजन करणे, त्यासाठी पैसे जमा करणे इत्यादी गोष्टींचा आरोपही पीएफआयवर आहे. वरील घटना आणि त्याचे परिणाम पाहता या संघटना राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी आहेत, हे वेगळे सांगायला नकोच.
 
 
 
भारत इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी योजना तयार करताना काही टप्पे नक्की केले गेले आहेत. आज भारतातील मुस्लीम लोकसंख्या हिंदूंपेक्षा कमी आहे. असे असले, तरी तिच्या वाढीचे प्रमाण हिंदूंपेक्षा जास्त आहे. मुस्लीम समाजात धार्मिक कट्टरता हिंदू समाजापेक्षा जास्त आहे आणि भारतावर अधिराज्य गाजवण्याची, कुराणाच्या आदेशानुसार भारतात इस्लाम धर्माचा प्रभाव निर्माण करण्यासाठी हरएक प्रकारे प्रयत्न करण्याची जिहादी मानसिकता आहे. जिहादी मानसिकता आणि कुराणाचा आदेश मानून बिगरमुस्लीम समूहाला एक तर कुराणाच्या परिघात आणणे किंवा त्याचे अस्तित्व संपवणे हे दोनच मार्ग समोर असल्याने घातपाती कारवाया करून अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न होत असतो. आपल्या देशात आजवर झालेल्या बाँबस्फोटांचा अभ्यास केला, तर यामागे कोणती शक्ती कार्यरत आहे हे आपल्या सहज लक्षात येईल.
 
 
pfi
 
पाटणा पोलिसांनी केलेल्या कारवाईत या राष्ट्रविरोधी कटात
PFDI आणि SDPI यांचे संबंध असल्याचे आढळले
 
 
एका बाजूला केंद्र सरकार मुस्लीम समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणण्यासाठी विविध प्रकारच्या योजना तयार करत असून अज्ञान, मागासलेपण, आरोग्य, रोजगार इत्यादी बाबतीत सढळ निर्णय घेतले जात आहेत. मुस्लीम महिलांना सन्मान मिळावा यासाठी कायदेशीर उपाययोजना करत आहे. मात्र भारतीय होण्याऐवजी ’मुस्लीम’ हीच ओळख अधिकाधिक घट्ट करून समाजाला कट्टरतेच्या गर्तेत ढकलण्याचे काम या संघटना करत आहेत. त्यांचा कुराणावर विश्वास असल्याने भारतीय राज्यघटना त्यांना आपलीशी वाटत नाही. राज्यघटनेने दिलेले हक्क उपभोगायचे, मात्र व्यवहार करण्याची वेळ आली की कुराणाचा आणि हदीसचा हवाला द्यायचा असा दुटप्पीपणा केला जात आहे. संख्याबळाच्या आधारे आपण सत्ताधीश व्हायचे असेल, तर अन्य समाजघटक आपल्या सोबत घ्यावे लागतील याची जाणीव या मंडळींना असून हिंदू समाजातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके-विमुक्त, इतर मागास जाती यांना आपल्या सोबत घ्यावे लागेल याची योजनाही तयार करण्यात आली आहे. हिंदू समाजातील या घटकांना आपल्या सोबत घ्यायचे असेल, तर त्यांना संभ्रमित करावे लागेल. हा संभ्रम निर्माण करण्यासाठी पुढील काळात ’राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे मार्‍याचे ठिकाण असेल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात असलेला हा समाज जर आपल्या गटात आणायचा, तर भ्रम निर्माण करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही हे या लोकांच्या लक्षात आले आहे. संघ सर्व हिंदू समाजाला संघटित करतो आहे आणि हिंदू समाज सशक्त होत आहे, हे राष्ट्रविरोधी लोकांना नको आहे. त्यामुळे हिंदू समाजातील विविध गट वेगळे करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी लव्ह जिहाद, लँड जिहाद, धर्मांतर, आर्थिक आमिषे अशा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले जातात. या प्रयत्नांना आपण कसे तोंड देणार आहोत? आणि हिंदू समाजाचे विघटन कसे रोखणार आहोत? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
 
आपल्या हिंदू समाजाचे वैशिष्ट्य असे की आपण स्वमग्नतेची शिकार झालो आहोत. आपल्या समाजासमोर, राष्ट्रासमोर कोणत्या समस्या आहेत आणि त्याचा आपण कशा प्रकारे विचार केला पाहिजे, या गोष्टीबाबत फार गंभीर नसतो. आपल्या आसपास चालणार्‍या संशयास्पद हालचालींकडे आपण गंभीरपणे पाहतो का? याउलट मोदी कसे चुकीचे काम करतात, एकाधिकारशाही कशी प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहे, या कपोलकल्पित गोष्टींची वायफळ चर्चा करण्यात आपल्या अधिक रस असतो. अशा चर्चेत आपण बडबड करण्यापलीकडे काही योगदान देत नसतो. हा देश सुरक्षित असावा, समर्थ असावा असे आपण म्हणतो आणि ती जबाबदारी सरकारवर ढकलून मोकळे होतो. या स्वमग्न अवस्थेतून आता बाहेर पडले पाहिजे. सजग झाले पाहिजे. जे कारस्थान पाटणा येथे शिजले, ते आपल्या शेजारीही शिजू शकते हे लक्षात घेतले पाहिजे. ही वेळ जागे होण्याची आहे.
Powered By Sangraha 9.0