विश्वदिशादर्शक ‘एकात्म मानव दर्शन’

12 May 2025 15:04:58
@मंगलप्रभात लोढा
कॅबिनेट मंत्री, महाराष्ट्र सरकार
Pandit Deendayal Upadhyaya 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिझम, साम्यवाद, समाजवाद या विचारांच्या संभ्रमात, भारत दिशाहीन होत असताना मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात 1965 मध्ये ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वज्ञानावर त्यांनी आपले विचार प्रकट केले होते. त्या तारखा होत्या 22 ते 25 एप्रिल आणि साठ वर्षानंतर याच तारखांना त्याच ऐतिहासिक वास्तूत पंडितजींच्या विचारांना युवा पिढीसमोर मांडण्यात आले.
सामान्य माणसाला विभक्त ठेवून कोणत्याही विकासाची परिभाषा होऊ शकत नाही. विकासासोबतच सृष्टीचे संवर्धन आणि प्राणिमात्रावरील सहिष्णुता त्यात अंतर्भूत असली पाहिजे, असा विश्वकल्याणाचा मौलिक विचार जगाला देणारे पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ तत्त्वाचा अनुयायी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. ‘एकात्म मानव दर्शन’ हा जीवनाकडे, जीवनशैलीकडे पाहण्याचा समग्र दृष्टिकोन आहे.
 
 
मानवी जीवनाचे ध्येय केवळ भौतिक सुख मिळवणे नसून शरीर, मन, बुद्धी आणि आत्म्याचा संतुलित विकास. या मानव दर्शनात पंडितजींनी ‘अंत्योदय’ ही संकल्पना मांडली असून शेवटच्या माणसापर्यंत विकासाची गंगा पोहोचली पाहिजे. पंडितजींची ही संकल्पना केवळ तत्कालीन घोषणा नसून एक व्यापक मूल्याधारित तत्त्वज्ञान आहे. याच तत्त्वावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या विविध कल्याणकारी योजना राबवत असून खर्‍या अर्थाने अंत्योदय साधत आहेत. प्रधानमंत्री जनधन योजना, आवास योजना, मुद्रा योजना, श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, आयुष्यमान भारत यासारख्या असंख्य योजना या अंत्योदयाच्या द्योतक आहेत.
 
Pandit Deendayal Upadhyaya 
 
पंडितजींनी मांडलेला पर्यावरणीय दृष्टीकोनही महत्त्वाचा आहे. प्रकृतीशी सुसंवाद ठेवणार्‍या जीवनशैली, वसुधैव कुटुंबकम्, सर्वे भवंतु सुखिनः यांसारख्या मूल्यांवर आधारित आहे. भारताने या मूल्यांना आंतरराष्ट्रीय मंचावर प्रभावीपणे मांडण्यास सुरुवात केली असून भारत पर्यावरण संतुलनातही अग्रणी भूमिका घेत आहे.
 
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी स्वातंत्र्योत्तर काळात कम्युनिझम, साम्यवाद, समाजवाद या विचारांच्या संभ्रमात, भारत दिशाहीन होत असताना मुंबईतील माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात 1965 मध्ये ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वज्ञानावर त्यांनी आपले विचार प्रकट केले होते. त्या तारखा होत्या 22 ते 25 एप्रिल आणि साठ वर्षानंतर याच तारखांना त्याच ऐतिहासिक वास्तूत पंडितजींच्या विचारांना युवा पिढीसोबत मांडताना मला अत्यधिक आनंद अनुभवता आला.
 
Pandit Deendayal Upadhyaya 
 
पंडितजीच्या विचारांचे सध्या जगभरात संशोधन होत आहे. भारताला अध्यात्मिकतेसोबत शक्तिशाली राष्ट्र म्हणून जगात नवी ओळख मिळत आहे. या पार्श्वभूमीवरच नव्या पिढीत ‘एकात्म मानव दर्शन’ हे विचार रुजवण्यासाठी शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म मानव दर्शन’ हीरकमहोत्सव समितीची स्थापना केली. या समितीचे अध्यक्षपद भूषवताना मोठी जबाबदारी पार पाडावी लागणार याची पूर्ण जाणीव आहे. विशेष म्हणजे पंडितजींनी महाराष्ट्राच्या पवित्र भूमीत विश्वकल्याणाचा मार्ग जगाला सांगितला.
 
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारात राष्ट्रप्रेमासह, संपूर्ण विश्वातील मानवाच्या सर्वांगीण विकासाचे मर्म जपले गेले आहे. त्यांच्या विचारांचा खजिना व्याख्यानमालेच्या माध्यमाने जनतेसमोर उघडता आला, याचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे. हा विचारांचा ठेवा श्रोते नक्कीच आयुष्यभर जपून ठेवून ते विचार अंगिकारतील असा आम्हाला विश्वास आहे.
 
 
रुईया महाविद्यालयात 22 एप्रिल रोजी तामिळनाडूचे महामहिम राज्यपाल आर.एन. रवी यांच्या प्रमुख उपस्थितीत पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘एकात्म मानव दर्शन’ हीरकमहोत्सव व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. तर महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम सी.पी. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेत व्याख्यानमालेच्या समारोप झाला. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी विशेष उपस्थिती लाभली.
 
Pandit Deendayal Upadhyaya 
 
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ या तत्त्वाला अनुसरून आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, संघाचे सह सरकार्यवाह डॉ. कृष्ण गोपालजी, केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल, संघाचे सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य, भाजपचे राष्ट्रीय संघटन महामंत्री व्ही. सुरेश तसेच सह संघटनमंत्री शिवकुमार यांनी सहभाग घेऊन पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांना उजाळा दिला.
 
 
पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे विचार हे भारताच्या सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरेवर आधारित असून, जागतिक समस्यांवर प्रभावी उपाय दर्शवितात. समाजव्यवस्था, अर्थव्यवस्था, पर्यावरण, शाश्वत विकास यांच्याशी संबंधित त्यांच्या मानवनिष्ठ दृष्टिकोनाचे आजच्या काळातही महत्त्व अधोरेखित होते.
 
 
व्याख्यानमालेचा समारोप नाही तर हा आरंभ आहे. यापुढे वर्षभर पंडित दीनदयाळ ‘एकात्म मानव दर्शन’ महोत्सव समिती राज्यभर विविध उपक्रम हाती घेऊन पंडितजींचे विचार समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचवणार आहे. पंडितजींच्या ‘एकात्म मानव दर्शन’ तत्त्वावर आधारित पुस्तिका प्रत्येक जिल्ह्यात वितरीत करण्यात येणार आहे. साठ लाख लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा संकल्प आहे असून ते साठ लाख लोक पुढे राज्यातील सहा कोटी जनतेपर्यंत विचार पोहचवतील असा आमचा ठाम विश्वास आहे. विकसित राष्ट्र होण्याच्या भारताच्या प्रक्रियेला ‘एकात्म मानव दर्शन’ चा आधार असून याच एकात्म मानव दर्शन तत्त्वाला अंगिकारून या प्रक्रियेत आपले योगदान देऊया.
Powered By Sangraha 9.0