छत्रपती संभाजीनगर दंगल धर्मांधतेचे भयाण वास्तव

विवेक मराठी    07-Apr-2023
Total Views |
@सागर शिंदे। 8055906039
रामनवमीच्या पूर्वसंध्येला छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागातील श्रीराम मंदिरावर हल्ला आणि दंगल झाली. झालेली जाळपोळ बघता दंगलीचे स्वरूप भीषण असेच होते. पोलिसांच्या सजगतेमुळे दंगेखोर मंदिरात जाऊ शकले नाहीत, नाहीतर अनर्थ झाला असता, राज्यातच नव्हे, तर देशभरात त्याचे पडसाद उमटले असते. एकूण घटनेचा आढावा या लेखात घेतला आहे.
Chhatrapati Sambhajinagar riots
 
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात रामनवमीच्या पूर्वसंध्येला दिनांक 29 मार्च 2023 रोजी रात्री सुमारे 12 ते पहाटे 3पर्यंत भीषण दंगल झाली. मोठ्या प्रमाणात दगडफेक व जाळपोळ झाली. या भागात असलेल्या श्रीराम मंदिरावर हल्ला केला गेला. रामनवमी महोत्सवानिमित्त मंदिराच्या बाहेर उभारलेली कमान दंगेखोरांनी जाळली. पोलिसांच्या 14 व अन्य 3 अशा एकूण 17 गाड्या जाळल्या. तुफान दगडफेक, पेट्रोल बाँब फेकले. यात 20 पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंदाजे अडीच कोटीच्या मालमत्तेचे नुकसान केले गेले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये गोळी लागून जखमी झालेल्या शेख मुनिरोद्दिन शेख मोइनुद्दिन या एक व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दुसर्‍या दिवशी पोलिसांनी 6 व इतर 400-500 जणांवर गुन्हा दाखल केला, ज्यात मृत शेख मुनोरुद्दिनचे नाव आहे. 4 एप्रिलपर्यंत पोलिसांनी एकूण 46 आरोपींना अटक केली आहे. शहर पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी घटनेच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती केली आहे. या तपास पथकात शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. झालेली जाळपोळ बघता दंगलीचे स्वरूप भीषण असेच होते. पोलिसांना त्यांच्या गाड्या सोडून पळून जावे लागले, अनेक पोलीस जखमी झाले, मंदिरावर हल्ला झाला; परंतु पोलिसांच्या सजगतेमुळे दंगेखोर मंदिरात जाऊ शकले नाहीत, नाहीतर अनर्थ झाला असता, राज्यातच नव्हे, तर देशभरात त्याचे पडसाद उमटले असते. एकूण घटनेचा आढावा या लेखात घेतला आहे.
 
 
शहरातील तणावग्रस्त वातावरणाची पार्श्वभूमी
 
 
छत्रपती संभाजीनगर शहर तसे विविध चळवळींचे केंद्र आहे. राज्यातील मोठे आणि मराठवाड्याच्या राजधानीचे शहर आहे. शहराला व जिल्ह्याला अगोदर धर्मांध, अत्याचारी मोगल शासक औरंगजेबच्या नावावरून औरंगाबाद हे नाव होते. औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर व्हावे, ही येथील जनतेची 35 वर्षे जुनी मागणी होती. नामांतरासाठी जनतेने तसेच मनपाने व शासनाने अनेक प्रयत्न केले होते. राज्य सरकारने औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याचा मंत्रीमंडळात निर्णय घेतला. त्याला केंद्र सरकारने सहमती दिली व दि. 24 फेब्रुवारी 2023 रोजी राज्य शासनाद्वारे नावबदलाची अधिसूचना प्रसिद्ध झाली. या नामांतरानंतर अनेक शासकीय कार्यालयांवरील जुन्या पाट्या बदलास सुरुवात झाली. मात्र स्थानिक खासदार इम्तियाज जलील यांनी या नामांतराच्या विरोधात भूमिका घेतली व औरंगजेबाच्या मृत्युदिनी दि. 3 मार्च रोजी आंदोलन करण्याचे जाहीर केले व दि. 4 मार्च 2023पासून आंदोलन सुरू केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 14 दिवस धरणे आंदोलन केले, तसेच एक दिवस मोर्चा काढला, यामुळे शहरातील व जिल्ह्यातील वातावरण बिघडण्यास सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर नावाच्या समर्थनात असणार्‍या नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. सोशल मीडियामध्ये त्याचे पडसाद उमटू लागले होते. दि. 19 मार्च 2023 रोजी छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनात शहरात सकल हिंदू समाजाच्या वतीने शहरातील अनेक पक्षांनी, संघटनांनी, मंडळांनी व नागरिकांनी एकत्र येत मोठ्या संख्येत हिंदू जन गर्जना मोर्चा काढला व मोर्चाचा समारोप जाहीर सभेत झाला. त्यावरही राजकीय टीकाटिपण्णी केली गेली.
 
 
छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या विरोधात व समर्थनात अर्ज मोहीम -
 
 
नामांतरच्या शासकीय अधिसूचनेमध्ये नागरिकांनी दि. 27 मार्चपर्यंत नामांतरासंदर्भात हरकती व सूचना नोंदवाव्या, असे म्हटले होते. अनेक मुस्लीम पक्षांनी व संघटनांनी हरकती नोंदवण्यास सुरुवात केली. नामांतराच्या विरोधात हजारो अर्ज दाखल झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. नामांतराच्या समर्थनात हिंदुत्ववादी पक्ष-संघटनांनी सूचना अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. शेवटच्या दिवसापर्यंत नामांतराच्या समर्थनात 4 लाख तीन हजार, तर विरोधात 2 लाख 73 हजार अर्ज दाखल झाले. म्हणजे औरंगाबादच्या समर्थनात व छत्रपती संभाजीनगरच्या विरोधात पावणेतीन लाख लोकांनी (मुस्लिमांनी) अर्ज दाखल केले. तसेच सोशल मीडियावरसुद्धा याचे वातावरण होते. अनेक मुस्लीम लोक औरंगजेबाचे समर्थन करत होते. ज्या भागात दंगल झाली तेथे राम मंदिराच्या अगदी समोर इब्राहिम पटेल या नेत्याच्या ऑफिसवर औरंगाबाद बचाव संघर्ष समितीचा बॅनर आजही लावलेला आहे. सर्व घडामोडींच्या कारणाने शहरातील वातावरण तणावग्रस्त झाले होते.
 

Chhatrapati Sambhajinagar riots 
दंगलीची पार्श्वभूमी उपरोक्त बॅनरवरून स्पष्ट 
 
 
 
प्रत्यक्ष दंगलीचे घटनास्थळ
किराडपुरा भागातील श्रीराम मंदिर
 
शहरातील हा किराडपुरा भाग 100 टक्के मुस्लीमबहुल परिसर आहे. कधीकाळी या भागात हिंदू बहुसंख्य होते, परंतु हळूहळू मुस्लिमांची संख्या वाढत गेली. येथील श्रीराम मंदिर 350 वर्षे जुने आहे. औरंगजेबाचा सरदार जसवंत सिंग यांनी हे मंदिर बांधले. किराडपुराच्या शेजारी आजही जसवंतपुरा भाग आहे. या ठिकाणी दर वर्षी रामनवमी उत्सव होतो. काही दशकांपूर्वी तेथील हिंदूंनी पुढाकार घेऊन ट्रस्ट स्थापन केला, मंदिराचा जीर्णोद्धार केला व मोठे मंदिर केले, रस्त्याच्या बाजूने गाळे काढून मंदिराला आर्थिक उत्पन्न सुरू केले. 1988मध्ये शहरात भीषण दंगल झाली. या दंगलीनंतर हिंदूंना येथून हुसकून लावण्यास सुरुवात झाली. आज परिसरात राम मंदिर आहे, पण वस्ती मात्र मुस्लिमांची आहे.
 
 
Chhatrapati Sambhajinagar riots
 
दंगलीचा घटनाक्रम
 
 
रामनवमीच्या पूर्वसंध्येला दि. 29 मार्च 2023 रोजी शहरातील किराडपुरा भागात असलेल्या राम मंदिर परिसरात रात्री दंगल झाली. पोलिसांनी व पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार त्या रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास गाडीचा धक्का लागला, म्हणून दोन गटांत किरकोळ वाद झाला. पण पोलिसांनी वाद मिटवला होता. तरुणांना घरी काढून दिले. परंतु रात्री 1 वाजता नंतर पुन्हा मोठ्या संख्येत टोळके आले व त्यांनी पोलिसांवर आणि मंदिरावर दगडफेक सुरू केली. नंतर जमाव वाढत गेला. पोलिसांच्या काही गाड्या आल्या, परंतु तरीही पोलिसांची संख्या कमीच होती. दगडफेक करणारा जमाव मुस्लीम असल्याने पोलिसांनी मुस्लीम मौलानांना व मुस्लीम नेत्यांना जमावाला शांत करण्यासाठी बोलावले. एक मौलाना अन्वर अली इशाती यांना तर पोलिसांनी पोलिसांच्या गाडीच्या बोनेटवर उभे केले व मौलाना माइकद्वारे मुस्लीम जमावाला शांत राहण्याचे आवाहन करत होते. परंतु जमाव आक्रमक होता. त्यात मौलानालासुद्धा दगड लागल्याने ते जखमी झाले. तसेच एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील हेसुद्धा त्या ठिकाणी आले व त्यांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण जमाव त्यांच्यावर धावून गेला. त्यामुळे दगड लागू नये, म्हणून खासदार जलील मंदिराच्या छोट्या गेटने मंदिरात गेले. जलील यांनी मंदिरातून काही व्हिडिओ करत मंदिरात काही झाले नसल्याचे सांगितले. मात्र त्याच वेळी मंदिराबाहेर दगडफेक सुरू होती. नंतर साधारण दोन वाजता दंगेखोरांनी पोलिसांच्या गाड्या जाळण्यास सुरुवात केली. तसेच श्रीराम मंदिरासमोर रामनवमी उत्सवानिमित्त उभारलेल्या स्वागत कमानीचे कापड फाडले व कमान जाळली. दंगलीचे अनेक व्हिडिओ व सीसीटीव्ही फूटेज उपलब्ध आहे, त्या व्हिडिओंमध्ये लोक जाळपोळ करताना दिसत आहे. अनेकांच्या डोक्यांवर धार्मिक टोप्या आहेत, पण अनेकांनी तोंडाला रुमाल लावलेले होते. दंगेखोरांनी मंदिराच्या दिशेने पेट्रोल बाँबसुद्धा फेकले. अनेकांच्या हातात लाठ्या, काठ्या, लोखंडी सळया होत्या व पोलिसांच्या गाड्या फोडताना दिसत आहेत. गाड्या जाळण्यासाठी ज्वलनशील द्रव्याचा वापर केला. लोखंडी सळ्यांना बोळे बांधून गाड्या जाळण्यासाठी वापरताना दिसत आहेत. मंदिराचे मुख्य लोखंडी गेट पोलिसांनी बंद केले होते. दंगेखोर गेट तोडून आत घुसण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा पोलिसांनी हवेत गोळीबार केला. पोलीस निरीक्षक गीता बागवडे व पोलीस निरीक्षक अशोक भंडारे त्या ठिकाणी होते. पोलिसांनी एफआयआरमध्ये दिलेल्या माहितीनुसार जमाव घोषणा देत होता की
 
इनको निकालो, जलाकर मार डालो, आज किसीको जिंदा नाही छोडेंगे।
 
नारे तकबीर अल्लाहो अकबर।
 
 
मंदिराच्या व मंदिरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलिसांनी अनेक वेळा हवेत गोळीबार केला आणि याचमुळे दंगेखोर मंदिरात घुसू शकले नाही. दंगेखोर मंदिरात घुसले असते आणि काही अनुचित घडले असते, तर देशभरात त्याचे तीव्र पडसाद उमटले असते. सुमारे तीनच्या सुमारास पोलीस आयुक्त व मोठ्या संख्येत फौजफाटा घेऊन आझाद चौकातून आत घुसले. दंगेखोरांनी पथदिवे फोडले असल्याने अंधार होता. पोलिसांवर दगडफेक झाली. पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. बळाचा वापर करत जमावाला मागे हाकलत पोलीस साधारण साडेतीन वाजता मंदिरापर्यंत पोहोचले व दंगलीवर नियंत्रण मिळवण्यात पोलिसांना यश आले.
 
 
दंगलीनंतर
 
पहाटे दंगल आटोक्यात आल्यानंतर प्रशासनाच्या मदतीने पोलिसांनी जळलेली वाहने तेथून उचलली, मंदिर परिसरात व रस्त्यावर पडलेला दगडांचा खच हटवण्यास सुरुवात केली व सकाळपर्यंत परिसर स्वच्छ केला. पहाटेपासूनच मंत्री, नेते मंडळी श्रीराम मंदिरास भेट देण्यास आले. सकाळपासून रामनवमीनिमित्त येणारे भाविक मंदिरात दर्शनासाठी येऊ लागले. पोलिसांनी बंदोबस्त वाढवला. सकाळी 11:30 वाजता मोठ्या संख्येत व सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत श्रीराम आरती झाली. शहरात रामनवमीच्या मिरवणुका उत्साहात पार पडल्या. दंगलीच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले. काही राजकीय नेत्यांनी आरोप-प्रत्यारोप केले.खासदाराच्या उपस्थितीत दंगल झालीच कशी? असा प्रश्न मंत्री अतुल सावे यांनी उपस्थित केला. भाजपा, शिवसेना (शिंदे गट)च्या स्थानिक नेत्यांनी शांततेसह कठोर कारवाईची मागणी केली.
 
 
पीएफआय व इतर इस्लामी संघटनांचा संबंध
 
बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या कट्टरतावादी संघटनेच्या समर्थक तरुणांचा दंगलीमध्ये सहभाग असल्याचा तपास यंत्रणांना दाट संशय आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत आहेत. सप्टेंबर 2022मध्ये शासनाने पीएफआयवर बंदी घातली, तेव्हा शहरात संघटनेच्या 21 पदाधिकार्‍यांना अटका झाल्या होत्या. दहशतवादविरोधी पथकाने (ATSने) तेव्हा इशारा दिला होता की पीएफआय संघटनेचे लोक पुढील काळात पोलिसांना लक्ष्य करतील. या दंगलीत पोलिसांवर जोरदार हल्ला झाला, पोलीस गाड्या जाळल्या व अनेक पोलीस जखमी झाले. पीएफआयसारख्या कट्टर धार्मिक संघटनेने शहरात अनेक तरुणांच्या डोक्यात कट्टरतेचे विष पेरले होते, चिथावणीखोर साहित्य प्रसारित केले होते. यामुळेच या दंगलीत एक विशिष्ट धर्माच्या (मुस्लीम) कट्टरतावादी जमावाने एकतर्फी हल्ला केला. या हल्ल्यात सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI), जमियत उलेमा ए हिंद व अन्य इस्लामी संघटनांचा सहभाग आहे का, याचाही तपास होण्याची आवश्यकता आहे. पोलिसांनी अटकसत्र सुरू केल्यानंतर आरोपींना न्यायालयीन मदत करण्यासाठी अनेक मुस्लीम संघटना पुढे आलेल्या आहेत.
 
 
शहराच्या हद्दीत ओव्हर गावातही दगडफेक - छत्रपती संभाजीनगर शहराच्या हद्दीत असलेल्या ओव्हर गावात रामनवमीच्या सायंकाळी मिरवणुकीत वाद झाला, रामनवमीचे बॅनर फाडले गेले व दुसर्‍या दिवशी गावात जोरदार दगडफेक झाली. त्यात अनेक हिंदू तरुण जखमी झाले. पोलिसांनी दोन्ही गटांतील तरुणांवर गुन्हे दाखल केले.
 
 
समारोप
 
दंगल हा प्रकारच भयानक असतो. दंगलीतील जमाव आक्रमकतेने जाळपोळ, हिंसाचार करत सुटतो. यामध्ये पोलिसांच्या जिवालासुद्धा धोका निर्माण होतो. दंगल अनियंत्रित झाली आणि शहरात व इतर भागांत तिचे लोण पोहोचले, तर किती भयाण परिस्थिती निर्माण होऊ शकते याचा विचार केला पाहिजे. एका किरकोळ घटनेने एवढी मोठी एकतर्फी दंगल होणे हे अनाकलनीय आहे. दंगलीत पेट्रोल बाँब वापरले गेले. तोंडाला रुमाल व जॅकेट घातलेले तरुण तयारीनिशी कसे आले? पोलिसांच्या गाड्यांशिवाय दंगेखोरांनी एकही स्थानिक गाडी जाळली नाही किंवा परिसरातील एकाही घरावर, दुकानावर दगडफेक का झाली नाही? पोलिसांच्या मोठ्या गाड्या सामान्य तरुण कसा जाळू शकेल? हिंदूंचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिरावर रामनवमीच्या सणाच्या दिवशीच हल्ला करण्याचे नेमके काय कारण? देशात अनेक ठिकाणी रामनवमीच्या दिवशीच हिंसक घटना घडल्या आहेत, यात काही दुवा आहे काय? हल्ल्याचा उद्देश नेमका काय होता? या काही गोष्टी लक्षात घेता दंगल पूर्वनियोजित होती असे दिसते. काही कट्टरतावादी गटांनी, संघटनांनी ठरवून श्रीराम मंदिराला व सुरक्षा यंत्रणांना लक्ष्य केले का?
 
 
याचा सखोल तपास होणे आवश्यक आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगर नामांतरविरोधी आंदोलन करून शहराचे वातावरण बिघडवले, मुस्लिमांमध्ये असंतोष निर्माण केला व इस्लामी कट्टरतावादी संघटनांनी याचाच फायदा घेतला असावा. शासनाने या घटनेची गंभीर दखल घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे पोलिसांनी अतिशय सखोल तपास करावा व शेकडो दंगेखोरांची ओळख पटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी व वचक बसवावा. दंग्यांमध्ये झालेले नुकसान गुन्हेगारांकडून वसूल करावे. या अशा भीषण घटनांमधून समाजाने योग्य धडा घ्यावा, जागरूक राहावे व गल्ली, कॉलनी, गाव, वस्तीत आपले मजबूत संघटन निर्माण करावे. भविष्यात भीषण परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था, संविधानाच्या रक्षणासाठी कट्टरतावाद्यांच्या विरोधात उभे राहावे लागेल.