बहुआयामी, दूरदर्शी डॉ. के. कस्तुरीरंगन

विवेक मराठी    07-May-2025
Total Views |
@रुचिरा सावंत

Dr. K. Kasturirangan 
भारतीय अवकाश विज्ञान कार्यक्रमाला वेगळी दिशा देणारे, भारतीय अवकाश विज्ञान संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्षपद भूषविलेले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे अध्यक्ष, पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार म्हणून कार्य केलेले आणि केवळ राष्ट्रीय नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांचा भाग असणारे, आपलं संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी, विज्ञानसेवेसाठी वाहिलेले, ज्येष्ठ दूरदर्शी वैज्ञानिक पद्मविभूषण डॉ. के. कस्तुरीरंगन. अलीकडेच त्यांचं निधन झालं. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा घेतलेला हा धावता आढावा.
डॉ. कस्तुरीरंगन यांचं कर्तृत्व वादातीत आहे. त्यांच्या अनुभवांचे सर्वच आयाम थक्क करणारे आहेत. शुक्रवार,25 एप्रिल 2025 रोजी वयाच्या चौर्‍याऐंशीव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला आणि केवळ भारताने नव्हे तर विश्वाने एक दूरदर्शी नेतृत्व गमावलं. पण खरं सांगू तर, त्यांच्या कर्तृत्वाच्या आणि योगदानाच्या न संपणार्‍या यादीइतकंच किंवा त्यापेक्षा जास्तच सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे त्यांचं एक निखळ, निःस्पृह व्यक्ती असणं.
 
 
2018 च्या सप्टेंबर महिन्यातील तो एक गडबडीचा दिवस होता. त्यादिवशी सकाळीच मी, सानिका आणि श्रीनी माझ्या आवडीच्या माणसांच्या यादीमध्ये पुढे जाऊन अग्रस्थानी येणार असलेल्या त्या व्यक्तीला रिसिव्ह करण्यासाठी मुंबई विमानतळावर पोहोचलो. फार ऐकलं आणि वाचलं होतं मी त्यांच्याविषयी. माझ्या बालपणीच्या सुपरहिरोजच्या गोष्टींमधील एक सुपरहिरोच होते ते. त्यांच्या एकूण योगदानाविषयी माहिती असल्याने त्यांना भेटण्याआधीच भारावून गेले होते मी. आपण दस्तुरखुद्द डॉ. के. कस्तुरीरंगन यांना भेटणार आहोत या विचारानेच माझ्यातील ती छोटी रुचिरा हरखून गेलेली. त्यांचं एकूण कार्य, त्यांनी सहज हाताळलेले विविध विषय, अनेक क्षेत्रात त्यांनी केलेली मुशाफिरी पाहून माझ्या मनात त्यांची एक स्थितप्रज्ञ, गंभीर प्रतिमा होती. पण त्यांना भेटता क्षणीच त्यांच्या रूपात मला भेटले एक मायाळू ज्येष्ठ. प्रवासाचा शीण चेहर्‍यावर किंवा वर्तनातून मुळीच न दाखवता ते आमच्यासोबत इस्रो हाऊसला पोहोचले आणि आराम करण्याऐवजी गप्पा करत बसले. तंत्रज्ञान, प्रशासन अशा क्षेत्रांमधील दांडगा अनुभव असतानाही त्यांचं बोलणं क्लिष्ट नव्हतं. ते कोणत्याही वयाच्या, कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीसोबत सहज बोलू शकायचे. वयामधील आणि अनुभवातील दरी त्यांना सहज कमी करता यायची. हे करत असताना कुठेही मोठेपणाची झलक नसायची. माझं आणि सानिकाचं तेव्हा 20-21 वर्ष वय समजून त्यांनी किती सहज आमच्यासोबत त्यांच्या तरुणपणीच्या गोष्टी केल्या. माझ्यासोबत पुस्तकांच्या आणि अवकाशविज्ञानातील गप्पा करत असताना सानिकासोबत खेळांच्या क्षेत्रातील गोष्टी फार सहजतेने केल्या त्यांनी. सानिका नेमबाजीचा खेळ गांभीर्याने खेळते हे लक्षात आल्यावर तिला बंदुका आणि या नव्या गोष्टींविषयी आणखी माहिती सांगायला सांगितली. अगदी कुतूहलाने लक्षपूर्वक ते सारं ऐकत होते. प्रश्न विचारत होते. तिच्याकडून सगळं ऐकून घेतल्यावर म्हणाले, ज्या दिवशी तू आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळ खेळशील तेव्हा मला जरूर कळव. मी तेव्हा सगळ्यांना अभिमानाने सांगीन की, मला बंदुकांची आणि या खेळाची माहिती सानिकाने दिली होती. माझा खाण्याचा वेग पाहून अगदी घरातील आपल्या आजोबांनी नातवंडांना सांगावं तसं त्यांनी, जोवर तुम्ही दोघी खाणार तोवर मी गोष्टी सांगणार, अशी अट घातली. ती अट पूर्ण करण्यासाठी आणि त्यांच्याकडून जास्तीत जास्त गोष्टी ऐकत राहण्यासाठी आम्ही खात राहिलो. त्या दिवशी त्यांचा निरोप घेताना या श्रेष्ठ वैज्ञानिक नेतृत्वाची एक वेगळी प्रेमळ बाजू दिसली. आयुष्यात त्यांना एकदा भेटता आणि अनुभवता आलं हीच आमच्यासाठी फार मोठी गोष्ट होती. त्या भेटीमध्ये त्यांनी भारतीय अवकाश विज्ञान संस्थेचे दीर्घकाळ अध्यक्ष म्हणून त्यांना आलेले काही अनुभव सांगितले. भारताला चांद्रमोहिमांसाठी तयार करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांविषयी सांगितल.
 
