वराहमिहिरांचे जलशास्त्र

विवेक मराठी    22-Apr-2025
Total Views |
@डॉ. सुमंत पांडे 9764006683
वराहमिहिर हे कृषी व जलक्षेत्रातील शास्त्रज्ञ समजले जातात. ‘बृहत् संहिता‘ या त्यांच्या ग्रंथात जलशास्त्रातील मेघवर्णन, मेघोत्पत्ती, जलगर्भोत्पत्ती, पर्जन्यवृष्टी या संदर्भात विस्तृत विवेचन आहे. जमिनीच्या पोटात असलेले पाणी कसे शोधावे याविषयीची शास्त्रशुद्ध माहिती त्यात आहे.
vivek
 
प्राचीन भारतीय वाड्:मयात (वेद, रामायण, महाभारत, बृहत् संहिता, कौटिल्याचे अर्थशास्त्र, काश्यपियकृषीसूक्ती आदी ग्रंथ) शेती, जमीन, जल, नक्षत्र, धान्य, पेरणी, साठवणूक यांचा विचार केला आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रात शेतीच्या सर्व अंगोपांगांचा उल्लेख केलेला दिसून येतो. याच परंपरेतील अवंतीनगरातील वराहमिहिर (इ.स. 505 ते 587) ऋषींचा उल्लेख ‘थोर ज्योतिषशास्त्रज्ञ‘ म्हणून होत असला तरी कृषी, जल आणि पर्यावरण क्षेत्रातही त्यांचे स्थान अढळ आहे. उज्जैनच्या चंद्रगुप्त विक्रमादित्याच्या राजसभेतील नवरत्नांपैकी ते एक असल्याचे मानले जाते. वराहमिहिरांनी ‘बृहत् संहिता‘, ‘लघुजातक‘,‘बृहत् जातक‘, ‘पंचसिद्धंतिका‘, ‘बृहत् विवाहपतल‘,‘स्वल्पविवाहपतल‘, ‘होरा रत्न‘, ‘पुष्करण्यादि पद्धती‘, ‘तडाग पद्धती‘ आदी ग्रंथांची निर्मिती केली. अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ‘बृहत् संहिता‘, ‘पुष्करण्यादी‘, ‘तडाग पद्धती‘ हे जलाशी संबंधित असलेले महत्त्वाचे ग्रंथ आहेत. वराहिमिहिरांनी बृहत् संहितेत ‘अर्भलक्षणाध्याय‘, ‘गर्भधारणाध्याय‘, ‘प्रवर्षणाध्याय‘, ‘दकार्गलाध्याय‘ या चार अध्यायांत मेघवर्णन, मेघोत्पत्ती, जलगर्भोत्पत्ती, पर्जन्यवृष्टी, तिचा काळ व प्रकार, पृथ्वीवर पडलेले पाणी भूगर्भात जिरते ते कोठे असेल? ते कसे ओळखावे? ते कसे बाहेर काढावे? कसे साठवावे? व कसे शुद्ध राखावे याची चर्चा केली आहे.
 
मेघांच्या उदरात पाण्याची गर्भधारणा
 
वराहमिहिरांची सैद्धांतिक बैठक पर्जन्याच्या उपलब्धतेवर आधारित असल्याचे त्यांच्या आरंभीच्या श्लोकावरून स्पष्ट होते.
 
अन्नं जगत: प्राणा: प्रावट् कालस्य चान्नप्रायात्तम् ।
यस्मादत्तः परीक्ष्य : प्रावट्कालः प्रयत्नेन् ॥
 
अर्थ : अन्न हे विश्वाचे प्राण आहेत. ही अन्ननिर्मिती पर्जन्यावर अवलंबून आहे. म्हणून (अन्नाचा विचार करण्यापूर्वी) पावसाचा विचार करणे अगत्याचे आहे. या अनुषंगाने त्यांनी मेघावर चेतनत्वचा (स्वतःच्या अस्तित्वाचे भान) आरोप केला आहे. यातून त्यांनी पर्जन्यप्राप्तीसाठी मेघ गर्भधारणेची संकल्पना मांडली आहे. तिचा परामर्श घेऊ या. सस्तन प्राण्यात पुनरुत्पत्ती होताना गर्भधारणा, गरोदरावस्था व प्रसूती असा क्रम असतो. तसाच क्रम पावसाबाबतही असतो. मेघांच्या उदरात पाण्याची गर्भधारणा होते व जलगर्भ मेघांच्या उदरात साधारण साडेसहा महिने (195 दिवस) राहून पक्व होतो आणि मेघातून जलरूपाने त्याची प्रसूती होते. त्यासाठी पाणी, वायू, ध्वनी, विद्युत व धुलियुक्त मेध गर्भधारणेची मूलभूत कारणे आहेत, असे वराहमिहिर सांगतात. पण त्यासाठी हे पाचही घटक एकत्र व एकाच वेळी असणे अनिवार्य नाहीत. यापैकी दोन, तीन वा चार घटक असले तरीही गर्भधारणा होते. पण पाचही घटक असतील तर गर्भ उत्कृष्ट प्रतीचा होतो व असा गर्भ 100 चौ.योजन (1 योजन = 25 चौ. किमी) म्हणजे साधारण 2500 चौ. किमी क्षेत्रावर भरपूर जलवर्षाव करण्याच्या क्षमतेचा असतो. एक, दोन वा तीन घटक कमी असतील तर अर्ध्या अर्ध्या प्रमाणात जलवर्षाव कमी होतो. एकही घटक नसेल तर अर्थातच गर्भधारणा होतच नाही व अवर्षण पडते. या सिद्धांताला अलीकडे नासाच्या संशोधनातून बळकटी मिळाली आहे. भारतीय जलशास्त्र प्रगत असल्याचा हा बळकट पुरावा आहे.
 
 
 
 
अशी होते मेघ गर्भधारणा
 
मेघांच्या गर्भधारणेचे एकूण वातावरणावर परिणाम होतात. त्यातील प्रमुख लक्षणे या प्रमाणे-मार्गशीर्ष व पौष महिन्यात पूर्व, ईशान्य व उत्तर दिशांकडून प्रसन्न व शीतल वारा वाहणे. सूर्य-चंद्रावर दाट पण पारदर्शक खळे निर्माण होणे. आकाराने मोठे व रंगाने निळे ढग आकाशात शांतपणे मंद-मंद फिरत राहणे. तसेच पक्षी पूर्व, ईशान्येकडे मंजुळ ध्वनी करत उडतात. सूर्याकडे तोंड करून उडत नाहीत, अशी लक्षणे वैशाखापर्यंत दिसतात. मार्गशीर्ष ते पौषापर्यंत पूर्व संध्या व पश्चिम संध्या रक्तवर्ण होतात. त्या गडद असतात. फिकट नसतात. मार्गशीर्षात कडाक्याची थंडी पडत नाही, पौषात दाट धुके पडत नाही. माघात सोसाट्याचे वारे वाहू लागतात. फाल्गुनात मोठी वादळे होतात. सूर्याभोवती अर्धवर्तुळाकार खळे पडते. चैत्र, वैशाखात कडक ऊन पडते. रात्री शीतल असतात. असे वातावरण राहिल्यास गर्भधारणेस अडथळा येत नाही.
 
भारतीय महिने (आणि त्या महिन्यांशी समकालीन इंग्रजी महिने)
 
चैत्र (मार्च-एप्रिल)
 
वैशाख (एप्रिल-मे)
 
ज्येष्ठ (मे-जून)
 
आषाढ (जून-जुलै)
 
श्रावण (जुलै-ऑगस्ट)
 
भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर)
 
आश्विन (सप्टेंबर-ऑक्टोबर)
 
कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
 
मार्गशीर्ष (नोव्हेंबर-डिसेंबर)
 
पौष (डिसेंबर-जानेवारी)
 
माघ (जानेवारी-फेब्रुवारी)
 
फाल्गुन (फेब्रुवारी-मार्च)
 
मेघ गर्भपाताची लक्षणे
 
काही वेळा मेघांचा गर्भपात होतो. त्यावेळी वृष्टी होत नाही. गर्भपाताची लक्षणे म्हणजे उल्का पडणे, धुळीचे वादळ होणे, आकाशात आग लागल्यासारखा प्रकाश दिसणे व पसरणे, भूकंप होणे, अवेळी इंद्रधनुष्य दिसणे, पावसाच्या पाण्यातून रक्त, बेडूक, मासे इ. प्राणी पडणे.
 
पावसाची सूर्यनक्षत्रे
 
मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा उत्तरा आणि हस्त ही नऊ नक्षत्रे(म्हणजे एकूण 27 नक्षत्रांपैकी तिसरा भाग) पावसाची सूर्यनक्षत्रे आहेत. मृग 7 जूनला लागतो व हस्त 10 ऑक्टोबरला संपते. म्हणजे 7 जून ते 10 ऑक्टोबर हाच खरा पावसाळा, चित्रा नक्षत्रावर (हस्तानंतरचे) पाऊस पडला तर पिकांना धोका संभवतो. स्वातीचा पाऊस समुद्रावर चांगला; कारण त्यामुळे मोती निर्माण होतात. (अर्थात हे सर्व उत्तर गोलार्धासाठी आहे. दक्षिणेत याच्या उलट) पाऊस नसल्यास कसा निर्माण करावा, यासाठी यज्ञ करण्याची योजना दिली आहे.
 
