श्रीरामानुचार्य व विशिष्टाद्वैत परंपरा

विवेक मराठी    22-Apr-2025   
Total Views |
 
मागच्या काही भागांमध्ये आपण वैष्णव भक्तिसंप्रदायाचा आढावा घेतला. दिव्य देसम्ची विविध मंदिरे, पासुरामी शब्दबद्ध केलेला ’नालयिरा दिव्य प्रबंधम’ ग्रंथ यांबद्दल समजून घेतले. या लेखात आपणो श्रीरामानुचार्य व विशिष्टाद्वैत परंपरा जाणून घेणार आहोत. संतकृपा झाली, इमारत फळा आली.
 
Divya Desam
 
आळ्वारे रचिला पाया, उभारीले देवालया.
नाथमुनी तयाचा किंकर, तेणे विस्तारीले आवार.
यमुनाचार्ये स्तंभ दिला वैष्णव.
रामानुजाचार्ये झालासे कळस...
 
आळ्वारांनी आणि नाथमुनींनी वैष्णव संप्रदायाचा पाया भक्कम केला होता. हे कार्य यमुनाचार्यांनी ’उत्तराधिकारी’ म्हणून पुढे नेले. ते नाथमुनींचे नातू होते. मात्र त्यावर कळस हा श्रीरामानुजाचार्यांनी चढवला. हा दहाव्या शतकाच्या सुरुवातीचा काळ होता. तामिळनाडूमध्ये राजसत्तेबरोबरच धर्मसत्ता बहरत होती. तेव्हाचे अवाढव्य साम्राज्य होते ते म्हणजे मदुराईचे पांडय व तंजावूरचे चोळ. या दोन्ही राजसत्ता शैवपूजक असल्या तरी काही अपवाद सोडले तर वैष्णवांना अतिशय मान होता. शैवांचे सर्वोच्च शिवालय म्हणजेच चिदंबरमच्या ’थिलई नटराजन’ बरोबरच वैष्णवांचे सर्वोच्च आणि दिव्य देसम्चे आद्य देवालय म्हणजे अर्थातच श्रीरंगम्ला अतोनात महत्त्व प्राप्त झाले होते.
 
 
श्रीरंगम्चे श्रीरंगनाथस्वामी मंदिर हे अतिप्राचीन काळापासून नावाजलेले होते. या श्रीरंगावर भक्तांचा अपार जीव होता. बाराही आळ्वारांचा त्यांच्या आयुष्यकाळात कधी ना कधी तरी श्रीरंगम्शी संपर्क आला होता. आळ्वारांचा जीवनकाळ संपल्यानंतरच्या संधिप्रकाशात श्रीरंगम् येथे रोजचे व्यवहार सुरू होते. मात्र भक्ती संप्रदायाच्या उदयामुळे मंदिरात वर्दळ वाढली. दूरदूरपासून भाविक श्रीरंगनाथाच्या ओढीने येऊ लागले. याच दरम्यान यमुनाचार्यांचा श्रीरंगम्शी संपर्क आला. आळ्वार व नाथमुनींचे उत्तराधिकारी या नात्याने द्वैत परंपरेची मांडणी यमुनाचार्यांनी आणखी पुढे नेली.
 
 
Divya Desam
 
वैष्णव संतांनी पेरुमाळला नेहमीच ’नारायण’ रूपात पूजले. यमुनाचार्यांनी द्वैत सिद्धांत ’स्तोत्ररत्न’ या ग्रंथातून मांडला. यांत यमुनाचार्यांनी आत्म्याचा, नारायणाशी अत्यंत भक्तिरसाने ओथंबलेला, नम्र संवाद लिहिला आहे. त्यांनी तत्त्वज्ञानावर केलेले भाष्य हे ’सिद्धित्रयम’ ग्रंथात शब्दबद्ध केले आहे. या ग्रंथात त्यांनी ’आत्मसिद्धी’ म्हणजे आत्मा आहे हे सिद्ध केले आहे, ’ईश्वरसिद्धी’ म्हणजे ईश्वराचे अस्तित्व आहे व तो सर्वोच्च आहे आणि ’संवितसिद्धी’ म्हणजेच खरी ज्ञानप्राप्ती कशी प्राप्त होते हे स्पष्ट केले आहे. उर्वरित आयुष्य श्रीरंगनाथस्वामीची पूजा करत यमुनाचार्यांनी व्यतीत केले. आपला अंत:काळ जवळ आल्याचे जाणून त्यांनी कांचीपुरमच्या ’वरदराज पेरूमाळ’ मंदिराचे पंडित श्रीरामानुजाचार्यांना श्रीरंगम् येथे येण्याचे निमंत्रण दिले. असं मानले जाते की, प्रत्यक्ष श्रीरंगनाथस्वामीने यमुनाचार्यांना श्रीरंगम्ला येण्याविषयी दृष्टांत दिला होता. दुर्दैवाने श्रीरामानुजाचार्य श्रीरंगम्ला पोहोचेपर्यंत यमुनाचार्यांचे देहावसन झाले. याविषयी वैष्णव परंपरेत एक प्रसिद्ध व अर्थपूर्ण कथा सांगितली जाते. यमुनाचार्यांचे पार्थिव शरीर पाहताना सर्वांना एक गूढ गोष्ट लक्षात आली. त्यांच्या डाव्या हाताची तीन बोटे मिटलेल्या अवस्थेत होती. ही तीन बोटे म्हणजेच यमुनाचार्यांचे तीन अपूर्ण संकल्प आहेत हे श्रीरामानुजाचार्यांनी ओळखले. ते अपूर्ण संकल्प म्हणजे, ’ब्रह्मसूत्रावर’ विशिष्टाद्वैत दृष्टीकोनातून भाष्य करणे, ’विष्णुसहस्त्रनामावर’ भाष्य करणे व वैष्णव तत्त्वज्ञानाचा प्रसार करण्यासाठी योग्य वारस नेमणे. हे संकल्प ओळखून श्रीरामानुजाचार्यांनी या तिन्ही गोष्टींची मी पूर्तता करीन अशी शपथ घेतली. या शपथेबरोबर यमुनाचार्यांची तिन्ही बोटे मोकळी झाली.
 
 
असं म्हणतात की, यमुनाचार्यांनी पाया घातलेल्या वैष्णव तत्त्वज्ञानावर श्रीरामानुजाचार्यांनी भव्य मंदिर उभारले. गेली कित्येक शतके वैष्णव परंपरा व तत्त्वज्ञान ठामपणे उभे आहे यामागे श्रीरामानुजाचार्यांचे आयुष्यभराचे अहर्निश प्रयत्न आहेत. श्रीरामानुजाचार्य हे वैष्णव संप्रदायाला पडलेले एक महत्तम स्वप्न आहे. त्यांना तामिळ संत परंपरेतील एक दीपस्तंभ मानले जाते. ते एक महान हिंदू तत्त्वज्ञ, संत व विशिष्टाद्वैताचे प्रणेते होते.
 
 
 
श्रीरामानुजाचार्यांचा जन्म इ.स. 1017 साली तामिळनाडूतील श्रीपेरूंबुदूर येथे झाला. लहानपणापासून तीक्ष्ण बुद्धिमत्ता लाभलेल्या श्रीरामानुजन यांची नेमणूक कांचीपुरमच्या ’वरदराज पेरूमाळच्या’ मंदिरात झाली. सप्तपुरींमधील एक पुरी असलेलं कांचीपुरम हे शैव, शाक्त व वैष्णव उपासनेचे महत्त्वाचे नगर होते. कांचीपुरमला राहाताना त्यांनी अद्वैत तत्त्वज्ञानाचे खंडन करून द्वैत तत्त्वज्ञानावर विद्वानांशी चर्चा सुरू केल्या. तेव्हापासूनच यमुनाचार्यांनी, श्रीरामानुजन यांवर बारकाईने लक्ष ठेवले होते.
 
 
Divya Desam
 
यमुनाचार्यांच्या देहावसानानंतर श्रीरामानुजाचार्यांनी वैष्णव दीक्षा घेतली आणि विशिष्टाद्वैताचा जोरकस प्रचार केला. त्यांनी अद्वैताच्या ’सर्व काही ब्रह्मच आहे’ या संकल्पनेला नाकारले. जीव (आत्मा), जग (सृष्टी) आणि ईश्वर (ब्रह्म) हे तीन वेगवेगळे असून ते परस्परसंबंधित आहेत. परमेश्वर हा निर्गुण नसून सगुण आहे व सर्वांचा आधार आहे. ईश्वरप्राप्तीसाठी भक्ती व त्यासाठी संपूर्ण समर्पणच मोक्षप्राप्तीस कारणीभूत ठरते हा सिद्धांत मांडला. हेच भक्तिपरंपरेचे मूळ आहे. अर्थातच त्यांचा पेरूमाळवर अतोनात विश्वास होता व भक्ती होती. आपण हे समजून घेतले पाहिजे की शैव-वैष्णव वाद हा शिव श्रेष्ठ की विष्णू श्रेष्ठ असा नसून तो दोन तत्त्वज्ञानातील फरक होता. श्रीरामानुजाचार्यांचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी जातीभेद व अस्पृश्यतेला प्रखर विरोध केला. कोणत्याही जातीतील व्यक्तीला मंदिरप्रवेश असावा व अध्यात्मिक शिक्षण घेण्याचा अधिकार असावा असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी ते आयुष्यभर झटले. श्रीरामानुजाचार्यांनी विविध ग्रंथरचना केली. श्रीभाष्य, गीताभाष्य व वेदांतसार अशी त्यांची ग्रंथनिर्मिती आहे. श्रीरामानुजाचार्यांच्या विचारांचा प्रभाव देशभरातील इतर संतांवर पडला, त्यांत महाराष्ट्रातील तुकाराम महाराजसुद्धा येतात. श्रीरामानुजाचार्य भारतातील समाजसुधारणा व तत्त्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक आहेत. तसेच त्यांचे अजून एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी वैष्णव मंदिरांच्या कामकाजाची, आचारसंहितेची एक बैठक घालून दिली. आज इतक्या वर्षांनंतरही ही सगळीच पेरूमाळ मंदिरे याच व्यवस्थेचे निष्ठेने पालन करत आहेत.
 
 
श्रीरामानुजाचार्यांनी मंदिरांबरोबर मठ व्यवस्थापनेतसुद्धा लक्ष घातले. मागच्या एका लेखात मी वैष्णवांच्या थेनकलई व वेदीकलई या दोन पूजापद्धतींचा उल्लेख केला होता. पार दक्षिणेत थेनकलई पद्धत अंगीकारली जाते तर कांचीपुरम भागात वेदीकलई पद्धत आहे. थेनकलईमध्ये फक्त तमिळ भाषेचा वापर आहे तर वेदीकलईमध्ये तमिळ बरोबरच संस्कृतलाही तेवढाच मान आहे. ही विभागणी श्रीरामानुजाचार्यांच्या खूप नंतर म्हणजे सतराव्या शतकात झाली. या परंपरेचे वेगवेगळे मठ आहेत. पण मूळ संकल्पना मात्र श्रीरामानुजाचार्यांचीच आहे. त्यांनी दिव्य देसम्मध्ये येणार्‍या दक्षिणेतील सर्वच विष्णुमंदिरांना नियम घालून दिले. मंदिरात पूजा कशी होईल, नित्य सेवा कशी दिली जाईल, नैवेद्य कसा दिला जाईल, कोणकोणते उत्सव साजरे होतील व कसे साजरे होतील अशा प्रकारचे मंदिरांतील प्रत्येक अंगाचे नियमन केले. कांचीपुरमच्या वरदराजाबरोबरच ते बारा वर्ष मेळूकोटेच्या ’चेरूवू नारायण’ मंदिरात राहिले होते. चोळ राजा ’कुलोत्तंग द्वितीय’ हा कट्टर शैवपंथीय होता. श्रीरामानुजाचार्यांचे वैष्णव परंपरेतील महत्त्व बघून या चोळ राजाने त्यांना श्रीरंगम्मध्ये राहाण्याची बंदी घातली होती. तेव्हा श्रीरामानुजाचार्य आजच्या कर्नाटकामधील मंड्या जिल्ह्यात असलेल्या मेळूकोटे इथे राहिले होते. याच मेळूकोटे गावातील भाविक, नाथमुनींच्या वीरनारायण मंदिरात आले होते व पुढे जाऊन दिव्य देसम्चा इतिहास घडला. श्रीरामानुजाचार्य यांनी तिरूमलाच्या ’श्री व्यंकटेशाच्या’ मंदिराचेही नियम बनवले होते हे सांगावेच लागेल. आजच्या प्रमाणेच तिरूमलाचे मंदिर प्राचीन काळीही भाविकांवर भुरळ घालत होते. वैष्णव परंपरेचा प्रसार करण्यासाठी श्रीरामानुजाचार्यांनी प्रामुख्याने हे मंदिर निवडले होते. आजही व्यंकटेशाची प्रत्येक पूजा व उत्सव साजरा करण्याची पद्धत श्रीरामानुजाचार्यांचे महत्त्व विशद करतेय. तिरूमलामधला ’रामानुजन मंडपम’ आजही त्यांची तिथली आठवण व त्यांचे कार्य जागते ठेवतोय. श्रीरामानुजाचार्यांच्या आयुष्यातील या चार मंदिरांना अतुलनीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
 
त्यांपैकी मेळूकोटे सोडले तर बाकी तीन मंदिरे दिव्य देसम्मध्ये मोडतात. या चार मंदिरांची जणू काही एक यात्राच असते. यांत भूलोकीचे वैकुंठ म्हणून ओळखली जाणारी दोन मंदिरे - व्यंकटेशाचे तिरुमला (मलई कोविल- मलई म्हणजे टेकडी तर कोविल म्हणजे मंदिर), श्रीरंगम् (कोविल) यांचा समावेश आहे. तर वरदराज पेरूमाळ (पेरूमाळ कोविल) आणि मेळूकोटे (चेरूवू नारायण कोविल) ही दोन मंदिरेसुद्धा या यात्रेत येतात. अतिशय आनंददायक गोष्ट म्हणजे मी ही यात्रा केली आहे. असे एकही दक्षिणेतील विष्णुमंदिर नसेल की ज्या मंदिरात वैष्णव धर्माची पताका घेतलेल्या श्रीरामानुजाचार्यांची मूर्ती नसेल.
 
 
श्रीरामानुजाचार्यांच्या आयुष्यातील बहुतांश काळ हा श्रीरंगम्भोवतीच केंद्रित झाला होता. सुमारे एकशे वीस वर्षांचे आयुष्य जगून श्रीरामानुजाचार्यांचे देहावसानही याच मंदिरात झाले. अत्यंत आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे मंदिरात आजही श्रीरामानुजाचार्यांचे पार्थिव गेली नऊशे वर्षे जपून ठेवले आहे. त्यांचे आयुष्य आपल्याला सामाजिक भेदाभेद दूर करून ईश्वरभक्तीच्या मार्गावर चालण्यासाठी प्रेरित करते. पुढच्या भागात श्रीरंगम्च्या मंदिरावर लिहिताना आपण याविषयी जाणून घेणार आहोत.

अनुष्का आशिष

 इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनीरिंगमधे शिक्षण झाले असून, IT क्षेत्रात कार्यरत होत्या. विविध वृत्तपत्र व साप्ताहिकात पुस्तक परीक्षण प्रसिद्ध झाले आहेत. प्रवासाची अतिशय आवड व त्यासंबंधित लेखन. देशभरातील प्राचीन मंदिरे पाहण्याची व त्यांचा अभ्यास करण्याची आवड आहे.