@डॉ. श्रीकांत कार्लेकर
भारतातील अनेक मोठ्या शहरांसाठी हवा प्रदूषण धोकादायक पातळीच्याही वरपर्यंत वाढण्याचा काळ म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरचा कालखंड. गेल्या काही वर्षांपासून देशातील अनेक महानगरं त्याच दिशेनं वाटचाल करू लागली आहेत! दिल्ली हे या आपत्तीचं प्रातिनिधिक शहर म्हणून जगभरात याआधीच प्रसिद्धी पावलं आहे. दिल्ली, मुंबईसारख्या महानगरांच्या हवेत साचणारे धूर आणि धुळीचे कण अभिशाप बनून लक्षावधी लोकांसमोर आरोग्याचं मोठं संकट उभं करीत आहेत.
दिल्ली हे आज जगभरात सर्वाधिक प्रदूषित शहर म्हणून ओळखलं जात आहे. एका अभ्यासानुसार दिल्ली शहरात दर वर्षी हजारो लोक प्रदूषणामुळे मृत्युमुखी पडतात. भारतातील मोठ्या शहरातील वाहनांचं वाढतं प्रमाण, औद्योगिक उत्सर्जन, बांधकामं आणि दिल्लीसारख्या शहरांच्या आजूबाजूच्या शेतजमिनीत तृण जाळण्याच्या घटना (Stubble burning) यामुळे प्रदूषणाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. दिल्लीत 2.5 मायक्रोमीटरपेक्षा कमी आकाराच्या तरंगत्या घन पदार्थांचं (Suspended Particulate Matter ) प्रमाण डिसेंबर 2024 मध्ये एक घन मीटर हवेत 232 मायक्रोग्रॅम इतकं प्रचंड होतं. मुंबईत ते सरासरी 154 मायक्रोग्रॅम, तर पुण्यात 211 मायक्रोग्रॅम इतके नोंदले गेले. हे प्रमाण 60 मायक्रोग्रॅम एवढंच अपेक्षित आहे. 2.5 मायक्रोमीटरपेक्षा लहान आकाराचे आगीतून आणि डिझेल ज्वलनातून हवेत पसरणारे कण वातावरणात बराच काळ तरंगत राहतात आणि माणसांच्या फुप्फुसांत सहज प्रवेश करतात. यामुळे शहरात नागरिकांच्या श्वसनाच्या तक्रारीत मोठी वाढ तर झाली आहेच, शिवाय तापमानात चढउतार होत राहणं, दृश्यमानता (Visibility) कमी होणं, हवाई वाहतूक बंद पडणं आणि प्रदूषित हवेमुळे शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्याचे प्रसंग ह्या घटनांतही वाढ होतेच आहे.
दिल्लीमध्येे हवा प्रदूषणाची ही पातळी इतक्या धोकादायक अवस्थेला पोहोचली आहे की, दृश्यमानता कमी झाल्यामुळे होणारे रस्त्यांवरचे अपघात, विमानांची उड्डाणे रद्द होण्याच्या घटना यात दरवर्षी वाढच होत आहे. दिल्ली हे शहर एक मोठं ’गॅस चेंबर’ झालंय! 3 डिसेंबर 2017 रोजी आंतरराष्ट्रीय संघाच्या खेळाडूंनी मास्क लावून क्रिकेट खेळ खेळण्याचा अभूतपूर्व प्रसंग नवी दिल्लीच्या फिरोजशहा कोटला मैदानावर भारत-श्रीलंका यांच्यातील तिसर्या कसोटीत घडला होता ते अनेकांना आठवत असेलच.
भरपूर झाडांची लागवड, सीएनजीवर धावणारी वाहनं, पर्यावरण हितैषी दिल्ली मेट्रोची सुरुवात, सम-विषम तारखेला केवळ तशाच क्रमांकाची वाहने रस्त्यावर आणायची सक्ती असे प्रयत्न होऊनही शहरातील मोटरगाड्यांची वाढती संख्या, वाढती बांधकामं आणि आजूबाजूच्या ग्रामीण भागाकडून शहराकडे वाहत येणार्या धुराचं वाढतं प्रमाण यामुळे हे संकट आजही कमी होण्याची लक्षणं नाहीत.
