@विजय सांबरे 9421329944
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील किमान सहा जिल्ह्यांतील चौदांपेक्षा अधिक तालुक्यांत डांगी गोवंश हा कृषिवलांच्या जीवनाचा आधार बनलेला आहे. या डांगी गोवंशाचे माहात्म्य व संवर्धन करण्याची निकड किती याबाबत माहिती देणारा लेख...
पार्श्वभूमी
अहमदनगर जिल्ह्यातील सह्याद्रीच्या रांगांनी व्यापलेल्या अकोले तालुक्याची वनवासीबहुल प्रदेश म्हणून ओळख आहे. याला ‘चाळीसगाव डांगाणी’ प्रदेश म्हटले जाते. ‘डांग’ या शब्दाचा अर्थच मुळी डोंगराळ प्रदेश. अभ्यासकांच्या मते, डांगाणी म्हणजे सह्याद्री घाटाच्या रांगेत असलेला जंगली, डोंगराळ व चढणीचा प्रदेश. नैसर्गिक जैवविविधतेबरोबरच येथील आद्य शेतकरी व पशुपालक समाजाने पिकांसोबतच पाळीव प्राण्यांच्या नानाविध जाती संगोपित केल्या आहेत. त्या गावरान वाणं म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यापैकीच एक आहे डांगी नावाचा देशी गोवंश. पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर ते कळसूबाई, त्र्यंबकेश्वर ते अगदी जव्हारपर्यंत हा देशी गोवंश शेकडो वर्षे पाळला जात आहे. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांतील किमान सहा जिल्ह्यांतील चौदांपेक्षा अधिक तालुक्यांत डांगी गोवंश हा कृषिवलांच्या जीवनाचा आधार बनलेला आहे.
वैशिष्ट्यपूर्ण डांगी गोवंश
उत्तर सह्याद्रीतील महादेव कोळी व ठाकर या आदिवासी जमाती व इतर शेतकरी डांगीपालन करतात. डोंगरउतारावरील अनगड ठिकाणी शेतीची मशागत करण्यासाठी डांगी बैलाचाच उपयोग होतो. लहान चणीची, मजबूत खुरांची ही डांगी जनावरे तेलकट त्वचेमुळे अति पावसाच्या डोंगराळ प्रदेशात टिकू शकतात. ते भर पावसात भात खाचरातील खोल गाळात मातीची चिखलणी करतात. त्या वेळी या जातीची ताकद कळते. डोंगराच्या तीव्र उतारावर- अगदी कड्याला चरताना पाहिले की, खुरांची क्षमता लक्षात येते. इतर गावरान जातींची जनावरे पाळण्याचे प्रयोग झाले; पण डांगीला सक्षम पर्याय अद्याप निर्माण झालेला नाही.
डांगीचे माहात्म्य
स्थानिकांच्या दृष्टीने डांगीचे अनेक अंगांनी महत्त्व आहे. उपजीविका, आर्थिक प्राप्ती व जैव सांस्कृतिक अंगाने डांगीचा सांभाळ येथील लोक करत असतात. डोंगराळ प्रदेशात चरत असल्यामुळे डांगी गाईचे दूध व गोमूत्र अत्यंत औषधी मानले जाते. दीर्घकाळासाठी खोकल्याचा आजार झाला तर, त्याला डांगी खोकला संबोधतात. अशा रुग्णाला डांगी गाईचे गोमूत्र औषध म्हणून देतात. दूध व त्यापासून तयार होणारे दही, तूप, खवा यांसारखे पदार्थ स्थानिक वनवासींच्या अन्नसुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्याच्या विक्रीतून घरखर्चासाठी महिलांना चार पैसे मिळतात. डांगी गोर्हे व बैल पाळण्याचे कौशल्य व छंद येथील वनवासींना आहे. राजूर, घोटी, म्हसा येथील बाजार व यात्रेतील प्रदर्शनात विक्री करून चांगली कमाई होत असते. आजही ‘राजूरचा पेढा’ हा प्रसिद्ध आहे. एकूणच पारंपरिक डांगीपालकांच्या दृष्टीने गोवंश आधारित उपजीविका व त्यात दडलेले अर्थकारण महत्त्वाचे आहे.
वनवासी महिला आपल्या लोकगीतांतून डांगी बैलाचे खूपच उत्कट वर्णन करतात... सणावाराच्या निमित्ताने समूहाने गोड गळ्याने गातात. त्याची चालही किती वेळ गुणगुणावी अशीच असते.
बैल पैंजन्या तुझे पायी तंबू वाणी रे,
झाली सवासांज आला नंदी वाणी रे,
आला नंदी वाणी न्याट मोडली अंगणी रे,
सोन्याचा कासरा हात धरून देईना रे,
वट्यावर उभी हाक मारीते धन्याला रे,
ववाड्याची शेती काम केला पाण्या वाणी रे,
तुझ्या कमाईची कणसा आली तांब्या वाणी रे,
बाळाच्या बाइलचे नाव आराज्य सराज्या रे,
बाळाची आई बोले जावा मामला इराज्या रे,
सारविते अंगण मी चांगला दिसाया रे,
पैंजन्या बैलाचं मन झालया बसाया रे.
डांगीचे नष्टचर्य व लोकपंचायतचा संवर्धनासाठी पुढाकार
मागील दोन दशकांपासून डांगी जनावरांचे नष्टचर्य सुरू झाले आहे. आज अखेर निम्म्याहून अधिक डांगी गोवंश नष्ट झाला. कळसूबाई-हरिश्चंद्रगड पट्ट्यात याची तीव्रता अधिक होती. ज्या कुटुंबांकडे शंभरच्या वर डांगीचे कळप होते, त्या घरची ‘लक्ष्मी’ नष्ट झाल्यामुळे येथील पशुपालकांनी अगतिक होऊन अखेर काठी ठेवून दिली व डांगी गुरांचे पालन थांबवले आहे. आजही त्यांना डांगीपालनाची इच्छा आहे, त्यांनी प्रयत्न सोडलेले नाहीत.
स्थानिक डांगीपालकांच्या आग्रहाने बारा वर्षांपूर्वी लोकपंचायत संस्थेने डांगी जतन व संवर्धनासाठी लोककेंद्री उपक्रम हाती घेतले. डांगी गोवंशाच्या समस्या लक्षात घेतल्या. कृषी जैवविविधतेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून डांगी संवर्धनाचे काम हाती घेतले. दरम्यान ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधवराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली ‘महाराष्ट्र जनुक कोश’ या नावाने महाराष्ट्रात जैवविविधता संवर्धन कार्यक्रम सुरू झाला. डांगी गोवंशाच्या समस्यांचा अभ्यास महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगाच्या सहकार्याने निवडक गावांत केला व त्याआधारे दीर्घकालीन डांगी गोवंश संवर्धनाचे काम लोकपंचायत करत आहे.
शास्त्रीय अभ्यास, कृती संशोधन, जाणीव जागृती, शासकीय विभाग व यंत्रणांच्या मदतीने स्थानिक डांगी गोवंश आधारित व्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी सर्वंकष कृती कार्यक्रम हाती घेतला. पंधरा गावे व चाळीसपेक्षा अधिक वाड्यावस्त्यांवर डांगी संवर्धन प्रक्रिया सुरू आहे. दुर्गम भागात पशुवैद्यकीय उपचार सुविधा, लसीकरण शिबिरे, प्रशिक्षण कार्यशाळा, डांगीमित्राद्वारे संवर्धनासाठी आश्वासक वातावरणनिर्मिती केली जात आहे. हा कार्यक्रम भविष्यात पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा पश्चिम घाटातील सहा जिल्हे व चौदा तालुक्यांत पोहोचविण्याचा संस्थेचा मानस आहे.
डांगी संवर्धनावर काम करत असताना मानव व निसर्गाचे कसे जैव-सांस्कृतिक असे शाश्वत नाते आहे, याची नव्याने उकल झाली. रानटी चार्याचा अभ्यास करत असताना राखणरानासारखी लोककेंद्री शाश्वत चारा व्यवस्थापन पद्धत प्रकाशात आली. नव्या पिढीतील डांगीपालकांना या प्रश्नावर संवेदनशील बनविले, त्याचाही एक चांगला परिणाम दिसतो आहे. गाई आजारी पडल्या तर डांगीमित्र व पशुवैद्यक यांना बोलावणे येते. गाभण गाईंची विशेष काळजी घेण्यास पालक मंडळी सरसावली आहेत. अशा या विविध प्रयत्नांतून एक उत्साहाचे वातावरण कार्यक्षेत्रात दिसत आहे. कळसूबाई-हरिश्चंद्रगड परिसरातील डांगीपालकांनी लोकपंचायतच्या मदतीने ‘डांगी गोवंश पैदासकार व संवर्धक संघ’ (ब्रीडर्स असोसिएशन Non Profit Company) स्थापला आहे. त्याच्या माध्यमातून डांगीकेंद्रित उपजीविका सक्षम होण्यास मदत होईल. डांगीशी असलेल्या जैव-सांस्कृतिक नात्याला शाश्वत अर्थकारणाची जोड मिळाल्यास नवी पिढीही डांगीपालनाची परंपरा सुरू ठेवेल. भविष्यात डांगी या देशी गोवंशासंबंधी एक भक्कम व्यवस्था निर्माण होईल, अशी आशा आहे.
