सावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदीबाई जोशी वैद्यकीय शिक्षणाचे व डॉक्टर बनण्याचे ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होत्या. यासाठी आनंदीबाईंना प्रेरणा दिली आणि सातत्याने प्रोत्साहन दिले ते त्यांचे पती गोपाळ जोशी यांनी. जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही, हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले.
मूळची कल्याणची... पुण्यात जन्मलेली... लग्नानंतर कल्याणमध्ये काही काळ राहिलेली... दगावलेल्या मुलामुळे व्यथित होऊन वैद्यकाचे शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत जाऊन राहिलेली... डॉक्टरीच्या दोन वर्षांच्या शिक्षणाच्या काळात क्षयरोग जडल्याने भारतात परत आल्यावर पुण्यात मृत्यूला सामोरी गेलेली... अमेरिकेत ज्या कुटुंबाच्या आश्रयाने राहिली त्या कुटुंबाने तिच्या अस्थी मागवून तिचे थडगे आपल्या कुटुंबाच्या खाजगी स्मशानात बांधले... एक तरुण हिंदू ब्राह्मणकन्या.... परदेशात शिक्षण घेऊन डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री... असा गौरवपूर्ण उल्लेख झालेली कर्तृत्ववान स्त्री म्हणजेच आनंदीबाई गोपाळ जोशी!
पुण्यात आजोळी जन्मलेल्या यमुना गणपतराव जोशीचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी त्यांच्याहून 20 वर्षांनी मोठे असणार्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला. गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरचे. लग्नानंतर गोपाळरावांनी पत्नीचे यमुना हे नाव बदलून आनंदीबाई ठेवले. वयाच्या चौदाव्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला, परंतु वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे मूल फक्त दहा दिवस जगले. आनंदीबाईंच्या जीवनात हा एक महत्त्वाचा टप्पा ठरला. या घटनेनंतर त्यांनी डॉक्टर होण्याचे ठरविले. गोपाळरावांनी आनंदीबाईंना मिशनरी शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून प्रयत्न केला. जोशी यांनी कोलकात्यात बदली घेतल्यावर तिथे आनंदीबाई संस्कृत आणि इंग्लिश वाचणे-बोलणे शिकल्या.
गोपाळराव मुळात कल्याणला पोस्ट ऑफिसात कारकून होते. नंतर त्यांची अलिबाग आणि कोलकाता येथे बदली झाली. त्या काळातही त्यांचा महिला शिक्षणाला पाठिंबा होता. त्या काळातील इतर पती आपल्या पत्नींना स्वयंपाक न केल्याबद्दल मारहाण करत. याउलट गोपाळराव आपल्या तरुण पत्नीला अभ्यास न केल्याबद्दल मारहाण करत. कारण पत्नीने वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर बनावे, असा त्यांचा आग्रह होता. आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे, हे कळल्यावर ते लोकहितवादींची शतपत्रे वाचून दाखवू लागले. त्यांनी आपल्या पत्नीस इंग्रजी भाषा शिकविण्याचे ठरविले.
आनंदीबाईंच्या वैद्यकीय शिक्षणासाठी गोपाळरावांनी अमेरिकेत पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याची पूर्वअट होती. धर्मांतर करणे त्यांना मान्य नव्हते. पुढे गोपाळरावांच्या चिकाटीमुळे आनंदीबाईंना ख्रिस्ती धर्म न स्वीकारता 1883 मध्ये, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया’मध्ये प्रवेश मिळाला. तिथे जाण्यापूर्वी तत्कालीन भारतीय समाजाकडून आनंदीबाईंच्या डॉक्टर होण्याला खूप विरोध झाला. त्यावेळी आनंदीबाईंनी कोलकाता येथे एक भाषण केले. त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची आवश्यकता किती आहे याचे ठोस प्रतिपादन केले आणि वर हे स्पष्ट सांगितले, “मला यासाठी धर्मांतर करण्याची काही गरज नाही. मी माझा हिंदू धर्म व संस्कृती यांचा केव्हाच त्याग करणार नाही. मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येऊन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायचे आहे.” आनंदीबाईंचे हे भाषण लोकांना खूप आवडले. त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच; पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनीदेखील 200 रुपयांचा फंड जाहीर केला.
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर दोनच वर्षांत अभ्यासक्रम पूर्ण करून मार्च 1886 मध्ये आनंदीबाईनी एम.डी. ही पदवी मिळवली. एम.डी.साठी त्यांनी ’‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’‘ या विषयावर प्रबंध लिहिला. एम.डी. झाल्यावर व्हिक्टोरिया राणीकडून त्यांचे अभिनंदन झाले. हा प्रवास करताना त्यांना गोपाळरावांचा पाठिंबा होता. त्यांच्या पदवीदान समारंभाला गोपाळराव स्वतः अमेरिकेत गेले होते. पंडिता रमाबाई यांनीसुद्धा या समारंभात भाग घेतला. एम.डी. झाल्यावर आनंदीबाई भारतात आल्यावर त्यांना कोल्हापूरमधील ‘अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल’मधील स्त्री-कक्षाच्या प्रमुख म्हणून नेमणूक झाली.
केवळ 21 वर्षांच्या जीवनयात्रेत आनंदीबाईंनी भारतीय स्त्रियांसाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा आणि ज्ञानाचा फायदा जनतेला होऊ शकला नाही. मात्र ’चूल आणि मूल’ म्हणजेच आयुष्य असे समजणार्या महिलांना त्या काळात आनंदीबाई जोशी यांनी आदर्श व मानदंड घालून दिला. अमेरिकेत असतानाच आनंदीबाईंची प्रकृती ढासळली. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा फुले स्त्रीशिक्षणासाठी प्रयत्न करत असतानाच आनंदी-गोपाळ हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते. ‘जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाही’ हे या जोडप्याने समाजाला सिद्ध करून दाखवले.
आनंदीबाई यांच्या जीवनाचा आढावा घेणारा ’आनंदी गोपाळ’ हा मराठी चित्रपट फेब्रुवारी 2019 मधे प्रदर्शित झाला. दिग्दर्शक होते, समीर विद्वांस. या चित्रपटाला 18व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या मराठी विभागात पहिला पुरस्कार मिळाला. आनंदीबाई जोशी यांच्या संघर्षगाथेवर अंजली कीर्तने यांनी तयार केलेल्या ‘आनंदीबाई जोशी - अ टॉर्चविअरर’ या डॉक्युड्रामात दिलीप प्रभावळकर यांनी गोपाळराव जोशींची तर अनुजा बिनीवाले व क्षमा खांडेकर यांनी आनंदीबाईंची भूमिका केली आहे. त्या लघुपटालाही महाराष्ट्र सरकारचा सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला.