‘अरमानने मला मारले..’

विवेक मराठी    11-Apr-2023
Total Views |
@सागर शिंदे । 8055906039
एका विशिष्ट चश्म्यातून घटनांकडे पाहणे व घटनांना जातीय रंग देणे यात कम्युनिस्ट संघटना आघाडीवर राहिलेल्या आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या दर्शन सोलंकी या विद्यार्थ्याचा जीव जातो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे, मात्र त्याच्या मृत्यूला जातीय रंग देण्याचा प्रकार घडला. आता तपासामध्ये अरमान इकबाल खत्री याचे नाव समोर आले आहे. त्यामुळे या संघटनांची तोंडे बंद झाली आहेत.
 
soanki
 
आयआयटी मुंबईत शिक्षण घेणारा हुशार असा दलित विद्यार्थी 19 वर्षीय दर्शन सोलंकी या बी.टेक.च्या प्रथम वर्षाला असणार्‍या युवकाने फेब्रुवारी महिन्यात आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणात राज्य सरकारने डखढ नियुक्त केलेली आहे. पोलीस तपासात वसतिगृहातील दर्शन सोलंकीच्या खोलीत दर्शनने स्वहस्ताक्षरात लिहिलेली सुसाइड नोट पोलिसांना सापडली, त्या नोटमध्ये अरमान इकबाल खत्रीचा उल्लेख आहे. "Arman has killed me.'(अरमानने मला मारले) असे दर्शनने लिहिले होते. पोलीस तपासात असेही समोर आले की, अरमान व दर्शन यांचा वाद झाला होता, दर्शनने अरमानसंदर्भात धार्मिक टिप्पणी केली होती व अरमान इक्बाल खत्री या विद्यार्थ्याने दर्शनला चाकूचा धाक दाखवत खुनाची धमकी दिली होती. हा नेमका वाद काय होता, याचा सखोल तपास व्हायला पाहिजे व पीडित कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. या प्रकरणात ही नवीन माहिती समोर आल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे.
 
 
soanki
 
दर्शनच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईमधील आंबेडकर फुले पेरियार स्टडी सर्कल (APPSC),, तसेच SFI अशा कम्युनिस्ट संघटनांनी घटनेच्या पहिल्या दिवसापासून आरोप व प्रचार केला की, ही आत्महत्या नसून ‘संस्थात्मक खून’ आहे व ‘जातीय भेदभावामुळे’ ही घटना घडली आहे. याविषयी या संघटनांनी अनेक विद्यापीठांमध्ये आंदोलनेसुद्धा केली. या संघटनांनी आयोजित केलेल्या आयआयटी मुंबईमध्ये झालेल्या सभेत एक युवकाने त्याच्या भाषणात अतिशय द्वेषपूर्ण, तेढ निर्माण करणारे पुढीलप्रमाणे विधान केले होते, “जबतक आप घर जाकर जय सियाराम बोलेंगे आपकी मानसिकता मे पूरी तरह से ब्राह्मण बँधा है, आप उसके चंगुल मे बँधे रहेंगे। आपको मानना पडेगा कि जब तक आप जय श्रीराम बोलेंगे, आपको जय क्षत्रिय जय ब्राह्मण जय वैश्य बोलना पड़ेगा और थू शुद्र कहना पड़ेगा, दलितवर्ग को नीचा दिखाना पड़ेगा।” या विधानाच्या विरोधात आयआयटीमधील एक संशोधक विद्यार्थ्याने पवई पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली आहे. एखाद्या दुर्दैवी घटनेचा कोणताही तपास न करता पहिल्या दिवसापासून त्याला जातीय रंग देणे किती योग्य आहे? दर्शन सोलंकीबरोबर आत्महत्या करण्यापर्यंत जातीय भेदभाव झाला असेल, तर त्याने आयआयटी प्रशासनाकडे त्या संदर्भात तक्रार का नाही केली? किंवा आयआयटीमध्ये कार्यान्वित असलेल्या अनुसूचित जाती - जमाती सेलकडे (SC, ST cellकडे) तक्रार का नाही केली, किंवा कोणत्याही विद्यार्थी संघटनेकडेसुद्धा तक्रार केली नाही, हे साधे प्रश्न या संघटनांना का पडले नसतील? माजी राज्यसभा खासदार व स्वत:ला विचारवंत म्हणवून घेणारे भालचंद्र मुणगेकर यांनी या प्रकरणी वृत्तपत्रात लेख लिहिला, पत्रकार परिषद घेतली व काही मागण्या केल्या होत्या. मुणगेकरांना या घटनेविषयी खोटी माहिती कोणी पुरवली? की त्यांनीच काही हेतूने तथ्यहीन विधाने केली? याचा जाब समाजाने विचारायला हवा. या प्रकरणात ज्या फुटीरतावादी संघटनांनी खोटी माहिती पसरवून समाजात जातीय तेढ व अराजक निर्माण करण्याचा प्रयत्न केला, त्यांचीसुद्धा पोलिसांनी चौकशी करायला हवी. कोणतेही पुरावे हाती नसताना स्वत:चा अजेंडा रेटण्याचा यांचा प्रयत्न होता. या फुटीर लोकांनी दर्शनच्या कुटुंबीयांचीसुद्धा दिशाभूल केली. तथ्य बाहेर आल्यानंतर मात्र हे लोक गप्प आहेत.
 
