प्रयोगशील, समर्पित शेतकरी

विवेक मराठी    09-Mar-2024
Total Views |
श्रीरंग जांभळे - 7588920490
गोव्यातील सावईवेरे या लहानशा खेड्यातील कृषिमित्र संजय अनंत पाटील यांना या वर्षी पद्मश्री सन्मानाने गौरवण्यात आले. शेतकरी वर्गाला आणि शेती-शेतकर्‍यांविषयी आस्था, प्रेम असणार्‍या सर्वांनाच यामुळे आनंद झाला. आपली संपूर्ण हयात कुळागरात (सुपारी हे प्रमुख पीक असलेली बागायत) घालवल्याबद्दल सार्थ अभिमान बाळगणार्‍या संजय यांनी “हा पुरस्कार म्हणजे गोव्यातील शेतकर्‍यांचा गौरव” असल्याचे म्हटले. यामुळे गोव्यातील शेतकर्‍यांना आपलाही गौरव झाल्याची अनुभूती नक्कीच आली असेल. अशा कृषिमित्र संजय पाटील यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...

krushivivek
 
शेतकरी, शेती याबद्दल समाजात खूप सहानुभूती पाहायला मिळते. शेतकर्‍यांचे कष्ट, त्यांच्या उत्पादित शेतमालाला मिळणारा कमी भाव याने व्यथित होणारे अनेक संदेश समाजमाध्यमांत फिरताना आढळतात. शेतकर्‍यांच्या मुद्द्यांवरून राजकीय फायदा मिळवण्याचेही अनेक प्रकार लक्षात येतात. राजकीय पक्ष आणि सत्ताधारी याबाबत काहीच करत नाहीत किंवा चुकीचे करतात अशा आरोपांच्या फैरीही झडतात. त्याचबरोबर आम्ही यांव करू, त्यांव करू अशी घोषणाबाजीही राजकीय व्यासपीठावरून ऐकायला मिळते. शेतकर्‍याने असे करावे, तसे करावे असे काही प्रॅक्टिकल व बरेचसे अनाहूत सल्लेही दिले जातात. यावरून शेतकरी हा कमजोर, माहिती-ज्ञान-तंत्रज्ञान यापासून खूप दूर अशी प्रतिमा उभी राहते, उभी केली जाते.
याच्या उलट, कोरोनाच्या काळात व त्यानंतर हुशार शेतकरी, तरुण रक्ताचे नव्या दमाचे स्मार्ट शेती उद्योजक यांच्या यशोगाथाही बर्‍याच ठिकाणी ऐकायला, पाहायला, वाचायला मिळतात. काही लाख रुपये कमावणारा शेतकरी किंवा शेतीपूरक उद्योग करणारा उद्योजक यांच्याबद्दलचे लिखाण समोर आले की नजर स्थिरावते. वाचल्यावर आनंद होतो. पद्मश्रीसारख्या महत्त्वाच्या पुरस्कारासाठी असेच एखाद्या शेतकर्‍याचे नामांकन होते आणि त्याला पुरस्कार जाहीर होतो, तेव्हा तर अत्यानंद होतो.
सन 2024मध्ये जाहीर झालेल्या 110 पद्मश्री पुरस्कारांत देशातील 5 जणांना शेती क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पुरस्कार जाहीर झाला आहे. गोव्यातील सावईवेरे या लहानशा खेड्यातील संजय अनंत पाटील यांचा यात समावेश आहे. शेतकरी वर्गाला आणि शेती-शेतकर्‍यांविषयी आस्था, प्रेम असणार्‍या सर्वांनाच आनंद झाला. आपली संपूर्ण हयात कुळागरात (सुपारी हे प्रमुख पीक असलेली बागायत) घालवल्याबद्दल सार्थ अभिमान बाळगणार्‍या संजयभाईंनी “हा पुरस्कार म्हणजे गोव्यातील शेतकर्‍यांचा गौरव” असल्याचे म्हटले. यामुळे गोव्यातील शेतकर्‍यांना आपलाही गौरव झाल्याची अनुभूती नक्कीच आली असेल. या काही वर्षांत सर्वसामान्यांमध्ये राहून असामान्य कर्तृत्व गाजवणार्‍या, चकाचक ग्लॅमरस जगाच्या जवळही न फिरकणार्‍या अनेक ग्रामीण व शहरी भागातील दीपस्तंभांना पद्म पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्याच्या घटनांमुळे पुरस्कार देण्याच्या प्रक्रियेविषयी जनतेत प्रामाणिक भावना जागत असल्याचे दिसून येते. याही घटनेने जनमानसात अशीच भावना उत्पन्न झाली असेलच.
सावई-वेरे-वळवई हा अंत्रुज महालातील (फोंडा तालुका) परिसर गोवा मुक्तिसंग्रामातील एक महत्त्वाचे क्षेत्र. इथे अनेक स्वातंत्र्यसैनिक आसरा घ्यायचे. येथील रहिवाशांमध्ये मोहन रानडे यांच्यासारख्या सन्माननीय राष्ट्रप्रेमींनी परकीय सत्तेच्या जुलमी राजवटीविरुद्ध जागृती घडवून आणली. यामुळे याही परिसरात सैनिक तयार झाले. येथील बर्‍याचशा घटना कुळागरातच घडल्या, योजना आकाराला आल्या. अशा या ऐतिहासिक वारशाच्या कुळागरातच संजय पाटील यांचे जीवन घडले. त्यांचे वडील या परंपरागत चालून आलेल्या कुळागरातच राहिले. आई-वडील, तीन बहिणी व भाऊ (संजयभाई) असे हे कुटुंब. सुपारी, नारळ, केळी, काजू, अननस या पिकांभोवतीच यांचा संसार. संजयभाईंचे शिक्षण लौकिक अर्थाने कॉलेजच्या पायरीपर्यंतच. त्यानंतर गोवा बागायतदार सहकारी संस्थेत अल्पकाळ नोकरी केली. वडील आजारी असल्याने 1986पासून त्यांनी बागायतीत पूर्णपणे लक्ष घालायला सुरुवात केली. पारंपरिक पद्धतीने शेती करताना अनेक अडचणी लक्षात आल्या. त्यामुळे नावीन्याचा शोध घेणे चालू केले. दरम्यानच्या काळात सरकारी योजना, भोवतालचे वातावरण याने प्रेरित होऊन संकरित गायी घेऊन दुधाच्या व्यवसायाची जोड दिली. सावईवेरे परिसरात काही काळ गोवा डेअरीसाठी कृत्रिम रेतन सेवाही दिली. आपल्या वैयक्तिक व सामूहिक जडणघडणीत समविचारी मित्रमंडळींचा महत्त्वाचा वाटा असतो. संजयभाईंच्या परिसरातील समवयस्क व मित्रमंडळी कोणत्याही विषयाचे पूर्ण व सार्थ विश्लेषण करण्यात अग्रेसर. अशाच विश्लेषणात्मक अभ्यासातून शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे, उत्पादकतेबरोबर निव्वळ नफाही वाढवणे यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू झाले. यातून गवसले नैसर्गिक / गोआधारित शेतीचे तंत्र. बागेतच उपलब्ध असलेल्या संसाधनांचा वापर करत पीक - माती - हवामान - निविष्ठा यांचे एकमेकांशी असलेले परस्पर संबंध व क्रिया-प्रक्रिया यांच्या सखोल चिंतनातून या मंडळींनी अभ्यास केला. त्यातून शेतीतील काही प्रयोग केले. देशी गायीचे महत्त्व, कृत्रिम रासायनिक खते व औषधे यांचे दुष्परिणाम यांच्या अभ्यासातून शेती पद्धतीची दिशा निश्चित केली.
1998-99दरम्यान संजयभाईंचा भारतीय किसान संघाशी संपर्क आला. किसान संघाच्या पुढाकाराने सेंद्रिय शेती पद्धतीचे तज्ज्ञ, उंबरगाव (गुजरात) येथील भास्कर सावे गुरुजी, डॉ. सुभाष पाळेकर यांचे व्याख्यान, सावे गुरुजींच्या उंबरगाव येथील शेतीला भेट असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यातून संजयभाईंनी मार्गदर्शन प्राप्त केले. वाचन-भेटी-चिंतन व प्रत्यक्ष प्रयोग यातून शेतीतल्या शाश्वत विकासासाठी संजयभाईंची बागायत एक प्रयोगशाळाच बनली.
दरम्यान, या परिसरात ग्राम विकास केंद्र या स्थानिक संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या पाणलोट क्षेत्र विकास प्रकल्पातही संजयभाई व मित्रमंडळींचा सक्रिय सहभाग होता. पाण्याचे व मातीचे संवर्धन करण्यासाठी त्यांनी आपल्या क्षेत्रात काही पारंपरिक व काही नवीन पद्धतींचा अवलंब केला. कर्नाटकात, केरळमध्ये डोंगरउतारावर भुयार मारून पाणी मिळवण्याचे तंत्रज्ञान काही जणांना अवगत आहे. अशाच एका तंत्रज्ञाच्या साहाय्याने संजयभाईंनी आपल्या बागेसाठी पाण्याचा स्रोत मिळवला. त्याआधी त्यांना एप्रिल-मे महिन्यात पाण्याची टंचाई अनुभवावी लागत होती. विहिरीतील आडव्या बोअरमुळेही उपलब्ध पाण्यात वृद्धी झाली.
