भारतीय कालगणना आणि वैदिक घड्याळ

विवेक मराठी    20-Mar-2024   
Total Views |
उज्जैन भारताची सांस्कृतिक नगरी, आता ही नगरी भारतासह संपूर्ण विश्वाला वैदिक कालगणनेनुसार वेळ सांगणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ’विक्रमादित्य वैदिक घड्याळ’ या अद्भुत घड्याळाचे लोकार्पण करण्यात आले. या घड्याळामुळे भारतीय कालगणनेला पुन्हा महत्त्व प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय कालगणना कशी होती आणि ’वैदिक घडाळ्या’ची वैशिष्ट्ये जाणून घेणे उचित ठरेल.
 
Vedic clock
 
भारतातील सांस्कृतिक स्थानांमध्ये उज्जैन कायम केंद्रस्थानी राहिले आहे. महाकालाचा आशीर्वाद असणारी ही नगरी संस्कृत साहित्यात कविकुलगुरू कालिदासांचे वास्तव्य असणारी नगरी म्हणूनही प्रसिद्ध आहे. आता ही नगरी भारतासह संपूर्ण विश्वाला वैदिक कालगणनेनुसार वेळ सांगणार आहे. भारताला सांस्कृतिक आणि शास्त्रज्ञानाची विशाल परंपरा आहे. भारतीय ज्ञानशाखांमध्ये शून्याचा शोध, वैदिक गणित, पायथागोरसच्या सिद्धान्ताआधी असणारी शुल्बसूत्रे, खगोलशास्त्र, ज्योतिषशास्त्र, विज्ञानातील अनेक सिद्धान्त आढळतात. कालगणना तरी याला अपवाद कशी ठरेल?
 
कालगणना म्हणजे काय?
 
कालाचे मापन करण्याच्या पद्धतीस कालगणना म्हणतात. इंग्लिशमधील ’क्रॉनॉलॉजी’ व ’एरा’ या दोन शब्दांसाठी कालगणना ही संज्ञा मराठीत रूढ झालेली आहे. घडत असलेल्या व घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे असा कालगणनेचा मूळ हेतू असतो. ऐतिहासिक कालगणनेत गतकालीन घटनांचा कालानुक्रम निश्चित करण्याचा प्रयत्न असतो. अर्थात, ही कालगणना करण्याची पद्धत भिन्न प्रदेशांत भिन्न प्रकारची असल्याचे आढळते. विविध काळांमध्ये निरनिराळ्या कालगणना अस्तित्वात असल्याचे आढळते. सध्या प्रचलित आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता असणारी कालगणना ख्रिस्ती आहे.
 
भारतीय कालगणना
 
आपल्या रोजच्या जीवनात आपण पाहतो की, लग्नाची किंवा पूजेची एखादी विशिष्ट तारीख जरी असली, तरी ’मुहूर्त’ काढलेला असतो. विशिष्ट तिथी, वार आणि ग्रह यांचा अभ्यास करून काही विशिष्ट वेळा ठरवलेल्या असतात. या कालगणनेचे संदर्भ वैदिक वाङ्मयात दिसतात.
 
वैदिक काळात अहोरात्र पक्ष, चांद्रमास, ऋतू, नक्षत्रे यांचे तत्कालीन लोकांना चांगले ज्ञान झाले असल्याचे दिसते. एवढेच नव्हे, तर सौर मास व चांद्र मास यांचा मेळ घालण्यासाठी लागणार्‍या अधिक मासाचेही त्यांना आकलन झाले होते. त्याही पुढे जाऊन, वासंतिक व शारद संपात यांचेही त्यांस ज्ञान झाले होते. पण कालगणनेसाठी त्यांना चार किंवा पाच वर्षांचे एक चक्र किंवा युग कल्पावे लागले. लोकमान्य टिळकांनी ’ओरायन’ आणि ’आर्क्टिक होम इन द वेदाज’ या ग्रंथांमध्ये याचा सखोल अभ्यास केलेला आहे.
 
 
काही देशांत 10 महिन्यांचे वर्ष समजले जात असे. पण भारतामध्ये चंद्राच्या अनुषंगाने होणारे 12 चांद्र महिन्यांचे चांद्र वर्ष आणि सूर्य व तारे यांच्या अनुषंगाने होणारे सौर वर्ष, तसेच त्यांचा मेळ घालण्यासाठी धरावा लागणारा अधिक मास या बाबतीत वेदकालीन लोक इतरांच्या मानाने बरेच पुढे गेले होते. तथापि 27 नक्षत्रांपासून तयार केलेल्या 12 राशी आणि सूर्यादी सप्तग्रहांवरून बनवलेले वार हे भारतीयांनी ग्रीक लोकांपासून घेतले, असे दिसते. राशी-वारांचे पश्चिमेकडून भारतात संक्रमण होत असता अरबस्तान, इराण इ. देशांत वार का रुजले नाहीत, हा एक प्रश्नच आहे. अरबी व इराणी संस्कृतींत वारांना ग्रहांवरून पडलेली स्वतंत्र नावे नाहीत. त्यांमध्ये पहिल्या पाच दिवसांना - म्हणजे रविवार ते गुरुवार या पाच वारांना अनुक्रमे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा दिवस किंवा यक्शंबा, दूशंबा, सेशंबा, चहारशंबा, पंजशंबा, शुक्रवारला जुमा, आदिना आणि शनिवारला सुबत किंवा शंबा अशी नावे दिली आहेत. यावरून या देशांत वारांची प्रथा रुजली नाही, हे स्पष्ट होते. राशी मात्र भारतात प्रचारात आल्या, तेव्हाच या देशांतही प्रचारात आल्या. अशा रितीने भारतीय ज्योतिषात कोणता भाग केव्हा व कसा प्रविष्ट झाला, हे पाहणे फार उद्बोधक होईल.
 
 
भारताचा काश्मीर ते कन्याकुमारी किंवा प्राग्योतिष ते सिंध एवढा विशाल विस्तार आहे. या साम्राज्याचे लहान लहान विभागांमध्ये विभाजन झाले. या प्रत्येक प्रदेशाची स्वतंत्र आचार-संस्कृती निर्माण झाली. तसे लोकव्यवहार निर्माण झाले. यामधून प्रादेशिक सोयीनुसार काही कालगणना निर्माण झाल्या. उदा. भारतात गणेश चतुर्थीला गणपती पूजन करत असले, तरी सर्व ठिकाणी गणेश चतुर्थी समान दिवशीच, समान वेळी असेलच असे नाही. त्यातही काहीसे फरक आढळतात.
 
 
भारतात विविध कालगणना उत्पन्न होण्याचे आणखीही एक कारण आहे. इतिहासाच्या अभ्यासावरून आपणास असे दिसून येते की, अनेक जमाती विविध काळी भारताबाहेरून भारतात आल्या व कायमच्या वस्ती करून राहिल्या. त्यांनी आपल्याबरोबर काही आचार-उच्चार-विचार आणले. त्यांत कालगणनाही होत्या. त्या जमातींपैकी काहींनी आपली राज्ये येथे स्थापन केली. तेव्हा त्यांच्या कालगणनाही येथे प्रचारात आल्या.
 
भारतात सद्य:स्थितीत 36 कालगणना अस्तित्वात आहेत.
(1) कटकी/बंगाली (2) इलाही, (3) कटकी (4) कलचुरी, (5) कलियुग, (6) कोल्लम, (7) गांगेय किंवा गंग-कदंब, (8) गुप्त, (9) ग्रहपरिवृत्ती, (10) चालुक्य विक्रम,
(11) जव्हार, (12) जुलूस, (13) तुर्की द्वादशवर्षचक्र व चिनी षष्टिवर्षचक्र, (14) नेवार (नेपाळ), (15) पर्गनाती,
(16) पुदुवैप्पु, (17) फसली, (18) बंगाली (19) बार्हस्पत्य वर्षचक्र 1 व 2, (20) बुद्धनिर्वाण, (21) भाटिक, (22) मगी, (23) मब्लूदी, (24) मौर्य, (25) राज्याभिषेक,
(26) लक्ष्मणसेन, (27) विक्रम, (28) विलायती
(29) वीरनिर्वाण, (30) शक, (31) शुहूर, (32) सप्तर्षी, (33) सिंह, (34) सिल्युसिडी, (35) हर्ष, (36) हिजरी.
 
 
विविध कालगणना भारतात चालू होण्याचे तिसरेही एक कारण आहे. येथील हिंदू राजांमध्ये अशी एक कल्पना प्रचलित होती की, एखादा अत्यंत पराक्रमी राजा आपली स्वतंत्र कालगणना प्रचलित करीत असे. विक्रमादित्य व शालिवाहन हे मोठे पराक्रमी राजे होऊन गेले व त्यांनी आपल्या कालगणना चालू केल्या. आपण जर त्यांसारखेच पराक्रमी आहो, तर आपणही आपल्या कालगणना का चालू करू नयेत? म्हणून काही राजांनीही आपल्या स्वतंत्र कालगणना चालू केल्या. चालुक्य, सहावा विक्रमादित्य, अकबर, छत्रपती शिवाजी महाराज, टिपू इ. अशांपैकीच राजे होत.
 
  
सारांश, भारतात गेल्या सुमारे 2,500 वर्षांत पाच-पंचवीस कालगणना उत्पन्न झाल्या किंवा प्रचलित केल्या गेल्या. यांपैकी काही शुद्ध भारतीय, काही परकीय व काही मिश्र स्वरूपाच्या आहेत. काहींच्या प्रारंभाचा थांगपत्ता लागतो, काहींचा लागत नाही.
 
स्थानिक पातळीवर आणि धार्मिक रूढी-परंपरांनुसार या विविध कालगणना पाळल्या जातात.
 
 
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पित केलेल्या ’विक्रमादित्य वैदिक घड्याळा’विषयी जाणून घेऊ या.
 
’विक्रमादित्य वैदिक घड्याळ’ हे वैशिष्ट्यपूर्ण घड्याळ असून वैदिक कालगणनेनुसार वेळ दर्शवणार आहे.
 
या घड्याळात इंडियन स्टँडर्ड टाइम (IST) आणि ग्रीनविच मीन टाइम (GMT) याबरोबरच पंचांग आणि मुहूर्ताविषयीदेखील माहिती मिळणार आहे.
 
 
विक्रमादित्य वैदिक तास हा 48 मिनिटांचा असणार आहे. या घड्याळात 24 तास नाही, तर 30 तास असणार आहेत. हे घड्याळ सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतची सगळी वेळ दाखवणार आहे. वैदिक मापनानुसार साधारणत: 30 तास होतात. हे घड्याळ फक्त वेळ नाही, तर मुहूर्त, ग्रहण तिथी, शुभमुहूर्त, पर्व, उपवास, ग्रह-भद्रा स्थिती, योग, सण, सूर्य आणि चंद्र ग्रहण याबरोबर अनेक गोष्टींची माहिती देणार आहे.
 
 
आयआयटी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी हे विक्रमादित्य वैदिक घड्याळ बनवले आहे. तसेच या घड्याळाचे अ‍ॅपही उपलब्ध आहे. हे घड्याळ इंटरनेट आणि जीपीएसशी जोडलेले आहे. तसेच भारतातील प्रमुख मंदिरांशी ते संलग्न असणार आहे. या घड्याळात इंग्लिश वेळही दर्शवण्यात येणार आहे. 85 फूट उंच टॉवरवर बसवण्यात आलेले हे वैदिक घड्याळ भारताच्या समृद्ध परंपरेत भर घालणारेच ठरले आहे.
 
 
या घड्याळाच्या निमित्ताने भारताच्या सोनेरी इतिहासात झालेली विविध गणितीय संशोधने अभ्यासण्यात आली. इतिहासाच्या अभ्यासातून भारत पुन्हा समृद्ध भविष्य घडवेल, याची ही नांदीच आहे.
 

वसुमती करंदीकर

 
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात संस्कृतमध्ये पीएच.डी करत आहे. प्राच्यविद्या शास्त्र, संस्कृत वृत्तपत्रविद्या यामध्ये पदविका, तर ब्राह्मी, मोडी, हस्तलिखितशास्त्र, मायथॉलॉजी यांचे सर्टिफिकेट कोर्स विशेष श्रेणीसह पूर्ण केले आहेत. सध्या कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठात ज्योतिषही शिकत आहेत. मुंबई विद्यापीठाचे विद्यापीठ स्तरावरचे बुद्धिबळाचे सुवर्ण तर कथा लेखनाचे रौप्य पदक प्राप्त. आतापर्यंत १३ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.