 
एका विशिष्ट चश्म्यातून घटनांकडे पाहणे व घटनांना जातीय रंग देणे यात कम्युनिस्ट संघटना आघाडीवर राहिलेल्या आहेत. एका सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्याचा जीव जातो ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. किती कष्ट करून हा मुलगा आयआयटीपर्यंत आला असेल, त्याच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. घटनेची खरी कारणे शोधण्याची थोडीसुद्धा तसदी हे लोक का घेत नाहीत? घटनेच्या पहिल्या दिवशीच हेतुपूर्वक आरोप कोणत्या तथ्यांच्या आधारे करतात? किमान तपास होण्यापर्यंतसुद्धा संयम हे लोक बाळगू शकत नाही का?
 
 
soanki
 
आयआयटी मुंबईने या प्रकरणात अंतर्गत सत्यशोधन समिती नियुक्त केली होती. या समितीने 79 व्यक्तींच्या मुलाखती घेतल्या व अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालामध्ये त्यांनी काही निष्कर्ष मांडले. त्यात त्यांनी प्रामुख्याने म्हटले की, ‘जातीय भेदभाव झाल्याचे कोणतेही तथ्य आढळले नाही. तसेच दर्शनची शैक्षणिक प्रगती खालावली होती आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असण्याची शक्यता आहे.’ परंतु या समितीला सुसाइड नोट सापडली नव्हती. पोलिसांच्या विशेष तपास पथकाला तपासात दर्शनच्या खोलीमध्ये सुसाइड नोट सापडल्यामुळे या प्रकरणातील चित्र स्पष्ट झाले आणि त्यामुळे आयआयआयटी मुंबईची सत्यशोधन समिती तथ्यापर्यंत पोहोचू शकली नाही आणि त्याचा आहवाल अर्धवट झाला असे म्हणता येईल. या सर्व प्रकरणात उच्च शिक्षण संस्थांमध्ये जातीय भेदभाव कसा चालतो, या संस्थांमध्ये ग्रामीण भागातून व वंचित घटकांमधून आलेल्या विद्यार्थ्यांना पुरेशा सोयीसुविधा कशा दिल्या जात नाहीत, विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या जाव्यात, रॅगिंगविरोधात यंत्रणा हवी अशा विषयांची चर्चा झाली.आयआयटी मुंबईमध्ये संस्थेने अनुसूचित जाती-जमाती सेल निर्माण केलेला आहे व त्याद्वारे विद्यार्थ्यांसाठी बरेच काम चालते, असे समजले. तरीही सिस्टिममध्ये दोष नक्की आहेत, त्यावर बोललेच पाहिजे, दोष दूर करण्यासाठी पर्याय सुचवला पाहिजे, समस्येवर काम केले पाहिजे. पण फुटीरतावाद्यांना फक्त आरोप करण्याची व सिस्टिम कशी दलितविरोधी आहे हे सिद्ध करण्याची घाई असते. रोहित वेमुला घटनासुद्धा यांनी अशीच मोठी करून वैचारिक अजेंडा राबवला. आता दर्शन सोलंकी घटनेमध्येसुद्धा त्यांचा असाच प्रयत्न होता. पण योग्य पोलीस तपासामुळे या कम्युनिस्ट, विद्रोही, फुटीरतावादी संघटना उघड्या पडल्या आहेत.
 
 
दर्शन सोलंकीला न्याय मिळालाच पाहिजे. उच्च शिक्षण संस्थांमध्ये अनेक कारणांनी विद्यार्थी आत्महत्या करतात. या सर्व कारणांचा शोध घेऊन या संस्थांमध्ये कोणत्याही कारणांनी अशा दुर्दैवी घटना घडू नयेत, यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत.