हाडाचा पीक वाण संशोधक - शेतकरी बाळासाहेब लावरे

विवेक मराठी    22-Apr-2025
Total Views |

krushivivek
संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब लावरे हे हाडाचे संशोधक-शेतकरी आहेत. आपल्या शेतात नवनवीन वाणांची लागवड करून त्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुण शोधतात. सध्या ते भाजीपाल्यातील वांगी व भोपळा या फळभाज्यांच्या गावठी वाणांवर संशोधन करत आहेत. सध्या ही दोन्हीही वाणे शासकीय प्रक्षेत्रावर प्रयोगासाठी पाठवली आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात पिंपरी-लौकी-आजमपूर या गावांचा शिवार कागदी लिंबू उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या उपरांगांनी वेढलेल्या या प्रदेशात मुरमाड पोयटा जमिनीत येथील कष्टकरी समुदायाने पिढ्यानपिढ्या कागदी लिंबाची स्थानिक जात विकसित केली आहे व आजही ते गुणवत्तापूर्ण उत्पादन घेतात. साहजिकच येथील लिंबाची कीर्ती दिल्लीच्या बाजारपेठेपर्यंत पोहोचली आहे. लिंबाबरोबरच येथील शेतकरी पावसाच्या पाण्यावर पारंपरिक मिश्र पीक ‘इरवड’ मोठ्या प्रमाणावर करतात व भाजीपाल्याची निकड भागविण्यासाठी घराजवळ ‘माळीव’ पण लावतात.
 
 
दैनंदिन गरजेचे भरडधान्य, कडधान्य, तेलबिया, गुरांना चारा अशी गरज भागविणारी ‘इरवड व माळीव’ या कृषी जैवविविधता जपणार्‍या शाश्वत पीक पद्धती आहेत. मात्र पाण्याची सुविधा करून नगदी पिके घेण्याचा पायंडा पडत चालल्यामुळे या मिश्र पीक पद्धतीकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे पिंपरी गावातील लावरे वस्तीवर राहणारे बाळासाहेब लावरे हे तरुण उत्साही शेतकरी अस्वस्थ होते. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे शिक्षण पुरे करता आले नाही. तरी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात कृषी पदविकेला प्रवेश घेतला व यशस्वीपणे कृषी विद्येची पदविका मिळवली. पीक पद्धतीत होत असलेले बदल, संकरित पीकांचे वाढते प्रमाण, रासायनिक खते व कीटकनाशकाचा अति वापर, त्यातून जमिनीची कमी होत जाणारी सुपीकता, यावर रामबाण उपाय योजना करणे गरजेचे आहे, हे लक्षात आल्यावर लावरे यांनी पारंपरिक ज्ञान व शहाणपण याचा आधार घेऊन शाश्वत शेती करण्याचे ठरविले.
 

krushivivek 
 
जमीन सुपीक कशी ठेवता येईल, पारंपरिक फेरपालट पद्धतीचा वापर, सेंद्रिय व पौष्टिक अन्नधान्य उत्पादन मिळविण्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण वाणाची लागवड करण्यावर त्यांनी भर दिला. आजूबाजूचे लोक वेड्यात काढायचे. काय ते जुनं घेऊन बसला, घरातील लहानथोरपण नाव ठेवायचे. शेजारच्या हायब्रीड बाजरीचे इतके पोते झाले. आपण उगीचच जुने वाण पेरतो. असे बरेच काही. जी अवहेलना प्रयोगशील शेतकर्‍याच्या वाट्याला येते, ती बाळासाहेबांच्या पण वाट्याला आली, यात नवल ते काय? या सर्व गोष्टी कानामागे सारून ते पुढे जात राहिले.
 
पारंपरिक शेतीतील शाश्वत तंत्र शोधण्याचा प्रवास अनेक वर्षापासून सुरु होता. अगदी तरुण वयापासून याच गोष्टीत मन रमते, असे ते उत्साहाने कथन करतात. सर्वसामान्य शेतकरी सांगतात, त्याप्रमाणे गावरान जातीला उत्पादन कमी येते, हे खरे की खोटे हे शोधण्याचे काम त्यांनी हाती घेतले. जुनी पिकांची वाणं नष्ट होण्याचे व गुणवत्ता खालावत जाण्याची कारणे लावरे यांनी शोधली. मुख्य कारण अशुद्ध बियाणांचा वापर, हे होते. उदाहरण द्यायचे तर वर्षानुवर्षे देवठाण बाजरीसारखे पीक संगमनेर-अकोले तालुक्यात सगळीकडे व्हायचे, पण बीज शुद्धीकडे दुर्लक्ष झाले. नवनवीन सुधारित व संकरीत बाजरीच्या जातीची लागवड होऊ लागल्यामुळे परपरागीभवन मोठ्या प्रमाणात झाले व परिणामी देवठाण बाजरीची शुद्धता संपुष्टात आली. हे सर्व लक्षात आल्यावर त्यांनी बाजरी, मठ, मूग, तूर अशा पारंपरिक वाणाची शुद्धता जपण्याचे प्रयोग सुरू केले.
 
दरम्यानच्या काळात लोणी येथील कृषी महाविद्यालयात बाळासाहेबांना लहानसे काम मिळाले. तेथे डॉ. अशोक ढगे नावाचे प्राचार्य होते. लावरे यांचा उत्साह पाहिल्यावर त्यांनी प्रोत्साहन दिले. तज्ज्ञ व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे शेतीतील प्रयोगांना शास्त्रशुद्ध बैठक देण्याचे कौशल्य बाळासाहेबांना ज्ञात झाले. सुरुवातीच्या पाच वर्षांत त्यांनी गावरान बाजरी पिकावर लक्ष केंद्रीत केले. पारंपरिक घरगुती बाजरी पिकात त्यांना उंच वाढणारी व किमान 10 ते 12 इंच लांबीचे कणीस आढळले. अशी निवडक कणसं त्यांनी बाजूला काढली. त्यापासून तयार झालेले बियाणे दरवर्षी पेरत राहिले. एक उत्तम गावरान बाजरीचे वाण त्यांना मिळाला. टपोरा दाणा, भरीव ताट व भरपूर पाने असे या बाजरीचे वैशिष्ट्य. बाजरी पिकाचे बाह्य गुणधर्म ( Morphological characters ) पण त्यांनी नोंदविली आहेत. बाभळेश्वर येथील कृषी विज्ञान केंद्र व राहुरी कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी प्लॉटवर भेटी दिल्या. पिक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा 2001 अंतर्गत शेतकरी-वाण (Farmers Variety) म्हणून त्यांनी नोंदणीचा प्रस्ताव दिला. पुढे हा प्रस्ताव तांत्रिक कारणे देऊन PPVF Authorityने नाकारला, पण त्याने बाजरी वाण संशोधनातील बाळासाहेबांचे कार्य नाकारता येणार नाही. ते निश्चितच नोंद घेण्याइतके उल्लेखनीय आहे.
 
 
निवड पद्धतीने विकसित झालेल्या बाजरीचे नामकरण त्यांनी ‘अहिल्या’ असे केले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रती असणार्‍या श्रद्धेपोटी अहिल्या हे नाव दिल्याचे ते आवर्जून सांगतात. जशी ‘अहिल्या’ बाजरीची कथा, तशीच ‘सिंधू’तुरीच्या निर्मितीचीपण कथा आहे. ‘इरवड’ या मिश्र पीक पद्धतीत तुरीचा पाट घालण्याची पद्धत या परिसरात वर्षानुवर्षे रूढ आहे. त्यातील निवडक गावठी पिकांचे निरीक्षण करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की, तुरीच्या काही झाडांना गुलाबी-लाल रंगांची फुले येतात. त्यातील बियांचा रंगही वेगळा आहे. विशेष म्हणजे ही तूर 110 दिवसात पक्व होते. प्रत्येक झाडाला 200 ते 300 शेंगा लगडतात व रोगकिडींना विशेष बळी पडत नाही. या प्रयोगशाळेतील निष्कर्षानुसार सिंधू तुरीत Anti-Oxidantचे प्रमाण चांगले असल्याने सेवन करणार्‍या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती सुधारते. मग बाळासाहेबांना आत्मविश्वास आला. तूर पिकावर लक्ष केंद्रीत केले. प्रयत्नपूर्वक शुद्ध बियाणे राखून ठेवले. दरवर्षी तुरीची लागवड करत राहिले. काडाचा रंग, उंची, बियाची संख्या, पानाची संख्या अशा बारीकसारीक नोंदी त्यांनी घेतल्या. आठ वर्षे सातत्याने प्रयत्न करून त्यांनी अहिल्या तुरीचे वाण विकसित केले. पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा 2001 अंतर्गत शेतकरी-वाण ( Farmers Variety) म्हणून मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव दिला. देशातील विविध प्रदेशातील संशोधन केंद्रांवर ट्रायल झाल्या. अखेर डिसेंबर 2024 मध्ये सिंधू तुरीला शेतकरी वाण म्हणून मान्यता मिळाली.
 
 
बाळासाहेब लावरे हे हाडाचे संशोधक-शेतकरी आहे. आपल्या शेतात नवनवीन वाणांची लागवड करून त्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुण शोधतात. सध्या ते भाजीपाल्यातील वांगी व भोपळा या गावठी वाणांवर संशोधन कार्य करत आहेत. या दोन्हीही वाणांची पीक वाण संरक्षण व शेतकरी हक्क कायदा 2001 अंतर्गत शेतकरी-वाण नोंदणी प्रक्रियेत आहेत. वांग्याला आईचे ‘परिघा’ नाव दिले आहे व भोपळ्याला ‘सोहम’ हे मुलाचे नाव ठेवले आहे. सध्या ही दोन्हीही वाणे शासकीय प्रक्षेत्रावर ट्रायल्ससाठी पाठवली आहेत.
 
 
एकूणच कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीबाबत त्यांना संमिश्र अनुभव आहे. काही लोक प्रोत्साहन देतात, तर काही नाउमेद करतात. पिकाच्या जाती शोधण्याचे काम शेतकर्‍याचे नाही. त्यातून मनात गोंधळ वाढतो. आपली दिशा योग्य आहे की नाही, असा संभ्रम निर्माण होतो. अशा स्थितीत लावरे यांचा आशावाद कायम आहे. मी विकसित केलेल्या गावरान जाती जास्तीत जास्त शेतकर्‍यांपर्यंत पोहोचाव्यात, शेतकर्‍यांनी गमावलेली बीज स्वावलंबन व्यवस्था पुन्हा निर्माण झाली पाहिजे, असे उत्कट स्वप्न ते उरी बाळगून आहेत.
 
 
हजारो वर्षापूर्वी भटक्या अवस्थेतून मानव स्थिर झाला. नदी काठी सुपीक जमिनीत शेती करू लागला. आजूबाजूच्या जंगलातील रानटी पिकातून उपयुक्त पिकांची वाणे, विशेषत: महिला शेतकर्‍यांनी शोधली व पुढील अनेक वर्ष असंख्य पिकांच्या व पाळीव प्राण्यांच्या जाती विकसित झाल्या. कृषी-जैवविविधता विषयातील अभ्यासक सांगतात त्याप्रमाणे, मागील पंधरा हजार वर्षात मानवाने केवळ पंचवीस जंगली भातापासून तीन लाखापेक्षा अधिक जाती तयार केल्या. बाळासाहेब लावरे यांच्या कामामागे हीच प्रेरणा आहे, किंबहुना तेच आपल्या देशातील प्राचीन कृषी परंपरेचे प्राचीन व प्रगत अशा जैव-सांस्कृतिक वारशाचे खरे रक्षक आहेत, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
 
संपर्क
श्री. बाळासाहेब लावरे - 9527649073