जीवामृत हा संजयभाईंचा हुकमी एक्का. देशी गायीचे शेण, गोमूत्र, गूळ, बेसन पीठ व झाडाच्या मुळाकडची माती यापासून सहज जीवामृत बनवता येते. एका संयंत्राच्या साहाय्याने फिल्टर करून ठिबक सिंचनाद्वारे नियमितपणे पिकाला जीवामृत देतात. घरातील सांडपाणीही या यंत्राद्वारे बागेला पोहोचवले जाते. यामुळे मातीतील जिवाणूंची संख्या वाढते व जमिनीची सुपीकताही वाढते. बागेतील पालापाचोळा न जाळता ते आच्छादन (र्चीश्रलहळपस) म्हणून वापरतात. यामुळे जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढते. या सर्व गोष्टींमुळे उत्पादनात वृद्धी व उत्पादनखर्चात कमालीची घट झाल्याचे ते आकडेवारीसहित सांगतात. त्यांच्यातला अभियंताही या सर्व उपक्रमांत त्यांना साथ देतो. आपल्या गरजेच्या अनुरूप तंत्रज्ञानाची ते जुळवाजुळव करतात, तसेच काही यंत्रे त्यांनी स्वत: विकसित केली आहेत. घरच्या अडचणींमुळे कॉलेजमध्ये न जाऊ शकलेली ही व्यक्ती असामान्य गोष्टी करताना आढळते. एखाद्या गोष्टीचा घेतलेला ध्यास व समर्पित वृत्तीने त्यासाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या यशाचे गमक आहे.
या त्यांच्या प्रवासात त्यांचे कौशल्य व दिलेले योगदान यासाठी, संजयभाईंना महत्त्वाचे काही पुरस्कारही प्राप्त झाले. गोवा बागायतदार सहकारी संस्थेचा ’सर्वोत्कृष्ट बागायतदार’ पुरस्कार, 2013 साली गोवा शासनाचा ’कृषिरत्न पुरस्कार’, भारतीय कृषी अनुसंधान संख्यान - दिल्लीचा नवोन्मेषी पुरस्कार व गोवा राज्य जैवविविधता मंडळाचा 2023 सालचा जैवविविधता पुरस्कार या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. भारतीय किसान संघाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे संघटन व त्याद्वारे त्यांच्या अडचणी सोडवताना गोवा प्रांताचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. पाणलोट संघाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी कार्य केले.
कृषी ही आपली संस्कृती आहे. त्याशिवाय माणूस जगू शकत नाही. शेती करणे ही कमीपणाची गोष्ट नव्हे. हुशार माणसाचे ते काम आहे. व्यक्तीला आपल्या हुशारीचा योग्य उपयोग कण्यासाठी शेती हे एकदम योग्य क्षेत्र आहे. नवीन पिढी कृषी क्षेत्रात येण्यासाठी सरकारने व समाजानेही प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे ते सांगतात. शाळेत, महाविद्यालयात प्रात्यक्षिकांद्वारे शेतीसंबंधीचे शिक्षण देण्याची आवश्यकता आहे. सरकारने विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात कौशल्याधारित कृषी शिक्षण उपलब्ध करून द्यावे, असा त्यांचा आग्रह आहे. आळसामुळे परावलंबित्व येते व परावलंबित्व गरिबी घेऊन येते, हा त्यांचा मंत्र. शेतीमुळेच आपण चांगले व सुखी जीवन जगण्याकडे वाटचाल केली, यातून मिळालेल्या संपत्तीतूनच मुलांचे शिक्षण पूर्ण केले व सुखी-समाधानी कौटुंबिक जीवन जगत असल्याचे ते अभिमानाने सांगतात. या त्यांच्या वाटचालीत त्यांची पत्नी संगीता व मुले सुमय व सुजला यांची खंबीर साथ आहे.
गोव्यातील एका खेड्यातील एका कष्टकरी शेतकर्‍याला ’पद्मश्री’ पुरस्कार जाहीर झाल्याने शेतीबाबत आस्था बाळगणारे व शेतकरी यांना नक्कीच आनंद झाला आहे. अनेक अडचणींना धैर्याने सामोरे जात अनेक शेतकरी आज शेतात राबत आहेत. युवाशक्तीही काही प्रमाणात याकडे आकृष्ट होत आहे. या सर्वांना भक्कम आधार देण्याचे कार्य सरकार, समाजधुरीण व एकूणच जनता यांनी केले पाहिजे. हे सर्व साध्य करण्याची शक्ती, बुद्धी, प्रेरणा कृषिदेवता भगवान बलराम संजयभाईंना व आपणा सर्वांना देवो, ही प्रार्थना.