@अभय पालवणकर
उत्तर प्रदेशात योगी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ‘एक संन्यासी काय करेल? सरकार चालवणे म्हणजे एखादे मठ चालवण्याइतके सोपे नाही’ अशी टीका झाली. पण ज्या पद्धतीने ते उत्तर प्रदेशचा विकास करीत आहेत, त्याला तोड नाही. आता 10-12 फेब्रुवारीला त्यांनी ’ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट’चे आयोजन केले आहे. या समिटसाठी ते मुंबईत आले होते. उत्तर प्रदेशमध्ये उद्योगधंद्यांना अनुकूल वातावरण निर्माण करून ते आपल्या राज्यात आमंत्रण देत आहेत. यामुळे बुलडोझर सरकार, हिंदुत्ववादी सरकार अशी टीका करणार्यांना योगी आदित्यनाथ यांनी काय करू शकतो याचे आपल्या कृतीतून खणखणीत उत्तर दिले आहे.
10-12 फेब्रुवारी 2023 या दिवसांत उत्तर प्रदेशमध्ये ’यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट’ होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दोन दिवसांच्या मुंबई दौर्यावर आले होते. उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 5 लाख कोटी रुपये गुंतवणूक करण्याचे आश्वासन त्यांना मिळाले आहे. आजपर्यंत उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात फक्त लोंढे येत होते. उत्तर प्रदेशमधील गुंडाराज, कमालीची बेरोजगारी, अन्न-वस्त्र-निवारा या मूलभूत गरजा भागवणेसुद्धा कठीण, अशा उत्तर प्रदेशातून मुंबईतच काय, देशातील प्रगत राज्यांत उत्तर प्रदेशमधील लोक स्थलांतर करीत असत. ज्या शहरात काम-धंदा मिळेल तेथे आपले पोट भरीत असत. त्यामुळे तेथील स्थानिक आणि उत्तर प्रदेशी-बिहारी असा संघर्ष अनेक राज्यांत दिसून आला. मुंबईत तर शिवसेनेने यावर राजकारण करून 27 वर्षे पालिकेची सत्ता राखली. आज मराठी-अमराठी मुद्दाच गौण झाला आहे. पण आज उत्तर प्रदेश खरेच बदलत आहे. आजवर देशाला चार पंतप्रधान देणारे व देशातील लोकसभेच्या सर्वाधिक जागा असलेले राज्य विकासापासून वंचित राहिले होते. पण 2014नंतर उत्तर प्रदेशची परिस्थिती बदलत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि उत्तर प्रदेशचे भाग्य बदलले, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पंतप्रधान मोदी यांनी उत्तर प्रदेशासाठी भरीव निधी दिला. त्यानंतर 2017मध्ये उत्तर प्रदेशच्या जनतेने मोदींवर विश्वास ठेवून भाजपाला बहुमताने सत्ता दिली. योगी आदित्यनाथ यांच्या रूपाने उत्तर प्रदेशला चांगला मुख्यमंत्री लाभला. योगींनी सुरुवातीच्या काळात विकासाबरोबरच उत्तर प्रदेशमधील गुंडाराज संपवण्याचे काम केले. मायावती आणि अखिलेश यादव यांच्या काळात राज्याच्या झालेल्या अधोगतीतून उत्तर प्रदेशला बाहेर काढण्यातच योगींची सुरुवातीची पाच वर्षे गेली. कारण पर्यटन असो वा उद्योग, या दोन्ही क्षेत्रांत राज्याला पुढेे घेऊन जायचे असेल, तर सर्वप्रथम राज्यांतर्गत सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी दोन संप्रदायांमध्ये वाद होणार नाही, याची त्यांनी