 
भारतीय अवकाश मोहिमांचे पिता म्हणून ओळखले जाणारे डॉ. साराभाई हे डॉ. कस्तुरीरंगन यांचे गुरू. डॉ. कस्तुरीरंगन यांची आपल्या या गुरूंवर अपार निष्ठा. आणि डॉ. कस्तुरीरंगन भारतीय अवकाश कार्यक्रमाला एक वेगळी दिशा देणार असा डॉ. साराभाई यांना विश्वास. त्यांच्या शेवटच्या संवादातील डॉ. साराभाई यांचं शेवटचं वाक्य होतं - ठरपसरप! र्धेी ुळश्रश्र से र्ीि ळप श्रळषश. झालं. या शिष्याने अगदी मनोभावे आपल्या गुरूंनी दाखवलेल्या विश्वासावर, त्यांना आपण दिलेल्या वचनावर विश्वास ठेवला आणि इस्रो व भारतीय अवकाश मोहिमांची दिशा खर्‍या अर्थाने बदलली. त्यांच्या याच विश्वासामुळे अनेकांना अशक्य वाटणार्‍या स्वप्नांच्या दिशेने भारताने आगेकूच केली.
 
 
2024 मध्ये जेव्हा आपण पहिला राष्ट्रीय अवकाश दिन साजरा केला तेव्हा एका महत्त्वाच्या मुद्याची जाणीव मला प्रकर्षाने झाली. 90 च्या दशकात भारतीय नागरिकांना, टॅक्सपेअर्सना इंटर प्लॅनेटरी मोहिमांसाठी तयार करणं, त्यांचं भविष्यातील महत्त्व समजावून सांगणं ही सोप्पी गोष्ट मुळीच नव्हती. अशा प्रकारचा प्रस्ताव मांडणारे ते पहिले व्हिजनरी होते. हे दिव्य कार्य त्यांनी कसे पार पाडले असेल? न राहवून आमच्या या पहिल्या भेटीदरम्यान मी त्यांना विचारलेल्या प्रश्नाची मला आठवण झाली. त्यांच्या उत्साही आणि प्रेमळ स्वभावाला अनुसरून त्यांनी मला काय उत्तर दिलं होतं माहितीये? ते म्हणाले,‘मी कायम डॉ. साराभाई यांनी मला जे सांगितलं, माझ्यावर जो विश्वास दाखवला त्यावर मनापासून विश्वास ठेवला. तो विश्वास खरा ठरवण्यासाठी पुरेपूर मेहनत घेतली. रुचिरा, अशा निर्णयांमध्ये तुम्ही काळाशी सुसंगत असणं (रीलेव्हंट) असणं हाच पाया असतो. भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, तो येणार्‍या प्रत्येक पिढीला आपला वाटावा यासाठी, तो रीलेव्हंट रहावा यासाठी चांद्रमोहीम ही आवश्यकता होती. त्याला पर्याय नव्हता. मी केवळ त्यावर विश्वास दाखवला आणि तो विचार सर्वांना पटवून दिला. लक्षात ठेव, एखाद्या मोठ्या मिशनच्या पूर्ततेसाठी मिशनला कुणा व्यक्तीपेक्षा, स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देऊन रीलेव्हंस टिकवून ठेवणं महत्त्वाचं. मी फक्त माझी जबाबदारी पार पाडली.’ त्या दिवशी किती सहज त्यांनी मला मोठ्या लक्ष्यासाठी काम करत असताना आपल्यातील ’मी’ दूरवर पार्क करून मोहिमेशी एकरूप होणं किती सहज शक्य आहे याचा परिपाठ दिला होता.
 
 
काही महिन्यांनी ते टीआयएफआरमध्ये येणार होते. यावेळी त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता,‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’. याच शैक्षणिक धोरणाचं अध्यक्षपद त्यांनी भूषविलं होतं. जेव्हा श्रीनीजवळ त्यांनी मला भेटीसाठी निरोप पाठवला आणि या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं तेव्हा माझा विश्वासच बसेना. त्या दिवशी कार्यक्रमावेळी मला पाहताक्षणीच त्यांनी माझं नाव घेतलं आणि मला एखादं मोठं बक्षीसच मिळाल्यासारखं वाटलं. त्यानंतर ते भेटत राहिले. कधी टीआयएफआरमध्ये. कधी इस्रो हाऊसमध्ये. कधी रमण रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये. कधी एखाद्या कार्यक्रमात, कधी चाणक्य विद्यापीठात, कधी जेवणासाठी एखाद्या क्लब/हॉटेलमध्ये तर कधी त्यांच्या घरी. प्रत्येक भेटीत त्यांचं अमाप प्रेम, विलक्षण कर्तृत्व, अगणित अनुभव, तल्लख बुद्धिमत्ता यांचं दर्शन घडत राहिलं. नव्याने स्तिमित करत राहिलं. माझ्या सुदैवानं सात वर्षांचा स्नेह लाभला मला त्यांचा. आणि प्रत्येक भेटीमध्ये, प्रत्येक संवादावेळी ते नव्याने भेटत राहिले. आणखी आवडू लागले.
 
 
पस्तीस वर्षांहूनही अधिक काळ त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेसोबत काम केलं. त्यापैकी जवळपास 10 वर्षं ते या संस्थेचे अध्यक्ष होते. भारतीय अवकाश संशोधन संस्थेची दिशा बदलण्याच्या लक्षणीय योगदानाच्या जोडीनेच त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनेक भूमिका बजावल्या. सहा वर्षे ते राज्यसभेचे सभासद होते. या अनुभवाचा उपयोग त्यांना धोरणनिर्मिती किंवा कायद्याचा विचार करून विविध क्षेत्रात कृती आराखडे तयार करण्यासाठी झाला. राष्ट्रीय नियोजन आयोगाचा ते भाग होते. तिथे विज्ञान व तंत्रज्ञान, कृषी आणि पर्यावरण या विषयांशी संलग्न धोरणे व कृतिआराखडे तयार करण्यासाठी ते मार्गदर्शन करत होते. त्यांनी काम केलेल्या शिक्षणसंस्थांची आणि शैक्षणिक उपक्रमांची यादी तर मारूतीच्या शेपटासारखी अगदी न संपणारी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ते प्रयत्नशील होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे अध्यक्ष म्हणून पुढील दोन दशकांसाठीची भारताची शैक्षणिक दिशा ठरवण्यासाठी त्यांचे योगदान अनन्यसाधारण आहे. माझ्या सुदैवाने त्यांच्यासोबत या सगळ्या विषयांवर दीर्घ चर्चा करण्याची संधी मला वेळोवेळी मिळत गेली.
 
आपला हा अनुभव तरुणांसोबत शेअर करण्यासाठी ते कायम उत्सुक असायचे. मागच्या कित्येक वर्षांत त्यांनी अनेक पदवी आणि पदव्युत्तर समारंभांमध्ये सहभाग घेऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपला अनुभव त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना हा कायम एक योग्य आणि महत्त्वाचा मार्ग वाटला. देशातील तीनही पद्म पुरस्कारांनी नावाजल्या गेलेल्या डॉ. कस्तुरीरंगन यांना मिळालेल्या राष्ट्रीय व आंतररराष्ट्रीय पुरस्कारांची आणि सन्मानांची यादी सुद्धा न संपणारी आहे.
 
 
डॉ. कस्तुरीरंगन यांच्या निधनाने भारतीय संशोधन संस्थांचा पाया रचणार्‍या इन्स्टिट्यूशन बिल्डर्सच्या युगाचा शेवट झाला असं म्हणता येईल. खरं सांगायचं तर त्यांच्या कर्तृत्वाच्या न संपणार्‍या यादीइतकंच आणि त्यांच्या एकूण योगदानाइतकंच किंवा त्यापेक्षा जास्तच सगळ्यांच्या लक्षात राहणार आहे त्याचं एक निखळ, निःस्पृह व्यक्ती असणं.
 
 
आमची शेवटची प्रत्यक्ष भेट आठवते आहे मला. डोक्यावर मायेने हात फिरवून मला पोटभर जेवू घातलेलं त्यांनी. निघताना माझे दोन्ही हात हातात घेऊन,‘रुचिरा, आपण पुन्हा केव्हा आणि कधी भेटणार आहोत हे मला माहीत नाही पण मला वाटतं तुला एक गोष्ट माहीत असली पाहिजे’, असं म्हणत त्यांनी मला दाखवलेला विश्वास आणि जे सांगितलं होतं ते मला लख्ख आठवतंय. ते ऐकता क्षणीच माझे डोळे भरून आले होते. ही शेवटची भेट असू नये अशी मनोमन प्रार्थना केली होती. पण तीच आमची शेवटची भेट ठरली.
 
 
त्यांच्या रूपात मला केवळ एक मार्गदर्शक नाही तर आपलं माणूस भेटलं. त्यांचं माझ्या आयुष्यातील स्थान आणि त्यांनी मला दिलेलं प्रेम याची तुलना कधीच कुणासोबतही करता येणार नाही. मी कायम त्यांच्या ऋणात राहणं पसंत करेन. आणि आमची ओळख करून देणार्‍या श्रीनीचे आभार तरी कसे मानू!
 
त्यांना दोन वचनं दिली आहेत मी. ती पूर्ण करण्यासाठी मी कायम धडपडेन इतकंच वचन मी त्यांना या निमित्ताने देईन.
 
Yes, this is a national loss. But it is a personal loss too!