मेघवर्णन
 
पाऊस ढगांतून येत असल्याने कोणत्या ढगांमुळे पाऊस पडतो किंवा पडत नाही याची कृषिऋषींनी निरीक्षणे करून ठेवली आहेत. मेघवर्णन व मेघलक्षण यावर पराशर ऋषींचा स्वतंत्र ग्रंथ आहे. वराहमिहिरांनी ‘बृहत् संहिते‘त मेघांचे वर्णन केले आहे. संध्यारागाने रंगलेले, नीलकमलाप्रमाणे निळे, संपूर्ण काळे पण पिवळ्या किनारीचे मोर किंवा बेडूक यांच्यासारखी गर्जना करणारे, आकाश व्यापणारे मोठे मेघ भरपूर वृष्टी करतात. उलट आकाराने लहान, रूक्ष, उंट, कावळा किंवा प्रेत यांच्या रंगाचे निःशब्द मेघ अशुभ असतात. पूर्वेला आलेल्या मेघांमुळे उत्तम धान्य येण्याची संभावना अधिक असते. ईशान्याचे मेघ अर्धेच दान करतात. वायव्य मेघ सोसाट्याच्या वार्‍यासह वृष्टी करतात. आग्नेयच्या मेघामुळे आगीचा धोका संभवतो.
 
 
शाश्वत भूजल
 
भूपृष्ठावरील वनस्पती, माती, वारूळ, खडक, वृक्ष, आदींमध्ये दिसणार्‍या रंग, रूप व लक्षणांवरून भूअंतर्गत जलशिरा शोधण्याचा मंत्र वराहमिहिरांनी दिला आहे. या जलशिरा म्हणजे ‘शाश्वत भूजल‘ होय. त्यांनी भूजल साठे शोधण्याची एकंदर 80 लक्षणे सांगितलेली आहेत. त्यांना आधारभूत मूळ संस्कृत श्लोक ’दकर्गलायध्याय’ या प्रकरणात दिले आहेत. आकाशातून पडलेले जे पाणी वाहून न जाता जमिनीत मुरते, ते जमिनीखालच्या भेगांमधून वाहू लागते व त्याचे प्रवाह बनतात, त्यांना शिरा किंवा नसा असे नाव दिले आहे. पावसाचे पडणारे पाणी चवीने व रंगाने सारखेच असते. पण जसजसे ते जमिनीत शिरू लागते तसतसे त्या-त्या भूमीच्या /मातीच्या गुणधर्मानुसार पाण्याची चव, रंग इ. गुणधर्म बदलतात. एकूण 10 शिरा असतात. आठ दिशांच्या मध्यावरील आठ महाशिरा आणि खालून वर वाहणारी ऊर्ध्वगामी शीर होय. 10 व्या शिरेचा तपशिल दिलेला नाही. म्हणजे याव्यतिरीक्त आढळणारी शीर दहावी मानावी. या सर्वांना उपशिरा असतात. ऊर्ध्वगामी शीर अत्यंत शुभ, पवित्र व उत्कृष्ट मानली आहे तर भूपृष्ठाला समांतर वाहणारी शिरा आहे. ज्या विहिरीला तळातून वर येणारे झरे असतात. ती जलाने परिपूर्ण असते व कधीही आटत नाही, असे वराहमिहिर सांगतात.
 
भूपृष्ठावरील लक्षणे
 
भूगर्भातील जलाचा शोध घेण्यासाठी वराहमिहिरांनी भूपृष्ठावरील काही लक्षणांची चर्चा केली आहे. आपल्याकडे भूगर्भातील जलसाठे शोधणार्‍यांचा एक वर्ग आहे. त्यांना पानाडे म्हटले जाते. त्यांचे ज्ञान या आडाख्यावरच अवलंबून असते. भूगर्भातंर्गत शिरांमुळे भूपृष्ठावरील वनस्पती, माती, रंग-रूपातील लक्षणांवरून अंतर्गत शिरांचा अंदाज करता येतो. तसेच पांढर्‍या मुंग्यांची, वाळवीची वारूळे काही प्रदेशात असतात. वारूळांमधून खूप आर्द्रता असते. त्यामुळे या मुंग्यांना (अथर्ववेदात त्यांना उपजीका म्हटले आहे) आत राहता येते. वारूळे करताना त्या थेट भूगर्भातील पाण्यापर्यंत जातात. त्यामुळे जमिनीवर वारूळ असणे हे खाली पाणी असल्याचे निदर्शक मानले गेले आहे. भूगर्भातील पाण्याचा शोध लावायचा असेल तर त्या प्रदेशाची भौगोलिक रचना, तेथील भूमीचे ज्ञान, मातीच्या विविध प्रकारांची माहिती, त्या प्रदेशात वाढणार्‍या किंवा अजिबात वाढू न शकणार्‍या वृक्ष व वनस्पती यांचा निकट परिचय आवश्यक आहे. वड, पिंपळ, औदुंबर, अर्जुन, निरगुडी, बोर, करंजी, आपटा, कवट, ताड या झाडांखाली पाणी सापडते. एखाद्या झाडाची फांदी, वाकलेली तार, लंबक अशा तर्‍हेच्या कोणत्याही अशास्त्रीय साधनांचा वराहमिहिरांनी उल्लेख केलेला नाही. त्यांचे उपाय व विधाने वनस्पतिशास्त्र व भूगर्भशास्त्रावर आधारित आहेत.
 