दिल्लीप्रमाणेच ब्रिटिश कोलंबिया (कॅनडा), शांघाय, बीजिंग (चीन), लंडन (यू.के.), ग्लासगो, एडीनबर्ग (स्कॉटलंड), मेक्सिको सिटी, सँटियागो (चिली), तेहरान (इराण), लॉस अँजेलीस (कॅलिफोर्निया), उल्लून बाटर (मंगोलिया), कालीमंतान (आग्नेय आशिया) अशी अनेक जागतिक शहरं आज ह्या विळख्यात सापडली आहेत. भारतातही पटना, ग्वाल्हेर, रायपूर, अहमदाबाद, कानपूर, आग्रा अशी अनेक शहरंही ह्या समस्येने बाधित आहेत. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथेही परिस्थिती जवळपास तशीच आहे. हे चित्र आता केवळ भारतापुरतंच मर्यादित राहिलं नसून जगातील अनेक शहरं या विषारी हवा प्रदूषणाचा सामना करीत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) अहवालानुसार शुद्ध हवेचे सगळे मापदंड ओलांडल्यामुळे बर्याच शहरांतील 80 टक्क्यांपेक्षा जास्त जनसंख्या यामुळे श्वसन विकारांनी बाधित होत चालली आहे. हवेच्या ह्या प्रदूषणाचा इतिहास पाहता असं लक्षात येतं की, माणसानं जेव्हा आगीचा शोध लावला आणि आगीचा उपयोग लाकूडफाटा जाळण्यासाठी सुरू केला तेव्हाच हवेच्या मानवनिर्मित प्रदूषणाला सुरुवात झाली. त्यानंतर हळूहळू अशा जळण्यातून तयार झालेला धूर दाट लोकसंख्येच्या नागरी वस्त्यांवर तरंगताना दिसू लागला. औद्योगिक क्रांतीनंतर तर कोळसाही जाळला जाऊ लागल्यावर प्रदूषणाचं हे संकट आणखीनच गडद होत गेलं.
इ.स. 1850 च्या दरम्यान कोळशाचा धूर आणि धुके (Pea Soup) याच्या प्रचंड मोठ्या काळ्या दाट थरानं लंडन शहर काळवंडून जाऊ लागलं. यानं अनेकांचे बळीही घेतले. यावरूनच 1911 च्या सुमारास या प्रदूषण प्रकाराला स्मॉग ( smog) म्हणजेच धूरधुके किंवा धुरके असं नाव दिलं गेलं. धूरधुके हे एक प्रकारचं दृश्य स्वरूपातलं प्रदूषण असून ते नायट्रोजन ऑक्साइड, सल्फर ऑक्साइड, ओझोन, कार्बन मोनॉक्साइड आणि धूर ह्यांचं मिश्रण असतं. आजकाल वाहनांतून बाहेर पडणार्या धुरामुळे ह्या प्रदूषणात मोठीच भर पडत आहे. औद्योगिक शहरातील हवेत कारखान्यातील धुरामुळे जलशोषक अणूंचं प्रमाण जास्त असतं. यामुळे सांद्रीभवन होऊन मोठ्या प्रमाणात काळपट धूरधुक्याची निर्मिती होते. ज्वालामुखीच्या उद्रेकानंतरही बाहेर पडणार्या सल्फर डायऑक्साइड व इतर सूक्ष्म कणांमुळे असे धूरधुके तयार होते. याला व्हॉग ( vog) असं म्हटलं जातं.
हवेच्या प्रदूषणाची पातळी प्रामुख्यानं कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, सल्फर ट्रायऑक्साइड, नायट्रिक व नायट्रोजन ऑक्साइड, मिथेन, क्लोरोफ्लुरोकार्बन आणि हवेत तरंगणारे सूक्ष्म घन पदार्थ व द्रवरूपी थेंब यामुळे वाढत असते. मोठमोठ्या शहरांवर आजकाल प्रकाश रासायनिक धूरधुके (Photochemical smog) व औद्योगिक धूरधुके ( Industrial smog) अशा दोन मुख्य प्रकारच्या धूरधुक्यांचे प्रचंड थर आढळून येत आहेत. वर सांगितलेल्या सर्व प्रकारच्या प्रदूषकांत सूर्यप्रकाशामुळे होणार्या परस्परक्रिया ज्या धूरधुक्याच्या निर्मितीस कारण होतात त्यास प्रकाश रासायनिक धूरधुके म्हटले जाते. वाहनातून बाहेर पडणार्या धुरामुळे पिवळसर तपकिरी रंगाचा नायट्रोजन ऑक्साइड तयार होतो. मोठ्या शहरात सकाळच्या स्वच्छ सूर्यप्रकाशानंतर दुपारपासूनच ह्या पिवळसर तपकिरी धूरधुक्याचा थर दिसू लागतो. यामुळे डोळ्यांची आग होऊन ते चुरचुरू लागतात. भरपूर ऊन अनुभवणार्या उबदार व कोरड्या हवेच्या नागरी वस्त्यांवर प्रकाश रासायनिक धूरधुक्याचा प्रभाव जास्त असतो.