भविष्यकालीन योजना
लोकपंचायत संस्थेने अकोले तालुक्यातील निवडक पंधरा गावांत पारंपरिक डांगीपालकांसोबत मागील बारा वर्षांत विविध उपक्रम राबवले. डांगी संवर्धनाचे हे शिवधनुष्य पेलण्यासाठी स्थानिक डांगीपालक शेतकरी, ब्रीडर्स असोसिएशन ते सरकारी यंत्रणा व स्वयंसेवी संस्था ते गोवंशाचे अभ्यासक या सर्वांचाच सहभाग व पाठबळ लागणार आहे. त्या सर्व घटकांसाठी अनुभवाच्या आधारे डांगी जतन-संवर्धनाचे कार्य पुढे जाण्यास मदत होईल. त्यासाठी आवश्यक भविष्यकालीन योजना खालीलप्रमाणे-
डांगी हा सह्याद्रीतील (पश्चिम घाटातील) कृषी जैवविविधतेचा एक घटक म्हणून स्वस्थळी संवर्धन प्रक्रियेस चालना देणे.
शुद्ध डांगी गोवंशनिर्मितीसाठी सुलक्षणी गाई व जातिवंत वळू यांच्या निर्मितीसाठी सातत्यपूर्ण लोकशिक्षण व प्रत्यक्ष कृती कार्यक्रम राबवणे गरजेचे आहे. त्यासाठी Livestock Policy of Maharashtra-2006 / GR No.LVS 102003/CR-467/ADF-4, Commissioner of Animal Husbandry, Government of Maharashtra / 17 July 2006. या धोरणानुसार देशी गोवंश टिकवण्यासाठी जातिवंत वळूंची निर्मिती व गरजेच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याची योजना आखणे.
उपजीविकेच्या दृष्टीने पारंपरिक डांगी व्यवस्था सक्षमीकरण व जतन-संवर्धन कार्यक्रमाची आखणी व अंमलबजावणी करणे.
विविध आजारांचे निदान-उपचार यासाठी पारंपरिक लोकज्ञान व आधुनिक पशुवैद्यकीय ज्ञानाचा वापर यांना प्रोत्साहन देणे, त्यात गावपातळीवर डांगीमित्र संकल्पनेचा वापर करणे.
रानटी व शेतातील चारा यावर प्रक्रिया/मूल्यवर्धन प्रक्रियेस चालना देणे. राखणरान या लोककेंद्री चारा व्यवस्थापन पद्धतीला मान्यता देणे व प्रोत्साहन देणे.
तातडीच्या उपाययोजना
डांगी पशुधन वाचविण्यासाठी काही उपक्रम तातडीने राबविणे आवश्यक आहे, ते असे-
1) दुर्गम ठिकाणे, गावे, वाडी व वस्तीवर डांगी जनावरांच्या लहानमोठ्या आजारांवर प्रथमोपचार व लसीकरणाची सुविधा डांगीमित्रांच्या माध्यमातून पोहोचविणे.
2) डांगी वंश शुद्ध राहावा, साथींच्या आजारावर नियंत्रण आणण्यासाठी अद्ययावत वैद्यकीय सुविधा असणारा फिरता पशु-दवाखाना सुरू करणे.
3) गावपातळीवर सकस चाराटंचाईच्या काळात उपलब्ध होण्यासाठी चाराकोश उभे करणे.
4) डांगी गाईच्या दूध, शेण व गोमूत्र यावर आधारित उप-उत्पादन निर्माण करण्यासाठी महिला व पुरुष गटांना आर्थिक व तांत्रिक साहाय्य करणे.
5) डांगीविषयी सर्वांगीण समज वाढवण्यासाठी डांगी रिसोर्स सेंटर उभारण्यासाठी व डांगी संवर्धनात कार्य करण्याची इच्छा असणार्या युवक-युवतींसाठी शिष्यवृत्ती देण्यासाठी योगदान देणे.
एकूणच डांगी संवर्धनासाठी डांगी गोवंश पैदासकार व संवर्धक संघ ‘डांगी संवर्धन निधी’ उभारत आहे. त्यात आपण आर्थिक योगदान देऊ शकता. त्याचबरोबर इच्छुक तज्ज्ञ व्यक्ती, संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, अनुभवी पशुपालक शेतकरी, स्वयंसेवक पत्रकार इ. लोक डांगी संवर्धनाच्या कामात प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात काम करू इच्छित असतील तर त्यांचे स्वागत आहे.
संपर्क करा अथवा भेटा...