काळजी घेतली. वाद झालाच तर अगदी वेळप्रसंगी बुलडोझर फिरवायचीही कारवाई केली. पोलीस दल सक्षम केले. आधुनिक टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आज उत्तर प्रदेशातील जिल्ह्यांमध्ये सायबर सुरक्षा पोलीस दल कार्यान्वित केले आहे. त्यामुळे पर्यटक पर्यटनासाठी अगदी आनंदाने येऊ शकत आहेत व उद्योगांसाठीही सुरक्षित वातावरण झाले आहे. 2020मध्ये कोरोनानंतरच्या कालावधीत उत्तर प्रदेशमध्ये जवळपास 9 हजार कोटींची परकीय गुंतवणूक झाली आहे. त्यासाठी ’पब्लिक प्रायव्हेट प्रॉपर्टी’ (पीपीपी) तत्त्वावर बिझनेस पार्क निर्माण केली जात आहेत. त्यासाठी आग्रा, मथुरा, गाझियाबाद, मेरठ, नोयडा, गोरखपूर येथे जागा अधिग्रहित केल्या आहेत. अशी सर्व अनुकूल स्थिती निर्माण केल्यानंतर, आता दुसर्या टर्मच्या वर्षभराच्या कालावधीतच योगींनी ’यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट’चे आयोजन करून उद्योगधंद्यांना आपल्या राज्यात आमंत्रण देत आहेत. यासाठी योगी देशातील मोठ्या उद्योगपतींची भेट घेत आहेत. त्यासाठी त्यांच्या मुंबई दौर्याचे आयोजन केले होते. यामध्ये त्यांनी रिलायन्स समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी, त्याबरोबर टाटा सन्स, अदानी समूह, गोदरेज, बिर्ला, पिरामल, वेदांत, पार्ले, हिंदुजा, लोढा आदी कंपन्यांच्या उच्चाधिकार्यांच्या भेटी घेतल्या. यामुळे उत्तर प्रदेशमध्ये पाच लाख कोटींच्या गुंतवणुकीचे आश्वासन मिळाले आहे. तर दुसरीकडे मंत्रीमंडळातील मंत्री परदेशातील उद्योगपतींची भेट घेत आहेत. यातून खरेच उत्तर प्रदेश राज्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊन रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी होऊ शकते. तसेच देशांतर्गत उद्योग स्पर्धेत आता उत्तर प्रदेशाचेही नाव समोर येईल, असे दिसते.
उत्तर प्रदेशात योगी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर ‘एक संन्यासी काय करेल? सरकार चालवणे म्हणजे एखादा मठ चालवण्याइतके सोपे नाही’ अशी टीका झाली. पण ज्या पद्धतीने ते उत्तर प्रदेशचा विकास करीत आहेत, त्याला तोड नाही. आजपर्यंत उत्तर प्रदेशचा विकास म्हणजे मायावतींचे निवडणूक चिन्ह असले हत्तींचे स्तंभ चौकाचौकात उभे केले जात होते, उद्योगपतींचे विमानाने येणे-जाणे होण्याऐवजी मुंबईतून सँडल हेलिकॉप्टरने उत्तर प्रदेशात जात होते. अखिलेश यादव यांच्या काळात उत्तर प्रदेशच्या पर्यटन जाहिरातीमध्ये आग्र्याच्या ताजमहालाचेच जास्त उदात्तीकरण असायचे. एका भगवाधारी संन्याशाने आज उत्तर प्रदेशची ही ओळख बदलून राज्याच्या विकासाचे मॉडेल तयार केले आहे. अयोध्या कॉरिडॉर, राम मंदिर, वाराणसी, काशी धार्मिक पयर्टन क्षेत्रांबरोबच उत्तर प्रदेशातील छोटी-मोठी पर्यटन स्थळे कात टाकत आहेत. त्याचबरोबर गुन्हेगारी कमी केली, लोकांना रोजगार कसा मिळेल याकडे लक्ष दिले. यावरून लक्षात येईल की, 2021मध्ये उत्तर प्रदेशातील मतदारांनी योगींवर बहुमताने पुन्हा एकदा का विश्वास दाखवला. ते आता यूपी ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट यशस्वी करून दाखवतीलच, त्याचबरोबर ‘उद्योगस्नेही राज्य’ अशीही उत्तर प्रदेशची ओळख निर्माण करण्यात यशस्वी होतील, यात शंका नाही.
योगींवर टीका, ममतादीदींना सहानुभूती
संजय राऊत यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या दौर्यावर टीका करताना त्यांनी महाराष्ट्रातील उद्योग पळवले अशी टीका केली आहे. ममतादीदी जेव्हा महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रात उद्योगपतींच्या भेटी घेण्यासाठी आल्या होत्या, तेव्हा राऊतांनी त्यांचे स्वागत केले होते. पण तेच राऊत आज मुख्यमंत्री योगींवर टीका करत आहेत.