@मल्हार कृष्ण गोखलेमेजर जनरल थिमय्यांनी झोजिला खिंडीत रणगाडे नेले. 1 नोव्हेंबर 1948 या दिवशी रणगाड्यांनी पाकिस्तानी मोर्च्यांवर जबरदस्त अग्निवर्षाव सुरू केला. चकित झालेला आणि घाबरलेला शत्रू मोर्चे सोडून पळत सुटला, हा सगळा वृत्तांत गेल्या लेखांकात पाहिला होता. त्या कालखंडाच्या दरम्यान आणि लगेच नंतर, राजकीय पातळीवर खूपच महत्त्वपूर्ण घडामोडी घडल्या होत्या. त्यांचा आढावा आता घेऊया..

भारताची फाळणी होणार आणि भारत आणि पाकिस्तान असे दोन नवे स्वतंत्र देश निर्माण होणार असे जेव्हा निश्चित झाले, तेव्हा लॉर्ड लुई माउंटबॅटन हे ब्रिटिश इंडियाचे गव्हर्नर जनरल किंवा व्हॉईसरॉय होते, हे आपल्याला माहीतच आहे. तसेच या ब्रिटिश इंडियाचे सरसेनापती फिल्ड मार्शल क्लॉड ऑकिनलेक हे होते. खरे म्हणजे ऑकिनलेक हे दुसर्या महायुद्धात जर्मनीच्या जनरल अर्विन रोमेल बरोबर दोन हात करून आलेले कीर्तिमान सेनापती होते. सर्वसामान्य सैनिकांमध्येही ते अतिशय दिलदार आणि उमद्या वागणुकीचे म्हणून लोकप्रिय होते. पण.... अखेर ते इंग्रज होते. भारत स्वतंत्र झाला तरी, सुरवातीचा काही काळ माउंटबॅटन यांनी गव्हर्नर जनरल पदावर रहावे, अशी विनंती खुद्द पंडित नेहरूंनी केली आणि त्यांनी मोठ्या मिजाशीत ती मान्य केली. जीना पण आपल्याला अशीच विनंती करतील, अशा भ्रमात ते होते. पण 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानची सत्ता स्वीकारल्यावर आपणच पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल असू, हे जीनांनी स्पष्ट केले. माउंटबॅटन यांचा थोडा विरसच झाला असावा. 1905 सालच्या वंगभंग आंदोलनाच्या वेळेस बंगालचा गव्हर्नर बामफिल्ड फुल्लर हा उघडपणे म्हणत असे की, ’हिंदू ही आमची नावडती बायको आहे, तर मुसलमान ही आमची आवडती बायको आहे.’ अन्य इंग्रज अधिकारी असे स्पष्टपणे बोलत नसले, तरी त्यांचे धोरण तसेच होते. तर ही आवडती बायको स्वतंत्र झाली की, कशी मुजोरपणे वागते, याचा हिसका माउंटबॅटनना लगेचच दिसला. असो.

माउंटबॅटन
सैनिकी क्षेत्रात मात्र वेगळी स्थिती होती. भारत आणि पाकिस्तान दोन्ही सरकारांनी फिल्ड मार्शल ऑकिनलेक यांना विनंती केली की, तुम्हीच आमचे संयुक्त सरसेनापती राहा. ऑकिनलेक सेवानिवृत्तीच्या वाटेवर होते. खेरीज इंग्रजी समाजाच्या कथित पुरोगामी (म्हणजे स्वैराचारी) मूल्यांचा फटका त्यांच्या वैयक्तिक जीवनाला बसला होता. त्यांची बायको एका तरुण अधिकार्याबरोबर पळून गेली होती. यामुळेही ऑकिनलेक अतिशय हैराण होते. तरीही त्यांनी नोव्हेंबर 1947 अखेरपर्यंत संयुक्त सरसेनापती पदावर रहायला मान्यता दिली. 1 डिसेंबर 1947 या दिवशी त्यांनी भारताला कायमचा रामराम ठोकला.
म्हणजे 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी जेव्हा पाकिस्तानने पठाणी घुसखोरांच्या वेषात काश्मीरवर आक्रमण केले, तेव्हा भारत आणि पाक या दोन्ही सैन्यदलांचे संयुक्त सरसेनापती होते फिल्डमार्शल ऑकिनलेक तसेच भारतीय सेनादलाचे कार्यकारी सरसेनानी होतेे जनरल रॉब लॉकहार्ट. तर पाक सेनादलाचे कार्यकारी सरसेनानी होतेे जनरल फ्रँक मेसर्व्ही. हे सगळेच जण चांगले व्यावसायिक सेनापती होते. पण शेवटी ते इंग्रज होते. ब्रिटनचा राष्ट्रीय स्वार्थ भारताला दुबळा बनवून ठेवणे आणि पाकिस्तानला शिरजोर बनवून ठेवणे हा होता. यानुसार ते वागत होते.
ऑकिनलेक
22 ऑक्टोबर 1947ला जेव्हा पाकने आक्रमण सुरू केले, तेव्हा नेमका जनरल मेसर्व्ही हा लंडनला गेलेला होता. त्याच्या अनुपस्थितीत जनरल डग्लस ग्रेसी हा पाकचा कार्यकारी सेनापती होता. लढाई सुरू झाल्यावर मेसर्व्ही लगेच कराचीला यायला निघाला. पण वाटेत तो दिल्लीला उतरून माउंटबॅटनला भेटला. कशासाठी? माहीत नाही. पण दिल्लीहून कराचीला आल्यावर मेसर्व्ही आणि ग्रेसी दोघे मिळून पठाण घुसखोरांना मार्गदर्शन करू लागले. पाकिस्तान देशाचे गव्हर्नर जनरल स्वतः जीना होतेच, पण वायव्य सरहद्द प्रांताचा गव्हर्नर म्हणून त्यांनी जॉर्ज कनिंगहॅम नावाच्या सेवानिवृत्त आय. सी. एस. अधिकार्याला मुद्दाम लंडनहून बोलावून घेतले होते. पुढे मेसर्व्हीने या जॉर्ज कनिंगहॅमकडे माउंटबॅटनबद्दल तक्रार करून म्हटले की, लॉर्ड माउंटबॅटन हिंदूचे पक्षपाती झाले आहेत.
सगळ्याच घटना आज किती नाट्यमय आणि अविश्वसनीय वाटतात पाहा. दोन देश एकमेकांशी लढत आहेत. दोन्हीकडचे प्रमुख सेनापती इंग्रज, यात पुन्हा एका देशाचा सेनापती दुसर्या देशाच्या राजधानीत येऊन काहीतरी गुफ्तगू करून जातो, हे सगळेच किती विचित्र आहे. आज पाऊणशे वर्षांनंतरही हे सगळे ऐकता- वाचताना आपला जीव जळतो. तरी आपल्याला फारच थोडे माहीत आहे. ज्यांना सगळे समजत आणि उमजत होते, यांच्या मनाची काय अवस्था असेल? भारतीय सैन्यातले जनरल करिअप्पा, थिमय्या, थोरात यांच्यासारखे वरिष्ठ सेनानी, खुद्द काश्मीरमधले प्रांत संघचालक प्रेमनाथजी डोग्रा, प्रांत प्रचारक बलराज मधोक, सरसंघचालक पू. श्रीगुरुजी, देशाच्या सुरक्षेसाठी सतत सावधान असणारे स्वातंत्र्यवीर सावरकर, खुद्द केंद्र सरकारमधले सरदार पटेल, डॉ. राजेंद्रप्रसाद अशा जाणत्या लोकांना या नाटकांचा किती मनस्ताप होत असेल! कल्पना करून पाहा! असो. तर पठाणी टोळीवाले हे बाह्य फसवे रूप असून त्यापाठी रितसर पाक सैन्य आहे, हे आम्हाला कळले असून पाकिस्तानी शासनाने त्वरित आपल्या सेनापतींना आवरावे, असा संदेश पंडित नेहरूंनी जीनांना पाठवला. 30 नोव्हेंबर 1947 या दिवशी जीनांनी पंडित नेहरूंचा हा निरोप फेटाळून लावला. लगेच 1 डिसेंबर 1947 या दिवशी पंडित नेहरूंनी ’युनो’ या आंतरराष्ट्रीय संघटनेकडे धाव घेत त्यांना या विवादात मध्यस्थी करण्याची विनंती केली. म्हणजे आता बघा हं! काश्मीर संस्थान आता कायद्याने आमचे झाले आहे. याचा भूभाग जबरदस्तीने व्यापून बसलेल्या लुटारूंना आमचे सैनिक चांगला चोप देऊन हाकलून काढतायत. यात युनोचा संबंधच काय? पण तरी पंडित नेहरू युनोकडे गेले. का? तर हा प्रश्न युनोकडे नेण्याचा सल्ला (की बदसल्ला?) यांना माउंटबॅटननी दिला.
झाले. युनोचे सदस्य काश्मीर प्रश्नाचा सखोल अभ्यास करायला लागले. यांचा महत्त्वपूर्ण ठराव 13 ऑगस्ट 1948 रोजी जाहीर झाला. दरम्यान दोन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. 30 जानेवारी 1948 या दिवशी दिल्लीत महात्मा गांधींची दुर्दैवी हत्या झाली. आणि जून 1948 मध्ये लॉर्ड माउंटबॅटन कायमचे लंडनला परतले. युनोच्या 13 ऑगस्टच्या ठरावाचे तीन मुख्य मुद्दे होते -
1) त्वरित युद्धबंदी व्हावी,
2) पाकिस्तानने काश्मीर प्रदेशातून सैन्य मागे घ्यावे,
3) काश्मीरमध्ये सार्वमत घ्यावे.
लबाड पाकिस्तानने पहिले दोन मुद्दे डावलून एकदम तिसरा मुद्दा प्रत्यक्षात आणण्याचा आग्रह धरला, परिणामी युद्ध सुरूच राहिले. जेमतेम महिना भरातच 11 सप्टेंबर 1948 रोजी जीना मरण पावले. एवढ्यात, म्हणजे त्यानंतर दोनच दिवसांनी म्हणजे 13 सप्टेंबर 1948 या दिवशी भारतीय सैन्याने हैद्राबादच्या निजाम संस्थानावर हल्ला केला. 18 सप्टेंबरला निजामी सैन्याने पांढरा बावटा फडकावला. देशाच्या अगदी पोटातच एखाद्या विषारी काट्याप्रमाणे सलणारे हैद्राबाद संस्थान भारतात विलीन करण्यात आले. सरदार पटेलांनी केंद्रीय गृहमंत्री या अधिकारात, सार्वभौम भारत सरकारला उघडपणे युद्धाचे आव्हान देणारे हैद्राबाद संस्थान एका फटक्यात संपवले. ही कारवाई सैन्याने केली, पण तिला अगदी कायदेशीरपणे ’पोलीस अॅक्शन’ असे नांव देण्यात आहे. म्हणजे बघा, सरदार पटेलांनी सेनापतींना ’गो अहेड’ म्हटल्यावर सैन्याने हैद्राबाद प्रश्न पाच दिवसांत संपवला. पण काश्मीर युद्धाचे दळण चालूच आहे. याला हिमालयीन भौगोलिक स्थिती इतकेच पंडित नेहरूंचे शेख अब्दुल्लाधार्जिणे धोरणही कारणीभूत होते.
1 नोव्हेंबर 1948 रोजी जनरल थिमय्यांनी लद्दाख आघाडीवर रणगाड्यांची मुसंडी मारल्यावर पाकिस्तानची फारच पंचाईत झाली. जम्मू-काश्मीर आणि लद्दाख या तीनही आघाड्यांवर पाकिस्तानी सेना मार खात माघार घेत आहेत. भारतीय सेना पुढे सरसावत आहेत, पण विजयी सेनेला तिचे राजकीय नेतेच सांगत आहेत की, सबूर, फार पुढे जाऊ नका. किती विनोदी दृष्य आहे ना ! यालाच इंग्रजीत ’ब्लॅक हयूमर’ म्हणत असावेत.
अखेर निरुपायाने 31 डिसेंबर 1947 रोजी रात्री 11.59 वाजता म्हणजेच 1 जानेवारी 1949 उगवत असताना पाकिस्तानने युद्धबंदी मान्य केली. मात्र व्याप्त प्रदेशातून त्याने आपली सेना कधीही मागे घेतली नाही. आजही नाही. आणि तरीही जनमत चाचणी किंवा सार्वमत यांचे तुणतुणे तो सदैव वाजवत असतो. आजही वाजवत असतोच.