तलाव, विहीर व पाणी
 
वराहमिहिरांनी तलाव, विहीर व जलशुद्धीकरणासंदर्भातही मौलिक विचार आपल्यापुढे ठेवला आहे. पाणी साठवण्याचे तत्कालीन उपाय म्हणजे तलाव बांधणे. यासाठी त्यांनी तपशिलाने वर्णन केले आहे. पाणी शुद्ध कसे ठेवावे यासाठी त्यांनी अंजन, भद्रमुस्ताचे चूर्ण, उशीर, राजकोष, आतक व अमलंक यांचे चूर्ण करून ते कलक फळाच्या चूर्णात मिसळून विहिरीत - तलावात टाकावे. त्यामुळे गढूळ, खारट पाणीसुद्धा चवदार सुगंधित व पाचक होते. रोहिणी, पुष्य, मघा, उत्तरा, उत्तरा-आषाढ, उत्तरा -भाद्रपदा, हस्त, अनुराधा, धनिष्ठा आणि शततारका ही नक्षत्रे विहीर खोदण्यास किंवा तलाव बांधण्यास शुभ आहेत, असे ते सांगतात. याचा आज उपयोग कितपत होईल हे निश्चित सांगता येणार नाही.
 
 
वराहमिहिरांची उपयुक्तता
 
पावसाचे अंदाज आपल्यासाठी आजही अत्यंत महत्त्वाचे आहेत.
 
वराहमिहिरांनी पर्जन्यमानाचा तपशील दिला आहे. मूळ बृहत् संहितेत दिलेली जलगर्भधारणेची लक्षणे नीट अभ्यासून तसे अंदाज वर्तवता येतील का याचा अभ्यास होणे आवश्यक आहे. विशेषतः भूगर्भातील पाण्याचा अंदाज घेताना या ग्रंथाची मदत नक्कीच होईल. यापूर्वी कौटिल्याने पर्जन्यमापनाचे परिमाण निश्चित केले होते. पर्जन्यमापकाची कल्पना मांडून तो तयार करण्याची पद्धत देऊन द्रोण हे त्याचे परिमाण निश्चित केले होते. चार आढकाचा एक द्रोण हे प्रमाणही त्याने दिले होते. त्याच्या पुढे जाऊन एक आढक म्हणजे पन्नास पळे असा अधिक तपशील वराहमिहिरांनी दिला आहे.
 
’हस्तिविशालम् कुंडकम् अधिकृत्य अंबुकप्रमाण निर्देशः ।
पंचाशफलम आढक अनेन मिनुयात जलंपतितं ॥’ (अ.23)
 
अर्थ - एक हात व्यासाचे कुंड पाऊस मोजण्यासाठी वापरावे. 50 पळ म्हणजे एक आढक होय आणि 4 आढक म्हणजे एक द्रोण होय.
 
थोडक्यात, जलमेघचक्र आणि पर्जन्यमान तसेच भूगर्भजल व ते बाहेर काढण्याचे तंत्र, पर्जन्यमापनाचे परिणाम आदी क्षेत्रांत वराहमिहिरांनी केलेले संशोधन हे भारतीय जलसंस्कृतीच्या प्रगत ज्ञानाचे उत्तम उदाहरण होय. एवढ्या प्रचंड ताकदीचा जलशास्त्रज्ञ भारतात निर्माण व्हावा हे आपले केवढे भाग्य! वराहमिहिरांच्या जलशास्त्राचा भविष्यात सखोल अभ्यास अपेक्षित आहे.
 
लेखक नदी आणि जल अभ्यासक, माजी कार्यकारी संचालक
जलसाक्षरता केंद्र, यशदा पुणे