मागील वीस ते पंचवीस वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील अनेक शेतकरी भेंडीचे विक्रमी उत्पादन घेत आहेत. सुधारित तंत्राचा वापर केल्याने शेतकर्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत आहे. त्यामुळे ठाणे जिल्हा भेंडीचे पीक घेण्यात अग्रेसर झाल्याने त्यास ‘ठाणे पॅटर्न’ म्हणून ओळखले जात आहे. बाजारपेठेतही ठाणे जिल्ह्यातील भेंडीला मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
लेखाचा हा मथळा वाचून तुम्हांला आश्चर्य वाटेल. कारण ठाणे जिल्हा हा प्रामुख्याने औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठाणे ते डोंबिवली, कल्याण ते भिवंडी, मुरबाड ते शहापूरपर्यंत अनेक कंपन्या, कारखाने आणि उद्योग प्रकल्प उभे आहेत. पावसाळ्याच्या दिवसांत या जिल्ह्यामध्ये आपल्याला ’वाडा कोलम’, ’जया’, ’रत्ना’, ’मुरबाड झिनी’ ही भातपीके हिरवे, किंचित पिवळसर वस्त्र नेसून उभी राहिलेली दिसतात. उन्हाळ्याच्या दिवसात बदलापूरातील काळीसावळी ’जांभळे’ बाजारपेठांतून दिसू लागतात. शहापूर-मुरबाडच्या जंगलातील गुळवेल, हिरडा, बेहडा, मोहफुले, शिकेकाई या वनदेवता भेटतात. याच वाटेवर मोगर्याच्या ताटव्यांनी वातावरण सुगंधी व उल्हसित झालेले दिसते. या प्रवासात आणखी एक मोठा आनंद लाभतो. तो म्हणजे शेतात दूरवर पसरलेल्या हिरव्यागार भेंडी लक्ष वेधून घेतात. ही ठाण्याची निराळी ओळख.
चमचमीत चविष्टपणासाठी ख्याती पावलेली भाजी म्हणजे ’मसाला भेंडी’. जेवणात भेंडीचा समावेश नसलेली कुटुंबे सर्वसाधारणपणे आपल्या देशात आढळणे कठीण. मराठी भाषेत ’भेंडी’ हा शब्द अनेकार्थांनी वापरलेला आहे. ’भेंडीसारखा चिकटलेला’ हा वाक्यप्रचार अनेक वर्षांपासून भाषा व्यवहारात दिसून येतो. इंग्रजी भाषेत भेंडीला ’लेडी फिंगर’ म्हटले जाते. ती ’माल्व्हेसी’ या वनस्पती कुळातील असून तिचे शास्त्रीय नाव आबेलमोशस एस्कुलेंटस’ असे आहे. तिचा उगम आफ्रिका खंडात झाला असला तरी भारत हा जगातला सर्वात मोठा भेंडी उत्पादक देश मानला जातो.
भेंडी ही पौष्टिक गुणधर्माने युक्त आहे. हृदयरोग, मधुमेह, पचन समस्या यासह बर्याच रोगांना प्रतिबंधित करण्यासदेखील मदत करते. ऊसापासून गूळ तयार करताना रस स्वच्छ करण्यासाठी भेंडीच्या खोडातील श्लेष्मल पदार्थ (चिकट विद्राव) वापरतात. रस गरम होत असताना तो विद्राव पाण्याबरोबर रसात मिसळतात. या रसापासून तयार केलेला गूळ आकर्षक असतो.
भारतात उन्हाळी भेंडीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. गुजरात, पश्चिम बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा ही राज्ये भेंडी उत्पादनात अग्रेसर आहेत. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, हरियाणा व झारखंड राज्यांचा क्रमांक लागतो.
