पुरुषांची मक्तेदारी असलेलं फोटोग्राफीचे क्षेत्र आणि ज्या काळात कुणाचे फोटो काढून घेणंसुद्धा सामान्य स्त्रीच्याकल्पनेपलीकडचं होतं, त्या काळात बिनदिक्कतपणे ब्रिटिश अधिकार्यांचे तसेच गांधी-नेहरुंचे फोटो टिपणार्या होमाई व्यारावाला म्हणजे लोकांसाठी एक अप्रूपच होतं. 98 वर्षांचं आयुष्य त्यांनी समृद्धरीत्या जगलं. आयुष्याच्या उत्तरार्धात पद्मविभूषणसारख्या अत्यंत प्रतिष्ठित सन्मानासह अनेक गौरव त्यांच्या वाट्याला आले.
भारतात अनेक विलक्षण स्त्रियांनी आपल्या कर्तृत्वाने इतिहास ‘घडवला’. होमाई यांनी मात्र आपल्या फोटोग्राफीच्या करिश्म्याने इतिहास ‘गोठवला’. होमाईनं छायाचित्रणाच्या क्षेत्रात पदार्पण केलं ते वयाच्या पंचविसाव्या वर्षी, 1938 साली. ज्या काळात फोटो काढून घेणंसुद्धा सामान्य स्त्रीच्या कल्पनेपलीकडचं होतं, त्या काळात बिनदिक्कतपणे ब्रिटिश अधिकार्यांचे तसेच गांधी-नेहरुंचे फोटो टिपणारी अशी ही ‘पद्म’मंडित छायाचित्रकार होमाई व्यारावाला म्हणजे लोकांसाठी एक अप्रूपच होतं. प्रचंड गर्दीच्या ठिकाणी पुरुषांची मक्तेदारी असणारं फोटोग्राफीचं काम अतिशय सराईतपणे, सहजपणे करणारी आपण एकुलती एक स्त्री आहोत याचं भानसुद्धा होमाईंना नसे. सायकल दामटत, सहा-सात पाऊंड वजनाचा जाडजूड कॅमेरा पेलत एका फोटोसाठी एक रुपया मानधन घेणार्या होमाई, ही लोकांसाठी नवलाईची बाब होती.
होमाई हे नाव पारशी समाजातलं, मुलीसाठी ठेवलं जाणारं, अत्यंत संवेदनशील अशा व्यक्तिमत्त्वासाठीचं, गुजरातमधील नवसारीमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या मुलीचं. ती जन्मली 1913 साली. 13 हा तिचा लकी नंबर होता. ती विवाहबद्ध झाली तीही 13 व्या वर्षी. आयुष्यातली पहिली मोटार तिनं घेतली ती महिन्याच्या 13 तारखेला. तिच्या मोटारीचा क्रमांक सुरू होत असे इंग्रजी ऊङऊ या आद्याक्षरांनी. त्या आद्याक्षरांचा आणि 13 या तारखेचा संदर्भ घेत तिनं आपल्या 1955 साली विकत घेतलेल्या पहिल्या मोटारीचा नंबरही निवडला होता तो 13. त्या नंबरामुळे ती कायम ओळखली गेली ती ‘डालडा 13’ या टोपणनावानं.
या व्यवसायात त्या तशा अपघातानेच आल्या. उर्दू-पारशी भाषेत गावागावांत नाटकं करणार्या त्यांच्या वडिलांचं अकालीच निधन झालं. घरच्या जेमतेम परिस्थितीमुळे आई विणकाम वगैरे करून कसा तरी चरितार्थ भागवीत असताना 12-13 वर्षांच्या होमाईला उदरभरणासाठी काही तरी काम करण्याशिवाय पर्यायच नव्हता. जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये शिकत असताना लवकरात लवकर कमाई करता येईल, या विचाराने त्या माणेकशॉ या प्रोफेशनल फोटोग्राफर मित्राकडून कॅमेरा वापरायला शिकल्या. माणेकशॉ आणि कॅमेरा या दोन्हींच्या प्रेमात पडलेल्या होमाईंचं आयुष्यच त्याने बदलून गेलं.