थंडीच्या दिवसांत दिल्ली, मुंबईसारख्या औद्योगिक शहरांतील लोकांना सल्फर डायऑक्साइडमुळे तयार झालेल्या सल्फ्युरिक अॅसिडच्या तरंगत्या कणांमुळे व उडणारी राख, परागकण, सिमेंटची धूळ, गिरणीतील पीठ पदार्थ, कोळशाची राख व रंगद्रव्ये अशा सूक्ष्म तरंगत्या पदार्थांमुळे (Aerosols) तयार झालेल्या धूरधुक्याचा सामना करावा लागतो. चीन, भारत, युक्रेन व काही पूर्व युरोपिअन देशांत जिथं प्रदूषण नियंत्रणाचा फारसा प्रयत्न केला जात नाही तिथं मोठ्या प्रमाणावर कोळसा ज्वलनामुळे अशा प्रकारच्या धूरधुक्याचं प्रमाण वाढलेलं दिसतं.
कोळसा आणि लाकडे यांच्या ज्वलनातून आणि धुळीची वादळं, जंगलातील आगी याचबरोबर भारतातील डोंगराळ भागातील सखल दर्याखोर्यात अशी प्रदूषित हवा मोठ्या प्रमाणावर साठविली जाते. शेताची भाजावळ (Crop burning ) आणि बांधकामांच्या ठिकाणी निर्माण होणारी प्रचंड धूळ यांचाही यात हातभार असतोच.
शहरांबरोबर प्रदूषणाचे हे लोण आता शहरांच्या जवळ असलेल्या खेड्यांच्या दिशेनं सरकलं आहे. वर्ष 2023 मध्येेच खेड्यातील 80 टक्के मृत्यू हे याच कारणांमुळे झाल्याची आकडेवारी उपलब्ध आहे. शेणाच्या गोवर्या आणि लाकूड यांच्या जाळण्यातून उत्पन्न होणारे प्रदूषित वायू याला कारणीभूत होते, असे ही माहिती सांगते. शेतात केलेल्या भाजावळीमुळं दिल्ली, मुंबई, चेन्नईसारख्या महानगरांच्या दिशेनं जो धूर पसरतो त्यातून ही प्रदूषके शहरातील बांधकामांची धूळ, वाहनातून बाहेर पडणारा धूर, फॅक्टरी आणि इतर उद्योगांतून सोडला जाणारा धूर यात मिसळून जातो. चुलींच्या वापरातून भारतात 25 टक्के हवा प्रदूषण होते. शहरांजवळच्या वीटभट्ट्याही याला हातभार लावतातच.
एका सर्वेक्षणानुसार, भारतातील विषारी वायू प्रदूषणाची ही समस्या नक्कीच फार जुनी आहे. आजकाल प्रत्येक शहराभोवती आणि आजूबाजूच्या भागांत हे वायू प्रदूषण मोजण्याचं प्रमाण वाढल्यामुळे ते लक्षात येऊ लागलं आहे इतकंच. प्रदूषण मोजण्याचं हे प्रमाण सगळीकडे जसजसं वाढेल तसं भारतातील आणखी अनेक ठिकाणांनी ही पातळी यापूर्वीच गाठली असल्याचंही लक्षात येण्याची शक्यता आहे.
