भारताने फणा उगारलेला आहे

विवेक मराठी    07-May-2025   
Total Views |
India Airstrike
भारताने आता फणा उगारलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विश्वासाचे सार्थक केले आहे. मोदी शांत बसणार नाहीत, ते वचपा काढतीलच, याची प्रत्येक भारतीयाला खात्री होती. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नितीचा अवलंब करून पाकिस्तानला घाबरवून सोडले. भारत हल्ला करणार म्हणून पाकिस्तानाने सैन्याची जमवाजमव केली. सैन्य सीमेवर आणले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या डोक्यावरून क्षेपणास्त्रे सोडली.
 
पहलगाम हल्ल्यात शुभम द्विवेदी यांना ‘तू हिंदू आहेस का’ असे विचारले आणि त्याच्या पत्नी ऐशान्यासमोर डोक्यात गोळी घालून त्याची हत्या केली. हा प्रसंग नुसता डोळ्यासमोर आणला तरी अंगावर काटा उभा राहतो. त्या शूर हिंदू वीराची पत्नी ऐशान्या ऑपरेशन सिंदूर नंतर टीव्ही चॅनेलवर आत्मविश्वासपूर्ण शब्दात सांगते की, आम्हाला खात्री होती की, नरेंद्र मोदी याचा बदला घेतील. पाकिस्तानच्या नऊ दहशतवादी तळांवर 7 मे रोजी 24 क्षेपणास्त्रे डागून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐशान्या आणि पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या सर्वांच्या हत्येचा आंशिक बदला घेतला आहे.
 
 
‘ऑपरेशन सिंदूर’ हे नावदेखील अतिशय सार्थकआहे. ज्या भगिनींच्या कपाळावरील कुंकू पुसले गेले, त्याचा सूड भारतीय जवानांनी अचूकपणे घेतला आहे. भारतीय सैन्यदलाने आपल्या सिद्धतेची आणि मारकतेची ओळख केवळ पाकिस्तानलाच नाही तर जगाला करून दिली आहे. प्रत्येक भारतीयाचा ऊर आज अभिमानाने भरून आलेला आहे. माणस मारण्यात आनंद नसतो, देशाचा सन्मान जपण्यात आनंद असतो.
 
नमस्कार सुहृदहो !
 
 
रावणाने सीतेचे हरण केले, हनुमंताने लंकेलाच आग लावून टाकली, ही आपली परंपरा आहे. तिचे विस्मरण झाले. आणि या विस्मरण काळात जगात आपली ओळख भित्रा देश, शांततेच्या पोकळ गोष्टी करणारा देश, सामर्थ्याचा अभाव असलेला देश अशी झाली. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ही ओळख पुसून टाकायला पाहिजे होती, दुर्दैवाने तसे झाले नाही. देशात राजकीय परविर्तन झाले. राष्ट्रीय सन्मान आणि मानचिन्हांची प्राणप्रतिष्ठा होऊ लागली आणि अल्पावधीतच देश आपल्या सामर्थ्यानिशी उभा राहिला.
आम्ही कोणावर आक्रमण करणार नाही, कुणाचा प्रदेश आम्हाला नको, नागरिकांना आम्ही ठार मारणार नाही, परंतु आमच्यावर कुणी हल्ला केला तर त्याला जशाच तसे उत्तर देऊ. चीनलाही उत्तर दिले गेले आणि यापूर्वी पाकिस्तानलाही उत्तर दिले गेले होते. आणि आता सणसणीत उत्तर देण्याची सुरूवात झालेली आहे.
 
 
 
रावणाने सीतेचे हरण केले, हनुमंताने लंकेलाच आग लावून टाकली, ही आपली परंपरा आहे. तिचे विस्मरण झाले. आणि या विस्मरण काळात जगात आपली ओळख भित्रा देश, शांततेच्या पोकळ गोष्टी करणारा देश, सामर्थ्याचा अभाव असलेला देश अशी झाली.
 
 
सहनशक्तीच्या मर्यादा असतात. जो देश सगळे अपमान मुकाटपणे सहन करतो, त्या देशाला जगात काही किंमत राहत नाही. त्या देशाचे नागरिकदेखील हताश होतात. इतकी वर्षे आपण पाकिस्तानी आंतकवाद्यांकडून मारल्या गेलेल्या भारतीयांची प्रेते मोजत बसत होतो. ऑपरेशन सिंदूरनंतर आंतकवाद्यांची प्रेते मोजण्याचे काम पाकिस्तानकडे आले आहे. सामर्थ्य हेच जीवन असते, दुर्बळता पाप आहे अशी आपली शास्त्रवचने आहेत, देवदेखील दुर्बलांचे रक्षण करीत नाही. आत्मरक्षणासाठी शक्ती असणे जितके आवश्यक आहे तितकेच शक्तीचे प्रदर्शन करणे आवश्यक असते. नागाने फणाच काढला नाही तर शेंबडी पोरंदेखील त्याला काठीने जखमा करतात. भारताने आता फणा उगारलेला आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या विश्वासाचे सार्थक केले आहे. मोदी शांत बसणार नाहीत, ते वचपा काढतीलच, याची प्रत्येक भारतीयाला खात्री होती. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नितीचा अवलंब करून पाकिस्तानला घाबरवून सोडले. भारत हल्ला करणार म्हणून पाकिस्तानाने सैन्याची जमवाजमव केली. सैन्य सीमेवर आणले. भारतीय सैन्याने पाकिस्तानी सैन्याच्या डोक्यावरून क्षेपणास्त्रे सोडली. परिणाम आपण टीव्हीवर पाहिला आहे. नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र नितीचादेखील हा प्रचंड विजय आहे. चीन, अमेरिका आणि युनोबदेखील पाकिस्तानबरोबर नाहीत रशिया असण्याचा प्रश्न येत नाही. दहशतवादाविरूद्धची लढाई, नरेंद्र मोदी यांनी जागतिक केली आहे. ऑपरेशन सिंदूरचे यश या सर्व सार्वत्रिक नितीचा परिणाम आहे. आपले भाग्य असे की, राष्ट्रीय नेतृत्वाचा अभिमान बाळगावा असा कणखर आणि खंबीर नेता आपण पाहतो आहोत.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.