दिव्यांगांना समाजाच्या मूळ प्रवाहात सामील व्हायचे असेल तर आधी दिव्यांगधारा सक्षम होणे महत्त्वाचे, दिव्यांगधारेला (दिव्यांगांना आणि त्यांच्या परिवारांना) समाजात प्रतिष्ठा मिळणे महत्त्वाचे! आदर्श ठेवला अष्टावक्राचा! सद्गुणांची प्रतिष्ठापना केली आणि पूजेचे साहित्य होते संवाद आणि अभिव्यक्ती! मनामनांना या पूजेमध्ये जोडायचे, समाज दिव्यांगांच्या दृष्टीकोनातून एकसंध करायचा. एकमेकांच्या गुणांचे, कौशल्यांचे मुलांनी कौतुक करायचे आणि म्हणूनच अभिव्यक्तीला प्रोत्साहन द्यायचे. या विचारमंथनातून सुरू झाले दिव्यांगधारा प्रतिष्ठान हे सेवाकार्य!
दिव्यांगांसाठी वेगळे व्यासपीठ न करता सक्षम (कोकणप्रांत), संस्कारभारती, क्रीडाभारती, अखिल भारतीय कीर्तन संस्था-दादर, अशा अखिल भारतीय स्तरावरच्या सेवाभावी संस्थांच्या समन्वयाने संवाद सेतू स्पर्धा व अन्य प्रकल्प दिव्यांगधारा प्रतिष्ठानाने संपन्न केले.
संवाद सेतू 2020 विकासाची किल्ली - दिव्यांग आणि खास करुन कर्णबधिर यांना श्रवणर्हासामुळे ऐकू येत नाही. त्यामुळे घरांतल्यांबरोबर सहज स्वाभाविक बोलणे खुंटते. एकटेपणा येतोच परंतु भाषाविकास, संकल्पना विकासच मंदावतो. काही वेळा तर थांबतोच म्हणून संकल्प मनात आला दिव्यांगधारा सक्षम करायची असेल तर संवादसेतू उभारणे, निर्माण करणे गरजेचे आहे. ज्यावर्षी दिव्यांगधारा प्रतिष्ठान सुरू झाले तो काळ होता 2020! काळ पण कठीण होता. कोरोना महामारी सुरू झाली होती. विद्यार्थी घरात कोंडला गेला होता. सर्वसामान्य मुलांसाठी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू होते तसेच दिव्यांगांसाठीही सुरू होते. पण दिव्यांगांना मोबाईलवर शिक्षण घेणे खूप कठीण जात होते. दिव्यांगांचे बोलण्यासाठी आधार जे शिक्षक, कलाशिक्षक मुलांना भेटू शकत नव्हते. दिव्यांग अगदीच एकटे पडले होते आणि म्हणूनच समाजमनाला दिव्यांगांच्या दु:खाबद्दल, अडचणीबद्दल जागरुक करण्यासाठी यूट्युब चॅनल सुरू केला. दिव्यांगांच्या पालकांच्यात प्रथम उत्साह, जोश निर्माण केला पाहिजे. त्यांना पाल्यासाठी, अधिक संवेदनाक्षम आणि प्रयत्नशील झाले पाहिजे यासाठी पहिली स्पर्धा चालू झाली.
संवादसेतू 2020 ही स्पर्धा म्हणजे पालक-मूल यांच्यातील संभाषणाचा-गप्पांचा व्हिडिओ करून पाठविणे. त्यानंतर दरवर्षी एक प्रकल्प आणि स्पर्धा असा नेम सुरु झाला. स्पर्धा या 5 प्रकारच्या प्रवर्गासाठी जागतिक अपंग दृष्टीकोन समोर ठेवून सुरू झाल्या. कर्णबधिर, मतिमंद, गतिमंद (शाळा कार्यशाळा ) अंध, ऑटीस्टीक, अनाथाश्रम व सर्वसामान्य विद्यार्थी या स्पर्धांमध्ये सामील झाले.स्पर्धा या मंचिय कला, क्रीडा, संवाद, साहित्य ह्यांच्याशी निगडित व पालक-विद्यार्थी दोघांसाठी आयोजित केल्या.
सर्व विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे निकष सारखेच परंतु प्रत्येक प्रवर्गासाठी स्वतंत्र बक्षिसे - दिव्यांग झाले म्हणून काय झाले त्याचे परीक्षण ही सर्वसामान्य मुलांप्रमाणेच झाले पाहिजे हा अट्टाहास! त्यासाठी प्रथितयश, जाणकार कलाकाराला परीक्षक म्हणून निमंत्रित केले. संस्कार भारतीचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ कलाकार पाचही वर्ष परीक्षक म्हणून निमंत्रित केले. प्रमुख अतिथी म्हणूनही योगेश सोमण, आशिष शेलार, आशुतोष गोखले, प्रमोद पवार, साथ फाऊंडेशनच्या संस्थापिका सुजाता रायकर, पद्मश्री पुरस्कार प्राप्त उदय देशपांडे, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त गणेश देवरुखकर असे मान्यवर दिव्यांगधाराच्या व्यासपीठावर हजेरी लावून गेले. परीक्षणासाठी दिव्यांगांना व सर्वसामान्यांना समान निकष ठेवले. परंतु बक्षिसे प्रत्येक प्रवर्गाला स्वतंत्र दिली. त्यामुळे कोणावरच अन्याय झाला नाही.
पाचवर्षांचा स्पर्धा व दिव्यांगधाराच्या इतर प्रकल्पांचा अभ्यास करुन विचारवंतांना एक शिक्षक म्हणून काही खालीलप्रमाणे निरीक्षणे
एक आगळावेगळा बक्षिस समारंभ - या बक्षिस समारंभात सेवाव्रतींचा आणि दिव्यांगांच्या यशस्वी मातांचा सत्कार करण्यात आला. तसेच यशस्वी आणि आपल्या कलेच्या आधारावर स्वावलंबी आणि स्वयंपूर्ण व्यक्तिमत्व म्हणून विकसित झालेल्या दिव्यांगांना व त्यांच्या माता-पित्यांना विशेष निमंत्रित म्हणून व्यासपीठावर बसविण्यात आले.
सेवाव्रती सत्कारामध्ये पद्मश्रीप्राप्त उदय देशपांडे सर - समर्थ व्यायाम मंदिर (विश्वस्त) विश्वगुरु मल्लखांब प्रशिक्षक, द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त गणेश देवरुखकर अध्यक्ष क्रीडा भारती मुंबई यांच्या हस्ते दिव्यांगधारा आणि सक्षम कोकणप्रांत यांच्या तर्फे सन्मानपत्र आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचवेळी मल्लखांब पटू कोमल पाटील या2024 च्या ऑलिम्पिकमध्ये प्रात्यक्षिकामध्ये सामील झालेल्या अंध युवतीने व्यासपीठावर प्रात्याक्षिक करून दाखविले.
आव्हान समाजासाठी - सर्वसाधारण समाजासाठी हे आव्हान आहे की, समाज कशा-कशा प्रकारे दिव्यांगांना मूळ प्रवाहात म्हणजेच 12 महिने चालणार्या वेगवेगळ्या कार्यक्रमात कशा रितीने आपलं समजून सामावून घेतो. दिव्यांग, समाजाच्या विविध घटकांमध्ये समरस झाला पाहिजे, दिव्यागांच्या सुद्धा शैक्षणिक-सामाजिक आणि व्यावसायिक आव्हानांबद्दल आणि यशाबद्दल माध्यमांनी आपलं दायित्व निभावले पाहिजे.
गुणवान दिव्यांगांसाठी आपण काही प्रयत्न करू शकतो. उदा., बक्षिसपात्र विद्यार्थ्यांचे किंवा पथनाट्यांचे, गणेश उत्सव-नवरात्र-वार्षिक स्नेहसंमेलन यामध्ये कार्यक्रम ठेवणे. हे प्रयत्न करत असतांना कर्णबधिरांसाठीची साईन लँग्वेज, समोरून स्पष्ट बोलणे, थोडे सावकाश व मोठ्या आवाजात बोलणे हे तंत्र सर्वसामान्य कलाकार विद्यार्थ्याला अवगत होईल. अंधासाठी आवश्यक ब्रेल लिपी, त्याला वाचून दाखवणे, स्पर्शाने काही विषय शिकवणे ही तंत्रे सर्वसामान्य विद्यार्थी शिकेल. मतिमंदांसाठी थोडे सावकाश त्यांच्या कलाने शिकवणे त्याला कळेल. दिव्यांग व सर्वसामान्य विद्यार्थी यांच्यातील हे संवादाचे आदानप्रदान अभ्यास विषयांपेक्षा कला विषयातून चांगल्या प्रकारे व सहज होऊ शकते. कारण दिव्यांग हा एखाद्या तरी कलाकौशल्य किंवा एखाद्या अभ्यास विषयामध्ये अपेक्षेबाहेर, नियमाबाहेर जाऊन निपुण असतोच. दिव्यांगांमधील व सर्वसामान्य मुलांमधील निपुणता शोधा, ज्याच्या आधारावर हे विद्यार्थी तरुणपणी स्वावलंबी होऊ शकतील!
आवाहन व्यावसायिकांसाठी- शिक्षण आणि कला कौशल्याच्या आधारावर देशपांडे सरांनी जसे अनेक मल्लखांबपटू तयार केले तसेच अनेक सर्वसामान्य व दिव्यांग प्रशिक्षकही तयार केले. अशाच प्रकारे प्रत्येक व्यावसायिकांनी आपल्या कार्यकाळात समकलाकौशल्य निपुण सर्वसामान्य होतकरू तसेच काही दिव्यांग कुमारकुमारींना, युवकयुवती यांना प्रशिक्षण द्यावे आणि पुढे जाऊन व्यवसाय किंवा तत्सम कामाची संधी काही वर्ष उपलब्ध करून द्यावी. म्हणजे वयाच्या 20 ते 25 वयाच्या दरम्यान त्याला/तिला आपले भविष्य सकारात्मक पध्दतीने आखता येऊ शकेल.
कलामिलाप - कलामिलाप कार्यक्रमातून शाळांना-शासनाला थोडं जागरुक करावेसे वाटते. शाळांमध्ये पूर्वप्राथमिक -प्राथमिक इयत्तेत तेच-तेच हस्तकला-चित्रकला विषय घेतले जातात. त्यात एक तर वैविध्य पाहिजे आणि हे विषय शिकवायला किंवा काही वेगळ्या तंत्राची ओळख करून द्यायला महिन्यातून 2/3 वेळा असे कला निपुण दिव्यांग विद्यार्थी शाळेनी निमंत्रित करावेत. पुढे माध्यमिक विभागामध्ये शाळांमध्ये कार्यानुभव विषय असतो. काही ठिकाणी याच विषयाची छान कार्यवाही होते तर काही ठिकाणी काहीच रचनात्मक होत नाही.
कर्णबधिरांच्या संस्थेत 15 वर्ष कलाकौशल्य प्रशिक्षण यशस्वी प्रयोग- प्राथमिक ते उच्च माध्यमिक विभागापर्यंत कलाकौशल्य अभ्यासक्रमाची व्यवस्थित कार्यवाही, अभ्यासविषय आणि कला विषयांची सुंदर सांगड आम्ही 15 वर्ष चेंबूर कॉलनी युवक मंडळाच्या अनिल असरानी व्होकेशनल ट्रेनिंग इन्स्टिट्युटमध्ये रोचिराम टी थधानी हायस्कूलच्या सहयोगाने, समन्वयाने व सहकार्याने निष्णात, कलाकुशल, कलाशिक्षकांच्या योगदानाने 8 वी इयत्तेच्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी 4 शासनाचे व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रम कर्णबधिरांसाठी, बॉर्डरलाइन मेंटली रिटार्डेड व लर्निंग डिसॅबिलिटी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राबवले गेले. एक प्रयोग म्हणून ते यशस्वीही झाले व काही दिव्यांगांना या कोर्सेसच्या आधारावर अॅडव्हान्स कोर्स करता आले व रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या.
कर्णबधिर हा बौद्धिक-भावनिक-मानसिक स्तरावर सर्वसामान्य मुलांसारखाच असतो. ऐकू न येण्यामुळे वरील घटकांवर अभिव्यक्तीच्या दृष्टीने फरक पडतो. कारण विषय ग्रहण करण्याची प्रक्रिया या विद्यार्थ्यांसाठी खूपच कठीण व आव्हानात्मक असते. असे असून सुद्धा त्यांना उत्साही, ग्रहणशील, ताजेतवाने ठेवणे हे पालक-शिक्षक-संस्थाचालक यांचे कौशल्य असते.
महाराष्ट्र व्यवसाय शिक्षण मंडळाचे 3 अभ्यासक्रम व जन शिक्षण मंडळाच्या 1 कोर्ससाठी आमची संस्था रजिस्टर्ड होती. या अभ्यासक्रमांमुळे व कलाकौशल्य विषयांच्या रचनात्मक आयोजनामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता कला प्रशिक्षण, व्यवसायपूर्व प्रशिक्षण व्यवसाय प्रशिक्षण, उद्योगपूर्व प्रशिक्षण व उद्योजक प्रशिक्षण अशा रचनेमुळे मुलांमध्ये स्वावलंबन, अर्थार्जन, कार्यप्रवणता या दृष्टीने सकारात्मक झाली. अन्यथा या प्रयोगापूर्वी मुले अशा गैरसमजुतीत होती की, इयत्ता 10वी किंवा 12वी शिक्षणानंतर आपल्याला प्रतिष्ठित समजल्या जाणार नोकर्या मिळतील. आता या प्रयोगामुळे विद्यार्थी त्यांच्या जोडीने पालकही उद्योग प्रवण झाले.
याचाच अर्थ असा की सर्वसामान्य अथवा कर्णबधिर किंवा अन्य दिव्यांग यांना शाळेच्या प्राथमिक स्तरापासून नियोजनबद्ध 1/2 कला विषयांचा अभ्यासक्रम पायरी-पायरीने विकसित केला तर कुमारवयापर्यंत इयत्ता 10 वी पर्यंत मुलांची शालेय अभ्यासक्रम व कला याबाबतची सकस-संतुलित मानसिकता तयार होऊ शकते आणि संस्था-शिक्षक-कलाशिक्षक-पालक यांच्या एकत्रित प्रयत्नांनी कर्णबधिरांना व्यवसायाभिमुख करण्याचा इतिहास घडू शकतो.
- शुभदा ओक-सातपुते
लेखिका दिव्यांगधारा प्रतिष्ठान संस्थेच्या
संस्थापिका आहेत.