संघ शाखा म्हणजे सत्याची साधना

विवेक मराठी    03-May-2025   
Total Views |

rss
‘सत्यमेव जयते’ सारख्या सनातन सत्यावर ज्यांचा विश्वास आहे त्या सर्वांचा हा देश आहे. सत्याचा अविरत चाललेला शोध हे हिंदू भूमीचे वैशिष्ट्य आहे. हिंदू संघटन लक्ष्य मानणार्‍या रा. स्व. संघाची शाखा म्हणजे या सनातन सत्याची साधना करण्याचे स्थान होय.
शाखा जिथे लावायची असते त्याला आपण संघस्थान म्हणतो, खेळाचे मैदान म्हणत नाही. संघस्थान तयार करावे लागते. शाखा म्हणजे भारतमातेची आराधना होय. जिथे भारतमातेची प्रार्थना होणार व जिथे अज्ञानाचा अंधकार दूर करणार्‍या भगव्या ध्वजाची स्थापना करायची आहे ते स्थान कसे असावे? मंदिरासारखे स्वच्छ, सडासंमार्जन केलेले, रेखांकन (रांगोळी) केलेले असावे.
मंदिरात जिथे विग्रह (मूर्ती) असते. त्याला ‘गर्भगृह’ म्हणतात. मंदिर कितीही मोठे असले तरी गर्भगृह छोटे असते. गर्भगृहात देवपूजा करणारा पुजारी जाऊ शकतो. अन्य सर्वांंनी निश्चित केलेेल्या कठड्यापासून दर्शन घ्यावयाचे असते.
 
 
संघस्थान म्हणजे भारतमातेचे मंदिर. साफसफाई करून ध्वजमंडल (गर्भगृह), संपतरेखा (स्वयंसेवकांना उभे राहण्याची सीमारेषा), मुख्यशिक्षक, कार्यवाह यांच्या उभे राहण्याची स्थाने, पादत्राणे ठेवण्याची व वाहने लावण्याची जागा असे सर्व निश्चित करावे लागते. नवीन आलेल्या व्यक्तीला सर्व रचना पाहून नियमपालनाची इच्छा होते.
 
देवपूजा करायची म्हटले की पूजासाहित्य तयार ठेवावे लागते. शिट्टी, रिंग, दंड, व्हॉलीबॉल इ. कबड्डी व खो-खोचे रेखांकन हे उत्साह वाढवणारे पूजासाहित्यच आहे.
 
शाखेची वेळ झाली की, मुख्यशिक्षकाची एक लांब एक आखूड-एक लांब एक आखूड (--0--0) अशी शिट्टी वाजते. शिट्टी वाजविण्यात मुख्यशिक्षकाचे कौशल्य प्रकट होते. परस्पर कुजबूज बंद होते. पूर्ण शांतता पसरते. सर्व हालचाल बंद होते. सर्व स्वयंसेवक सावधान होऊन पुढची सूचना (आज्ञा) ऐकण्यास तयार असतात. अग्रेसरांचे ऐटीत चालणे, संपत रेषेवर संपत होणे, मुख्यशिक्षकांचे त्यांना अंतर देणे, या सर्व गोष्टी परिणाम करीत असतात. नवागताला लगेच कळते की आपण एका विशेष स्थानी आलो आहोत. केवळ खेळाच्या मैदानावर नाही.
 
प्रारंभालाच ध्वजमंडलामध्ये भगवा ध्वज लावला जातो. ध्वज लावणारा स्वयंसेवक ध्वजमंडलात जाऊ शकतो. सर्व शाखा भगव्या ध्वजाला प्रणाम करते. संघशाखेवर भगव्या ध्वजाला गुरुस्थानी मानले आहे. श्रीगुरू म्हणजे अंधकार दूर करून सत्याचे ज्ञान देणारा. श्रीगुरुची महिमा गाणारे अनेक श्लोक धार्मिक ग्रंथात आढळतात. एका श्लोकाची सुरुवातच ‘ज्ञानमूलं गुरुमूर्ती’ अशी केली आहे. श्रीगुरुच्या केवळ दर्शनाने सत्याचे ज्ञान होते. ज्ञान म्हणजे सत्याचेच ज्ञान. असत्याच्या भाराभार माहितीला कोणी ज्ञान म्हणत नाही.
 
 
rss
 
भगवा ध्वज जेवढा प्राचीन त्याहून जास्त प्राचीन आपला भारत आहे. भारतीय मनाला भगव्या रंगाचे आकर्षण नेहमीच राहिले आहे. भगवा रंग सूर्याच्या आगमनाचा संंदेश देणारा रंग आहे. भारत नेहमीच ज्ञानाचा उपासक राहिलेला आहे. ज्ञानाचा म्हणजेे सत्याचा उपासक भारत आहे. स्वाभाविकपणे स्वतंत्र भारतानेे सरकारी मुद्रा म्हणून, घोेषवाक्य म्हणून ‘सत्यमेव जयते’ स्वीकारले आहे.
 
भारत ‘हिंदूभूमी’ असल्यामुळे हिंदूंच्या स्वभावाप्रमाणे ’सत्यमेव जयते’ हे त्रिकालाबाधित सत्य स्वतंत्र भारत सरकारचे घोषवाक्य झाले. पण ‘भारत हिंदूभूमी आहे’, असे म्हटल्यावर काही लोक चक्रावून जातात. ही हिंदूभूमी आहे तर मुसलमानांची, ख्रिश्चनांची नाही का? असा प्रश्न उभा केला जातो. ‘सत्यमेव जयते’ सारख्या सनातन सत्यावर ज्यांचा विश्वास आहे. त्या सर्वांचा हा देश आहे. सत्याचा अविरत चाललेला शोध हे हिंदूभूमीचे वैशिष्ट्य आहे. इथल्या ऋषी परंपरेने, महात्मा गौतम बुद्धांनी, महावीरांनी, श्री गुरुनानक देवांनी, महात्मा बसवेश्वरांनी, नायन्मार आळ्वारांनी सत्याची माहिती शिष्यांना दिली. सत्य शोधण्याचा मार्ग सांगितला. पण स्वतः तपसाधना करून सत्याचे ज्ञान (साक्षात्कार) करून घ्यायला सांगितले. म. गौतम बुद्धांचे प्रसिद्ध वचन आहे ‘अप्प दिपो भव’.
 
हिंदू ज्ञानप्रतिभेची दोनच उदाहरणे घेऊ. याच्याशी तुलना करण्यासारखे जगातले सूत्र विद्वानांनी दाखवावे.
1) एकं सत् विप्रा: बहुधा वदन्ति।
2)ॐ द्यौ शान्तिरतरिक्षं शान्ति: । पृथ्वी शान्तिराप:
शान्तिरोषधय: शान्ति: वनस्पतय: शान्तिविश्वे
देवा: शान्तिब्रर्र्ह्म शान्ति:। सर्वं शान्ति:
शान्तिरेव शान्ति: सा मा शान्तिरेधि।
ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥
 
हिंदू, हिंदुत्व हे येथील अखंड ब्रह्माडाला गवसणी घालणार्‍या ज्ञानपरंपरेचे नाव आहे. वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, बुद्ध त्रिपिटक, जैन आगम, तिरुक्कुरल आदि. सर्व ग्रंथातून याच ज्ञान परंपरेची महिमा गायली आहे. साधु, संत, कीर्तनकार, प्रवचनकार हेच ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत लोकभाषेमध्ये पोहोचवण्याचे कर्तव्य पार पाडत असतात.
 
हिंदूभूमीतील सामान्य माणसाचे भावविश्व येथील ज्ञानपरंपरांशी जोडले गेले आहे. त्याला अध्यात्मिक ज्ञानपरंपरा म्हणता येईल. त्याला हिंदू, हिंदुत्व या शब्दाचे काही वावडे नाही. समाजापासून कोणीतरी वेगळे आहोत, असे स्वतःला मानणार्‍या काही अतिबुद्धिमान लोकांच्या गळी हिंदू, हिंदुत्व, हिंदूभूमी, हिंदुराष्ट्र हे शब्द उतरतच नाहीत. त्यांना ‘हिंदू’ या शब्दाचीच अ‍ॅलर्जी आहे. संघ सर्वसामान्य लोकांना बरोबर घेऊन पुढे चालला आहे. रेखांकन करून ‘भारत’ नकाशावर दाखवता येईल. हिंदुराष्ट्र गुणवाचक शब्द आहे. रेखा काढून कागदावर दाखवता येणार नाही. भारताचा नकाशा काढून ‘भारत हिंदुराष्ट्र आहे’ असे लिहिता येईल.
 
भारत हिंदुराष्ट्र आहे म्हणून पुण्यभूमी आहे. जगात पुण्यभूमी म्हणण्यालायक कोणती भूमी असेल तर ती एकच भारत! असे स्वामी विवेकानंद विश्वासाने म्हणत. भारत हेच आराध्य दैवत व्हावे. ज्ञानाचा उदय सर्वप्रथम भारतात झाला, असे त्यांचे ठाम मत होते.
 
ध्वज प्रणामानंतर संघशाखेत शारीरिक तसेच बौद्धिक कार्यक्रमांची रचना असते. सहभागी घटकांमध्ये स्वयंसेवकत्व विकसित व्हावे याचा प्रयत्न होतो. सत्यनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा हे दोन गुण स्वयंसेवकांमध्ये प्रकर्षाने असलेच पाहिजेत. (सत्यनिष्ठा म्हणजे ‘सत्य काय आहे’ हे जाणून घेण्याची इच्छा.) स्वयंसेवकाला माणसे जोडता आली पाहिजेत. सर्वांना बरोबर घेऊन काम करता आले पाहिजे. भारतमातेबद्दल अव्यभिचारी निष्ठा हवी, असे परमपूजनीय श्रीगुरुजी म्हणत असत.
 
व्यभिचार नाही. कुठलीच अपेक्षा नाही. इदं राष्ट्राय। इदं न मम॥ भारतमाता सर्वांची कुलदेवता आहे. वक्तृत्व, वाग्विभव, मानसन्मान, सत्कार-पुरस्कार भारतमातेच्या चरणी अर्पण. स्वामी विवेकानंद म्हणत,“भारतमातेच्या बलिवेदीवर बळी देण्यासाठीच तुमचा जन्म झाला आहे.”
 
संघकार्याचा आधार स्वयंसेवकच आहे. स्वयंसेवकांची संख्या सतत वाढत राहावी, हाच संघशाखा चालवण्याचा उद्देश असतो. सध्या 80 हजार शाखा आहेत. त्या सर्व स्वयंसेवक निर्माण व्हावेत हाच प्रयत्न करीत असतात. शरीरामध्ये रक्तकोशिकांचे जे काम तेच स्वयंसेवकांचे राष्ट्रशरीरामध्ये आहे. रक्तकोशिकांचे एक निश्चित प्रमाण शरीरामध्ये असावे लागते. ज्यामुळे शरीर आरोग्यसंपन्न, सुदृढ, कार्यक्षम राहते. राष्ट्रशरीरामध्ये स्वयंसेवकांचे काही निश्चित प्रमाण असले तर राष्ट्रशरीर आरोग्यसंपन्न, सुदृढ व कार्यक्षम राहील. समृद्धी व सुख (परम्वैभव) प्राप्त करू शकेल. स्वयंसेवकांच्या निश्चित प्रमाणामध्ये आवश्यक असलेल्या संख्येला संघ प्रार्थनेमध्ये ‘विजेत्री च न: संहता कार्यशक्ति:’ असे म्हटले आहे. स्वयंसेवकांची संघटित, विजयशालिनी कार्यशक्ती उभी करण्याचे प्रयत्न निरंतर चालू आहेत. शाखा-विस्तार, स्वयंसेवक-विस्तार हेच काम संघाला करावयाचे आहे.
 
 
संघशाखा म्हणजे भक्ती, ज्ञान, कर्म यांचा त्रिवेणीसंगम आहे. रोज एकदा त्रिवेणीसंगमामध्ये स्नान करावे. भारतमातेची अनन्य भक्ति, भारत हिंदुराष्ट्र आहे याचे ज्ञान व ‘विजेत्री च न: संहता कार्यशक्ति:’ उभी करणे हे कर्म.
 
स्वातंत्र्यासाठी चाललेल्या सर्व प्रकारच्या आंदोलनामध्ये डॉ. हेडगेवारांचा सहभाग उठून दिसणारा होता. व्यंकटेश थिएटरमध्ये त्यांच्या सत्कारार्थ झालेली सभा खूपच गाजली. पं. मोतीलाल नेहरू, विठ्ठलभाई पटेल, हकीम अजमल खान, डॉ. अन्सारी, राजगोपालाचारी मंचावर उपस्थित होते. ‘ब्रिटिशांच्या जाचातून देश स्वतंत्र केला पाहिजे’ हा विषय सार्वत्रिक झाला होता. पण स्वातंत्र्य म्हणजे काय? स्वतंत्र म्हणजे काय? राष्ट्र म्हणजेे काय? राष्ट्रीयत्व म्हणजे काय? यावर गंभीर चर्चा कुठेच दिसत नव्हती. राष्ट्र व राष्ट्रीयत्वाच्या पायावर स्वतंत्रता आंदोलन उभे केले पाहिजे असे त्यांना वाटू लागले. म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणून एक नवीन काम त्यांनी प्रारंभ केले.
 
संघात सहभागी होणार्‍या प्रत्येक घटकाची भूमिका स्पष्ट असावी, म्हणून एक प्रतिज्ञा पंधरा वर्षावरील वयाच्या स्वयंसेवकास घ्यावी लागत असे. ‘सर्वशक्तिमान श्री परमेश्वरास व आपल्या पूर्वजांस स्मरून मी अशी प्रतिज्ञा करतो की, आपला पवित्र हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू समाज यांचे संरक्षण करून हिंदुराष्ट्राला स्वतंत्र करण्यासाठी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घटक झालो आहे.’ कुठे अस्पष्टता ठेवली नाही. हिंदुराष्ट्र हा शब्दप्रयोग कशाची प्रतिक्रिया म्हणून प्रयोगात आणलेला नाही. हिंदू संस्कृती हा या राष्ट्राचा प्राण आहे. ‘भारत हिंदुराष्ट्र आहे’, असे म्हणत असताना भारताची तुलना इस्लामी, ख्रिश्चन व ज्यू देशांशी करून चालणार नाही.
 
वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, गीता, आगम, त्रिपिटक, श्रीगुरुग्रंथसाहेब या सर्व ज्ञान-भांडाराला आपला म्हणणारा एक जरी हिंदू जिवंत आहे तरी हे हिंदुराष्ट्र आहे. मुसलमान असण्या-नसण्याचा हिंदुराष्ट्राशी काही संबंध नाही. हिंदू हे येथील सनातन ज्ञानपरंपरेचे नाव आहे, जी सर्वांची मंगलकामना करते.
 
डॉक्टरांनी ‘हिंदू’ या शब्दाबद्दल कुठेही वितंडवाद घातला नाही. आपल्या शुद्ध, निर्मळ अंत:करणाने, स्नेहाने सर्वांना भेटत गेले. मोठ-मोठ्या लोकांची अंतःकरणे त्यांनी जिंकली. 1940 पर्यंत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला डॉक्टरांच्या देखत अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झाले. डॉ. हेडगेवार संतहृदयी महापुरुष होते म्हणून हे घडले. सर्वांप्रति मंगलभावना असलेली व्यक्तीच असे युगप्रवर्तक कार्य करू शकते. डॉक्टरांनी हिंदुराष्ट्रावर कोणताही पांडित्यपूर्ण ग्रंथ लिहिला नाही. भक्ती, ज्ञान व कर्म याची निरंतर साधना करण्याकरता संघशाखा दिली. सत्याची जाण सर्वांना करून देण्याचे हे ईश्वरी कार्य आपण करीत आहोत.
 
‘अध्यात्म म्हणजे काय?’ या प्रश्नाला स्वामी विवेकानंदांनी सहज उत्तर दिले आहे की, ‘दुसर्‍याची चिंता करणे म्हणजे अध्यात्म’. संघशाखेत दुसर्‍याची चिंता करण्याचे संस्कारच होतात. जस-जसा गटनायक, गणशिक्षक, मुख्यशिक्षक, कार्यवाह असा स्वयंसेवक काम करीत जातो तस-तसा त्याचा दुसर्‍याची चिंता करण्याचा परिघ वाढतच जातो. शिशु, बाल, तरुण, प्रौढ प्रत्येक स्वयंसेवकाची चिंता करण्याचा स्वभाव संघशाखेत तयार होतो. ‘मी शाखेत गेल्यामुळे राष्ट्र सामर्थ्यसंपन्न होईल’, या धारणेनेच स्वयंसेवक शाखेत येत असतो. कोणत्याही स्वार्थाचा विचार मनाला स्पर्श करत नाही. अध्यात्म साधनेचा सहज मार्ग म्हणजे संघशाखा आहे.
संघशाखेसंबंधी चालू असलेल्या लेखमालेचा समारोप संत तुकारामांच्या वचनाने करणे उचित वाटते.
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती। देह कष्टविती उपकारें॥
भूतांची दया हे भांडवल संतां। आपुली ममता नाही देहीं॥

मधुभाई कुलकर्णी

राष्‍ट्रीय स्वयंसेवक संघ केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आहेत...