भारतीय भाजीपाला संशोधन संस्थेने विकसित केलेली ’काशी चमन’ ही भेंडीची जात उत्तर भारतात लोकप्रिय आहे. याखेरीज ’पुसा सावनी’, ’पुसा मखमली’, ’किरण’, ’अर्का’, ’अनामिका’, ’मंजिमा’ यासारख्या भेंडीच्या जातींचा लौकिक आहे. महाराष्ट्रात ’कोकण भेंडी’, ’परभणी क्रांती’, ’फुले विमुक्ता’, ’फुले कीर्ती ’ अशा काही जातींची पावसाळी व उन्हाळी हंगामात पुणे, सोलापूर, नाशिक, सातारा, जळगाव, धुळे, अहिल्यानगर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
ठाण्यातील भेंडीचे चित्र
ठाणे येथील विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील कृषी अधिकारी पंकज बनसोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांत भेंडीचे ठाणे जिल्ह्यात उत्पादन वाढले आहे. त्यामुळे गाव-पाड्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. आज भेंडी हे पीक ठाणे जिल्ह्यातील दुर्गम भागात रोजगाराचे प्रमुख साधन बनले आहे. जिल्ह्यात सुमारे 1752 हेक्टर क्षेत्रावर भेंडीची लागवड केली जाते. यामध्ये कल्याण (50 हेक्टर), शहापूर (715 हेक्टर), मुरबाड (701 हेक्टर), भिवंडी (235) हेक्टर आणि उल्हासनगर (50 हेक्टर) या तालुक्यांचा समावेश आहे. हे सगळे चित्र विचार करायला लावणारे आहे. कारण या जिल्ह्यात टोमॅटो 69 हेक्टर, हिरवी मिरची 212 हेक्टर, वांगी 205 हेक्टर आणि उर्वरित भाजीपाल्याची 194 हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते. या भाजीपाल्यांच्या तुलनेत भेंडीचा आलेख हा चढता आहे. यामुळे आज ठाणे हा भाग ’भेंडीचा जिल्हा’ म्हणून ओळखला जात आहे.
मुरबाड भागात भेंडी लागवड कधीपासून सुरू झाली? याविषयी सांगताना इंदे गावातील ’जय जवान जय किसान’ गटाचे अध्यक्ष बुधाजी बंगाल पाटील म्हणाले,‘25-30 वर्षांपूर्वी आम्हाला भेंडी लागवडीविषयी काहीच माहिती नव्हती. देशावरचे (जुन्नर, ओत्तूर व भीमाशंकर) शेतकरी भातकापणी नंतर आमच्याकडे येऊन, ज्याच्याकडे पाणी आहे अशा शेतकर्याची खंडाने शेती करू लागले. भात कापणीनंतर जमिनीत ओलावा असायचा. शेत नांगरून भेंडी, काकडी, वाल, टोमॅटोचे पीक घेऊ लागले. त्यातून मुरबाड-शहापूरची माती भेंडीला पोषक असल्याचे निदर्शनास आले. तेव्हापासून आम्हांला भेंडीची माहिती मिळाली. यानंतर हळूहळू स्थानिक शेतकरी भेंडी उत्पादनाकडे वळू लागले. अलीकडे तालुक्यात जलसंधारणाची मोठी कामे झाली. मानिवली, जांभुर्डे, वांजळे, शिरोशी, ठाकूरवाडी, खांडपे धरणांतील पाण्यामुळे तालुक्यातील जमीन मोठ्या प्रमाणात ओलिताखाली आली आहे. या पाण्यामुळे शेतकरी उन्हाळी भेंडी मोठ्या प्रमाणात घेऊ लागला आहे. मुबलक पाणी असूनही आम्ही पारंपरिक पद्धतीने भेंडी लागवड करायचो, सरी पडायचो अन् त्याच्यावर बियाणे लावायचो, खताचा भरपूर प्रमाणात वापर करायचो. त्यामुळे मावा, हळद्या रोग, तुडतुडे, भुरी इ. रोगाचा प्रादुर्भाव व्हायचा शिवाय पानांवर ठिपके व शेंडा फळे पोखरणार्या अळीमुळे भेंडीचे अपेक्षित उत्पादन निघायचे नाही. पुढे सुधारित पद्धतीचा केलेला अंगीकार फायदेशीर ठरला.’
सुधारित भेंडी लागवड पद्धतीची किमया
कृषी अधिकार्यांनी वेळावेळी केलेल्या पाहणीतून, जाणवलेल्या त्रुटीमधून शेतकर्यांना पारंपरिक भेंडी लागवड न करता सुधारित पद्धतीने भेंडी लागवड करण्याचा सल्ला दिला. बुधाजी बंगाल पाटील अनुभव सांगताना म्हणाले,‘गेल्या अकरा वर्षांपासून इंदे गावात ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात शेतकरी भेंडी लागवड करतात. अगोदर अडीच फूट रुंदीचे गादीवाफे तयार करून घेऊन नंतर नत्र, स्फुरद, पालाश समप्रमाणात खत मिसळून दिले जाते. गादीवाफेवर ठिबक नंतर मल्चिंग पेपर अंथरला जातो. दोन रोपात दीड फुटाचे अंतर ठेवून भेंडीची लागवड केली जाते. पेरणीनंतर ठिबकने पाणी दिले जाते. त्यानंतर सहा-सात दिवसांच्या अंतराने पाणी देणे गरजेचे असते. पॉली मल्चिंगचा अवलंब केल्यामुळे माती व पाण्याचे बाष्पीभवन कमी झाले असून ठिबक सिंचनामुळे पाण्याची बचत झाली आहे. तणांची समस्या राहिली नाही. यामुळे खुरपणीच्या खर्चात पंधरा-वीस हजार रूपयांची बचत झाली आहे. मावा व तुडतुड्यांची समस्याही कमी झाली आहे. सुधारित तंत्र वापरल्याने भेंडीच्या एकरी तोड्यात (वार्षिक सरासरी 55 ते 60 तोडे) वाढ झाली आहे. पूर्वी भेंडीचा तोडा मार्च महिन्यात संपायचा आता तो मे-जून पर्यंत चालतो. एक एकर भेंडीला लागवडीपासून ते काढणीपर्यंत 50 ते 60 हजार रूपये खर्च होतो. बाजारभावाप्रमाणे एकरी 35 हजार रूपये नफा मिळतो.’
‘सुधारित तंत्रामुळे इंदे (मानगाव बंगाल पाडा) आता भेंडीचे गाव म्हणून ओळखले जाते. सध्या गावात 50 ते 60 एकरांवर भेंडी आहे. माझ्या गटात सुमारे 300 शेतकरी आहेत. यापैकी 100 शेतकर्यांनी उन्हाळी भेंडीची लागवड केली आहे. भेंडी उत्पादकांसाठी लागवड ते काढणीपर्यंत विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन कार्यक्रम घेतले जातात. सर्व शेतकरी सुधारित पद्धतीने भेंडी घेतात. त्यामुळे संपूर्ण गावात दररोज चार ते सहा टन भेंडीचे उत्पादन निघते. यावर्षी माझ्याकडे दहा एकरांवर उन्हाळी भेंडी आहे. दिवसाआड एकरी एक (सरासरी दोन क्विंटल) तोडा भेंडी निघते.
मुरबाड तालुक्यातील उंबरवाडी (नाणेघाट) येथील नवसू नामा पारधे सांगतात,‘मी 1991 पासून खंडाने शेत घेऊन भेंडीची शेती करतो. यंदा दहा एकरात सुधारित भेंडी लावली आहे. लागवड ते काढणीपर्यंत कुटुंबातले सदस्य मला मदत करतात. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत होऊन समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. ’ खापरे गावातील संभाजी गवारे, प्रमोद भला, धनाजी भला या भेंडी उत्पादक शेतकर्यांचे अनुभव देखील बोलके आणि दिशादर्शक आहेत. संभाजी गवारे सांगतात,‘आज शेतकर्यांसमोर विविध समस्या आहेत. अशा काळात मुरबाड तालुक्यातील शेतकरी बांधवांनी शेतीमध्ये आमूलाग्र व कालसुसंगत बदल घडवून आणले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भेंडीमध्ये आंतरपीक सध्या शेतकर्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. आंतरपीक म्हणून चवळी, वाल, मिरची, फुलकोबी यांसारखी पिके निवडली आहेत. आंतरपीकांमुळे शेतकर्यांना कमी कालावधीत चांगला नफा मिळू लागला आहे.’
काढणी व विक्री
भेंडीच्या उत्पादनात गेल्या 25 वर्षांपासून ठाणे जिल्हा अग्रगण्य आहे. येथील बहुतांश भेंडी ही वाशी (नवी मुंबई) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत विकली जाते. या संदर्भात बुधाजी म्हणाले, ‘आमच्याकडून पूर्वी मुंबईतले व्यापारी भेंडी खरेदी करायचे आणि स्वत: विकायचे. यातून ते जास्तीचा नफा मिळवायचे. व्यापार्याला मालाचा जितका फायदा मिळतो तेवढाच त्या शेतकर्याला मिळत असतो हे सूत्र आमच्या लक्षात आले. यानंतर आम्ही गटामार्फत भेंडी विकू लागलो. भेंडी तोडण्यासाठी स्थानिक व परिसरातील महिला मजुरांना गावातच रोजगार मिळू लागला. चांगल्या प्रकारे प्रतवारी केल्यास भेंडीला चांगला भाव मिळतो, हे आमच्या लक्षात आले. याप्रमाणे भेंडी तोडणी नंतर एक, दोन आणि तीन अशी भेंडीची योग्य प्रकारे स्वच्छता, प्रतवारी व पॅकिंग केली जाते. हा माल क्रेटमध्ये भरून वाशी मार्केटला पाठवला जातो. एक नंबरच्या भेंडीला चांगला दर मिळतो. सध्या एक किलोला सरासरी 25 ते 30 रुपये दर मिळत आहे.’ भेंडीसारख्या भाजीने ठाणे जिल्ह्यातील शेतकर्यांना नवा आर्थिक मार्ग दाखवला आहे. बहुतांश शेतकरी सेंद्रिय पद्धतीने भेंडी लागवड करत आहेत. अशा शेतकर्यांची भेंडी देश व परदेशात निर्यात होत आहे.
शासनाकडून अपेक्षा
भेंडी ही पौष्टिक आहे. मधुर, रूचकर, पचण्यास हलकी व विविध विकारांवर गुणकारी आहे. या सर्व बाबी लक्षात घेऊन शासनातर्फे भेंडी उत्पादकांच्या हिताच्या विविध योजना राबविण्यात याव्यात अशी मागणी मुरबाडच्या स्थानिक शेतकर्यांनी केली आहे. मुरबाड, शहापूर, भिवंडी, कल्याण व उल्हासनगर तालुक्यांचा दुर्गम भाग हा वाहतुकीच्या दृष्टीने कठीण आहे. परिणामी निर्यात योग्य गुणवत्तेचा माल बाजारपेठेत दाखल होत नाही. यासाठी शेतकर्यांना वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.
भेंडीची शास्त्रोक्त पद्धतीने साठवणूक करणे अत्यंत आवश्यक आहे. ठाणे जिल्ह्यात भेंडी साठवणूक केंद्र उभे राहिल्यास शेतकर्यांचे कमीत कमी नुकसान होऊन अधिकचा आर्थिक फायदा मिळेल. तिसरी गोष्ट म्हणजे शेतकर्यांना प्लास्टिक क्रेट खरेदीसाठी अनुदान देण्याची योजना सुरू केली पाहिजे. कारण भेंडी काढणीनंतर पॅकिंग, वाहतूक ते मार्केटपर्यंत जाईपर्यंत भेंडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते आणि याचा फटका शेतकर्यांना बसतो. शेतकर्यांना क्रेट्समधून भेंडी पाठविल्यास चांगला दर मिळतो, असे शेतकर्यांचे म्हणणे आहे. सर्वच शेतकर्यांना प्लास्टिक क्रेट्स खरेदी करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शासनाने प्लास्टिक क्रेट्ससाठी अनुदान द्यावे, अशी एक मागणी शेतकर्यांनी केली आहे. आणखी एक महत्त्वाची गरज आहे ती म्हणजे कृषी यांत्रिकीकरणाची. भेंडी काढणे तसे किचकट काम आहे. त्यात भेंडीला काटे असतात. त्यामुळे ती सहजरित्या काढता येत नाही. भेंडी काढताना हाताला व बोटाला इजा होतात. परिणामी, मजूर मिळत नाहीत. कृषी विद्यापीठाने सहजरित्या भेंडी काढता येईल, असे यंत्र विकसित केले तर शेतकरी व मजुराचे कष्ट कमी होतील. आज भेंडीचा वापर खाद्य, औषध आणि सौंदर्य प्रसाधन उद्योगांमध्ये केला जातो. ग्रामीण पातळीवर छोटे भेंडी प्रक्रिया उद्योग सुरू करणे आवश्यक आहे. कारण भेंडीच्या उत्पादनासोबत दरामध्ये चढउतार होत असतात. त्यावर मात करून दरामध्ये स्थिरता मिळवण्यास मदत होईल .
ठाणे जिल्हा वगळता भेंडी पिकाची सुधारित तंत्राद्वारे लागवड मोठ्या प्रमाणात कुठेही होत नाही, हे पीक ठाण्याचे मुख्य बलस्थान. त्यामुळे भेंडी पीक लागवड करू इच्छिणार्या शेतकर्यांना व तज्ज्ञांना हा लेख उपयोगी पडेल अशी आशा आहे.
सध्या सा.विवेकमध्ये उपसंपादक, एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारीमध्ये वार्ताहर व उपसंपादक. कृषी,साहित्य, व वंचित समाजाविषयी सातत्याने लिखाण.