त्या एका ऐतिहासिक कालखंडाच्या निव्वळ साक्षीदारच झाल्या नाहीत, तर अनेक ऐतिहासिक क्षण छायाचित्रबद्ध करून अजरामर करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधींपासून ते लॉर्ड माऊंटबॅटन, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष आयसेनहॉवर यांच्यापर्यंत अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे त्यांच्या कॅमेर्यात बंदिस्त झाली. सामाजिक आयुष्यात कर्तव्यकठोर असणार्या अनेक नेत्यांचे विलक्षण मानवी पैलू होमाईंच्या फोटोंतून पुढे आले. महात्मा गांधींच्या अनेक सभा, भारताच्या फाळणीचा निर्णय झाला ती अ. भा. काँग्रेस कमिटीची मीटिंग, पहिल्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण, पाकिस्ताननिर्मितीच्या आदल्या दिवशीच्या पत्रकार परिषदेतले मोहम्मद अली जिना, भारताला स्वराज्य प्रदान केल्यानंतर भारत सोडून जाणारे लॉर्ड माऊंटबॅटन, तिबेटमधून भारतात प्रवेशणारे तरुण दलाई लामा, पहिल्या गणतंत्रदिनी मानवंदना स्वीकारणारे, राष्ट्रपती भवनात पहिल्यांदा टेलिफोन लाइन लागली तेव्हा रिसिव्हर तोंडासमोर धरून हसणारे डॉ. राजेंद्रप्रसाद, याबरोबरच जॅकलिन केनेडी, अमेरिकेचे अध्यक्ष आयसेनहॉवर, डॉ. मार्टिन ल्युथर किंग अशा दिग्गज व्यक्तींचे होमाईंनी जे फोटो काढले, त्यांचे मूल्य शब्दातीत आहे.
पुरुष फोटोग्राफरच्या गर्दीत, त्यांच्या सोबतीने फोटो काढताना त्यांना बघून डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, “या रफ क्राऊडमध्ये तुम्ही काय करत आहात?” सत्तरच्या दशकात एकुलत्या एका मुलाच्या आणि पतीच्या निधनानंतर त्यांनी अतिशय स्थितप्रज्ञतेने या क्षेत्रातून निवृत्ती घेतली आणि उरलेले आयुष्य दिल्ली शहर सोडून बडोद्यात निवांतपणे घालविले. काळाच्या ओघात प्रत्येकच क्षेत्रात घुसलेल्या वाईट गोष्टी याही क्षेत्रात शिरल्या ज्या त्यांना मानवणार्या नव्हत्या. 98 वर्षांचं आयुष्य समृद्धरीत्या जगताना शेवटच्या 40 वर्षांत त्यांनी कधीही कॅमेर्याला हात लावला नाही. आयुष्याच्या उत्तरार्धात पद्मविभूषणसारख्या अत्यंत प्रतिष्ठित सन्मानासह अनेक गौरव त्यांच्या वाट्याला आले.
शेवटच्या श्वासापर्यंत स्वयंपाक, सुतारकाम, प्लम्बिंग, आपली आवडती फियाट चालवणं यांसारखी कामे करत अतिशय आत्मनिर्भर आणि स्वतंत्र आयुष्य त्या तृप्तपणे जगल्या. शल्य एकच होतं, दिल्लीला 30 जानेवारी 1948 रोजी बिर्ला हाऊसमध्ये महात्मा गांधींची प्रार्थना सभा त्यांना कव्हर करायची होती. निघता निघता नवर्याचा फोन आला- दुसरीकडे जाण्यासाठी. आजऐवजी उद्याची सभा कव्हर करण्याचं ठरलं आणि थोड्याच वेळात बातमी आली. महात्माजींची हत्या झाली. गांधीजींना गमावण्याचं दु:ख तर त्यांना होतंच; पण एक व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून कारकीर्दीतला अत्यंत मूल्यवान असा ऐतिहासिक क्षण टिपण्याची संधी त्यांनी गमावली होती. ही हुरहुर त्यांना जन्मभर लागून राहिली.