शहराचा भूगोल, भूरूपिकी (Geomorphology), हवामान, लोकसंख्येची घनता, औद्योगिक संकुलांची संख्या, छोट्या मोटारी व ट्रक यांची संख्या आणि इंधनांचा वापर अशा सगळ्याच गोष्टींवर हवा प्रदूषणाचं प्रमाण ठरतं. जिथं पर्जन्यवृष्टी किंवा हिमवृष्टी जास्त असते अशी शहरं मात्र नैसर्गिकदृष्ट्या या प्रदूषणातून मुक्त असतात. समुद्रकिनारी असलेली शहरंही ह्या बाबतीत थोडी जास्त नशीबवान असतात, कारण जमिनीकडून समुद्राकडे वाहणार्या हवेतील तरंगती प्रदूषकं समुद्राकडून येणार्या खारट समुद्री हवेच्या फवार्यामुळे नष्ट केली जातात. किनार्यांवर उंच इमारती असल्या तर मात्र हा परिणाम थोडा कमी दिसतो. जिथं वारे जास्त वेगाने वाहतात तिथंही हवेतील प्रदूषकं इतरत्र वाहून नेली जातात. मात्र ज्या दिशेनं ती वाहत जातात त्या बाजूकडील ठिकाणं
प्रदूषणग्रस्त होतात
मोठ्या शहरातील उंच इमारतींमुळे वार्याचा वेग रोखला जातो आणि हवेतील प्रदूषकं तिथंच घुटमळत राहतात. डोंगराळ प्रदेशातील नागरी वस्त्यांतही सखल भागात प्रदूषकं साचून राहतात. ती इतरत्र पसरू शकत नाहीत. तापमानाच्या विपरीततेमुळे (Temperature Inversion) धुकं व त्याबरोबर प्रदूषकही दरीत साचतात आणि प्रदूषण पातळीत वाढ होते. अनेक पर्यावरणवाद्यांच्या मते नागरीकरण (Urbanization) ही खरं म्हणजे समस्या नसून नागरी वस्त्यांची सर्व दिशांनी होणारी वाढ (Urban Sprawl) ही समस्या आहे! ह्यामुळे आजूबाजूच्या मोठ्या ग्रामीण, प्रदूषणविरहित आणि स्वच्छ परिसराचा र्हास होण्याची शक्यता वाढत असते.
शहरं अधिक शुद्ध, स्वच्छ हवेची, प्रदूषणमुक्त व जगण्यासाठी योग्य बनविणं हे खरं तर ह्या समस्येचं योग्य उत्तर आहे. ह्यासाठी शहरांचं पर्यावरणहितैषी अशा ग्रीन सिटी किंवा इको सिटीमध्ये रूपांतर करणंही आता गरजेचं आहे. अशा शहरात मुख्य भर हा प्रदूषणावर पूर्ण नियंत्रण, कचरानिर्मितीत घट आणि सौर शक्ती वापरून त्याचा पुनर्वापर यावर असावा. शहरातील व आजूबाजूच्या प्रदेशांतील जैवविविधतेचं रक्षण करणं व त्यात वाढ होण्यासाठी प्रयत्न करणं या गोष्टींनाही इथं प्राधान्य हवं. ही शहरं लोकाभिमुख हवी, ती वाहनाभिमुख (car oriented) नसावी.
मुंबई, कोलकाता, चेन्नई यांसारख्या किनार्याजवळच्या शहरातील खाड्या आणि नद्या वारंवार स्वच्छ करून, त्यांच्या पर्यावरणाची सुधारणा किंवा पुनर्निर्मिती तसंच दिल्ली, मुंबई, पुणे, बंगळुरू अशा शहरांच्या नदी पर्यावरणात सुधारणा, वृक्षांची भरपूर लागवड, टेकड्यांच्या पर्यावरणाची सुरक्षितता आणि शहराच्या सर्व दिशांनी वाढणार्या सीमेवर नियंत्रण असे अनेक उपाय प्रदूषण नियंत्रणाच्या संदर्भात अभ्यासकांनी मांडले आहेत. वर्षागणिक वाढणारी वाहनसंख्या आणि पर्यावरणाचा र्हास करणारी अनिर्बंध बांधकामं यावर नियंत्रण ठेवलं तरी दिल्ली आणि अर्थातच पुणे, मुंबईसारख्या शहरांतील हवा प्रदूषणाची ही समस्या कमी करता येईल. लोकांची मानसिकता बदलणं आणि त्यांचं सहकार्य शहर विकासाच्या व प्रदूषण निर्मूलनाच्या सर्व चांगल्या योजनांना मिळणं हे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं.